5/03/2016

'आम्हाला आत्महत्या करायची आहे!'

तो पदवीधर होता. चांगली नोकरीही होती. त्याच्या घरची परिस्थितीत संपन्न होती. तो एका मैत्रिणीच्या प्रेमातही पडला होता. तिचीही परिस्थिती चांगली होती. पण दोघांमध्ये भेदाभेदाच्या मोठमोठ्याला भिंती उभ्या होत्या. त्या भींती पार करून सर्वांच्या परवानगीने एकत्र येणे सहज शक्‍य नव्हते. सगळ्या परिस्थितीसमोर तो हतबल झाला होता. त्यामुळे तो प्रचंड अस्वस्थ होता. मात्र ती खंबीर होती. त्याला जगण्यासाठी, लढण्यासाठी आणि एक होण्यासाठी बळ देत होती. साधारण वर्षभरापासून हे सारं सुरू होतं. आता काहीतरी निर्णय घेण्याचा क्षण जवळ येत होता. अनेकदा सगळं सोडून दूर कुठेतरी पळून जावं असं तिनं सुचवलं होतं. पण इच्छा असूनही तो घाबरत असल्याने त्याची हिम्मत होत नव्हती. एकदा आपण एकत्र आलो की सगळेजण मान्य करतील, असा विश्‍वास ती त्याला देत होती. अर्थात तसे होण्याची शक्‍यताही होती. याबाबत त्यांनी दोघांच्या ओळखीच्या एका मित्राचा सल्ला घेतला. त्यानेही त्यांनी दोघांनी मिळून योग्य तो निर्णय घ्यावा असेच सांगितले.

अखेर एकेदिवशी दोघांनीही एकत्र येण्याची तारीख, वेळ, ठिकाण ठरवले. पुढचे पुढे पाहू असेही ठरले. ठरल्याप्रमाणे दोघेही भेटले. ठरल्याप्रमाणे काही वेळाने त्याच ठिकाणी मित्रही मदतीसाठी आला. इथपर्यंतच ठरले होते. पण आता पुढे काय? मात्र मित्राने अलिकडेच घेतलेल्या फ्लॅटमध्ये त्यांची सोय केली होती. अर्थात तो फ्लॅट दुसऱ्या शहरात होता. त्याने प्रवासाची तिकिटेही बुक केली होती. शिवाय एक-दोन दिवसांनी तो त्यांना भेटायलाही जाणार होता. दोघांचा प्रवास सुरू झाला. आता ते आनंदीत झाले होते. पण तरीही परिणामांची चिंता त्यांना अस्वस्थ करत होती. अशी सारी अवस्था असतानाच प्रवास संपलाही. ते ठरलेल्या मित्राच्या फ्लॅटवर पोचले. इकडे दोघांच्याही घरी शोधाशोध सुरू झाली. मदत करणाऱ्या मित्राकडेही विचारणा झाली. मात्र त्याने फार काही माहिती दिली नाही. फक्त दोघेही सज्ञान आहेत, चिंता करू नका असे समजावून सांगितले. दरम्यान एक-दोन वेळा त्याला घरून फोन आला. त्यानेही त्रोटक उत्तरे देत वेळ मारून नेली. आता आपल्यासमोर काहीही पर्याय नाही. जगण्याला अर्थ नाही, अशा निष्कर्षापर्यंत दोघेही पोचले. त्याच्या मनात आत्महत्येचा विचार येऊ लागला. मग "तुझ्यासोबत मी ही येते‘ असे म्हणून ती ही तसाच विचार करू लागली. अशातच एक दिवस गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळीच मुलीच्या घरचा मुलाला धमकीचा फोन आला. आता मात्र दोघांच्या पायाखालची जमीन सरकली. आता ते प्रचंड अस्वस्थ झाले. दरम्यान ठरल्याप्रमाणे संध्याकाळी मित्र आला. त्याला त्यांनी घडलेला सारा प्रकार त्याला सांगितला. त्यावर त्याने दोघांनाही धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनीही यातून बाहेर पडण्याचा काहीही मार्ग नसल्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. मित्राने यातून बाहेर पडता येईल, असे सांगितले. त्यावर आपण विचार करू, ठरवू असा विश्‍वासही दिला. मात्र दोघेही आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यानंतर बराच वेळ शांतता पसरली.

काही वेळाने मित्र बोलू लागला, "चला, तुमच्या निर्णयावर तुम्ही ठाम असाल तर मी काहीही करू शकत नाही. आत्महत्या कशी करायची आहे, ते ठरवा. पण प्लिज इथे फ्लॅटमध्ये फास घेऊन किंवा विष घेऊन करू नका. मला अडचण होईल. दरीतून खाली उडी घ्यायची म्हटले तर दरी येथून खूप दूर आहे. पुन्हा तुम्हाला शोधताना घरच्यांची धावपळ होईल. त्यापेक्षा अगदी सोपा उपाय म्हणजे रेल्वेच्या रूळाखाली जाणे. रेल्वेचा रूळ येथून जवळच आहे. आणि हो प्लिज एक्‍सप्रेस खालीच झोपा. म्हणजे काही सेकंदात सगळं संपून जाईल.‘ हे सगळं ऐकून दोघे थरथर कापत होते. मात्र मित्र पुढे बोलतच होता. "एक्‍सप्रेस नसलेल्या रेल्वे सिग्ननला थांबण्याची शक्‍यता असते. त्यामुळे तुमच्या मरण्यालाही सिग्नल लागायचा आणि वाट पाहावी लागायची. माझ्याकडे एक्‍सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक आहे. ते तुम्हाला देतो. त्या वेळेप्रमाणे रूळावर झोपा. बाकी रेल्वेच करेल काय करायचे ते. काही क्षणांत तुम्ही मोकळे व्हाल.‘ आता दोघांच्याही डोळ्यांत पाणी येऊ लागले. मात्र मित्र थांबला नाही. तो बोलतच राहिला, "माझ्या झालेल्या खर्च देण्याची गरज नाही. फक्त काय करा तुम्ही मेल्याचे बातमी कोणाला-कोणाला कळववी लागेल याची यादी फोन क्रमांकासह द्या. म्हणजे अडचण नको. तुमची शेवटची इच्छा काय असेल ते तुमचे तुम्हीच पूर्ण करा. मला ती पूर्ण करणे जमेलच असे नाही. त्यामुळे मला हुरहूर नको. कधी निघताय ते ही सांगा?‘ एवढे बोलून तो मित्र थांबला.

साक्षात मृत्यु समोर दिसू लागल्याने दोघेही प्रचंड घाबरले. मित्राने एवढे सारे भयानक वर्णन केल्याने दोघेही ढसाढसा रडू लागले. मित्र मात्र शांतच होता. त्याने दोघांनाही खूप रडू दिले. पुढचा बराच वेळ रडण्याचाच कार्यक्रम सुरू होता. शेवटी दोघांनीही हात जोडले आणि मित्राला यावर काय पर्याय आहे हे सांगण्याची विनंती केली. त्यावर मित्राने धीर देत सांगितले, "जगात प्रत्येकाला अडचणी असतात रे. फक्त त्यावर मात करून खंबीरपणे उभं राहणं महत्त्वाचं असतं. प्रत्येक जणच अडचणींना कंटाळून मेला असता तर जगात कोणीच उरल नसतं. मात्र जगातील प्रत्येक गोष्टीवर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय असतोच. फक्त त्या दुसऱ्या पर्यायाचा थोडासा शोध घ्यायला हवा.‘ आणि पुढे मग तिघेही दुसऱ्या पर्यायावर विचार करू लागले.

1 comments:

  1. Sir mala hi story use karaychi ahe plz yogeshd2506@Gmail.com ya vr contact kara

    ReplyDelete

Related Posts Plugin for WordPress, Blogger...