12/27/2013

प्रेमात पडल्यावर काय होतं?

बर्‍याच वेळा आपल्याला आपण प्रेमात पडलो आहोत की नाहीत हे समजत नाही किंवा समजत जरी असलं तरी आपण जे अनुभवत आहोत; त्याला ‘प्रेमात पडणं’ म्हणतात हे आपल्याला माहित नसतं. पण तरीही आपण प्रेमात पडलेलो असतो, हे वास्तव असतं. चला तर मग, प्रेमात पडल्यावर होणार्‍या बदलांचा, येणार्‍या अनुभवांचा प्रवास करूयात.

प्रेमात पडल्यावर आपली प्रिय व्यक्ती आपल्यासमोर आली की आपल्या हृदयाचे ठोके नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने पडायला लागतात. ते स्पष्टपणे आपल्या शरीराला जाणवायला लागतं. ठोके तेच असतात. हृदयही तेच असतं. पण आपली प्रिय व्यक्ती असते. त्यानंतर जगातील सार्‍या गोष्टींना आपण निमिषार्धात विसरून जातो आणि समोर असलेल्या त्या व्यक्तीबद्दलच विचार करू लागतो. आपल्या सार्‍या जाणिवा, नेणिवा अन् अस्तित्त्व त्या व्यक्तीभोवती केंद्रित होतं. आपल्या शरीरात एक वेगळ्या प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचा आभास होतो. त्यातून आपण अवघ्या जगाला जिंकू असा विश्वास निर्माण होतो. ‘जग सुंदर आहे, जगणं मखमली आहे.’ असं वाटायला सुरुवात होते. आपल्या शरीरावर आपलं हृदय अधिराज्य गाजवू लागतं. काही क्षणांपुरतं तरी आपलं ‘हृदय’ म्हणजे अनभिषज्ञ सम्राट होतं.

काही वेळात ती व्यक्ती तशीच समोरून निघून जाते. तरीही पुढे काही मिनिटे आपण त्या अवस्थेतून बाहेर आलेलो नसतो. मात्र, पूर्वीपेक्षा थोडं हलकं वाटायला लागतं. हळूहळू आपण पूर्वावस्था प्राप्त करतो. पण तो क्षण आणि ती व्यक्ती आपल्या डोक्यात घर करून राहते. दिवसरात्र आपण तो विचार करू लागतो. पुढे सुखस्वप्नांचे भास होऊ लागतात. त्यातून आपण स्वत:ला अधिकाधिक सुशोभित करण्याचा प्रयत्न करू लागतो. आरश्यासमोर स्वत:चं अनेकवेळा परीक्षण केलं जातं. टापटीपपणा, स्वच्छता, सौंदर्य यांना उच्चकोटीचं महत्त्व दिलं जातं. आणि ती व्यक्ती अनेकवेळा समोर यावी असं वाटू लागतं.  विशेष म्हणजे आपण ज्या व्यक्तीबद्दल विचार करीत असतो; त्या व्यक्तीला आपसूकच आपले भाव जाणवू लागतात, असं वाटायला लागतं. अशा अनाकलनीय अवस्थेत पुन:पुन्हा जावसं वाटतं. ती अवस्था आयुष्यभर संपूच नये असं वाटतं. ही अवस्था अगदी सुरुवातीची असते. पुढे धैर्यानं आपण त्या व्यक्तीसमोर आपले भाव व्यक्त करू लागतो.  समोरून सकारात्मक प्रतिसाद आला तर, आपल्या आनंदाला आभाळ कमी पडतं.

आता, थोडा वास्तवाचा विचार करूयात. जर समोरच्या व्यक्तीच्या मनात तसे काहीच भाव नसतील किंवा आपल्याला पाहून तसे काही भाव निर्माण होत नसतील तर? तर आपल्या शरीरात ‘प्रेमाने’ निर्माण झालेल्या सकारात्मक ऊर्जेचं ‘कर्तृत्त्वात’ रूपांतर करण्याची जबरदस्त संधी आपल्यासाठी निर्माण होते. जगात बरीच अशी उदाहरणं आहेत की त्यांनी ‘प्रेमातून कर्तृत्त्वाकडे’ गरूड भरारी घेतली आहे. केवळ अशावेळी आपला विवेक जागृत ठेऊन, पावलं उचलण्याची गरज असते. अशावेळी वस्तुनिष्ठपणाने विचार करून जगाकडे बघण्याची दृष्टि जागृत ठेवायला हवी.  अशाच वेळी तेच ‘प्रेम’ अवघ्या जगावर करायला हवं.... त्यावेळी तुमचं ’प्रेम’ भंग झालेलं नसतं. भंग पावते ती भोगण्याची सुप्त इच्छा! कारण प्रेम कधीच भंग पावत नाही.

1 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...