6/21/2016

भाड्याचे घर

"आठ हजार रुपये भाडे. तीस हजार रुपये डिपॉझीट. सोसायटी, लाईटबिल वेगळे. कमिनश दोन महिन्यांचे भाडे‘, भाड्याचे घर दाखवत इस्टेट एजंटाने व्यवहाराच्या गोष्टी सांगितल्या. त्यावर त्या दोघांनी ठीक आहे, म्हणत "काही कमी जास्त वगैरे..‘ अशी विचारणा केली. त्यावर "कमीत कमी आहे बघा, एरिया पॉश आहे. सोसायटी चांगली आहे चिंताच करू नका.‘ असे सांगितले. त्यावर दोन दिवसांनी कळविण्याचे आश्‍वासन देत, पती-पत्नीने एजंटाचा निरोप घेतला. त्या दोघांचा विवाह होऊन दोनच वर्षे झाली होती. आई-बाबा गावाकडे राहात होते. त्यांना लवकरच इकडे आणायचे होते. त्यासाठी जरा मोठे घराचा शोध घेण्यात येत होता. पती-पत्नी दोघेही नोकरी करत होते. सध्या ते वन रूम किचनमध्ये राहात होते. एजंटाने दाखविलेले घर वन बीएचके होते. पुरेसे होते. दोघेही समजूतदार होते. नोकरी करत होते. परस्परांना समजून घेत होते.

दोघेही घरी पोचले. एजंटाच्या प्रस्तावावर विचार सुरू झाला. "अरे, आठ हजार भाडे. सोसायटी आणि लाईटबिल म्हणजे जवळपास दहा हजाराच्या घरात जाणार रे आणि पुन्हा अकरा महिन्यांनी टांगती तलवार. घर बदलायला परत पैसे...‘, पत्नीने व्यथा मांडली. "अगं आपण एकटेच आहोत का जगात असे? अनेक लोकं राहातात की भाड्याने आणि घेऊ एक ना एक दिवस आपले स्वत:चे घर, हळूहळू पैसे जमा करून.‘, पतीने समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावर पुन्हा पत्नी बोलू लागली, "पण बघ ना आता दोन वर्षांत आपण दोन वेळा घर बदलले. त्यातच मालकांना सोसायटीचे पैसे कमी आणि भाडेकरूंना जास्त. आपण काय माणसं नाहीत का? का आपण जास्त जागा वापरतो?‘ त्यावर पती पुन्हा समजावू लागला, "अगं, तो व्यवहाराचा प्रश्‍न आहे. त्यावर तोडगा निघायला हवा. पण सध्या तरी आपल्याला जे आहे ते स्वीकारायला हवयं ना! आणि या जगात आपणच एकटे भाड्याने राहातो का? खूप जण राहतात की. कॉट बेसीस, पेईंग गेस्ट, रूम करून, हॉस्टेलमध्ये किती जण जगतात..‘ त्यावर पत्नीने मुद्यालाच हात घातला, "ते राहु दे रे.. पण गावाकडची जमीन विकून आपण थेट स्वत:च्या घरातच राहायला जाऊ शकतो ना रे. काही तरी घे की निर्णय‘ आता पती थोडासा अस्वस्थ दिसला. "अगं, तुला तर माहित आहेच मी आतापर्यंत आई-बाबांकडून काहीच घेतलेले नाही. त्यांनी मोठ्या कष्टाने थोडीशी जमीन घेतली आहे. शिवाय तोच त्यांचा आधार आहे. त्यांचं मन इकडं रमत नाही. बघू मागे पुढे. तोपर्यंत आपले पैसेही जमतील. घेऊ की घर‘, एवढ्यावर त्यांचा संवाद थांबला. तसेच एजंटाने दाखविलेल्या घरात जाण्याचा निर्णय झाला.

घर बदलून आता आठ दिवस झाले. घरातील सामान अद्यापही व्यवस्थित लागलेले नव्हते. रविवारचा दिवस होता. "भाड्याने राहाणे म्हणजे गणपतीच्या देखाव्यासारखे असते. दरवर्षी हलवावा लागतो‘, साऱ्या कामामुळे थकल्याने तिने नवऱ्यापुढे व्यथा मांडली. "खरं आहे गं! पण आज आपल्याला नीट सामान लावावे लागेल. आज आई-बाबा येणार आहेत. संध्याकाळपर्यंत पोचतील‘ त्याने आठवण करून दिली. दोघे मिळून घरातील सामान आवरू लागले.

संध्याकाळ झाली. ठरल्याप्रमाणे आई-बाबा आले. संध्याकाळचे जेवणे उरकून सारे जण गप्पा मारू लागले. इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्यावर बाबा म्हणाले, "सूनबाई, जरा नीट ऐक. लय त्रास व्हतो तुमाला या भाड्याच्या खोलीत. होतो तुम्हाला या भाड्याच्या घरात. सारखं सामान हलवायचा. मी बी नोकरीत असताना असच व्हायचं. 2-3 वर्षांनी सारखी बदली व्हायची. शेवटी रिटायर झालो अन्‌ गाव गाठलं. पण तुमाला हा त्रास नकू म्हणून आमी एक निर्णय घेतलाय‘ सगळे जण शांतपणे आणि उत्सुकतेने ऐकत होते. "अरे, आम्ही आता म्हतारे झालो. आम्हाला तुमच्याशिवाय कुणाचा बी आधार नाय. गावाकडं एकटे राहताना मन नाय रमत. सारखं तुमची चिंता. शिवाय तुमालाबी स्वत:चं घर हवंच की. गावातल्या एकाला बोललोय. जमीन काढतोय. चांगला भाव येतोय. जे काय पैसे येतील ते घरासाठी उपयोगी पडतील. जे काय उरतील त्याचं लोन करू. आम्हालाही तुमच्याजवळच राहाता येईल, कायम! आता या घरातून जायचं ते थेट स्वत:च्या घरात‘ बाबांनी बोलणे संपवले. थोडा वेळ सगळीकडे शांतता पसरली.

(Courtesy: eSakal.com)

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...