12/26/2015

व्हॉटस्‌ ऍप'वर हे असले मेसेजेस?

कॉलेजची मित्रमंडळी बऱ्याच दिवसांनी एकत्र आली होती. बहुतेक जण नोकरी करणारे होते. बऱ्याच दिवसांनी भेट झाली होती. त्यामुळे निवांत गप्पा सुरु होत्या. तरीही मध्ये-मध्ये काहीजण व्हॉटस्‌ ऍप पाहत होते. बराच वेळ हा प्रकार चालला होता. त्यावर नाराजी व्यक्त करत एकाने झापायला सुरुवात केली. "आयला, आमी काय इथं मुडदे हायत का? जे आहेत त्यांच्यापेक्षा जे नाहीत त्यांच्याशीच गप्पा. काय राव? बंद करा की ते...‘, अशा शब्दांत नव्या विषयालाच सुरुवात झाली. "या फोनमुळं ना लय ताप झालाय राव!‘, आणखी एकाने सुरात सूर मिसळला. तो बोलू लागला, "परवा मला मेसेज आला काय तर "नोकरीमें मजा मारने के तरीके‘ कुणाला एवडा टाइम असल राव. सुचवायचं, टाईप करायचं आणि पाठवायचं?‘ त्यावर मार्केटिंगमध्ये काम करणारा एक मित्र म्हणाला, "व्हॉटस्‌ ऍप‘वर हे असले मेसेजेस म्हणजे धंदा हैं भौ धंदा... हे असले मेसेज कोणीतरी प्रमोशनसाठी वापरतात आणि पुढे कॉपी-पेस्ट करत आपल्यापर्यंत पोचतोत ते‘, त्याच्याशी मात्र फार जणांनी सहमती दर्शविली नाही. "छोड ना यार, गप्पा मारू‘, मगाशी फोनला टच करण्यात गुंग असणाऱ्यानेच शहाणपणाचा सल्ला दिला. 

"काही म्हणा राव पण या व्हॉटस्‌ ऍपमुळे टाईमपास होतो.‘ एकाने तक्रारीच्या सुरात सांगितले. तर त्यावर दुसऱ्याने तत्त्वज्ञान सांगायला सुरुवात केली, "माणसाचा स्वत:च्या मनावर ताबा नाही. त्याला एखादी गोष्ट मिळाली की ती ओरबाडून तिचा चोथा करायची सवयच असते. त्यामुळे एकवेळ अशी येते की ती गोष्टच नकोशी होते. मग ते व्हॉटस्‌ ऍप असो नाहीतर काहीही...‘ त्यानंतर बराच वेळ या विषयावर खलबते झाली. अगदी टोकाची मतं समोर आली. अर्थात जे बोलत होते ते सगळे रोजच "व्हॉटस्‌ ऍप‘चा वापर करत होते. "खाजगी चॅटिंगसाठी हे फार सोपे आणि फास्ट मेसेंजर ऍप आहे‘, असा विचार एकाने मांडला. तर त्यावर "अरे, भौ तुला माहितेय का खाजगी-बिजगी काहीही नसतं. तू व्हॉटस्‌ऍपवर ज्या गप्पा मारतो त्यावर कंपन्यांचं लक्ष असतं. तुझ्या गप्पांच्या विषयानुसारच तुझ्या फेसबुकवर जाहिराती दिसतात‘, पुन्हा मार्केटिंगवाल्याने ज्ञानदान केले. "अरे ते कसं शक्‍य आहे.?‘ एकाने आश्‍चर्य व्यक्त केलं. "टेक्‍नॉलॉजी है. टेक्‍नॉलॉजी यहॉं कुछ भी असंभव नही है।‘ मार्केटिंगवाला चांगलाच पेटला होता. 

एवढा वेळ शांत असलेल्या एका मित्राने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मौन सोडत म्हटले, "तुम्ही कोणत्याही गोष्टीला नावं ठेवू नका रे. त्यात बी पॉझिटिव्ह काय आहे तेवढं बघा.‘ पुढचे काही क्षण शांतता पसरली. "त्यात काय बे बी पॉझिटिव्ह. तू काय करतो सांग की? म्हणे बी पॉझिटिव्ह...‘, एकाने तीव्र शब्दांत टीकास्त्र सोडले. "आता हे बघा. आम्ही काही चांगल्या गोष्टी आमच्या व्हॉटस्‌ ऍप वरून करतो. सगळ्यात पहिली की शक्‍यतो "अनवॉन्टेड‘ वाटणारे मेसेजेस फॉरवर्ड करत नाहीत किंवा रिसीव्ह झाले तर तिथंच पाठवणाऱ्याला कडक सुनावतो. ग्रुपवर शक्‍यतो पॉझिटिव्ह चर्चा ठेवतो. गरज नसताना फालतू मेसेज फॉरवर्ड करतच नाही. कोणी चुकून केलाच तर मात्र त्याला गय नाही. त्याला त्याच्या चुकीची शिक्षा म्हणून दोन दिवस ग्रुपच्या बाहेरचा रस्ता दाखवतो. "पुन्हा अशी चूक करणार नाही‘ अशा अटीवर दोन दिवसांनी ग्रुपमध्ये घेतो. अर्थात कसलेही विनोद आम्ही सहन करतो. पण ते ही ठराविक मर्यादेपर्यंतच. उगाच एखाद्या पॉलिटिकल पार्टीला किंवा व्यक्तीला किंवा कोणाच्या भावना दुखावतील अशा मेसेजेस अजिबात थारा नाही.‘ सगळेजण जरा जास्तच मौन सोडलेल्या त्या मित्राला शांतपणे ऐकत होते. 

तो पुढे बोलू लागला, "ग्रुपमध्ये महिन्याला किंवा जेव्हा जमेल तेव्हा सर्वांच्या सोयीने एखाद्या विषयाच्या एक्‍स्पर्टला ग्रुपमध्ये इनव्हाईट करतो. काही तासांसाठी किंवा फार-फार तर दिवसभरासाठी. त्याच्याशी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतो. त्या त्या फिल्डची माहिती घेतो. प्रश्‍न विचारतो. आणि गप्पा झाल्या की ठरल्यावेळी आनंदाने निरोपही देतो. असंच आमच्या एका ग्रुपमधल्या मित्राला दुसऱ्या ग्रुपमध्ये एक दिवसासाठी ऍड करतो. सर्वांच्या ओळखी करून देतो आणि निरोप देतो. त्यातून ओळखी निर्माण होतात. खरंखुरं "सोशल नेटवर्किंग‘ घडतं. शिवाय एखाद्या गरवंताला आर्थिक किंवा अन्य काही मदत हवी असल्यास माहितीची शहानिशा करून त्याबाबतचा संदेशही अनेक ग्रुपवर पाठवतो.‘ एवढं बोलून तो थांबला. 

"तसं अवघड आहे. एवढा खटाटोप करणं. पण अशक्‍य मात्र नाही‘, असं म्हणत सर्वांनीच या पॉझिटिव्ह विचारांना पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला.
 
(Courtesy: eSakal.com)

12/02/2015

आम्हाला एक मुलगी मिळेना, अन्‌...

दिवाळीच्या सुट्या संपल्या. ऑफिस सुरु झालं. दिवाळी सेलिब्रेशनच्या गप्पा रंगल्या. "काय मग यंदा कर्तव्य आहे ना?‘. लग्नासाठी मुली पाहणाऱ्या सहकाऱ्याची चौकशी सुरु झाली. "नाही राव, काय मुलींच्या अपेक्षा फार आहेत!‘, अस्वस्थ होत त्यानं उत्तर दिलं. "खरं तर तू लग्नच करु नकोस! लय कटकट असते राव. सारी जिंदगीच बदलून जाते‘, दोनच वर्षांपूर्वी लग्न झालेल्यानं अनुभव सांगितला. "पण लग्नाशिवाय जगण्याला काही अर्थ नाही. दोनाचे चार हात चाराचे मग...‘ एका सुखी विवाहितानं उत्तर दिलं. "अरे, तुमचे अनुभव लादू नका. त्याला त्याचा अनुभव घेऊ द्या. अन्‌ ठरवू द्या ना!‘, ऑफिसमधील एका स्कॉलरने विचार मांडला. काही काळ शांतता पसरली. पुन्हा स्कॉलर बोलू लागला, "काय आहे, की 1981-1990 या दहा वर्षांमध्ये मुलींचा जन्मदर कमी होता त्यामुळे या नव्या पोरांना मुली मिळत नाहीएत?‘, स्कॉलरने पुन्हा "स्कॉलर‘ विचार मांडला. "आणि ज्या आहेत त्यांच्या अपेक्षा फारच... हे नको, ते हवं. ते नको हे हवं‘, मुली पाहणाऱ्या अविवाहितानं त्याच्यासमोरील आव्हानं सांगितली. काही वेळातच सगळेजण आपल्या कामाला लागले. हळूहळू चर्चा थांबली.

दुपारच्या चहाची वेळ झाली होती. सर्वजण कॅंटीनमध्ये चहाला जमले. तिथं काम करणारा पोऱ्या चुणचुणीत होता. तो आनंदाने आणि उत्साहाने चहा देत होता. यांच्यामध्ये पुन्हा सकाळची चर्चा रंगली. "हा पोरा बघा. काय फिकर-बिकर काय नाय. दिवसाला पगार. दिवसाचा खर्च भागला. संपलं...‘ एकाने पोराची जिंदगी उलगडून सांगितली. तेवढ्यात चहा घेऊन पोरा आला. "का रे? कशी झाली दिवाळी? सुटी घेतली का नाय?‘, एकाने पोराला सवाल केला. "होय, सायब चांगली 15 दिवस सुटी होती‘, पोराने उत्तर दिलं. "अरे 15 दिवस काय केलस मग?‘, पोराशी संवाद वाढविण्यात आला. "काय, नाय लग्न केलं सायब!‘, पोराने लाजत उत्तर दिलं. "अरे, पण मागे एकदा तू लग्न केलसं म्हणाला होतास ना?‘, एका वरिष्ठ सहकार्याने सवाल केला. "हो! आता हे दुसरं लग्न होतं...‘, पोराने निरागसपणे उत्तर दिलं. त्यावर सर्वांना धक्काच बसला. "आयला, आमाला एक मुलगी मिळना अन्‌ तू दोन दोन लग्न...‘, अविवाहितानं नेमका मर्मावर बोट ठेवला. आता पोरा बोलू लागला, "काय आहे सायब की पटवून घेतलं, समजून घेतलं की भागून जातं. नाय पटलं, नाय आवडलं तर फारकत घेतलेली बरी. मी तसचं केलं. पहिल्या बायकोशी नाय पटलं. तिला, तिच्या घरच्याला बोलावलं. आपलं पटत नाय सांगितलं. कोर्ट, फिर्ट चक्कर नकोय. आमीच तिचं दुसरं लग्न लावून देऊ असं सांगितलं. झालं..‘ पोरा तेवढ्यातच थांबला. आता त्याच्या स्टोरीत सगळ्यांनाच इंटरेस्ट निर्माण झाला होता. "मग, पुढं काय झालं?‘ स्कॉलरने उत्सुकता दाखवली. पोरा पुन्हा बोलू लागला, "सायब, तिनं बी सांगितलं नाय पटत. शेवटी माझ्या गावाकडच्या नात्यातल्यानं त्याना मदत केली दुसरं लग्नबी लावलं. आता माजंबी लग्न झालं. ती खूष मी बी खूष!‘ पोराने स्टोरी पूर्ण केली अन्‌ तो निघूनही गेला.




"बघा, साधा चहा विकणारा पोरगा दोन-दोन लग्न करतो. आपल्याला शहाणपणा शिकवतो. बघा...‘, स्कॉलरनं उपदेश सुरु केला. "त्याचं काय रे त्याची जिंदगी साधी आहे. दिवस भागला. संपलं. आपल्याकडच्या पोरी भविष्याचा विचार करतात. प्रॉपर्टी बघतात...‘, अविवाहितानं त्रागा केला. त्यावर दुसरा एक सहकारी म्हणाला, "अरे पण कसलं भविष्य अन्‌ कसलं काय. चहा विकणारा पोरा काय बी करू शकतो भौ..‘ आता चर्चेत चांगलाच रंग चढत चालला होता. चहाचा कप रिकामा होत होता. चहावाल्या पोराला अनेकांना प्रश्‍न विचारायचे होते. त्यांनी त्याला पुन्हा आवाज दिला. पोरा आला. "काय रे? तुझी कमाई किती? बायको त्रास देत नाही का?‘ एकाने त्याला थेट सवाल विचारला. "सायब, पहिलीला पण मी लग्नाआधीच सांगितलं होतं. आपली कमाई एवढी. पुडं-मागं वाढलं. पर गॅरंटी नाय. वन रूम किचनचं छोटं घर बाप देऊन गेला. तीच प्रॉपर्टी. पर तिला नाय आवडलं. आपण बी जास्त इचार नाय केला. शेवटी इचार करून काय होतं सायब... जिंदगी महत्वाची ना..‘, पोराने तत्वज्ञानचं मांडलं. "लईच बोलतो रे तू....?‘, एकाने पोराची खेचली. त्यावर पोरा सुटलाच, "सायब, तुमच्या जिंदगीशी कंपेर करू नका आमाला. आमच्याकडं मोटं घर नाय. साधी दोन चाकाची गाडी बी नाय. रोजच्या रोज पगार. जे मिळलं त्यात सुख. आता घराजवळ एक चहाची टपरी सुरु केलीया. इथनं गेलं की तिथं धंदा सुरु. कमाई वाडतीया. रोज सुखानं झोप येतीया. बॅंकेच्या हप्त्याची कटकट नाय की हाय-फाय राहणीची... बापाने जिंदगी जगली. अन्‌ सोडली बी. बायको अन्‌ माय सोबत हाय... त्या बी टपरीसाठी मदत करत्यात... हप्त्यातून एकदा कोंबडं कापतो. महिन्यातनं एकदा गोड-धोड करतो. वर्षातनं एकदा फिरायलाबी जातो. एकाद्या दिवशी उपाशी झोपण्याचीबी तयारी हाय. काय जिंदगी असतीया अजून... दररोज पोटभर कष्टाची भाकर अन्‌ रोज रातच्याला शांत झोप...‘, पोरानं त्याचं आयुष्यच वाचून दाखवलं. आता सगळेच शांत झाले. तो तुलना करू नका म्हणत होता. पण सगळेजण स्वत:च्या जगण्याचीच त्याच्याशी तुलना करत होते.

सगळीकडे स्मशान शांतता पसरली. काही वेळाने स्कॉलर बोलू लागला, "काय असतं. मुलींच्या अपेक्षा जास्त आहेत असं नाही. मुलांच्या पण अपेक्षा असतातच. गोरी हवी, काळी नको. स्वयंपाक यायला हवा. गाडी यायला हवी. साडी घालता यावी. बाप श्रीमंत असावा. जावयाचा लाड करावा. बहिण-भाऊ शक्‍यतो नसावेत. आदी आदी...‘ आता अविवाहित बोलू लागला, "समजा, यापैकी एकही अपेक्षा नसेल तरीही मुलींच्या अपेक्षा असतातच ना?‘ "बीऽऽऽऽ कूल... अरे जी मुलगी आपली अख्खी लाईफ सोडून तुमच्याकडे येणार असते तिनं अपेक्षा ठेवल्या तर बिघडलं काय रे? तिने नक्कीच अपेक्षा ठेवाव्यात!‘ स्कॉलर पेटला.

आता वरिष्ठ सहकारी बोलू लागला, "शेवटी काय आहे की मुलगा असो की मुलगी प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडे काय आहे, आपल्या अपेक्षा काय आहेत, याचा एकूणात विचार हवा. शेवटी लग्न म्हणजे जीवनाचा प्रश्‍न असतो. प्रसंगी काही तडजोडी कराव्या लागतात. तडजोडींचं प्रमाणही ठरवायला हवं. अन्‌ त्या स्वीकारून आयुष्यभर परस्परांची साथ देण्याची हिम्मतही असावी. तसं झालं नाही तर प्रसंगी फारकत घेऊन दूर जाण्याचीही तयारी असावी. या पोरासारखी. जे आहे त्यात सुख मानायला हवं. जे नाही ते मिळविण्याचा प्रयत्नही अवश्‍य करावा. पण वास्तवाचं भान हवं. परस्परांना साथ द्यावी. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत... लक्षात ठेवा नवरा आणि बायको अखेरच्या क्षणापर्यंत सोबत असताता, इतरांची खात्री नसते...‘सर्व वातावरण गंभीर झाले. ‘सिरीयसली विचार करा मित्रांनो आणि मात्र आता चला काम पडलीत...‘ असं म्हणत स्कॉलरने पूर्णविराम दिला.

(Courtesy: esakal.com)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...