7/21/2015

मैत्रिणी चालणार नाहीत!

"लग्नानंतर तुमच्या मैत्रिणी घरी आलेल्या चालणार नाहीत‘ तिनं स्पष्टपणाने आपल्या भावी पतीला बजावलं. तो काहीच बोलला नाही. एका नातेवाईकाकडून हे स्थळ त्याला आलं होतं. दोघांची ही दुसरी भेट होती. अर्थात अद्याप काहीच निश्‍चित झालं नव्हतं. पहिली भेट तिच्या घरी होती. तर दुसरी भेट त्याच्या घरी होती. दुसऱ्या भेटीमध्ये दोघेजण आतल्या खोलीत जाऊन बोलत होते. "तुम्ही फेसबुक वगैरे वापरता. तुम्हाला मैत्रिणी असतीलच. मला तुमच्या मैत्रिणी असलेल्या आवडणार नाहीत. लग्नानंतर कोणतीही मैत्रिण घरी आलेली चालणार नाही‘ असे तिने स्पष्ट सांगितले. एवढ्या अपेक्षेशिवाय तिने काहीही इतर अपेक्षा सांगितल्या नाहीत. परस्परांमध्ये इतर काही विचारपूस वगैरे झाल्यावर दुसरी भेटही संपली.

तो तत्वज्ञानाचा पदवीधर होता. तर ती विज्ञान शाखेची पदवीधर होती. दोघांची कौटुंबिक पार्श्‍वभूमी सारखीच होती. दोन्ही कुटुंबियांच्या या विवाहासाठी होकार होता. "मैत्रिणी चालणार नाहीत!‘ हा एकच विचार मुलाच्या मनात घुमू लागला. त्यासाठी त्याने अद्याप काहीही निर्णय कळविला नाही. पुढील 2-3 दिवस तो आपल्या जवळच्या मित्रांकडून याबाबत चर्चा करत होता. एक मित्र म्हणाला, "तिचे मित्र घरी आलेले तुला चालतील का? मग तुझ्या मैत्रिणी तरी तिला कशा चालतील? तिला सांगून टाक. लग्नानंतर मैत्रिणी घरी येणार नाहीत‘ पण तरीही ती आतापासूनच स्वातंत्र्यावर गदा आणत असल्याचं मुलाला वाटत होतं. अशातच दुसऱ्या एका मित्रानं सांगितलं, "हो म्हणायचं, लग्न झालं की सगळं बरोबर होतं‘ तर तिसऱ्या एका मित्रानं सांगितलं, "काय कर, तिला प्रेमाने समजून सांग. की माझ्या मैत्रिणी आहेत. पण मैत्री निखळ आहे.‘ तर त्याच्या कुटुंबियांनी मात्र स्पष्ट सांगितलं. "मुलगी जर आताच मुलाला धाक दाखवत असेल, तर पुढे आयुष्य कसे निभावून नेईल?‘

तत्वज्ञानाचा विद्यार्थी असल्याने अशा साऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यावर लग्नाच्या विषयापेक्षाही एखाद्या मुलीच्या दृष्टीकोनाबाबत समाजाची भूमिका किंवा विचार करण्याची पद्धत त्याला नव्याने समजली होती. मात्र, त्याचा या स्थळाबाबत काहीही नेमका निर्णय होत नव्हता. कारण "मैत्रिणी चालणार नाहीत‘ हा विचारच त्याच्या मनात घोळत होता.

(Courtesy: esakal.com )

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...