11/17/2017

कष्टाचे फळ (बोधकथा)

एका संयुक्‍त कुटुंबात अनेक जण एकत्र राहात होते. घरात आजोबा, आजी सर्वांत ज्येष्ठ होते. त्यांना पाच मुले होती आणि दहा नातवंडे होती. आजी-आजोबा आता खूप वृद्ध झाले होते. तरीही ते निरोगी होते. त्यांनी मुलांना आणि नातवंडांवर चांगले संस्कार केले होते. नेहमी छोट्या छोट्या कृतीमधून ते मुलांना एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून देत. एकदा त्यांनी सर्व मुलांची परिक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी सर्व मुलांना एकत्र घेतले. आजोबा म्हणाले, "आपण उद्या पहाटे दूरपर्यंत फिरायला जाणार आहोत. आपण आधी गाडीने शेजारच्या गावातील डोंगराजवळ जाणार आहोत. तेथून चालत पुढे जाणार आहोत. चालण्याचे अंतर थोडे जास्त आहे. त्यामुळे मी तयारीसाठी पुढे जाणार आहे. आणि हो, तुमच्यासोबत मोठे कोणीही असणार नाही. सोबत फक्त तुम्हाला त्या गावातील एक व्यक्ती प्रत्येकाला लाकडाच्या जराशा जाड आणि 8-10 फूट लांब फळ्या देणार आहे. त्या तुम्हाला माझ्यापर्यंत घेऊन याव्या लागणार आहेत. त्यातून आपण खेळ खेळणार आहोत. चला तर मग सकाळी लवकर गाडी तयार असेल.' काही नातवंडांनी शंका उपस्थित केल्या. त्या सर्व शंकांचे निरसन झाल्यावर सर्व जण झोपी गेले.

दुसऱ्या दिवशी पहाटे सर्व जण ठरल्याप्रमाणे निघाले. नातवंडांमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील नातवंडांचा समावेश होता. ठरलेल्या वेळेत सर्वजण ठरलेल्या ठिकाणी पोचले. सर्वांना पुढे काय होणार याची खूप उत्सुकता लागली होती. आजोबांनी सांगितल्याप्रमाणे एक व्यक्ती फळ्या घेऊन तेथे आला. त्याने प्रत्येकाला एक-एक फळी दिली. फळी तशी जड होती. गावकऱ्याकडे नातवंडांनी चौकशी केली येथून आजोबा किती अंतरावर आहेत. "इथून सरळ सरळ पुढेपर्यंत चालत जा', अशी सूचना गावकऱ्याने दिली. त्याप्रमाणे सर्व मुले उत्साहाने त्या मार्गाने चालू लागली. दोन किलोमीटरचे अंतर चालून गेल्यानंतर मुलांना दम लागू लागला. सगळेजण एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले. "आपल्याला आजोबांनी एवढी जाड फळी घेऊन एवढ्या दूर का बोलावले असेल?', एका लहान नातवंडाने प्रश्‍न उपस्थित केला. "अरे, आजोबांनी सांगितले ना आपण या फळीने खेळ खेळणार आहोत', दुसऱ्या एका नातवंडाने उत्तर दिले. "अरे, पण आपले आजोबा आपल्याला एवढे कष्ट का देत आहेत?', पुन्हा प्रश्‍न आला. त्यावर "चला, लवकर म्हणजे याचे उत्तर आपण आजोबांनाच विचारू', असे एकाने सांगितले. काही वेळाने सगळेजण पुन्हा चालू लागले.

पुन्हा काही अंतर गेल्यावर सर्वांत लहान नातवंड थकल्याने त्याने फळी सोडून दिली. "मी आजोबांना सांगेल की मला नाही उचलली फळी', असे इतर जणांना सांगून तो पुढे चालू लागला. आणखी काही अंतर गेल्यावर आणखी एकाने फळी टाकून दिली. पुढे चालू लागला. फळी सोडून दिल्याने या दोघांनाही आता चालताना त्रास होत नव्हता. त्यामुळे ते इतरांपेक्षा खूप पुढे चालू लागले. असे करत करत दहापैकी 7 जणांनी फळी सोडून दिली आणि "आम्हाला नको खेळायचा असला खेळ' म्हणत पुढे चालू लागले. आता केवळ फळी घेतलेले तिघेच उरले होते. आणखी एकालाही आता असह्य झाले. त्यानेही फळी सोडून दिली. आता फक्त दोन जणच फळी घेऊन पुढे चालत होते. इतर सगळेजण एवढे पुढे गेले होते की ते दिसेनासे झाले. हे दोघेच प्रामाणिकपणे फळी घेऊन पुढे चालू लागले. त्यांना घाम आला. तरीही त्यांनी फळी सोडली नाही. आणखी काही अंतर गेल्यावर त्यांना सगळेजण एकाठिकणी थांबलेले दिसले. तेथे फळी घेतलेले दोघे जण पोचले. समोरचे दृश्‍य पाहून त्यांना आश्‍चर्याचा धक्काच बसला. कारण पुढे 10-15 फुटांच्या अंतरावरच आजोबा उभे होते. मात्र मध्ये एक 7 फूटांची दरी होती. आजोबांनी सांगितले. ज्यांच्याकडे फळी आहे त्यांनी आपली फळी या दोन डोंगरावर टाका. तिचा वापर पुलासारखा करा आणि माझ्यापर्यंत पोचा. केवळ दोघांकडेच फळी असल्याने दोघे जण सहजपर्यंत आजोबांपर्यंत पोचले. आजोबांनी त्यांना जवळ घेतले. त्यांचा घाम पुसला. त्यांना पिण्यासाठी पाणी दिले. इतर आठ जण दुसऱ्याच टोकाला होते. आजोबा दूरवरूनच बोलू लागले, "मुलांनो. आता समजले का ही फळी मी तुम्हाला का आणायला सांगितली होती. खरं तर एकच फळी आणूनही काम भागले असते. मात्र त्यामुळे तुमच्यापैकी एकालाच कष्ट पडले असते किंवा तुम्ही एकेकाने ती फळी उचलली असती. बाळांनो, प्रत्यक्ष आयुष्यात मात्र असे कष्ट वाटून घेता येत नाहीत. तुम्हाला पुढील आयुष्यात खूप कष्ट करावे लागतील. मात्र तुम्ही कधीही त्याचा कंटाळा करू नका. ते कष्ट तुम्हाला आयुष्यात कधी ना कधी तरी उपयोगी पडतीलच. ते कष्ट कधीही वाया जात नाहीत', असा संदेश देत आजोबांना एक फळी दरीवर टाकली आणि सर्वांना आपल्याकडे बोलावून घेतले.

11/16/2017

संदेश (बोधकथा))

एका मोठ्या गुरूकुलात एक गुरुवर्य अध्यापन करत असत. एकदा त्यांनी सर्व शिष्यांची परिक्षा घेण्याचे ठरवले. सर्व शिष्यांना एकत्र बोलवले. सर्वांना एक फळ दिले. "तुमच्याकडे दिलेले फळ संध्याकाळपर्यंत अशा ठिकाणी जाऊन खा, की जेथे तुम्हाला कोणीही पाहणार नाही. अशी कल्पना करा की हे फळ तुम्ही कोणालाही न विचारता आणले आहे आणि तुम्ही ते खात आहात', अशी सूचना गुरुवर्यांनी दिली. सर्व शिष्य फळ खाण्यासाठी जागा शोधू लागले. कोणी गुरुकुलापासून दूरवर असलेल्या डोंगरात, तर कोणी विस्तीर्ण झाडाच्या बुंध्याला जाऊन, कोणी गुरुकुलातील स्वत:च्या निवासस्थानी जाऊन फळ खाऊ लागले. तासाभरातच सर्व शिष्य फळ खाऊन गुरुवर्यांकडे परत आले. मात्र एक शिष्य गुरुवर्यांना दिसला नाही. फळ खाण्यासाठी संध्याकाळपर्यंतची वेळ होती. त्यामुळे तो शिष्य आल्यावर चर्चा करण्याचे ठरले. इतर शिष्य आपला अनुभव सांगण्यास उत्सुक होते. मात्र त्या एका शिष्याची प्रतिक्षा करावी लागली. दोन तास झाले. चार तास झाले. मात्र शिष्य काही आला नाही. शेवटी सहा तासांनी शिष्य परतला. त्याच्या हातात फळ तसेच होते. त्याने फळ खाल्ले नव्हते. हे पाहून सारे जण त्याच्याकडे पाहून हसू लागले. हा गोंधळ पाहून गुरूवर्य तेथे पोचले. त्यामुळे सर्व शिष्य शांत झाले.

गुरुवर्य प्रत्येकाला त्यांचे अनुभव विचारू लागले. प्रत्येकजण आपला अनुभव कसा वेगळा आणि आपण एकांतात जाऊन कसे फळ खाल्ले हे सांगू लागला. सर्व शिष्यांनी आपले अनुभव कथन केले. आता गुरुवर्य हातात फळ घेऊन परतलेल्या शिष्याकडे वळले. त्याला अनुभव विचारू लागले. तो शिष्य अत्यंत नम्रपणे म्हणाला, "गुरुवर्य, मी आजूबाजूला कोणीही पाहणार नाही अशी जागा शोधण्याचा प्रयत्न केला. पण मला तशी जागा मिळाली नाही. कारण प्रत्येक ठिकाणी एक जण मला पाहत होता. तो एक जण म्हणजे मी स्वत:च होतो. गुरुवर्य आपण या सर्व जगाला धोका देऊ शकतो पण स्वत:ला धोका कसा देणार? स्वत:पासून दूर कोठे जाणार? कसा शोधणार एकांत?' एवढे बोलून शिष्याने आपले म्हणणे पूर्ण केले.

त्यावर गुरुवर्य म्हणाले, "बघा, या एकाच शिष्याला माझा संदेश समजला. या जगात एकही अशी जागा नाही की जेथे तुम्ही स्वत:पासून दूर जाऊ शकता. त्यामुळे शिष्यांनो कोणीच पाहत नाही अशी कल्पना करून एकही कृती करू नका. तुम्हाला जे वाटतं, जे तुम्ही स्वत:ला दाखवू शकता. ज्याची तुम्हाला लाज वाटत नाही केवळ आणि केवळ असेच कृत्य करा. मला विश्‍वास आहे की अशी प्रत्येक कृती चांगल्या भावनेतूनच असेल. असे केलेत तर तुमच्या हातून आयुष्यभर एकही वाईट कृती घडणार नाही.'

8/04/2017

संवाद संपत चालला आहे का?

माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे त्याला अन्न, वस्त्र, निवार्‍याशिवाय संवादाचीही गरज असते. अर्थात ही गरज अनिवार्य नाही. मात्र सलग २४ तास जर आपण एक शब्दही न बोलता राहिलो तर काय अवस्था येते याचा केवळ विचारच केलेला बरा. संवादाच्या माध्यमातून माणूस आपले ज्ञान, माहिती, भावना इतरांपर्यंत पोहोचवित असतो. अगदी दशकभरापूर्वीपर्यंत असे संवाद घरात, दारात, गावात आणि सार्वजनिक ठिकाणी व्हायचे. त्यातून माहितीचा, ज्ञानाचा प्रसार व्हायचा. शंका-कुशंकांचे निरसन व्हायचे. आपली मते मांडली जायची. दुसर्‍यांची मते ऐकून घेतली जायची. आवश्यक असणारी माहिती स्वीकारली जायची. खोटी वाटणारी माहिती सोडून दिली जायची. गल्लीपासून-दिल्लीपर्यंत हजारो विषयांवर एकाच वेळी चर्चा व्हायची. प्रत्येकजण आपल्याला माहित असणारी माहिती सांगायचा. अशा प्रकारे माणसे समोरासमोर बोलायची. त्यांच्यामध्ये खराखुरा संवाद व्हायच.  संवादाच्य माध्यमातून माणसे माणसांना भेटायची. आजही अशा प्रकारचा संवाद होतो. पण त्याचे प्रमाण दखल घ्यावे एवढ्या वेगाने कमी होत आहे.

काळ बदलत चालला आहे. संवाद सुरू आहे पण माणसांच्या माध्यमातून नव्हे तर यंत्रांच्या माध्यमातून. मानवी बुद्धीच्या उत्कटतेच्या आणि विशालतेच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा उन्नत आविष्कार प्रत्यक्षात अवतरला आहे. त्यातून हजारो किलोमीटर दूर असलेल्या माणसाला प्रत्यक्ष पाहता येणे आणि बोलता येणे सहज शक्य झाले आहे. अगदी दुसर्‍या ग्रहावर म्हणजे चंद्रावर गेलेल्या माणसाशीही संवाद शक्य झाला आहे. संवादाच्या माध्यमामध्ये अमूलाग्र बदल झाला आहे.  घर, दार आणि सार्वजनिक ठिकाणांची जागा सोशल मिडियाद्वारे केल्य जाणार्‍य संवादाने घेतली आहे. `नमस्कार’, `राम राम’ची जागा `व्हॉटस अप’ ने घेतली आहे. माणूस माणसांना न भेटताच बोलू लागला आहे. जिवंत माणूस शेजारी बसलेला असताना शेकडो किलोमीटर दूर असलेल्या माणसाशी आभासी संवाद करण्याचा मोह नियंत्रणाच्या पलिकडे माणसाच्या मनावर स्वार झाला आहे. सगळं काही आभासी होऊ लागलं आहे. माणूस संवादापेक्षा स्वत:ची प्रतिमा जपण्यात मग्न झाला आहे. प्रत्यक्षातील प्रतिमेपेक्षा व्हॉटसअॅपचा डीपी आणि फेसबुकच्या प्रोफाईल फोटोद्वारे प्रतिमा जपण्यात माणूस बिझी झाला आहे. मी, माझं या चक्रात माणूस दिवसेंदिवस अधिकाधिक अडकत चालला आहे. खाजगी, सार्वजनिक आयुष्यातील आनंदाचे, दु:खाचे क्षण, समारंभ, उत्सव, महोत्सव प्रत्यक्ष अनुभवण्यापेक्षा कॅमेर्‍यात कैद करण्याकडे माणसाचा कल वाढला आहे. तो तेवढ्यावरच थांबत नाही. तर हे सारे अनुभव जगापर्यंत पोहोचविण्याची त्याला घाई झाली आहे. जगाने आपले क्षण पाहावेत त्यावर प्रतिक्रिया द्यावी, कौतुक करावं किंवा दु:खात सहभागी व्हावं यासाठी त्याची सारी धडपड सुरू झाली आहे. आपल्या आप्तस्वकीयांच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाचे फोटो शेअर करण्याची इच्छा व्हावी यापेक्षा असंवेदनशीलतेचे दुसरे दुदैर्वी उदाहरण काय असू शकेल? याही पेक्षा भयानक म्हणजे फेसबुक पोस्ट किंवा फेसबुक लाईव्हद्वारे स्वत:च्या मृत्यूचे थेट प्रक्षेपण करून आत्महत्या करणार्‍या पिढीचा जन्म होत आहे. याला संवाद म्हणायचं का? याचा विचार करण्याची ही गरज आहे. नव्हे नव्हे आता ती अपरिहार्यताच झाली आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सार्वजनिक आचारसंहिता पायदळी तुडविली जात आहे. हयातीत असलेले किंवा नसलेले ज्येष्ठ, श्रेष्ठ नेते किंवा महापुरुष यांच्या इतिहासाबद्दल आणि वर्तमानाबद्दल वेगवेगळी मते नोंदविण्यात येत आहेत. आपल्याला हवे ते मत सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करण्यात ही पिढी बिझी झाली आहे. त्यातून इतिहासाची चिरफाड करून आभासी संवादाद्वारे व्हॉटसअॅपच्या मेसेजेसमधून फोनची मेमरी फुल्ल होत  चालली आहे. एकेकाळी आवडीच्या क्षेत्राचा इतिहास आणि त्यासंदर्भातील नवनवी संशोधने डोक्यात साठविली जात होती आणि प्रत्येकजण तेथूनच त्याचा शोध घेत होता. आता ती व्हॉटसअॅप किंवा गुगलवर सर्च केली जात आहेत.  वर्तमानात जगण्यापेक्षा माणूस इतिहासाला प्राधान्य देत भविष्याची चिंता करत बसला आहे.

हसण्याची, रडण्याची, आश्चर्य व्यक्त करण्याची, दु:ख व्यक्त करण्याची, कौतुक करण्याची, टाळ्या वाजवण्याची आणि सगळ्याच मानवी भावनांची जागा दोन बाय दोन मिलिमीटरच्या इमोजीने घेतली आहे. आनंदाचे, दु:खाचे, कौतुकाचे सोहळे हाताच्या तळव्यावर मावतील एवढ्या डिव्हाईसेसवरच साजरे होत आहेत. या सार्‍या परिस्थितीकडे माणूस म्हणून उघड्या डोळ्यांनी आणि संवेदनशील हृदयाने पाहिले तर ही सारी परिस्थिती गंभीर म्हणावी नव्हे नव्हे त्यापेक्षा गंभीर आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हजारो लाभ झाले असले तरीही त्यातून झालेले तोटे माणसाचे अस्तित्व जोपर्यंत टिकून तोपर्यंत न भरून निघणारे आहेत. माणूस माणसाला स्पर्श करण्याऐवजी डिव्हाईसेसला स्पर्श करत आहे. ही परिस्थिती अशीच टिकून राहिली आणि जर माणूस माणसाला स्पर्श करण्याऐवजी केवळ डिव्हाईसेसलाच स्पर्श करत राहिला तर त्यानंतर अल्पावधीतच माणसाचे एकूण अस्तित्वच नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

डिव्हाईसेस आणि आभासी संवादातून बाहेर येऊन माणसाने माणसाची माणसाप्रमाणे प्रत्यक्ष संवाद करावा आणि माणसाचे अस्तित्व टिकवावे असे मला मनापासून वाटते.

7/06/2017

सायबर दरोडा आणि दहशतही

जगाच्या बऱ्याच भागात पुन्हा एकदा सायबर हल्ल्याची घटना घडली असून, त्यामुळे कामकाजात मोठ्या प्रमाणावर व्यत्यय निर्माण झाला. रुग्णालये, जहाज कंपनी, औषधनिर्माण कंपनी, पोलाद कंपनी आदी ठिकाणांना आता हा संसर्ग भारतातही पसरला आहे. जहाजबांधणी मंत्रालयाने "जेएनपीटी' येथील टर्मिनलवर "रॅन्समवेअर'चा हल्ला झाल्याचे मान्य केले आहे; तर पुण्यातील एका कंपनीनेही असा हल्ला झाल्याचे जाहीर केले आहे. संगणकाच्या भाषेत रॅन्समवेअर हा व्हायरसचा एक भीषण प्रकार आहे. झटपट पैसे कमाविण्याच्या उद्देशाने काही देशांतील तरुणांची टोळी ही घातपाती कृत्ये करीत आहे. जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यातील संगणक ताब्यात घेणे आणि घेतलेला ताबा परत देण्यासाठी खंडणीची मागणी करणे, हा रॅन्समवेअरचा उद्देश आहे. खंडणी मागणाऱ्याचा मागमूस लागू नये म्हणून "बीट कॉईन'सारख्या डिजिटल चलनाच्या माध्यमातून खंडणी मागितली जाते. शिवाय अशा प्रकारात खंडणी दिल्यानंतरही संगणकावरील माहिती आणि संगणक पूर्वावस्थेत येईल, याची कोणतीही शाश्‍वती नसते. शिक्षित टोळीने द्वेषभावनेने केलेल्या दहशतवादाचा हा अतिप्रगत प्रकार समजायला हरकत नाही.

हातात शस्त्र घेऊन किंवा आत्मघातकी दहशतवादी त्या त्या परिसरातील नागरिकांना धोका ठरतात. मात्र, असे दहशतवादी संगणकातील माहितीवर हल्ला करून लाखो जणांना धोका निर्माण करतात. कामकाजाची घडीच विस्कटून टाकतात. अशा सायबर शस्त्रांचा वापरही नजीकच्या भविष्यात वाढत जाण्याची शक्‍यता आहे. विशेषत: शत्रू राष्ट्रांवरील यंत्रणा ठप्प करण्यासाठी आणि त्या माध्यमातून पैसे कमाविण्यासाठी अशा गैरप्रकारांचा वापर वाढणार आहे. माहितीवर आणि संगणकावर विसंबून असलेले जग क्षणार्धात बंद पडू शकते, याची प्रचिती रॅन्समवेअरच्या माध्यमातून झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतासारख्या विकसनशील देशाने माहितीच्या सुरक्षिततेची अधिकाधिक काळजी घेणे, नव्या पिढीला या बाबींची आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानीची जाणीव-जागृती करून देणे काळाची गरज बनली आहे.

(सौजन्य इ सकाळ )

6/11/2017

'आयटी'त जगण्याची मजा

मिटिंग संपली. पण तरीही तो ऑफिसच्या बाराव्या मजल्यावरील मिटिंग हॉलच्या खिडकीजवळ उभा होता. खिडकीतून दिसणाऱ्या निळाशार समुद्राकडे पाहत. काहीच विचार न करता शांतपणे. "साहब कोई मिलने को आया है आपको', सिक्‍युरिटी गार्डने हॉलमध्ये येऊन सांगितले. याला पुढचा कार्यक्रम आठवला. "यही भेज दो', याने ऑर्डर दिली. "मे आय कम इन सर', एका कोवळ्या तरुणाने अत्यंत नम्रपणे विचारणा केली. "येस. कम.' याने त्याला परवानगी दिली. नजरानजर झाली. याने तरुणाला बसण्याचा इशारा केला. दोघेही समोरासमोर बसले. "सो धिस इज युअर फर्स्ट डे इन धीस कंपनी', याने सुरुवात केली. "येस सर. ऍक्‍च्युली धीस इज माय व्हेरी फर्स्ट जॉब', त्याने खुलासा केला. पुढे काही क्षण शांततेत गेले. काही टेक्‍निकल प्रश्‍न विचारल्यावर नाव, गाव, घर आदींची विचारणा झाली. दोघेही एकाच जिल्ह्यातील निघाले. मग मराठीतच गप्पा सुरू झाल्या.

हा बोलू लागला. "काही वर्षांपूर्वी मी ही असाच तुझ्यासारखा एका कंपनीत इंटर्नशिपला गेलो होतो. तुझ्या मनात आता जे प्रश्‍न असतील तेच त्यावेळी माझ्या मनात होते', खिडकीतील समुद्राकडे पाहत तो सांगू लागला. "बट सर. माझ्या मनात काय प्रश्‍न आहेत हे तुम्हाला कसे समजले?', तरुणाने प्रश्‍न केला. "गुड क्वच्शन. अरे भावा, "आयटी'त पाच वर्षांपासून आहे. पण फक्त मशिनमध्ये नाही तर माणसांच्या मनामध्येही शिरायला शिकलो आहे', हा आता चांगलाच खुलला होता. "ओह! रिअली. सर, मला ना असं वाटायचं की "आयटी' काम करणारे इतर काही विचारच करू शकत नसतील', याने मनातील शंका बोलून दाखवली. त्यानंतर काही काळ शांतता पसरली. "आजपासून काम सुरू करण्याआधी एक लक्षात ठेव तू आयुष्यात कोणत्याही एरियात काम करत असशील तरीही तुझी विचार करण्याची नॅचरल पद्धत कधीही थांबवू नकोस. अर्थात ती थांबत नसतेच. अगदी कोणाचीही ती थांबत नसते. एखादा गुलामही त्याला हवा तसा विचार करू शकतो. पण बहुतेक जण स्वत:च्या विचारांना, भावनांना मनातल्या मनात दाबून ठेवत असतात आणि त्रास करून घेतात. कोठं तरी व्यक्त व्हायला हवं. कधी कधी आपण स्वत:जवळही व्यक्त झालं पाहिजे.', याने उत्तर दिले.

तरुण बोलू लागला, "सर ऍक्‍चुअली न कॉलेजमध्ये आणि घरी असताना मी आतापर्यंत खूप ठिकाणी ऐकलं आहे की "आयटी'त काम करणारे स्वत:ला ओव्हर स्मार्ट समजतात. ते सेल्फ ओरिएंटेड असतात. कोणाशी फार बोलत नाहीत. पण तुम्ही तर एवढे...', तरुणाला थांबवत तो म्हणाला, "कसं आहे की काहीही केलं तरीही हे जग नाव ठेवणारच. मी जगाला काय वाटतयं, त्यापेक्षा स्वत:ला काय वाटतयं; याचा जास्त विचार करतो.' "सॉरी सर, थोडं पर्सनल सांगतो तुमच्याबद्दल. तुमच्याकडे पाहून मला खूप प्राऊड फिल होत आहे. "आयटी'त खूप कटकटी असताना तुम्ही एवढे फ्रेश कसे?', याने पुन्हा प्रश्‍न केला. त्यानंतर काही काळ कोणीच काही बोललं नाही. "कटकटी म्हणजे काय?', त्याने प्रश्‍न विचारला. तरुण बावरला. "सॉरी सर', म्हणत त्याने चर्चा थांबवायचा प्रयत्न केला. "अरे, बोल रे बिनधास्त बोल. उद्यापासून आपली कधी भेट होईल काही सांगता येत नाही. तुला टीम असाईन केली की माझं काम संपलं...', तो आता चांगलाच खुलला होता. "ओके. म्हणजे सर, फॅमिलीला वेळ देणे, ऑफिसमधले पॉलिटिक्‍स, अपडेटस ठेवणे शिवाय बॅंकेचे प्रिमिअम्स, जॉब सिक्‍युरिटी वगैरे वगैरे', तरुणाने "कटकटी' सांगितल्या.

"सगळ्यात पहिल्यांदा या सगळ्या कटकटी आहेत हे म्हणणं सोडून दे. दुसरी गोष्ट हे सगळे प्रकार फक्त "आयटी'तील लोकांनाच फेस करावे लागतात हा भ्रमही काढून टाक. तुला एक सांगतो. मी इंटर्नशिपला एका कंपनीत गेलो, तिथं पहिल्याच दिवशी तिथल्या एकाने मला छान मेसेज दिला होता. आयटीत नक्की नोकरी कर. पण काही वर्षांसाठी. कर्जाच्या चक्रात अडकून राहून एसीमध्ये पिझ्झा खाण्यापेक्षा गावाकडे आईच्या हातची चुलीवरची भाकरी आयुष्यभर खाऊ शकशील एवढेच पैसे कमव. आयुष्य जगायला शिक, असं त्यानं मला सांगितलं होतं. बाकी टाईम मॅनेजमेंट केलं की फॅमिलीला वेळ देता येतो आणि कोणत्याही ऑफिसमध्ये पॉलिटिक्‍स वगैरे असतच रे. जगात कोठेही गेलास तरीही. अपडेटस ठेवणं ही आपल्या प्रोफेशनची गरज आहे. बॅंकेचे प्रिमिअम्स काय फक्त "आयटी'तल्यांनाच आहेत का? आणि जॉब सिक्‍युरिटी म्हणशील तर या क्षणाला भूकंप झाला आणि ही इमारत कोसळली तर... काय गॅरंटी माणसाच्या जगण्याची. मग जॉबची गॅरंटी कशाला हवी?', याने एका दमात खुलासा केला.

"सर, यु आर ग्रेट. सॅल्युट सर. बट सर, "आयटी'तल्यांना फॉरेनला जाण्याची संधी असते. पण...', तरुणाला पुन्हा थांबवत तो बोलू लागला, "पॉलिटिक्‍स वगैरे सोडून दे रे. इफ यू हॅव क्वालिटी, डेडिकेशन देन यू कॅन डू एनिथिंग. मी फक्त गेल्या सहा वर्षांपासून आयटीत नोकरी करतोय. ठरवलचं आहे की फक्त बारा वर्षे यात घालवायची. मग या काळात जे करता येईल, ते करायचं. क्वालिटी मेंटेन केली आणि पॉलिटिक्‍स वगैरे म्हणतात नं ते सुद्धा थोडं फार केलं. म्हणजे कोणाचं वाईट नाही केलं पण स्वत:ला संधी निर्माण व्हाव्यात असं वातावरण निर्माण केलं.' "म्हणजे', तरुणाला काही उमगलं नाही.

"म्हणजे, समजा तुझ्या टीम लीडरचं किंवा बॉसचं किंवा बॉसच्या बॉसचं दररोज कौतुक केल्यानं त्याला बरं वाटत असेल तर त्यात बिघडलं कुठं? कधी कधी समजा बॉसनं एखादं एक्‍स्ट्रा काम सांगितलं तर बिघडलं कुठं? मी तेच केलं. झालं माझी प्रगती होत गेली. गेल्या पाच वर्षातील माझी ही तिसरी कंपनी आहे. अर्धा डझन देशात जाऊन आलो आतापर्यंत. स्वत:चं घर, गाडी स्वप्न साकार झाली. मलाही फार फार तर सहा महिने झाले असतील या कंपनीत येऊन. पण एक केलं. कधी कोणाचं वाईट केलं नाही आणि कधी कोणाशी मतभेद निर्माण होऊ दिले नाहीत. थोडं फार ऍडजस्ट केलं. गॉसिपींग कधी केलं नाहीच पण गॉसिपींग करणाऱ्यांपासून दूर राहिलो', याने खुलासा केलं.

"मला आजही आठवतयं. माझ्या पहिल्या पगारात मी एका मंदिरात बोललेला नवस फेडायला गेलो होतो. पण तिथं याचना करणारे हात दिसले. दगडाच्या हातांपेक्षा माणसांच्या हातात नवसाचे पैसे दिले. काय आनंद झाला. त्याच दिवशी मी पहिल्यांदा माझ्या गावी बाबांच्या नावाने पाच आकड्यातील मनीऑर्डर पाठवली होती. मनीऑर्डर लिहिताना माझा हात थरथरत होता. तिकडं मनीऑर्डर घेताना आई-बापाचा हात थरथरत होता. मी दुसऱ्या एखाद्या फिल्डमध्ये गेलो असतो तर मी पहिल्याच पगारात कधीच पाच आकडी मनीऑर्डर नसतो पाठवू शकलो. शेवटी पैसा महत्त्वाचा आहे', याच्या डोळ्याच्या कडा एव्हाना पाणावल्या होत्या.

"मंदिरातील याचना करणारे हात आठवले किंवा कधी दिसले की स्वत:चा खूप अभिमान वाटतो. कधी कधी मित्र-मैत्रिणींना फायनान्शिअल अडचणी आल्या की ते माझ्याकडे येतात. जर मी "आयटी'त नसतो; तर मी त्या मित्र-मैत्रिणींच्या जागी असतो असा विचार करून मी त्यांना अगदी शक्‍य तेवढी मदत करतो. जगायला पैसा लागतोच. फक्त तो मिळवताना स्वत:तला "माणूस' जपायला हवा. माझे खूप मित्र वेगवेगळ्या फिल्डमध्ये काम करतात. पण सतत फिल्डला शिव्या घालतात. फिल्ड कोणतंही असो. "आयटी' किंवा अन्य कोणतंही ते आपल्या पोटापाण्याचं साधन असतं. एखाद्या ठिकाणी आपण किती वर्षे काम केलं; त्याही पेक्षा तिथं काम केल्याने आपण किती वर्षे स्वत:चा निर्वाह करू शकलो हे महत्त्वाचं असतं. आपल्या फिल्डवर आपली निष्ठा असावी. मी माझ्या फिल्डचा फुल रिस्पेक्‍ट करतो. म्हणून तर मला "आयटी'त जगायला मजा वाटते. प्रत्येकाने स्वत:च्या फिल्डमध्ये जगत असल्याची मजा घ्यायला हवी', त्याने डोळे पुसले.

"ग्रेट, ग्रेट, ग्रेट सर..', तरुण निशब्द झाला होता. "चल, तुझ्या पहिल्या टीमशी तुझी ओळख करून देतो', दोघेही मिटिंग हॉलच्या बाहेर पडले.
(Courtesy: eSakal.com)

6/10/2017

भ्रमात राहु नका (बोधकथा)

गौतम बुद्ध काही शिष्यांना उपदेश करत होते. "आपण जे समजतो तेच सत्य आहे, असे कधीही समजू नका. कदाचित सत्य काही तरी वेगळेच असू शकते. सतत डोळे उघडे ठेवा. जाणीवा जागृत ठेवा.' असा उपदेश बुद्धांनी केला. त्यावर काही शिष्यांना अधिक विस्ताराने सांगण्याचा आग्रह केला. त्यानंतर बुद्ध एक गोष्ट सांगू लागले.

एका गावात एक गरीब व्यक्ती राहत होता. गावाबाहेरील एका वसाहतीत त्याची छोटीशी झोपडी होती. त्याला एक मुलगा होता. गंभीर आजारामुळे काही वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीचा मृत्यु झाला होता. त्यामुळे पत्नीनंतर त्यानेच आपल्या मुलाचे योग्य संगोपन केले होते. गावातील एका घरात तो व्यक्ती रात्रभर पहाऱ्याचे काम करत असे. मुलावर त्याचे प्रचंड प्रेम होते. मुलगा आता शाळेत जाऊ लागला होता. मुलगा सुरक्षित राहावा यासाठी तो दररोज मुलाला लवकर झोपवून बाहेरून कुलूप लावून कामावर जात असे. दुर्दैवाने एका रात्री तो राहात असलेल्या वसाहतीवर दरोडा पडला. दरोडेखोरांना त्याच्या मुलाला बाहेर काढले. झोपडीतील सर्व सामान लुटले. ज्या घरात माणसे नव्हते अशा शेजारच्या काही घरातील सामान लुटले. हा सारा प्रकार अगदी गुपचूप झाल्याने आजूबाजूच्यांना काहीच समजले नाही. मात्र दरोडेखोरांनी जाताना सर्व झोपडपट्यांना आग लावली आणि त्या व्यक्तीच्या मुलाला घेऊन ते फरार झाले.

दुसऱ्या दिवशी काम संपवून तो व्यक्ती घराकडे आला. त्यावेळी समोरचे दृश्‍य पाहून त्याला प्रचंड दु:ख झाले. झोपडी जळाली. आपला मुलगाही त्यात जळून गेला, असे त्याला वाटले. त्याने प्रचंड शोक केला. काही दिवसांनी दु:खातून सावरत त्याने पुन्हा पूर्ववत आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांत त्याने पुन्हा झोपडी उभी केली. त्या आधी एका डब्यामध्ये झोपडीतील थोडी राख एकत्र केली. आपला मुलगा नव्हे तर किमान त्याची राख तरी आपल्यासोबत कायम राहील, असे समजून तो राखेचा डबा कायम स्वत:जवळ बाळगू लागला. अशातच काही वर्षे गेली. एके दिवशी काम संपवून सकाळी-सकाळी तो राखेचा डबा घेऊन झोपडीत आला. झोपडीचे दार त्याने आतून बंद केले होते. त्याचवेळी दरोडेखोरांच्या तावडीतून सुटून त्याचा मुलगा त्याच्या दाराशी आला. बाहेरून जोरजोरात दार वाजवू लागला. "मी तुमचा मुलगा', असा आवाज देऊ लागला. मात्र आपला मुलगा तर केव्हाच मृत झाला आहे, असा समज करून बसलेल्या त्या व्यक्तीने स्वत:च्या मुलाकडेच दुर्लक्ष केले. शेजारच्या झोपडीतील मुले आपली गंमत करत असतील, असे समजून त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. खूप वेळ दार वाजवूनही दार न उघडल्याने मुलगा हताश होऊन पुन्हा दूर निघून गेला.

बुद्धांची गोष्ट संपली होती. मात्र शिष्यांची विचारप्रक्रिया सुरू झाली होती. बुद्ध सांगू लागले, "पाहा, "आपला मुलगा मेला' हा समज त्या व्यक्तीच्या मनावर एवढा खोल रूजला होता, की कदाचित सत्य काहीतरी वेगळेच असेल आणि आपला मुलगा जिवंत असेल एवढा विचार करण्याचेही त्याला भान नव्हते. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही जे समजता तेच सत्य असते अशा भ्रमात राहु नका.'
 
(Courtesy: eSakal.com)

6/09/2017

क्षमायाचना (बुद्धकथा)

एका गावात एक मोठा व्यापारी होता. त्याला चार मुले होती. त्याची चारही मुले दररोज बुद्धांसमोर तीन-चार तास बसत होती. व्यापाऱ्याला प्रश्‍न पडला. मुले बुद्धांसमोर बसण्यापेक्षा दुकानात बसली तर जास्त नफा होईल, व्यापाऱ्याने विचार केला. एकेदिवशी व्यापारी मुलांच्या मागे गेला. मुले बुद्ध बसलेल्या ठिकाणी आली. बुद्ध डोळे मिटून शांतपणे बसून होते. त्यांच्यासमोर काही लोकही बसले होते. मुलेही त्यांच्यासमोर डोळे मिटून शांतपणे बसले. "त्यांनी डोळे मिटलेले आहेत आणि माझी मुलेही त्यांच्यासमोर डोळे मिटून बसलेली आहेत', हे पाहून व्यापारी संतापला. व्यापाऱ्याने बुद्धांना दूषणे देण्यास प्रारंभ केला. जोराजोरात वाईट बोलू लागला. तरीही सारे जण शांत होते. बुद्ध किंवा समोर बसलेले मुले काहीच प्रतिसाद देत नसल्याचे पाहत व्यापारी बुद्ध बसलेल्या ठिकाणाजवळ रागाने थुंकला आणि निघून गेला. बुद्ध, व्यापाऱ्याची मुले किंवा समोर बसलेल्यांपैकी कोणीही काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे व्यापारी निघून गेला.

त्या रात्री व्यापाऱ्याला झोप लागली नाही. आपण एवढी दूषणे दिली. एवढे वाईट बोललो. त्यांच्याजवळ थुंकलो. तरीही त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. इतर वेळी आपण कोणालाही एक शब्दही वाईट बोललो, तर लोक चिडतात. पण बुद्ध, त्यांचे अनुयायी मात्र शांत होते. कदाचित आपणच चुकीचे काम केले असेल. आपणच चुकलो आहोत, असा विचार व्यापारी करू लागला. त्याला रात्रभर झोप लागली नाही.

दुसऱ्या दिवशी उठून तो बुद्धांकडे गेला. बुद्धांना नमस्कार करून तो क्षमा मागू लागला. "मी जे केले आहे. त्याचा मला पश्‍चाताप होत आहे. कृपया मला माफ करा', व्यापारी विनंती करू लागला. मात्र बुद्धांनी अनपेक्षित उत्तर दिले, "मी तुला माफ करू शकत नाही!' त्यामुळे व्यापारी आणखी त्रस्त झाला. तो म्हणाला, "पण आपण मला का माफ करू शकत नाहीत?' त्यावर बुद्धांनी उत्तर दिले, "ज्याने काल दूषणे देण्याचे, थुंकण्याचे कृत्य केले तो तू नाहीस. माझा द्वेष करणारा काल रात्रीच निघून गेला आहे. आता माझ्यासमोर जो माणूस क्षमायाचना करत आहे त्याने काहीही चूक केलेली नाही. जर तू काहीही चूक केली नसेल तर मी कशासाठी क्षमा करावी?'
हे ऐकून व्यापाऱ्याने बुद्धांचे पाय धरले.

(Source: esakal.com)

3/29/2017

तुम्हाला आवडतील असे पटकन वाचून होणारे विचार

तुम्हाला आवडतील असे पटकन वाचून होणारे विचार







Related Posts Plugin for WordPress, Blogger...