4/30/2016

लहानपणीचे क्रिकेट

एका छोट्या शहरातील एका मोठ्या माळवदांच्या दोन मजली वाड्यात पाच-पंचवीस बिऱ्हाडं राहात होती. वाड्याच्या अंगणात ऐसपैस रिकामी जागा होती. त्याला चौक म्हटले जायचे. वाड्याला मोठे दार होते. दाराच्या बाहेर बरीचशी रिकामी जागा होती. अलिकडेच त्या जागेवर सिमेंटचा थर दिला होता. तेथेच एका कोपऱ्यात पाण्यासाठी आड होता. त्या आडाजवळ भूताचे घर असल्याचे लहानमुलांना सांगितले जायचे. वाड्यात सगळेमिळून 20-22 चिल्ले-पिल्ले होते. त्यापैकी 8-10 जण शाळेत जातील एवढी मोठी होती. बहुतेकजण परीक्षा संपल्याने मामाच्या गावाला गेले होते. सर्वांच्या शाळेला कालच सुटी लागली होती. त्यामुळे सगळ्यांना स्वतंत्र झाल्याचा आनंद होता. सगळेजण खूप धिंगाणा करण्याच्या मूडमध्ये होती. वाड्यात वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळी कामे करून पोट भरणारी बिऱ्हाडं होती. चिल्ल्या-पिल्ल्यांना मात्र त्याच्याशी काही घेणं-देणं नव्हतं. ते केवळ एकत्र मिळून खेळत. खटके उडाले तर भांडत. मारामारी करत. काही वेळ गप्प बसत आणि पुन्हा एकत्र येऊन खेळत.



आता सकाळचे दहा वाजले होते. सगळे चिमुरडे मोठ्या दाराबाहेर एकत्र आली. त्यामध्ये सहावीतील स्नेहा आणि सौरभ, आठवीतील सचिन आणि दीपक, पाचवीतील वैभव, सातवीतील पूनम आणि तिचा चार वर्षांचा भाऊ पंकज, नववीतील लक्ष्मी, छाया, चौथीतील बबन हे सगळेजण होते. आणखी काही चिल्ले-पिल्ले आईला उन्हाळी कामात मदत करत होते. तर कोणी अजून झोपेतच होते.

काय खेळायचे? यावर चर्चा सुरू झाली. स्नेहाने कोपरापाणी खेळायचा आग्रह धरला. तिला छायाने पाठिंबा दिला. मात्र त्यावर एकमत झाले नाही. मग लपंडाव, कबड्डी, लगंडीपाणी, शिवणापाणी, विष का अमृत, खोखो असे पर्याय समोर आले. पण कशावरच एकमत होत नव्हते. शेवटी मग कि केटचा विषय निघाला. त्यावर छायाने खूप विरोध केला. मात्र सर्वांनी त्यावर एकमत दर्शविले. पण लहान पोरांना घ्यायचे नाही असे ठरले. मग पूनम तिच्या भावाला घरी सोडून आली. आता प्रश्‍न बॅट आणि बॉलचा होता. बबनला घ्यायचे नाही असे सौरभने सांगितले. त्यामुळे तो ही घरी रागाने निघून जात होता. तितक्‍यात छायाने सौरभच्या कानात काहीतरी सांगितले. त्यावर सौरभने बबनला थांबविले. फक्त त्याने त्याचा प्लॅस्टिकचा बॉल आणावा या अटीवर. बॉल त्याच्या खिशातच असल्याचे त्याने सांगितले. आता प्रश्‍न फक्त बॅटचा उरला. स्नेहाने धावत जाऊन एका मोरीतील कपडे धुण्याची लाकडी फळी आणली. त्यावर "हा हा हा‘ असे सगळ्यांनी एकत्र म्हणत तिला चिडवले. असे चिडवले की तिला राग यायचा. मग थोडा वेळ वाद झाले आणि ती फळी फक्त मुलींनी बॅट म्हणून वापरावी असे ठरले. आता मुलांच्या बॅटचा प्रश्‍न होता. प्रश्‍न सुटेना म्हणून वाड्यासमोरच्या घरात राहणाऱ्या आणि बॅट असलेल्या गिरीशकडे धाव घेण्यात आली. त्याला बाहेर जायचे होते. पण त्याने सर्वांच्या आग्रहामुळे बॅट दिली. "गिरीश किती छान आहे‘, असे गौरवोद्गार बबनने काढले. आता प्रश्‍न स्टंपचा होता. त्यावर वैभवने धावत घरी जाऊन वडिलांच्या रिक्षाचे एक निकामी चाक आणले. तर दुसऱ्या बाजूला एकावर एक रचलेल्या तीन विटांचा स्टंप तयार झाला. दोन्ही स्टंपांजवळ क्रीज म्हणून विटेने रेघ ओढण्यात आली. या सर्वाला "पीच‘ म्हणून सर्वमान्यता मिळाली.

आता वाड्याच्या दिशेने तोंड करून फलंदाजाची जागा ठरली. त्यानंतर नियमांवर चर्चा सुरू झाली. वॉल कॅच आऊट, वन टप्पा आऊट, कोणाच्या घरात बॉल गेला तर आऊट, वाड्यावर बॉल गेला तर आऊट, बॉल आडाला लागला तर चौका, वाड्याच्या दाराला लागला तर दोन रण, खालचा बॅटस्मन नाही, टीम नाही, स्वतंत्रपणे खेळायचे, ज्याचे जास्त रन तो पहिल्यांदा बॅटिंग करणार असे नियम एका दमात सचिनने सांगितले. त्यावर लहानांपासून बॅटिंग सुरु करू असे छायाने सुचविले. "बॅटिंग करून पळून जायचे नाही‘, अशी सूचना स्नेहाने केली. शिवाय बॉल हरवला तर भरून द्या असे बबनने सांगितले. सगळ्या सूचना मान्य झाल्या. चेंडू कोणी फेकायचा यावरही तोडगा निघाला. ज्याची शेवटी बॅटिंग असेल त्याने एक विकेट पडेपर्यंत चेंडू टाकायचे ठरले. आणि हो ओव्हरचे बंधन नाही, अंपायर नाही, आऊट होईपर्यंत खेळायचे असेही ठरले.

या सर्व पूर्वतयारीच्या नादात सकाळचे 11.30 वाजले होते. सगळेजण फिल्डिंगवर गेले. सचिन फिल्डर्सला जागा सांगू लागला. पण लक्ष्मीने त्याचे ऐकणार नाही असे सांगत "ज्याला जिथं वाटेल तिथं उभं राहा. फक्त जवळजवळ उभे नका राहु‘ असे सांगितले. सगळ्यांनी आपल्या आवडत्या जागा पकडल्या. सचिनने किपरिंग करण्याचे ठरवले. पहिला बॉल पडणार तितक्‍यात "लक्ष्मी, अगं ए लक्ष्मी‘ असा आवाज वाड्यातून आला. तिची आई पापड्या करत होती. तिला मदतीसाठी हाक मारत होती. "आले आले‘ म्हणत ती निघून गेली. तरीही खेळ सुरू ठेवा असे तिने सांगितले. सर्वप्रथम बबन बॅटिंगला उतरला. त्याच्या उंचीपेक्षा बॅट अगदी किंचित छोटी होती. "मुलींची बॅट वापर‘ असा सल्ला त्याने धुडकावून लावला. त्याने बॅट घेतली. त्याला छाया चेंडू टाकू लागली. दोन टप्पे पडून चेंडू बॅटवर आदळला. पण शॉट मारण्याच्या नादात बॅट मागे टायरला लागली आणि टायर खाली कोसळले. "आऊटए, आऊटए‘ असे ओरडत सगळ्यांनी जोष सुरू केला. त्यावर "पहिला बॉल देवाला असतो‘ असा दावा बबनने केला. त्यावर थोडे वाद झाले. पण "सगळ्यांचा पहिला बॉल देवाचा मग‘ असा ठराव पास झाला. बबन पुन्हा खेळू लागला. छायाने चेंडू टाकला. यावेळी बबनने हुशारी दाखवत थोडे समोर येऊन बॉल मारला. बॅट फेकून बबन रन काढण्यासाठी धावला. पण स्नेहाने बॉल पकडून छायाकडे दिला. तिने खालच्या स्टंपला मारण्याचा प्रयत्नही केला. तसा तो स्टंपला लागला. पुन्हा "आऊटए, आऊटए‘ म्हणत जल्लोष सुरू झाला. पण कि जमध्ये पोचल्याचा दावा बबनने केला. त्यावर वाद निर्माण झाले. "जा, माझा बॉल घेऊन मी चाललो‘ असे म्हणत बबन रागाने निघून जाऊ लागला. त्यावर "खेळ तू, खेळ चिडकी‘ म्हणत त्याला रोखण्यात आले. त्यावर "कॉलर टाईट‘ झाल्याच्या आविर्भावात बबन पुन्हा खेळू लागला. सचिनने छायाला कानात येऊन काहीतरी सांगितले. छायानेही ते ऐकले. त्यानंतर तीन-चार बॉल खेळून बबन आऊट झाला. यावेळी त्याने नकार दिला नाही.

आता वैभव मैदानात उतरला. त्याला दीपक चेंडू टाकू लागला. लक्ष्मी अजूनही आली नव्हती. दीपकने चेंडू टाकला. वैभवने बॅटवर चेंडूचा एक टप्पा खेळून चेंडू खूप उंच उडवला. "पूनम कॅचए‘ असे सगळेजण ओरडले. तेवढ्यात तिच्यावर विश्‍वास नसल्याने टायरला धक्का मारून सचिन कॅच पकडायला धावला. पूनमची आणि सचिनची टक्कर झाली आणि दोघेही खाली पडले. मात्र एक टप्पा पडूनही कोणी कॅच पकडू शकले नाही. वैभवने "हुश्‍शशश‘ म्हणत आनंद साजरा केला. तर सगळ्यांनी सचिनला दोष दिला. या सर्व गडबठीत पूनम गुडघ्यावर पडल्याने तिच्या गुडघ्यातून थोडेसे रक्त वाहू लागले. सर्वजण चिंताग्रस्त झाले. तेवढ्यात आडाशेजारी पडलेल्या चिंधीने छायाने तिचे रक्त पुसले. त्यावर तिने आराम करावा बॅटिंग आली की कळवू असे म्हणत तिचे सांत्वन करण्यात आले. तिनेही ते मान्य केले. काही वेळाने तिच्या जखमेवर कागद लावण्याचा सल्ला कोणीतरी दिला आणि एक कागदही लावण्यात आला.

बघता बघता वैभवने 15 रन केले. मात्र त्यानंतर एक जोरात शॉट मारायच्या नादात बॉल उंचावरून वाड्याच्या आतील चौकात पडला. सुदैवाने कोणाला लागला नाही. मात्र नियमाप्रमाणे वैभव आऊट झाला. त्यानंतर स्नेहा बॅटिंगला उतरली. तिने मुलींची बॅट घेतली. आणि उभे राहून धान्य पाखडताना सुप धरतात त्याप्रमाणे दोन्ही हातात बॅट धरली. तिच्या या पद्धतीला सचिनने विरोध केला. "कव्हर दिसत नाही‘ अशी तक ारही अनेकांनी केली. पण ती तिच्या पद्धतीवर ठाम राहिली. याच पद्धतीने तिने 10 रन केले. शेवटी एका बॉलवर वॉलवर टप्पा पडून ती बाद झाली. त्यानंतर पूनमही लवकरच बाद झाली.
आता दीपक बॅटिंगला उतरला. त्याने चांगला खेळ केला. तो 30 रनांपर्यंत पोचला. त्यावर त्याला आऊट होण्याची विनंती छायाने केली. आता खेळात सर्वांना थोडे बोअर होऊ लागले. तितक्‍यात घरातले काम उरकून लक्ष्मी आली. तिने बॉलिंग टाकते म्हणून मागणी केली. तिला संधी देण्यात आली. तिने एक "स्लोअर फुलटॉस‘ टाकला. सचिनने दोन रन करावेत म्हणून दाराच्या दिशेने बॉल मारताना लक्ष्मीनेच एक टप्पा कॅच पकडली आणि सचिन 35 रनावर आऊट झाला. सर्वांनी जल्लोष केला. त्यानंतर छाया आणि लक्ष्मीची बॅटिंग उरली. आता दुपारचा एक वाजत होता. "बबन जेवायला चल‘ अशी बबनला घरातून हाक आली. सर्वांना धडकी भरली. कारण बबन जाताना बॉल घेऊन जाणार होता. त्यावर बबन वेळ मारून नेऊ लागला. छाया बॅटिंग करत होती. खेळ पुन्हा रंगात आला होता. "बबनऽऽऽऽ‘ जोरात हाक आली. बबन पुन्हा "बॉल द्या‘ म्हणू लागला. खेळ रंगात आल्याने "देत नाही जा‘ असा दम सचिनने भरला. बबनने रडत घरी जाऊन तक्रार केली. काही आईला घेऊन तो मैदानाच्या दिशेने येऊ लागला. ही गोष्ट पंकजने धावत येऊन सर्वांना सांगितली. बॉल तेथेच टाकून सगळ्यांनी धूम्म ठोकली. अशाप्रकारे क्रिकेट पार पडले.

(Courtesy: www.esakal.com)

4/29/2016

नातेवाईकांकडे राहण्याचा त्रास!

कॉलेजचा आजचा शेवटचा दिवस होता. निरोप समारंभाच्या कार्यक्रमापूर्वी सगळेजण आपल्या कॉलेजातील आठवणी सांगत गप्पा मारत होते. कॉलेजच्या वर्षातील अनुभव तसेच पुढे काय करायचे याबद्दलच्या गप्पा रंगात आल्या होत्या. एक जण सांगू लागला, "मी कॉलेज लाईफ फुल्ल एन्जॉय केली. मी पुढे आयुष्यपण फुल्ल टू फुल्ल एन्जॉय करणार. पुढे मास्टर्सचा विचार आहे. त्यानंतर मला जे वाटतं, जे आवडतं तेच काम करणार. आवडीचं काम नसेल तर रिकामा बसणार पण आवडीचंच काम करणार!‘ ग्रुपमधील एक विद्यार्थीनी सांगू लागली, "मी तर ठरवलयं. हे शिक्षण बिक्षण बस्स झालं. मी दोन-तीन महिन्याचा ब्युटिशिअनचा कोर्स करून थेट ब्युटी पार्लर उघडणार आणि जगाला आय मिन जगातील मुलींना सुंदर बनवत राहणार!‘ त्यानंतर ग्रुपमध्ये बराच वेळ हशा पिकला. "मुलींचं हृदय पण जरा सुंदर बनवायला शिक‘, प्रेमात पडलेल्या एकाने कॉमेंट केली. त्यावर पुन्हा सगळेजण हसू लागले.

त्यानंतर सर्वांनीच आपल्या भावना मांडल्या. एक दोघांना फारच वाईट वाटत होतं. "अरे, आपण काय मरणार आहोत काय? आयुष्य आता खरं सुरू होणार आहे...‘, असं तत्त्वज्ञान मांडत एकाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी आपल्याला आलेल्या अडचणी वगैरे सांगण्याचा प्रयत्न केला. पुढील स्वप्नांचे चित्र रेखाटले. ग्रुपमधला सर्वांत हुशार आणि नेहमी आनंदी आणि राहणारा एक विद्यार्थी आज जरा अस्वस्थ होता. सर्वांनी विनंती केल्यावर तो बोलू लागला, "माझं कॉलेजचं आयुष्य मजेत गेलं. पण मी माझ्या एका नातेवाईकाकडे राहात असल्याने जरा त्रास सहन करावा लागला. जाऊ द्या ना. चांगल्या गोष्टी बोलूयात आपण!‘

त्यावर त्याला पुढे बोलण्याचा सर्वांनी आग्रह केला. त्यामुळे तो बोलू लागला, "गावाकडे शिक्षणाची सोय नसल्याने वडिलांनी मला इथे माझ्या नातेवाईकांकडे शिकायला पाठवलं. नातेवाईकांची परिस्थिती चांगली होती. सुरुवातीला त्यांनी चांगला पाहुणचारही केला. मात्र हळूहळू त्यांना मी परका भासू लागलो. त्यांच्या मुलांत आणि माझ्यात ते भेदभाव करू लागले. तरीही मला काही वाटले नाही. पण सहा महिन्यातच त्यांनी याला हे आवडत नाही, याला ते आवडत नाही, असे म्हणत माझा चहा, सकाळचा नाष्टा बंद केला. हिवाळ्यातही आंघोळीला गरम पाणी मला मिळाले नाही. शिवाय "मी कमी जेवतो‘ असे कारण सांगून माझा आहारही कमी करण्यात आला. रोज मला घरातील बरीच कामे करावी लागत होती. पण मी कधीही तक्रार केली नाही. आपलं शिक्षण महत्त्वाचं. जाऊ द्या कशाला त्या आठवणी...‘

त्याला मध्येच थांबवत एकजण म्हणाला, "अरे, नातेवाईकाकडे राहण्याचा लय त्रास होतो. खायचे वांदे. शिवाय वेळा पाळा. मी पण होतो एका ठिकाणी... पण नय टिकलो. दोन महिन्यात बाहेर पडलो.‘ जगाला सुंदर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुलीने प्रश्‍न केला, "अरे, पण हे नातेवाईक एवढा त्रास का देतात? माझे तर कोणी नातेवाईक त्रास वगैरे देत नाहीत.‘ हुशार मुलगा उत्तर देऊ लागला, "कसं असतं की माणसाची जातच अशी आहे की आपण आपला आणि परका भेदभाव करते. आता हेच बघ आपण गावाबाहेर गेलो की आपल्याला गावाकडचा माणूस भेटला की बरं वाटतं. तसंच राज्याबाहेर गेल्यावर राज्यातला, तर देशाबाहेर गेल्यावर देशातला माणूस भेटला की बरं वाटू लागतं. मग पृथ्वीच्या बाहेर जिथं माणसचं नसतील तिथं गेल्यावर फक्त "माणूस‘ भेटला की बरं वाटेल. पण इथं पृथ्वीवर माणूस बघून बरं वाटत नाही, हेच माणसाचं दुर्दैव आहे. आणि हे बघ दुरून डोंगर साजरे असते. जवळ गेलं की कळतो माणसाचा खरा स्वभाव. नातेवाईकांचं पण तसंच असतं.‘ त्यापैकी एकाने उत्सुकतेने विचारले, "पण मग एवढा त्रास सहन करूनही तू एवढा फ्रेश, हुशार कसा रे?‘ आता विषय नेमक्‍या मुद्यावर आला. तो आता चांगला खुलून बोलू लागला, "काय असतं मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेक चॅलेंजेस असतात. आपल्याला असं वाटतं की चॅलेंजेस खूप मोठ्या आहेत आणि त्या कशा सोडवायच्या याच विचारात आपण पुढे जाणं थांबवतो. त्यामुळे वेळ निघून गेल्यावर आपण मागे कसे राहिलो हे समजतही नाही. मी मात्र अडचणींकडे कधी पाहिलचं नाही. त्यांना स्वीकारलं आणि पुढे पुढे जात राहिलो.‘

"अरे तू फिलॉसॉफी नको सांगू रे... नेमकं सांग काय केलं ते!‘, एकाने स्पष्ट विचारलं. त्यावर पुन्हा तो बोलू लागला, "नातेवाईकाकडील एकूण परिस्थिती पाहून मी कॉलेजच्या कॅटिंनमध्ये नाष्टा, जेवण सुरू केलं. वडिलांनी पॉकेटमनीसाठी दिलेले काही पैसे तिथे कामी आले. नंतर ते कमी पडू लागले म्हणून एका शिकवणीत रोज दोन तास शिकवायला गेलो. त्यातून खर्च भागला. आता परीक्षेला काही महिने बाकी असताना तर आपल्याच एका मित्राच्या रूमवर राहत होतो मी. तिथं बसून शांतपणे अभ्यास केला. आतापर्यंत ठीक होतं. पण यापुढे आता नातेवाईकाकडे न राहण्याचा निर्णय घेतला आहे. काय असतं मित्रांनो की मार्ग शोधले की सापडतात. मार्ग सापडत नाहीत म्हणून शोध थांबवण्याला अर्थ नसतो. जाऊ द्या. आज शेवटचा दिवस कॉलेजचा अन्‌ आपण भलत्याच विषयावर आलो.‘ एवढे बोलून तो थांबला.

4/09/2016

होकार, नकार, होकार!

दि. 10 डिसेंबर

नमस्कार,

मला जे सांगायचं आहे ते समोरासमोर सांगता येत नाही म्हणून मुद्दामच हे पत्र लिहित आहे. मागच्या महिन्यात आपलं ऍरेंज मॅरेज ठरलं. तू खूप छान मुलगा आहेस. सगळ्याच बाबतीत चांगला आहेस. तू मला आवडत नाहीस असेही नाही. आपला कांदा पोह्याचा कार्यक्रम झाला. दोन्हीकडून ग्रीन सिग्नलही आला. ऑफिशिअली सगळं ठरलं. त्यानंतर आपण दोन-तीनदा भेटलोही.

पण सॉरी... तुला खूपदा सांगावेसे वाटले. पण हिम्मत नाही झाली. घरच्यांच्या दबावामुळे आणि आणखी बऱ्याच गोष्टींमुळे. मी ज्या कंपनीत काम करते त्या कंपनीतील एक मुलगा मला खूप आवडतो. गेले सात-आठ महिन्यांपासून आमची मैत्री आहे. दोन महिन्यांपूर्वीच आमच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. पण आम्ही सर्व मर्यादा पाळल्या आहेत. तो दुसऱ्या राज्यातील असल्याने घरच्यांना अजून सांगितले नाही. पण आता सांगणार नाही. त्यापूर्वी तुला कळवत आहे. प्लिज गैरसमज करून घेऊ नको. तू खूप छान आहेस. तुला चांगली मुलगी मिळेल.

थॅंक्‍स!

तुझी न होऊ शकलेली

-----
दि. 12 जानेवारी

नमस्कार,

मला मनापासून माफ कर. मागील महिन्यात जे पत्र पाठवलं त्यामुळं खूप वाद झाले. तुझ्याकडे आणि माझ्याकडेही. पण आता मला वास्तवाची जाणीव झाली आहे. ज्या मुलावर माझे प्रेम होते, त्याने मला धोका दिला. काही कारणास्तव त्याने लग्नाला स्पष्ट नकार दिला. तो अत्यंत स्वार्थी असल्याचे मला नंतर समजले. अर्थात मागे सांगितल्याप्रमाणे मी सर्व मर्यादा पाळल्या होत्या. मात्र साऱ्या प्रकारामुळे मी खूप डिस्टर्ब झाले होते. घरातल्या वादामुळं माझी अवस्था प्रचंड वाईट झाली होती. आता थोडी सावरतेय. तू खरचं खूप चांगला मुलगा आहेस. खरं तर मी पुन्हा तुला लग्नासाठी मागणी घालणं योग्य नाही. घरच्यांच्या मार्फततर अजिबातच नाही. पण तरीही दोन-तीन वेळा भेटल्याने हिम्मत करून मी तुला पुन्हा मागणी घालत आहे. मला स्वीकारणं अथवा नाकारणं हा संपूर्णत: तुझाच निर्णय असेल आणि तो मला डोळे झाकून मान्य असेल.

पुन्हा एकदा सॉरी!

तुझी होण्याची इच्छा असलेली

---
दि. 1 फेब्रुवारी

नमस्कार,

तुझे पत्र मिळाले. तुझा थोडासा रागही आला. पण तुझ्या प्रामाणिकपणाचे कौतुक वाटले. सारे काही तू मान्य केलेस. आयुष्यात माणसं ओळखण्यात बऱ्याचदा चुका होतात. पण तू चूक कबूल केलीस. सावरायचा प्रयत्न केलास. मलाही बरोबर ओळखलेस. म्हणूनच पुन्हा मागणी घालण्याचे धैर्य केलेस. मी खुल्या दिलाचा माणूस आहे. तू ही छानच आहेस. किंचित अल्लड आहेस. मला आवडलीस. मला आवडत राहशील. पुढचं सगळं फोनवर बोलून ठरवू.

तुझाच,
Related Posts Plugin for WordPress, Blogger...