12/11/2013

फेसबुक प्रत्यक्ष कधी अवतरणार?

फेसबुक म्हटलं की काही लोकांना राग येतो. तर काही लोकांना शब्दातीत आनंद होतो. आनंद होणारा बहुतेक वर्ग हा कॉलेजात जाणारा, तरुण आहे. राग येणार्‍यांमध्ये ज्यांना फेसबुक वापरता येत नाही, अथवा थोडेसे वापरून कंटाळा आला आहे अशांचा वर्ग आहे. पण चला, आज आपली आवड निवड बाजूला ठेवून फेसबुककडे एका वेगळ्या दृष्टीने पाहूयात.

फेसबुकवर वयाची विशिष्ट मर्यादा पार करणारा वर्ग आपले खाते विनामूल्य उघडू शकतो. अर्थात् त्याकरिता कॉम्प्युटर अथवा स्मार्टफोनसह इंटरनेट लागणार हे निराळे सांगण्याची गरज नाही. खाते उघडताना किरकोळ माहिती दिली की आपण फेसबुकच्या जगात प्रवेश करू शकतो. मग आपण आपल्याला हवी ते तिथे लिहू शकतो, हवा तो फोटो शेअर करू शकतो, हवा तो व्हिडिओ अपलोड करू शकतो. त्यावर इतरांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ शकतो आणि एकप्रकारे परस्परांशी या ना त्या माध्यमातून संपर्कात राहू शकतो. याला व्हर्च्युअल कम्युनिकेशन म्हणतात. त्याचप्रमाणे इतरांनी शेअर केलेल्या गोष्टींना आपण लाईक करू शकतो, त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकतो. याला सोशल नेटवर्किंग असे संबोधतात.

फेसबुकवर अकाऊंट उघडत असताना तिथे कोठेही तुम्ही कोणत्या जातीचे, तुम्ही कोणत्या वर्णाचे, तुम्ही कोणत्या धर्माचे, तुम्ही कोणत्या प्रदेशातील असा भेदाभेद केला जात नाही. (इंटरनेटसेवा पुरविणे सोयीचे व्हावे म्हणून तुम्ही कुठल्या देशाचे हे मात्र विचारले जाते.) तिथे सर्वांना समान संधी असतात. एखाद्या राष्ट्राध्यक्षाला फेसबुकवर जेवढ्या सोयी वापरता येतात तेवढ्याच सोयी झोपडीत राहणार्‍या सामान्य व्यक्तीला देखील वापरता येतात. तिथे कोणताही भेदभाव नाही. तसेच (सुरक्षेचे अपवाद वगळता) कोणीही कोणाच्याही फोटोला लाईक करू शकतो, अन् त्यावर प्रतिक्रियाही देऊ शकतो.

फेसबुकवर कोणताही भेदाभेद नाही. जात, पात, धर्म, पंथ, संप्रदाय हे तर सोडाच. मात्र वर्णभेद, लिंगभेद, लहान-थोर, वरिष्ठ-कनिष्ठ, प्रदेशाचेही भेदाभेद येथे आढळून येत नाहीत. त्यामुळेच तर जगाच्या एका कोपर्‍यात बसलेली व्यक्ती जगातील दुसर्‍या कोपर्‍याशी संपर्क साधू शकते. तेथे भेटलेेले सारे सारे फक्त फेसबुक वापरकर्ते आहेत. दुसरे कोणीही नाही. सारे एक आहेत. फेसबुकवाले!

तिथे कोणतेही वाद नाहीत. कोणतेही तंटे नाहीत. असतील तर या प्रत्यक्ष जगातील वाद काही कंटकांनी तेथे नेऊन चर्चिले आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्या जगात कोणतेही वाद नाहीत. हवं त्याला आपण शोधू शकतो अन् व्हर्च्युअली भेटू शकतो. अर्थात या सार्‍यांना सुरक्षेच्या मर्यादा आहेत. पण त्याचं देखील प्रत्येकाला स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. ज्याला हवं तो तेवढं स्वत:चं जग सुरक्षित ठेवू शकतो. असं कोणतेच भेद नसलेलं, पूर्ण स्वातंत्र्य असलेलं जग प्रत्यक्ष कधी अवतरणार?

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...