12/27/2014

प्रशासकीय संस्कार

पले राष्ट्र हे विविधतेत एकता साधणारे राष्ट्र आहे. आपल्या देशात विविध धर्माचे, जातीचे, पंथाचे, संप्रदायाचे लोक वास्तव्य करतात. एवढी सारी विविधता असूनदेखील आपण सारे परस्परांचे बंधू आहोत, अशी प्रगल्भ विचारसरणी आपण निर्माण केली आहे. आणि हा बंधुभाव आपण प्रत्यक्ष अंगीकारलेला देखील आहे. हा आपल्यावर झालेल्या संस्काराचाच एक भाग आहे. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्श दिनक्रम आवश्यक असतो. भारतातील विविध धर्मांनी आदर्श दिनक्रम,  दाखवून दिला आहे.  साधारणपणे यालाच संस्कार असे संबोधता येऊ शकेल.  संस्कार हा मूळ हिंदी भाषेतून आलेला शब्द आहे. सांस्कृतिक वारसा आणि त्याचे जतन असाही अर्थ संस्कार या शब्दातून प्रतीत होतो. माणसाचे आयुष्य हे सामाजिक, सांस्कृतिक, नैतिक दृष्टीने विकसित करण्याकरिता संस्कार मोलाची भूमिका बजावत असतात. जीवनातील काही मूलभूत अत्यावश्यक अशा मूल्यांना केंद्रस्थानी ठेवूनच संस्कारांची निर्मिती आणि त्यांचा विकास झालेला आहे. थोरांचा आदर करावा, सत्य बोलावे, सर्वांचा सन्मान करावा अशा प्रकारच्या काही मूल्यांचा त्यामध्ये समावेश आहे.

अलिकडे अनेक क्षेत्रांमध्ये हळूहळू संस्कार ही संकल्पना रूढ होत आहे. आज  संस्कार या संकल्पनेकडे व्यापक दृष्टिने पाहण्याची गरज आहे. एकविसाव्या शतकात प्रशासन अधिक गतिशील, पारदर्शक आणि लोकसहभागी होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनातही ‘संस्कार’ ही संकल्पना राबविता येऊ शकेल. या संकल्पनेला ‘प्रशासकीय संस्कार’ असे संबोधता येऊ शकेल. शासकीय सेवेत सध्या कार्यरत असणार्‍या आणि विशेषत: नव्याने येऊ इच्छिणार्‍या अधिकारी-कर्मचारी यांच्यावर अशा संस्कारांचे संस्करण करता येऊ शकेल. हे प्रशासकीय संस्कार काय असतील याविषयी चर्चा करूयात.

सर्वांवर प्रेम करा

प्रेम या संकल्पनेकडे अधिक व्यापक दृष्टिने पाहण्याची गरज आहे. प्रेम हे केवळ दोन भिन्नलिंगी व्यक्तींमध्येच असते असे नाही, तर कोणत्याही दोन गोष्टींमध्ये निरपेक्ष प्रेम असू शकते. येथे प्रेम हे अलौकिक अर्थाने अभिप्रेत आहे.

पोथी पढ पढ जग मुआ। 
पंडित भया न कोई॥
ढाई आखर प्रेम के। 
पढे सो पंडित होई॥

कितीही शास्त्रं वाचली, मनुष्य ज्ञानी झाला, पंडित झाला तरी त्याचा उपयोग नाही. ज्याने प्रेमाची अडीच अक्षरे वाचली तोच खरा पंडित होय. असे संत कबीर आपल्या एका वचनात म्हणतात.


शासकीय कार्यालयांमध्ये दररोज विविध कामांच्या निमित्ताने सामान्य नागरिकांचा वावर असतो. कोणत्याही शासकीय अथवा खाजगी काम घेऊन कार्यालयात येणार्‍या व्यक्तीला प्रेमाने, आपुलकीची वागणूक मिळत नाही.  त्यांना ‘बसा, तुमचे काय काम आहे?’ अशीही चौकशीही बर्‍याचदा होत नाही. या पार्श्वभूमीवर कार्यालयात आलेल्या नागरिकांवर बंधुभावाच्या भावनेने पाहून त्यांच्यावर प्रेम करण्याची गरज आहे. कवी रूमी यांनी म्हटले आहे, ‘‘प्रेम शोधणे हे तुमचं काम नाही. पण स्वत:मधील प्रेमाला विरोध करणार्‍या सर्व गोष्टींचा नाश करणे हे तुमचं काम आहे.’’ ज्याप्रमाणे आपण आपल्या घराबाहेर आपल्या कुटुंबातील सदस्यांना  वागणूक देतो, तसेच वर्तन सामान्य नागरिक भेटल्यावर करणे हा एक प्रशासकीय संस्कारच आहे. याशिवाय आपले सहकारी, आपले वरिष्ठ, आपले कनिष्ठ यांना देखील अशाच प्रकारची वागणूक देणे आवश्यक आहे. त्यामुळे जनमानसामध्ये शासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी मदत होईल आणि पर्यायाने शासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होईल. प्रशासनातील सारीच यंत्रणा ज्यादिवशी अशा-प्रकारचा बंधुभाव आणि प्रेमभाव सर्वांप्रती दाखवेल त्यादिवशी आपण खर्‍या अर्थाने विकसित होऊ. सर्वांवर प्रेम करणे हा प्राथमिक ‘प्रशासकीय संस्कार’ असू शकेल. तो प्रत्येकाने स्वत:मध्ये रूजविणे नितांत आवश्यकता आहे.


कामाप्रती निष्ठा













आपण ज्या आस्थापनेमध्ये, ज्या यंत्रणेमध्ये जे काम करतो; त्या कामाप्रती आपली निष्ठा असणे अत्यंत आवश्यक आहे. कामातून मिळणारा मोबदला हा उदरनिर्वाह असतो; तर प्रत्यक्ष केलेले काम हा व्यक्ती विकास असतो. जो मनुष्य आयुष्यभर केवळ जबाबदारी म्हणून काम करतो; तो आयुष्याच्या उतारवयात आयुष्यभर काहीच न केल्याची खंत व्यक्त करत असतो. जेवढे अधिक काम तुम्ही कराल, तेवढे अधिक तुम्हाला शिकायला मिळेल. मग भलेही नव्याने काही शिकताना अनावधनाने चूक झाली तरी चालेल. स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘एखादा दिवस जर तुमची एकही चूक झाली नाही किंवा तुम्हाला एकही संकट आले नाही, तर समजा की तुम्ही चुकीच्या वाटेने प्रवास करीत आहात.’’ म्हणून प्रशासनात काम करत असताना स्वत:च्या आणि पर्यायाने देशाच्या विकासासाठी निष्ठेने, सचोटीने काम करणे हा ही एक महत्त्वाचा प्रशासकीय संस्कार म्हणून संबोधता येईल.

तंत्रज्ञानाचा वापर

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपण सध्या वावरत आहोत. संगणकाचा, तंत्रज्ञानाचा दैनंदिन कामात अधिकाधिक उपयोग करून प्रशासन गतिशील करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ई-ऑफिसच्या, लेस पेपर ऑफिसच्या दिशेने आपली घोडदौड सुरू आहे. अशा परिस्थितीत तंत्रज्ञानाचा वापर आवश्यकच नव्हे, तर अपरिहार्य झाला आहे. पूर्वी ज्यांना लिहिता, वाचता येत नव्हते; त्यांना निरक्षर संबोधले जात होते. लवकरच संगणक साक्षर नसणे म्हणजे निरक्षर असे म्हटले जाईल. प्रशासन सुलभ पद्धतीने आणि गतीने कामकाजासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यावर भर देत आहे. या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाचा-संगणकाचा वापर हा ही प्रशासकीय संस्कार म्हणून समोर आणता येईल.

शिकण्याची आवड

तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे संस्कार करतानाच तंत्रज्ञान शिकण्याची आवड असली पाहिजे. तसेच दैनंदिन कामात सुलभता येण्यासाठी सहकार्‍यांकडून, कनिष्ठांकडून, वरिष्ठांकडून जे जे शिकायला मिळेल; ते ते शिकत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मोठमोठ्या रूग्णांवर हजारो यशस्वी शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टर्सना चशवळलरश्र झीरलींळींळेपशी म्हणून संबोधले जाते. कारण ते ही प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकत असतात. शिकण्याची निरंतर प्रक्रिया सुरूच असते. ती आवश्यकही असते. केवळ त्यात आवड दाखविली की आपल्याला त्यात अधिक रस निर्माण होईल. शिकण्याची आवड प्रत्येकाला असते. मात्र, आपण काही नवीन शिकले तर आपल्याला अधिक काम करावे लागेल, अशा भ्रमात राहून आपण स्वत:लाच अधोगतीकडे घेऊन जात असतो. त्यामुळे शिकण्याची आवड हा एक ‘प्रशासकीय संस्कार’ होऊ शकतो.

कार्यालयीन स्वच्छता अनेक कार्यालयात अधिकारी कर्मचार्‍यांची भेट घेण्यासाठी अभ्यागतांना ताटकळत उभे राहावे लागते. बर्‍याच कार्यालयात काम करणार्‍यांनी लक्ष घालून आपले कार्यालय स्वच्छ, टापटीप, प्रसन्न ठेवले पाहिजे. ज्यामुळे कामातील उत्साह वाढण्यास मदत होऊ शकेल. त्यामुळे स्वच्छता हा ही एक प्रशासकीय संस्कार आवश्यक आहे.

नैतिक आचरण

नैतिक आचरण हे आपल्या वैयक्तिक निर्णयाशी संबंधित असते. जेव्हा कृती व्यवस्थेच्या मूल्यांशी सुसंगत असते, तेव्हा ते आचरण नैतिक असते. उत्तरदायित्त्व, पारदर्शीपणा आणि गती ही प्रशासनाची काही मूल्ये आहेत. आपला प्रत्येक कार्यालयीन निर्णय या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून घेतला पाहिजे. आपल्या प्रत्येक निर्णयाला नैतिकतेच्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. ज्यावेळी शासकीय यंत्रणेतील प्रत्येक घटक अशा प्रकारची दृष्टी ठेवेल त्यावेळी सगळीकडे समृद्धता पसरलेली पाहायला मिळेल. यामुळे ‘नैतिक आचरण’ हा ही एक प्रशासकीय संस्कार गृहित धरता येऊ शकेल.

प्रशासकीय संस्कार समजून घेतल्यावर हे सारे संस्कार कोणी कोणावर कोठे करावेत असा प्रश्‍न उपस्थित राहणे नैसर्गिक आहे. अर्थातच यातील सर्वच किंवा काही संस्कार अनेकजण अनेक वर्षांपासून प्रत्यक्ष अंमलात आणत असतील. त्यांचे कार्य कौतुकास्पदच आहे. हे संस्कार शासकीय कार्यामधील वरिष्ठांनी आपल्या सहकार्‍यांवर करणे अपेक्षित आहे. प्रसंगी आपण स्वत: आपल्या सहकार्‍यांसह याविषयी चर्चा करू शकता. अर्थातच त्यासाठी प्रत्यक्ष वर्गखोलीतून हे संस्कार करण्याची आवश्यकता नाही. प्रवासात, जेवणाच्या सुटीत जेथे शक्य असेल आणि जेथे अगदी अनौपचारिक वातावरण असेल अशाच वातावरणात याविषयीची चर्चा अधिक फलदायी ठरू शकेल. हे संस्कार एका रात्रीत प्रत्यक्षात अवतरतील असे नाही. तर हळूहळू एक-एक करून अंगिकारणे ही सुप्रशासनाची वाटचाल ठरेल, हे नि:संशय!

(या लेखासाठी मानवशास्त्रज्ञ अनुज घाणेकर यांनी सहाय्य केले आहे.)

(यशदा यशमंथन जानेवारी-मार्च २०१४ मध्ये प्रकाशित)

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...