11/30/2013

नाव नसलेले पदार्थ

खाणं अन् जगणं एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणता येतील एवढं आता माणसाचं जगणं अन् खाणं समृद्ध होत चाललं आहे. दररोजच्या आयुष्यात आपण अनेक पदार्थ खातो, अनेक चवी चाखतो. पदार्थ तेच असतात, कमी अधिक फरकाने चवही तिच असते. पण त्यातून प्रतीत होणार्‍या भावना प्रत्येकवेळी वेगळ्या असतात. त्यांना गंभीर अर्थ असतो पण नाव नसते. प्रत्येकानं आपापल्या जगात त्या-त्या प्रसंगी त्याच-त्याच पदार्थांना, त्याच त्या पेयाला विशिष्ट नाव दिलेले असते. पण प्रत्येकाचे अर्थ वेगळे असतात. म्हणूनच आजही असे शब्द लौकिकार्थाने सार्वत्रिक ठरलेले दिसून येत नाहीत.

थकून भागून घरी आल्यावर पत्नीनं घरात प्रवेश करताच अत्यंत लडिवाळपणे, प्रेमाने आपल्या पुढ्यात ठेवलेला चहाचा झुरका घेताना मिळणारी चव आणि त्या चहाचे नाव शब्दात मांडता येण्यासारखे नाही. मुलीच्या विवाहासंदर्भातील बैठकीच्या वेळी बापाच्या ओठांतून आत जाणार्‍या चहाचे नाव कदाचित त्या चहाला सामावून घेणार्‍या कपालादेखिल आजतागायत माहित पडले नसेल. तोच चहा जेव्हा कॉलेजच्या कॅटींनमध्ये आपल्या प्रिय  मित्रांसमवेत कॉलेजातील सौंदर्याच्या चर्चा तोंडी लावत उदरात जातो तेव्हा त्या चहाला काही नाव असेल काय? त्यातल्या त्याष चहाचे ‘देयक बिल’ जेव्हा आपला परममित्र ‘पे’ करतो; तेव्हा तो आनंद गगनात मावत नाही अन् तो चहा उदरात मावत नाही. तेव्हा त्या विशाल चहाला काही नाव देता येईल का? इथंसुद्धा चहा तोच असतो, चव तिच असते. भावना किती बदलतात ना.

कल्पना करा. सूर्यास्ताच्या वेळी तुम्ही घरी आलात. पत्नी बाहेर गेली आहे. घरी तुम्ही एकटेच आहात. तुम्हाला प्रचंड भूक लागलेली आहे. घरात काहीही पदार्थ तयार नाहीत. अशावेळी डबे चाचपत असताना तुम्हाला शुभ्र रंग धारण केलेला ‘मुरमुरे’ नावाचा पदार्थ दिसतो अन् तुमची भूक आणखीन चाळावेत. तुमच्याकडून त्या मुरमुर्‍यात तेल, मिरची अन् मीठ कधी एकरुप होतं ते तुमचे तुम्हालाच कळत नाही. पण हेच ‘एकरुप’ खुशखुशीत चवीसह तुमची भूक शमविण्याची ताकद धारण करतं. याला बहुतेक रसिक खवय्ये ‘तिखट-मीठ-मुरमुरे’ असे म्हणतात. पण या सर्वांचं मिळून एकत्रित बारसं अद्याप व्हावयाचे आहे. विकेंडच्या रात्री तुमचा कुटुंबासमवेत अचानक बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरतो. पत्नीने घरी रात्रीचा स्वयंपाक केलेला असतो. दुसर्‍या दिवशी  सकाळकरिता त्या पोळ्या तुमची वाट पाहत असतात. मग त्या पोळ्यांचे छोटे-छोटे तुकडे करून त्याला फोडणी टाकून खाताना तुम्ही ‘पोहे’ खाल्ल्याचा आनंद लुटता. पोह्यांचा आनंद देणार्‍या पोळीच्या त्या तुकड्यांना काही निराळं नावच नाही. आता खरेखुरे पोहेसुद्धा बघा किती भाव बदलतात, ते! रेल्वेच्या डब्यातून तुम्ही प्रवास करीत आहात अन् भल्या पहाटे ‘गरम गरम पोहे, गरम गरम पोहे’ म्हणून ओरडत फिरणार्‍या त्या विक्रेत्याला अडवण्याचा मोह तुम्हाला आवरत नाही. त्या प्रवासात तो आनंद देणार्‍या त्या गरम पोह्यांना काही नावच नाही. तेच पोहे जेव्हा ‘कांदा-पोहे’ कार्यक्रमात मुलीच्या थरथरणार्‍या हातातून सर्वांना वितरित केले जातात, मुलीच्या थरथरणार्‍या त्या हातातील पोह्यांना काही निराळे नाव असेल काय!  जगातील सर्व मित्र-मैत्रिणींना एक वेगळाच संदेश देणारे अन् इतिहासाच्या गर्भात घेऊन जाणारे सुदाम्याच्या पोह्यांनासुद्धा वेगळे असे नाव नाही. मैत्रिचे संबंध जाणणार्‍या त्या भावना मात्र किती बोलक्या आहेत ना!
तुम्ही बसने प्रवास करीत आहात. कोणत्यातरी गावात तुमची बस थांबली आहे. तुम्हाला फार तहान लागली आहे. अन् त्याचवेळी कंडक्टरने खाली न उतरण्याची सक्त ताकीद दिलेली आहे. अशावेळी बसच्या खिडकीतून ‘लेमनऽऽ गोळ्या, लेमनऽऽ गोळ्या’ म्हणून ओरडणार्‍या पोराकडे तुम्ही आशेने बघता. अन् त्याच्याकडून त्या गोळ्या घेऊन तोंडात टाकता. त्यावेळी तुमची तहान भागविणार्‍या त्या गोळ्यांना तुम्हाला ‘पाणी’ म्हणण्याचा मोह आवरत नाही.

केशवाय नम:, माधवाय नम:, गोविंदाय नम: म्हणत पळीभर पाण्याचं प्राषण केल्यावर ते पाणी आपल्या ठायी पाणी उरत नाही, पण त्याला नेमकं नावसुद्धा देता येत नाही. कारण त्या पाण्याला श्रद्धेचा काठ असतो.
चंद्राचं आणि माणसाच्या आयुष्याचं नातं अगदी जवळचं आहे. बालपणी चंद्र मामा भासतो, तर तोच चंद्र प्रेयसीसमवेत असताना वेगळाच संदर्भ घेऊन आपल्यासमोर उगवतो. कोजागिरीच्या रात्री तर त्याला काय मिजास चढतो ना. तो थेट आकाशातून आपल्या दुधाच्या भांड्यात अवतरतो. त्यानं आपल्या केवळ सावलीच्या अस्तित्वानं पावन केलेलं दुध आपण प्रसाद म्हणून पाशन करतो. दूध तेच असतं. चवही तिच असते. पण संदर्भ बदलतो मात्र कोजागिरीच्या दुधाला नेमकं नाव काही सापडत नाही. तोच चंद्र जेव्हा रमजानच्या रात्री उगवतो तेव्हा ‘रोजा’धरलेल्या कित्येक श्रद्धाळूंना तो जणू निरनिराळे पदार्थ खाण्याचे निमंत्रणच देतो. मग शिरखुरम्यावर ताव मारला जातो. दुधात निरनिराळे पदार्थ एकत्र करून तयार करण्यात आलेला शिरखुरमा म्हणजे दुधच.  इथंसुद्धा दूध तेच असते. पण दोन्हीही ठिकाणी श्रद्धेचे माध्यम बदलते. अंतिम भावना मात्र श्रद्धेचीच असते.

एखाद्याच्या लग्नाचे लाडू खाताना आपल्याला अतिशय आनंद होतो. त्या व्यक्तीच्या आनंदात समरस होऊन आपण लाडवांचा आनंद लुटतो. आणि हाच लाडू नावाचा पदार्थ आपण जेव्हा एखाद्या मृत व्यक्तीच्या गोडजेवणाच्या वेळी खातो, तेव्हा काय भावना असतात लिहिण्यापलिकडचंच आहे. या दोन्ही प्रसंगांच्या वेळी पदार्थ तोच असतो नावही तेच असतं पण प्रत्येकवेळी त्यांचा अर्थ बदलत जातो.

(चिंतन आदेश दिवाळी अंक २०१२)

11/29/2013

प्रिय मृत्युस..

जिवंतपणी तुला पत्र लिहिणं म्हणजे धैर्याचं काम आहे. अर्थात हे पत्र तुझ्यापर्यंत कोणत्या माध्यमातून पाठवावं अन् ते तुझ्यापर्यंत पोचेल की नाही, याचीदेखिल खात्री नाही. तरीसुद्धा कदाचित मी तुझ्याकडे आल्यावर तुला माझ्या पत्राची आठवण होईल म्हणून हा पत्रव्याप. तुझे स्मरण किंवा तुझी चर्चाही आम्हा पामरांना भयदायक, अशुभ वाटते. पण जिवंतपणी एकदा तुला तुझ्याबद्दलच्या आमच्या भावना सांगाव्यात म्हणून हा खटाटोप. पुन्हा मेल्यावर ‘अभिव्यक्ती’चं स्वातंत्र्यात तुझ्या राज्यात आहे की नाही कोणास ठाऊक?

कसा आहेस रे तू? लपून लपून राहतोस. कधी ‘धप्पा’ करशील अन् तुझ्या ‘राज्या’त घेऊन जाशील ठाऊक नाही. पण कधीतरी तू सर्वांना तुझ्या राज्यात घेऊन जातोस. आम्ही आपले आमच्याच राज्यात अधिकाधिक ‘जिवंत’ राहण्याचा प्रयत्न करतो. तू आपला आम्हा सर्वांना तुझ्या राज्यात घेऊन जायचा प्रयत्न करतोस. तुझं राज्य कसं आहे रे? तिथं सगळी माणसं असतील ना, सार्‍यांना वाटतं की तुझ्याकडं आलं की ‘मेलं’ पण ते खरचं मरत असतील का? बरं तू किती मोठा आहेस हे तुलादेखील ठाऊक नसेल. बघ ना, तुझ्याकडे कोणी आला की आम्ही त्याला ‘देव’ झाला म्हणतो. म्हणजे जसं परीसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं; त्याप्रमाणे तुझ्यास्पर्शाने आम्ही ‘देव’ होतो. शिवाय आम्ही ज्या ‘शांती’ला आयुष्यभर शोधायला प्रयत्न करतो, ती तुला भेटल्यावर आम्हाला मिळते. (अर्थात् तेव्हा ती आम्हाला नको असते) मग तरीसुद्धा तू सर्वांना नकोनकोसा का वाटतो? तुझ्याबाबतीतलं बाबा सारं सारं गूढच आहे आणि त्याची उत्तरं शोधणं हे त्यापेक्षा अधिक मोठं गूढ! एकवेळ सागराची खोली मोजणं शक्य आहे, आकाशाचं अनुमान करणंदेखील शक्य होईल पण तुझा शोध घेणं ‘जिवंत’पणी शक्य होणार नाही.

आम्ही कोणाकोणाला घाबरत नाहीत; फक्त तू सोडून. तू सत्य आहेस. अंतिम सत्य. तू देवत्त्व बहाल करणारा दाता आहेस. कारण आम्ही मरू नयेत म्हणून जगत राहतो. अर्थात तू जगण्याचं बळ आहेस. तू युगायुगांपासून आहेस. तुझ्याठायी कोणताही भेदभाव नाही. रंग, रूप, जात, धर्म, पंथ, संप्रदाय, वेष, भूषा-भाषा वगैरे कसले कसलेच भेदभाव असत नाहीत. जगात तू एकटाच असशील की जे तुला आवडतात, त्यांना तू क्षणार्धात आपल्या ‘कवेत’ घेऊ शकतोस. कदाचित तू अमर असावास. कारण जोपर्यंत जन्म आहे तोपर्यंत तू आहेस. तू आहेस म्हणून आम्हा माणसांना किमान एका ‘भीती’ची तरी जाणीव आहे. त्यामुळे तू अमर रहा, जन्म असेपर्यंत अन् मरेपर्यंत. बाकी प्रत्यक्ष भेटल्यावर सविस्तर बोलूच!

धन्यवाद

मरेपर्यंत तुझाच,

11/28/2013

आकाशाचं उडण्याचं निमंत्रण स्वीकारा!

तांबडं फुटतं, कोंबडं आरवतं, अंधार संपतो अन् प्रकाशणारा सूर्य उगवतो. शेतकरी रानाकडं जातो, विद्यार्थी ज्ञानाकडं जातो, व्यापारी धनाकडं जातो, अन् माणूस जगण्याकडं जातो. मित्रहो, हे असं युगान्युगांपासून चालत आलेलं जग युगान्युगांपर्यंत चालू राहणार आहे. हे सगळं चालू असतानाच इथं जगणार्‍या प्रत्येक माणसानं  स्वत:च्या विकासाचं, आत्मवैभवाचं स्वप्न बघण्यास काय हरकत आहे?

चला स्वप्नं पाहुयात अन् ती सत्यात आणण्याचा प्रयत्न करूयात. अर्थात् त्यात वास्तवता असायला हवीच. पण आपल्या खिशात फुटकी कवडी नाही अन् हा माणूस स्वप्नं बघायला सांगतो, असं समजत असाल तर आपण निरर्थक जगत आहोत असंच समजा. स्वप्नं बाजारात विकत मिळत नाहीत त्यामुळं खिशात पैसे असण्याची गरजच नाही. गरज आहे केवळ प्रबळ इच्छाशक्तीची अन् दुर्दम्य आत्मविश्वासाची!

संत तुकाराम महाराजांनी ‘सकाळासी येथे आहे अधिकारी, भेदाभेद भ्रम अमंगळ’ असे म्हटले आहे. प्रदेशाचा भेदाभेद करणं केव्हाही अमंगळच. मात्र, आपल्या जन्मभूमीचा अभिमान असणं हे मांगल्याचं लक्षण आहे. तरीसुद्धा माझा मराठवाडा म्हटलं की दुष्काळग्रस्त भाग, राजकीय-सामाजिक-आर्थिक-शैक्षणिक उदासिनता, उद्योग-धंद्यांनी फिरविलेली पाठ, ऊस तोडणारा कामगार वर्ग, गुणवत्ता नसलेला विद्यार्थी अशी ओळख कशी आणि का निर्माण झाली कळत नाही? सकारात्मक दृष्टी ठेऊन विचार करा.

निसर्गानं फिरविलेली पाठ हा काय तिथं राहणार्‍या लोकांचा दोष आहे? ‘पाणी’ नाही. त्यामुळे विकासाला गती नाही. गतीशिवाय विकास नाही. या न संपणार्‍या चक्राच्या विचारात मराठवाड्यातला ‘माणूस’ अडकत राहतो.  जरा, सुक्ष्म निरीक्षणं केलं तर असं दिसून येईल की अलिकडे परिस्थिती, व्यवस्था अन् काही प्रमाणात निसर्गातही बदल झालेला आहे. आता मनाला अन् मानसिकतेला बदलणं आवश्यक आहे. चला तर आपली मानसिकता बदलूयात!

आता तुम्ही म्हणाल की स्वप्नं बघायचं ठरवलं तर, रोज उठून स्वप्नं काय बघायचं? तेच ते अन् तेच ते! भल्या सकाळी तुम्ही उठायच्या आधी तुमची ‘माय’ रानात जायच्या तयारीत असते. रात्री उरकायला कितीही उशीर झाला तरी घरासाठी धडपडत असते. एका सकाळी लवकर उठून त्या ‘माय’ला थांबवून तिच्या डोळ्यात बारकाईनं बघा, तुमची स्वप्नं तुम्हाला तिथं दिसतील. तिनं आयुष्यभर खाल्लेला खस्ता, तुम्हाला सांभाळण्यासाठी घेतलेले कष्ट तिच्या दोन डोळ्यात दिसतील. तिथंच तुमचं स्वप्नं तुम्हाला दिसेल. ते इथं लिहिण्याची गरज नाही. दिवसभर कष्ट करून रात्री घरी आलेल्या तुमच्या बापाच्या जवळ घडीभर बसा. त्याच्या डोळ्यांत बघा, तुमच्या मागण्या पूर्ण करता करता, घर चालवण्यासाठी त्यानं डोळ्यांतच अडवलेले वेदनेचे अश्रू तिथं तुम्हाला स्पष्ट दिसतील. त्याच अश्रूंत तुमची स्वप्नं तुम्हाला भेटण्याची धडपड करत असतील.

त्या स्वप्नांना हेरा, आत्मभान जागृत करा, मी काहीतरी करू शकतो हे स्वत:ला हजार वेळा सांगा. शेवटच्या श्‍वासापर्यंत खूप शिकण्याची, भव्य-दिव्य कर्तृत्त्व गाजवून मोठ्ठं होण्याची जिद्द बाळगा! एवढी जिद्द बाळगलीत तर तुम्ही अर्धं युद्ध जिंकल्यातच जमा आहे. शाळेतल्या अन् कॉलेजातल्या शिक्षणापेक्षा आयुष्याच्या शाळेत अधिक शिकायला मिळतं, त्या शाळेत भरती व्हा, पैशांशिवाय! एकदा वैचारिक बैठक पक्की झाली की जिंकणं म्हणजे औपचारिकता ठरते.

लढण्यासाठी तुम्ही एकदा सिद्ध झालात की पुढे सारी सृष्टी तुम्हाला मदत करेल, तीच तुम्हाला कवेत घेईल, या दिशा तुम्हाला रस्ता दाखवतील, आकाश तुम्हाला उडण्याचं आमंत्रण देईल. मग पुण्या-मुंबईची भीती उरणार नाही. पैसे नसल्याची चिंता उरणार नाही. तुमचं पाऊल कोठेही थबकणार नाही. ती पावलं कधीच थकणार नाहीत. त्या पावलांमध्ये हत्तीचं बळ येईल.  मात्र कधीतरी मायची, बापाची आठवण येईल. पण हे सारं तुम्ही त्यांच्यासाठीच करीत आहात हे आठवल्यावर ती आठवण सुद्धा तुम्हाला लढायला बळ देईल.

प्रत्येकाची स्वप्नं वेगळी असतील. कोणी शिकून सवरून मोठा अधिकारी बनण्याची स्वप्नं बाळगत असेल, कोणी पायलट होऊन आपल्या गावावरून विमान उडवण्याचं स्वप्नं पाहत असेल, कोणी चित्रपटाचा हिरो बनण्याचं स्वप्न बाळगत असेल. कोणी नेता होऊन आपल्या गावाला सुधारण्याचं स्वप्नं पाहत असेल. स्वप्नं कोणतंही बघायला हरकत नाही, मात्र ‘त्या’ स्वप्नांवर जिवापेक्षाही अधिक प्रेम करण्याची क्षमता हवी. त्यासाठी प्रामाणिक आणि जीवापाड प्रयत्नांची पराकाष्ठा करा. कोणत्याही परिस्थितीत नितीमूल्य, संस्कार, प्रयत्न यांची साथ कधीही सोडू नका.

कल्पना करा एके दिवशी तुमच्या गावाकडं तांबडं फुटल, कोंबडं आरवल, अंधार संपेल अन् प्रकाशणारा सूर्य उगवेल. शेतकरी रानाकडं जाईल, विद्यार्थी ज्ञानाकडं जाईल. व्यापारी धनाकडं जाईल, अन् माणूस जगण्याकडं जाईल. तेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नापर्यंत पोचला असाल. 

11/26/2013

प्रेम कधीच "भंग' होत नाही!

प्रेम करणं खरचं एक विलक्षण अनुभूती आहे. ती एवढी विलक्षण आहे की आपलं प्रेम कोणी स्वीकारलं अथवा नाकरलं तरीसुद्धा आपल्या हृदयात प्रेमाची उत्पत्ती होत राहते. मात्र, भोगण्याच्या सुप्त इच्छेलाच जर का प्रेमासारख्या विशुद्ध अन्‌ पवित्र भावनेचे नाव दिले तर मात्र आपणांस प्रेमाचा खरा अर्थच कळला नाही. खरेखुरे प्रेम हे फुलांप्रमाणे असते. त्याच्यावर प्रेम करणाऱ्याला तर ते गंध देतेच, मात्र पायदळी तुडविणाऱ्यांना देखील तोच अन्‌ तेवढाच गंध देते. प्रेम करायचं असेल तर फुलांप्रमाणे करायला हवं. पायदळी तुडविल्यावरदेखील प्रेम करणारं.

आपण कोणावर तरी प्रेम करतो किंवा तसं आपल्याला वाटतं. त्यावेळी आपल्या मनात नेमक्या भावना काय असतात? त्या व्यक्तीवर आयुष्यभराकरिता स्वामित्व हक्क गाजविणं? त्या व्यक्तीचा देह भोगणं? तसं असेल तर प्रेमाच्या परिभाषेत प्रेमानेच आपलं प्रेम तपासून बघा. कारण या साऱ्या भावनांच्या पलिकडेच खरं प्रेम सुरू होतं.   त्या प्रेमाला वास्तवाचं भान असतं. नैतिकतेचं अधिष्ठान असतं. संवाद, सहवास, स्पर्शाची अपरिहार्यता त्यात नसते. आपण काळ्या-पांढऱ्या कातड्यावर किंवा एखाद्या अवयवावर प्रेम करतो का? आसक्ती, वासना अन्‌ भोग यापासून खरं "प्रेम' कैक मैल दूर असतं!

"प्रेमभंग' ही संकल्पना का व कशी रूढ झालेली आहे समजत नाही. कारण प्रेम हे अभंग आहे. प्रेम हे विशाल आहे. तेथे सर्वांना प्रवेश आहे. ते कधीच भंग पावत नाही. प्रेम युगानयुगांपासून चालत आलेलं आहे. नश्र्वर अन्‌ क्षणार्धात नष्ट होऊ शकणाऱ्या गोष्टी भंग पावतात... भंग पावतात त्या भोगण्याच्या, वासनेच्या क्रूर इच्छा... भंग पावते ती स्वार्थी वृत्ती... एकवेळ देहसुद्धा भंग पावतो. नष्ट होतो. मात्र "प्रेम' कधीच नष्ट होत नाही. अर्थात भंग होणारं प्रेम हे प्रेमच नसतं!

इतरांवर प्रेम करण्याचं सामर्थ्य तुमच्यात असणं हे सुद्धा मोठेपणाचं लक्षण आहे. प्रेम नाकारणं अथवा स्वीकारणं हे या जगातील सोपस्कर आहेत. प्रेमाचं जगच वेगळं असतं. "प्रेमभंग' झाला म्हणून प्रेम(?) मिळविण्यासाठी वाट्टेल त्या मार्गांचा अवलंब करणं म्हणजे केवळ वैचारिक क्षुद्रतेचं अन्‌ प्रेमाच्या अनुपस्थितीचं लक्षण आहे. प्रेम कधीही ओरबाडून घेता येत नसतं. ते हळूवारपणानं मिळत असतं. स्वत:च्या हृदयात प्रेमाची उत्पत्ती होणं अन्‌ त्यामुळे अवघ्या देहाला एक वेगळीच अनुभूती प्राप्त होणं म्हणजे खरं प्रेम असतं. ती अनुभूती भंग कशी पावेल?

11/22/2013

प्रेम करा प्रेम...



प्रेम हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यांसमोर केवळ प्रियकर अन्‌ प्रेयसी यांचे चित्र समोर उभे राहते. ते तर प्रेम आहेत; पण त्याशिवायदेखील अगणित जागी, साऱ्या चराचरामध्ये प्रेम आहे. प्रेम करणं म्हणजे केवळ देह भोगणं नव्हे तर प्रेम करणं ही विलक्षण अन्‌ अद्‌भूत अनुभूती आहे. ती फक्त अनुभवावी भोगाच्या पलिकडे जाऊन. जेथे दृष्टी टाकावी तेथे प्रेम आहे. अर्थात्‌ दृष्टी टाकण्यासाठी डोळे नाही तर नजर आवश्यक असते. प्रेमाची नजर... 

प्रेम कोणावर करावे? जन्म देणाऱ्या आईवर, घर आवरणाऱ्या ताईवर, संस्कार शिकवणाऱ्या आजीवर, गोष्टी सांगणाऱ्या आजोबांवर, कष्ट करणाऱ्या बापावर, "लढ' म्हणणाऱ्या मित्रांवर, भावावर, मावशीवर, मामावर, माणसामाणसांवर, पशु, पक्ष्यांवर प्रेम करता येतं, करायला हवं.

प्रेम जिवंत माणसावर तर करतातच, पण चैतन्यदायी निर्जिवावरसुद्धा करायला हवं. अंकुराला चैतन्य प्रदान करणाऱ्या काळ्याकुट्ट मातीवर प्रेम करायला हवं. प्राणवायूने अवघ्या मनुष्यजातीला जिवंत ठेवणाऱ्या झाडा-झुडपांवर वेलींवर प्रेम करायला हवं. पायदळी तुडवल्यावरदेखील आपल्या सुगंधाचा धर्म न सोडणाऱ्या फुलाफुलांवर प्रेम करायला हवं. शितलता देऊन शांत करणाऱ्या चंद्र-चांदण्यावर, उडण्याचं निमंत्रण देणाऱ्या निळ्याभोर नभावर, प्रकाशात नेणाऱ्या नभांगणातील सूर्यावर, साऱ्यांचे वजन पेलणाऱ्या पृथ्वीवर, पंखांमध्ये बळ आणून गगनभरारी शिकविणाऱ्या पक्षांवर साऱ्या साऱ्यांवर प्रेम करायला हवं. इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यावर, पराक्रमाचा इतिहास सांगणाऱ्या वीरांवर, दोन टोकांना जोडणाऱ्या सेतूंवर, घराची ऊब देणाऱ्या निर्जिव भिंतींवर, शिस्त शिकविणाऱ्या घड्याळाच्या टिकटिकवर, कोसळतानाही आपलं सौंदर्य तसूभरही ढळू न देणाऱ्या पाण्यावर, धरणीला अन्‌ आकाशला जोडणाण्या आभास निर्माण करणाऱ्या क्षितीजावर, इंद्रधनूच्या सप्तरंगावर, शांतपणे वाहणाऱ्या जलौघावर, उसळणाऱ्या लाटांवर, जीवनसत्त्व देणाऱ्या फळांवर अशी अगणित अगदी सारीच स्थळे आहेत ज्यावर प्रेम करायला हवं.

आपल्या आत राहून आपली दु:खं समजावून घेऊन; शेवटी हवं तेव्हा आपलं दु:ख घेऊन जाणाऱ्या स्वत:च्या अश्रूंवरदेखील प्रेम करायला हवं. कष्ट केल्याची पावती देणाऱ्या आपल्या स्वत:च्या घामावरदेखील प्रेम करायला हवं. अन्‌ घाम का गाळायचा हे सांगणाऱ्या आपल्या आतल्या इवल्याश्या हृदयावरदेखील प्रेम करायला हवं. स्वत:च्या प्रयत्नांवर, स्वत:च्या यशावर, स्वत:च्या प्रगतीवर, स्वत:च्या स्वत:वर अर्थात प्रेमाची सुरुवात स्वत:पासून करायला हवी. स्वत:वर प्रेम करायला हवं.

एकदा का डोळ्यांना नजर प्राप्त करून दिलीत की सारीकडे प्रेम दिसू लागेल. निरामय, निस्सीम, निरागस प्रेम. मग बघा सारी सृष्टी, अवघं विश्र्व, सारी माणसंदेखिल तुमच्यावर प्रेम करत आहेत, याची अनुभूती घेता येईल. चला, त्या विलक्षण अनुभूतीच्या दिशेनं जाऊयात, "प्रेम करूयात प्रेम' साऱ्यांवर...

मधुचंद्राच्या पूर्वसंध्येला नववराला नववधूने लिहिलेले पत्र... ‘प्रिये...’














प्रिये,

तुला आठवतं तुला बघायला मी जेव्हा पहिल्यांदा आलो होतो. तेव्हा तुझा तो लाजरा, बुजरा, अल्लड अन अवखळपणा. तुला माहितेय लाजाळूचं एक झाड असतं. त्याला सुंदर फुलं येतात. स्पर्श होताक्षणी ती फुलं आपल्या पाकळ्या मिटून घेतात. तू तर स्पर्शाशिवायच पाकळ्या मिटलेल्या लाजाळूच्या झाडासारखी त्यावेळी भासत होतीस.

आता नुकतेच तू उंबरठा ओलांडून आत आलीस. उंबरठ्यावरचे शुभ्र धान्याचे माप ओलांडलेस. तुझ्या नाजूक अस्तित्वानं ते मापसुद्धा हरखून गेलं. त्यातच त्यानं तुझा कोमल पदस्पर्श अनुभवला. काल कदाचित त्या मापाला या घरात राहण्याचं कृतार्थपण जाणवलं असेल. म्हणूनच त्यानं त्याच्यात सामावलेली समृद्धी कायम आपल्या घरात लोटण्याचा निश्‍चय केला असेल.

11/20/2013

प्रिय हृदयास....

 तू किती छोटा आहेस रे? अगदी लहान बालकाच्या हातात मावेल एवढासा? पण तुझ्यात केवढं सामर्थ्य आहे! तू रक्ताची निर्मिती करून आम्हा माणसाची सारी अवयवं जिवंत ठेवतोस. तर प्रेमाची निर्मिती करून आम्हा माणसांना जिवंत का रहायचं ते सांगतोस. तू सतत धडधडत राहतोस. तू सतत निर्मिती करीत राहतोस. अगदी आमचे सारे अवयव झोपलेले असताना देखील तू जिवंत असतोस. तू जेव्हा थांबतोस तेव्हा मात्र आमचा जिवंतपणा संपतो आणि हे शरीर निरुपयोगी ठरून जाळलं जातं, गाडलं जातं किंवा पुरलं जातं!

तू निर्माण केलेल्या रक्तामुळेच आमचं डोकं चालतं, पण आम्ही पामर कधी कधी तुझ्याऐवजी आमच्या डोक्याचं ऐकतो. ज्याला तूच रक्तपुरवठा करून कार्यरत ठेवलेलं असतं. बाकी सार्‍या अवयवांच्या बाबतीतही तसचं आम्ही तुझे कधीच ऐकत नाही. तुझा सल्ला हा प्रेमाचा असतो. ममत्त्वाने भरलेला असतो. तू कधी आम्हाला चुकीचं अथवा खोटं मार्गदर्शन करणार नाहीस असा विश्‍वास आम्हाला असतोच असतो. त्यामुळेच तर एखादी वाईट घटना आमच्या हातून घडून गेली की ‘तुझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं’ असं आम्हांस वाटून जातं.

खरंच अरे हृदया जर आमच्या सार्‍या शरीराऐवजी केवळ तूच असलास तर? फक्त तू बदामाच्या आकाराचा, प्रेमाच्या रंगाचा फक्त तू! हृदय... तिथं मग सारी हृदयं सारखीच असतील. तिथं कोणताही भेदभाव असणार नाही. जात, पात, धर्म, पंथ, संप्रदाय तर सोडाच पण अगदी लिंगाचा, रूपाचा अथवा सौंदर्याचासुद्धा भेद असणार नाही. ज्याला हवं तो हव्या त्या हृदयावर प्रेम करू शकेल. लिंगभेद नसल्याने शरीरसंबंध आणि त्याद्वारे येणार्‍या वासनेचाही प्रश्न उरणार नाही. फक्त हृदय असल्याने  शरीर चालविण्यासाठी रक्ताच्या निर्मितीचीसुद्धा गरज उरणार नाही. ज्यामुळे उदरनिर्वाहाची देखील गरज असणार नाही. कोणाला कशाचीच गरज नाही. अगदी प्राणवायूची देखील नाही. त्यामुळे रस्ते असणार नाहीत, वाहनं असणार नाहीत, अगदी कशाकशाचीच गरज उरणार नाही. फक्त हृदयं, बदामाच्या आकाराची... त्यांना कोणतेही अवयव असणार नाहीत. हवेत, पाण्यात कोठेच कसलेच प्रदूषण असणार नाही. सारीकडे शुद्ध अन् पवित्र प्रेमाचे वारे वाहतील. सारे हृदयं प्रेमाच्या सागरात डुंबून जातील. तिथं जन्म असणार नाही, मृत्यु असणार नाही. अगदी आकाशातील चांदण्यांसारखं जग. पण या जगात चंद्रसुद्धा असणार नाही. फक्त हृदयं. आणि एका हृदयाचं आयुष्य संपलं की त्याचा मोठा स्फोट होणार आणि त्यातून असंख्य हृदयं निर्माण होणार! प्रेम करणारी, शुद्ध, पवित्र अन् निर्मळ...

हृदया, जा तुला ज्यानं निर्माण केलं त्याला सांग की फक्त मलाच ठेवा. माणसाच्या रूपाचं प्रतिक बनून प्रेमाचा सागर निर्माण करण्यासाठी मला संधी द्या म्हणून त्याला सांग. मग बघ आम्ही फक्त तुझंच ऐकू... जगात सारीकडे शांतता असेल, प्रेम असेल.... फक्त प्रेम, प्रेम अन् प्रेम...!!!

बजावू माहिती अधिकार...


काळ बदलतो, नातं नाही...



फक्त प्रयत्न....


तुझ्या रक्ताचा थेंब...


हुशार आणि शहाणे...


जगतो कशासाठी?


काळ बदलतो नातं नाही...


जन्म आणि जात...




प्रयत्नांवर प्रेम करा...


11/07/2013

स्वप्नांचं जग...!!


स्वप्नांचं जग...!!



बघं ना आकाशात किती छान चंद्र आला आहे. त्याच्याभोवती किती किती मस्त चांदण्या आहेत. तो चंद्र एका रथात बसला आहे. त्या रथाला नाजूकश्या हरणांच्या दोन जोड्या आहेत. छोट्या छोट्या चांदण्या त्या रथाभोवती फिरत आहेत. आणि तो रथ आकाशातून आकाशात फिरत आहे. किती विलोभनीय दृश्य आहे ना हे. म्हणूनच तर बघ इतरांना दररोज आकाशातील फक्त तो चंद्र धावताना दिसत आहे. पण आपल्याला तर तो रथातून फिरताना भासत आहे. कारण आपण त्याच्याच जगात आहोत ना! पण मला तर बुवा या सा-या नजराण्यापेक्षाही इथे पृथ्वीवर माझ्या शेजारी बसलेली चांदणीच अधिक आवडते. ती किती गोड हसते. ती किती गोड लाजते. ती किती नाजूक आहे... लाल ओठांची चांदणी.. काळ्या केसांची चांदणी.. बघं बघं तू लाजलीस की नाही?


प्रेम नाकारलेल्या ‘प्रेयसी’ला पत्र...

प्रेम नाकारलेल्या ‘प्रेयसी’ला पत्र...



आज माझे शब्द हरवले आहेत. शब्दच काय मी स्वत:च हरवलो आहे. मात्र, तरीसुद्धा माझे चित्त स्थिर असून मी स्वत: स्थितप्रज्ञ आहे. अशा क्षणांना शब्द स्वत:च मला भेटायला आले आहेत. यावेळी एक गोष्ट मला स्पष्ट सांगावीशी वाटते की, काल जे बोलता आलं नाही ते मी आज लिहिणार आहे. अर्थात् यात माझा काहीही उद्देश्य नाही. हे कृपया समजून घ्यावे. गैरसमज करून घेऊ नये. पत्र वाचून झालं की विसरून गेलात तरी चालेल किंवा तसेच करणे अधिक सोयीचे होईल.


एका स्त्रीने अवघ्या मनुष्यमात्राला लिहिलेले पत्र....

एका स्त्रीने अवघ्या मनुष्यमात्राला लिहिलेले पत्र....


प्रिय माणसा,

देवांच्या राज्यात अग्रक्रमाने आमचा अर्थात स्त्री जातीला सन्मानाने वागवितात. म्हणूनच तर त्यांच्याकडील महत्त्वाचा कारभार अन्नपूर्णा, सरस्वती, धनलक्ष्मी आदी स्त्रीवर्गांकडे सोपविला जातो. दुर्दैवाने तुम्हा माणसाच्या  जगात आम्हाला हवा तेवढा सन्मान दिला जात नाही. आम्ही अगदी गर्भात असल्यापासून आमच्यावर कटू नजरेने पाहिलं जातं. जन्माला येणार्‍या अपत्याकडे माणूस म्हणून कधीच बघितलं जात नाही. तसं असतं तर मुलगा जन्मल्यावर पेढे आणि मुलगी जन्मल्यावर बर्फी अथवा जिलेबी असा भेदाभेद झालाच नसता. शिवाय गर्भातूनच आम्हाला ज्या देवाकडून आलो आहोत त्याच देवाकडे पाठविण्याचा प्रयत्न केला जातो.


11/06/2013

ग्रामविकासात संतांची भूमिका

ग्रामविकासात संतांची भूमिका



आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर लोकजागर या कार्यक्रमात ‘ग्रामविकासात संतांची भूमिका’ या विषयावर पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या माध्यम व प्रकाशन केंद्रातील व्यंकटेश कल्याणकर यांचे प्रसारित झालेले भाषणातील संपादित भाग.

राम राम गावकरी मंडळींनो,

चांगलीच थंडी सुटली आहे ना! तुम्ही दिवसभर शेतातून थकून भागून आला आहात. शेतातील काळ्या आईकडे तुम्ही नेहमीच चांगलं धान उगवण्याची विनंती करीत असता. ते धान म्हणजेच तुमचं वैभव असतं. त्यातून तुम्ही स्वत:चा विकास साधता. तुमच्या गावातील प्रत्येक घरातील प्रत्येकाचा असा विकास म्हणजेच तुमच्या गावाचा विकास. एका एका गावाने मिळून देश बनतो. म्हणजेच तुमच्या गावाचा विकास पर्यायाने आपल्या देशाचा विकासच असतो.

आता, तुमचा विकास साधण्याचा मार्ग कितीतरी शतकांपासून संतपदाला पोचलेले व्यक्ति सांगत आली आहेत. चला, तर मग संत मंडळींनी तुमच्या म्हणजेच तुमच्या गावाच्या विकासाच्या बाबतीत काय काय सांगितले आहे याची माहिती आज आपण घेऊ.



Related Posts Plugin for WordPress, Blogger...