2/27/2015

स्पर्श : 'मालक आमी हायेत, लढा, लढा...'

त्यानं काळ्या आईला साष्टांग दंडवत घातला. "माय तुले पाणी पाजू शकलो नाय म्या! माफी कर माय, माफी कर...‘ गेल्या अनेक दिवसांपासून तो तिला असाच अश्रूंचा अभिषेक घालत होता. पण तो पुरेसा नव्हता. आभाळातील गोळा त्याच्या घरी जात होता. पुन्हा उगवण्यासाठी. हा पण त्याच्याच घरी जाणार होता. पण पुन्हा कधीच उगवणार नव्हता. आता वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. धावत धावत तो रानाजवळच्या घरात आला. घर कसलं जाड कापडानं आभाळ झाकलेलं उघडी जमीनच होती. आभाळातून पाणी येत नव्हत. त्यामुळे याच्या पोटात अन्न नव्हतं, खिशात दमडी नव्हती, होती-नव्हती जगण्याची उमेदही मावळली होती. पण अद्यापही काळजातलं प्रेम संपलेलं नव्हत.

घराच्या समोर अखेरची दौलत सर्जा-राजा बसलेले होते. शेतात राबणाऱ्या जनावरांच्या पाठीवरून त्यानं प्रेमानं हात फिरवला. त्यांचीही माफी मागितली. आता त्याला सर्वांच्या उपकाराची परतफेड माफीनं अन्‌ प्रेमानं करायची होती. मुकी जनावरे जणू काही सांगत होती, ‘मालक आमी हायेत, लढा, लढा...‘ तो आत आला. घरात चार जीव याची वाट पाहत होते. पोटातली भूक घेऊन सगळेच जण आशाळभूतपणानं त्याला अधाशासारखं येऊन बिलगले. त्यांना भाकर हवी होती, पण याच्याकडे प्रेमाशिवाय द्यायला काहीच नव्हतं. त्यानं पोट भरणारं नव्हतं. "काम जाल काव जी?‘ तिनं रूक्षपणानं पण तेवढ्याच नम्रतेने विचारलं. त्यानं काहीच उत्तर दिलं नाही. "उद्या बगू‘ म्हणून तो पडला, अन्‌ इतर जणांनीही डोळे मिटले. भुकेल्या पोटाने सगळेच जीव कसे-बसे निद्रिस्त झाले. कायमचेच झोपण्याच्या इराद्याने काही वेळाने तो हळूच उठला. झोपलेल्या अवस्थेतील पत्नीचे पाय धरून माफी मागितली, "किती जन्माचं पाप घेऊन जनमलीस गं? माझ्यासारखा दादला तुझ्या पदरी पडला. आता पुढे कधीच तुला तरास होणार नाय. किती भोगलसं माझ्यासाठी. उघड्या पडलेल्या संसारापरमाणं उघडं शरीर जगाला दिसू नये म्हणून झाकण्यापुरतीच कापड हायत तुझ्याकडं. पर धीर सोडू नगं, दोन पोराला लई शिकव. लई मोट्टं कर. अन्‌ माणूस मेला की कर्ज फिटतं म्हणून सांग जगाला, अन्‌ इतनं लई लांब जा...‘ असे म्हणत त्यानं दोन पोरांवरून त्यानं प्रेमानं हात फिरवला. अन्‌ उघड्या आकाशात आला.

समोरच्या एका जनावराची वेसन काढली. त्याचा फास केला. समोरच्याच झाडाला लटकवला. आतून एक तुटका-फुटका रिकामा डबा आणला. त्यो पालथा घालून त्याच्यावर उभा राहिला. शेवटचा विचार करू लागला, काळ्या आईला इकावं म्हटलं तर त्याचा कायबी उपेग होणार नाय. कारण त्यातनं कर्जाच्या पैशाचं थकलेलं व्याज बी फिटायचं नाय. गेली 4- 5 वर्ष कशीबशी काढली. आता एक क्षणही घालवणं शक्‍य नाय. रिकाम्या डब्यावरून त्यानं हे जग सोडून जाण्यासाठी फासात गळा अडकवला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो फास त्याला या साऱ्या व्यापातून मुक्त करणार होता. आता त्याला या मुक्ततेपासून कोणीही मुक्त करू शकणार नव्हतं. समोर बसलेली दोन जनावरं तरीही हाक देत होती, ‘मालक आमी हायेत, लढा, लढा...‘

(Courtesy: esakal.com) 

2/22/2015

प्रेरणादायी विचार... (01)

अवघ्या पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात  हे सारे विचार वाचून होतील.  मात्र प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास अवघं आयुष्य कमी पडेल फेसबुकवर लिहिलेले काही प्रेरणादायी विचार....














2/08/2015

स्पर्श : उत्तर

आकाशातील लाल गोळा खाली जात होता. तर याच्या पोटात भुकेचा गोळा उगवत होता. संपूर्ण दिवस दोन कटिंगवर काढत तो खूप धावला होता. रविवारी रस्त्यावर गर्दी असल्याने त्याने विकायला आणलेली खेळण्यातील "विमाने' सिग्नलवर थांबूनच चांगली विकली होती. रात्री माय अन्‌ छोट्या भावासोबत गोडाधोडाच्या जेवणाची स्वप्ने तो पाहत होता. गोडाधोडाच्या जेवणात गोड काहीच नव्हतं, पण जेवण पोटभर होतं, ते ही कमाईचं. तेच गोड मानून खाऊन त्यालाच ते गोडाधोडाचं जेवण म्हणत होते. अंधार पडला. तो जेवणाची तयारी करू लागला. एरवी भाजीवाल्याची सडलेली भाजी अन्‌ गिरणीतलं सांडलेलं पीठ खाणारं त्याचं कुटुंब दुकानातल्या पीठासोबत ताज्या भाजीचा स्वर्गिय आनंद लुटणार होतं. ठरल्याप्रमाणे सगळं झालं. आमावस्येची रात्र असूनही फूटपाथवरील त्यांच्या "मूव्हेबल' घरात गोडाधोडाच्या जेवणामुळे आनंदाचा प्रकाश पडला होता. उद्याचा विचार न करता तृप्त मनानं ते कुटुंब निद्रिस्त झालं.

दुसरा दिवस उजाडला. तो आज रूमाल अन्‌ गजरे घेऊन रस्त्याच्या सिग्नलवर धावू लागला. दुपारपर्यंत फक्त एकच रुमाल विकला. कालचे पैसे कालच उधळले होते. आज हातात काहीच नव्हतं. संध्याकाळी गर्दी होईल म्हणून तो धावू लागला. माय अन्‌ भाऊ दूर उभे राहून सारं पाहत होते. धावता धावता बसला आडवं जाताना त्याचा तोल गेला, अन्‌ क्षणार्धात हातातील रूमाल अन्‌ गजरे रक्तात माखून निघाले. मर्त्य जग सोडून तो क्षणार्धात निघून गेला होता. थोडी गर्दी झाली. हॉर्न वाजू लागले. थोडावेळ ट्रॅफिक जाम. काही वेळात कोणीतरी रक्तात माखलेला "मृत' देह कडेला नेला.

माय अन्‌ भाऊ अजूनही कडेला थांबून रडत होते. पोलिस आपल्याला पकडतील म्हणून ते पुढे सरकले नाहीत. मेलेल्याला पाहायचे का जिवंत असलेल्याला सांभाळायचे अशी मायची अवस्था झाली. शिवाय "मेल्या'ला जाळायचं कुठं हा प्रश्‍नही होताच. दोघेजण फूटपाथवरून अश्रू ढाळत "त्या'च्या पासून दूर जाऊ लागले. 2-3 किलोमीटरवर नदीच्या काठी येऊन बसले. कालचं गोडधोड जेवण पोटात मावलं होतं. पण आजचं दु:ख पोटात मावणारं नव्हतं. तिनं दादल्याची बॉडीपण अशीच सोडली होती, अन्‌ आता थोरल्या पोराची पण.

बराच वेळापासून हे सगळं पाहणारा 4-5 वर्षाचा धाकला निरागसपणे म्हणाला, "माय, तू मला बी अशीच सोडून जाशील?' मायकडं उत्तर द्यायला शब्द तर नव्हतेच, पण अश्रू ढाळायला डोळ्यात पाणीपण नव्हतं.

2/07/2015

स्पर्श : ERROR

  

कितीही केलं तरी प्रोगाममधील एरर निघत नव्हती. त्यामुळे तो त्रागा करत चहा प्यायला बाहेर पडला. कंपनीच्या कॅंटीनपेक्षा विरंगुळा म्हणून तो बाहेरच्या टपरीवर चहा प्यायला आला. टपरीवरचा पोऱ्या कष्टांन चहा तयार करत होता. अन्‌ प्रेमानं विकत होता. टपरीवर बऱ्यापैकी गर्दी होती. याने कटिंग घेऊन चहाचा पहिला झुरका घेतला. तेवढ्यात गावाकडून बाबांचा फोन आला. याचा मूडच फिरला. त्यातच, "बाळा, तुला मागावं वाटत नाही. पण चेक पाठविलास का रे?' हे वाक्‍य ऐकून तर त्यानं प्रचंड रागात, "अहो, मला काय चेक पाठविण्याशिवाय दुसरं काम नाही का? पाठवतो म्हणून सांगितलं ना!' असं म्हणून फोन आपटला. मी कॉलेजात असताना कशी मला भीक मागावी लागायची, फी साठी, मेससाठी. किती उशिर लावायचे पैसे पाठवायला! आता तुम्ही पण जरा अनुभवा, असं तो मनातल्या मनात पुटपुटला अन्‌ चहाकडं वळला.

तो पुन्हा चहाकडं वळला. तेवढ्यात एक काळी कुट्ट अन्‌ काळे कपडे घातलेली म्हातारी समोर आली. "बाबा, जरा चहा पाजशील का रे? पैसे संपलेत माझे.' डोक्‍याला ताप नको म्हणून टपरीवरच्या पोऱ्याला त्यानं कटिंगची ऑर्डर दिली. त्यानं विचार केल्याप्रमाणं कटिंग घेऊन म्हातारी गेली. अन्‌ टपरीवरचा पोऱ्या बोलू लागला, "साहेब, ही म्हातारी रोज असच कोणालातरी चहा मागते. कोणालातरी जेवण मागते. फूटपाथवर झोपते. अन्‌ बडबडते माझ्याकडे जमीन होती घर होतं. पण पोराच्या शिक्षणासाठी सगळं विकलं. पोरगा शिकून लई मोठा साप्तवेअरचा साहेब झाला. तो चेक पाठवणार आहे.. मी त्याची वाट पाहतेय..'

तितक्‍यात त्याला प्रोग्राममधल्या एरर वर सोल्युशन सापडलं. मात्र वास्तवतील एक नवाच एरर सापडला होता...

स्पर्श : सामर्थ्य

रस्त्याच्या कडेला फुटपाथवर त्यांचा उघडा संसार ताडपत्रीचं वेष्टन देऊन बंद केला होता. बाहेर भुरभुर पाऊस पडत होता आणि हिच्या पोटात भुकेचा. हिच्या पोटचा एक गोळा जीवाच्या आकांतानं भिजत भिजत सुगंध देणारे गजरे विकत होता, तर दुसरा गोळा भुकेनं तळमळत त्या दुस-या गोळ्याकडं पाहत आभाळाएवढ्या आशेनं होता. दिवस मावळू लागला, गर्दी वाढू लागली. गज-याचा सुगंध येईनासा झाला अन्‌ पहिल्या गोळ्याची काळीकुट्ट देहयष्टीही दिसेनाशी झाली. आता काय करावं म्हणून ती दुस-या गोळ्याच्या तोंडाकडं पाहून हुंदका दाबत होती. काही वेळात गज-याचा नकोसा सुगंध अन्‌ मागोमाग तो ही आला. त्याच्या हातात फक्त गजरे होते, जे भूक भागविणार तर नव्हतेच पण आशाही संपविणारे होते. तो धावत आला, ‘‘माय आलोच म्या...!’’ म्हणत गजरे ठेऊन धावत गेलादेखील.

काही वेळानं हातात दोन वडापाव अन्‌ एक कोल्ड्रिंकची नवी कोरी बाटली घेऊन तो धावतच आला. तिनं ते पाहिलं. तिच्या पोटातली भूक आणखी चाळवली. त्यानं मोठ्या आनंदानं छोट्या गोळ्याला कोल्ड्रिंकची बाटली दिली. एकाएकी तिला काहीतरी झालं. तिनं वडापाव अन्‌ बाटली हातात घेतली अन्‌ जोरात ओरडत म्हणाली, ‘‘मेल्या.... भूकेनं मेलोत तरी चोरी करून खायाचं नाय तुला सांगितलं होतं ना...!!’’ त्या काळ्या गोळ्याला जोरात धक्का देत तिनं ते शेजारच्या नाली ओतलं...

त्या मोठ्या गोळ्याच्या पोटात मोठा गोळा आला. 

अन्‌ हुंदका देत, ‘‘आए, चोरी नाय केली म्या, रस्त्यावर आलेल्या दोन पोरींनी दिलयं ते मला... कोनतरी त्यांना ‘समाजसेविका’ म्हणत होतं... चोरी नाय केली म्या...!!!’’ एवढं बोलण्याचं सामर्थ्यही त्याच्याकडे उरलं नाही.

2/05/2015

स्पर्श : आठवण

"बाबा, तुम्हाला किती वेळा सांगितलं या जुन्या पेट्या घराची शोभा घालवतात. त्या फेकून द्या बरं आताच्या आता. या घरात येण्यापूर्वीच मी म्हणालो होतो ना.' त्यानं स्वत:च्या वडिलांना आदेश दिला.

आणि थरथरत त्या बापाच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, "ठीक आहे, ठीक आहे.'

"तुम्हाला काय उचलणार त्या पेट्या. मीच देतो फेकून बाहेर.' असे म्हणून तो पेट्या घेण्यासाठी जाऊ लागला.

तेवढ्यात घरात नव्यानेच रूजू झालेला कामवाला समोर आला आणि त्यानं मालकाला म्हटले, "मालक राहू द्या मी त्या पेट्या माझ्या खोलीत ठेवतो. तेवढंच कामाला येतील.'

अन्‌ थोडा वेळात त्या पेट्या त्या कामवाल्याच्या 10 बाय 10 च्या खोलीत येऊन धडकल्या. मागोमाग दुर्भागी बापही पोचला.

अन्‌ त्या कामवाल्याला विनंती करू लागला, "माझ्यावर उपकार कराल, मी जिवंत असेपर्यंत तरी या पेट्या फेकू नका.'

तो कामवाला ओशाळला. म्हणाला, "मालक, त्यासाठीच मी त्या हिथं आणल्यात. मला वाटलचं त्यात तुमचं काहीतरी महत्वाचं सामान असेल.'

तेवढ्यात त्या बापाच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या, "पोरा तुला काय सांगू. जिथं या पेट्या होत्या तिथून त्याला काहीच त्रास नव्हता. तरीही माझ्या आठवणी ठेवण्यासाठी माझ्याच घरात जागा नाही.'

कामवाला म्हणाला, "पण त्यात हाय तरी काय मनायचं?'

बाप उत्तरला, "माझं लग्न ठरल्यावर "तिला' मी दररोज एक प्रेमपत्र लिहायचो. तीदेखील उत्तर लिहायची. त्या सर्वांची मी फ्रेम करून एकत्र ठेवलीय. आज ती नाही. पण या पेट्या आहेत. मुलाला बोलायला वेळ नाही पण 
हि पत्रे माझ्याशी बोलत असतात. ही पत्रे म्हणजे तिची आठवण अन्‌ माझ्या जगण्याची शक्ती आहेत. माझं भाग्यच की या पेट्याप्रमाणे त्यानं अजून तरी मला घराबाहेर काढलं नाही.'

कामवाल्याच्या डोळ्यातून पाणी बाहेर कधी आलं ते समजलंच नाही...  मात्र कामवाल्याने  जे  समजून घेतले होते. ते त्याला कामावर ठेवणा-याला  कधीच समजणार नव्हते.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...