11/07/2013

एका स्त्रीने अवघ्या मनुष्यमात्राला लिहिलेले पत्र....

एका स्त्रीने अवघ्या मनुष्यमात्राला लिहिलेले पत्र....


प्रिय माणसा,

देवांच्या राज्यात अग्रक्रमाने आमचा अर्थात स्त्री जातीला सन्मानाने वागवितात. म्हणूनच तर त्यांच्याकडील महत्त्वाचा कारभार अन्नपूर्णा, सरस्वती, धनलक्ष्मी आदी स्त्रीवर्गांकडे सोपविला जातो. दुर्दैवाने तुम्हा माणसाच्या  जगात आम्हाला हवा तेवढा सन्मान दिला जात नाही. आम्ही अगदी गर्भात असल्यापासून आमच्यावर कटू नजरेने पाहिलं जातं. जन्माला येणार्‍या अपत्याकडे माणूस म्हणून कधीच बघितलं जात नाही. तसं असतं तर मुलगा जन्मल्यावर पेढे आणि मुलगी जन्मल्यावर बर्फी अथवा जिलेबी असा भेदाभेद झालाच नसता. शिवाय गर्भातूनच आम्हाला ज्या देवाकडून आलो आहोत त्याच देवाकडे पाठविण्याचा प्रयत्न केला जातो.




पुढे कसंतरी जन्म घेऊन आम्ही स्त्रीजन्माचा अवतार धारण केला की, आयुष्यभर आमच्याकडून पडद्याआड राहून काबाड कष्टाची अपेक्षा केली जाते. घरातील भांड्याकुंड्यांच्या साफसफाईपासून माणसांची घरातील सदस्यांची दूषित झालेली मनेदेखिल साफ करण्याची जबाबदारी आमच्यावरच येऊन ठेपते. नव्हे ते आमचे नैतिक कर्तव्य आहे असे आम्हांस सांगितले जाते.

भारतीय विवाहसंस्थांचा इतिहास बघितला तर फार पूर्वी मनुष्य अगदी रानटी प्राणी होता. त्यानंतर हळूहळू त्याचा विकास होत गेला आहे. मात्र या सार्‍या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही महिलांनीच संघटन, संरक्षण आणि विकास या करिता मनापासून प्रयत्न केले आहेत. या विकासाच्या प्रक्रियेमध्ये बर्‍याच वेळी आमच्या वाट्याला अन्याय, अत्याचार सहन करण्याची वेळ आली आहे. त्यातून आजच्या स्त्रीचे चित्र आपल्यासमोर उभे आहे. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तेच अन्याय अत्याचार आजही समाजातील स्त्री भोगत आहे, ही भारतासारख्या देशाला अत्यंत अशोभनीय बाब आहे. आम्हाला नेहमीच उपभोग्य वस्तू म्हणून पाहण्यात येते आणि तिचे निरनिराळ्या ठिकाणी विविध माध्यमातून अक्षरश: प्रदर्शन केले जाते. पुढे असे म्हटले जाते की, आम्ही स्वत:हून केलेल्या प्रदर्शनामुळेच समाजातील स्त्रीवर होणारे अत्याचार वाढले आहेत. अशा विचारसरणीला अर्थ नाही. मनुष्यमात्राला हवा तो सुगंध देणार्‍या सुगंध देणार्‍या आम्ही कधी फूल बनून, कधी घरातील चूल बनून तर कधी छोटसं मूल बनून सगळ्या वातावरणात गंध पसरविण्याचा प्रयत्न करीत असतो. तरीदेखील आम्हाला ‘परक्याचं धन’ म्हणूनच बघितलं जातं.

त्यामुळे माझं अवघ्या पुरुष जमातीला हेच सांगणं आहे की, जेव्हा जेव्हा जे जे हवं ते ते मी तुम्हांस देत आली आहे. त्याबदल्यात तुमच्याकडून मला काहीही नको. मात्र, माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, माझ्यासाठी, तुमच्या घरातील ताईसाठी, आईसाठी, पत्नीसाठी एवढं कराल?

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...