7/22/2016

प्रेम नाकारलेल्या प्रेयसीला लिहिलेले पत्र..

तो  आज माझे शब्द हरवले आहेत. शब्दच काय मी स्वत:च हरवलो आहे. मात्र, तरीसुद्धा माझे चित्त स्थिर असून मी स्वत: स्थितप्रज्ञ आहे. अशा क्षणांना शब्द स्वत:च मला भेटायला आले आहेत. यावेळी एक गोष्ट मला स्पष्ट सांगावीशी वाटते की, काल जे बोलता आलं नाही ते मी आज लिहिणार आहे. अर्थात् यात माझा काहीही उद्देश्य नाही. हे कृपया समजून घ्यावे. गैरसमज करून घेऊ नये. पत्र वाचून झालं की विसरून गेलात तरी चालेल किंवा तसेच करणे अधिक सोयीचे होईल.

अर्थात् हे मी आपणांस का सांगत आहे, हे निराळं सांगण्याची गरज नाही. काल काही क्षणांच्या अवधीत काय काय सांगणार? त्यामुळे कोसळण्याकरिता पत्राचा चा हा मार्ग मला अधिक सुकर वाटतो. अर्थात् हे कोसळणं म्हणजे भौतिक नव्हे तर हे कोसळणं म्हणजे भावनांचं, जाणिवांचं कोसळणं आहे. शिवाय पाणी जसं कोसळताना आपलं सौंदर्य तसूभरही कमी होऊ देत नाही. तसाच माझा प्रयत्न आहे. असलं काहीतरी भलतं-सलतं वाचून आपण हे पत्र शेवटपर्यंत वाचाल याची जगात कोणी शाश्वती देऊ शकत नाही. तरीसुद्धा कधीतरी हे पत्र पूर्ण वाचाल किंवा कदाचित पहिल्याच वेळी वाचून पूर्ण कराल अशा वेड्या आशेवर मला लिहिण्यास धीर आला आहे. कदाचित या पत्राची पारायणंसुद्धा (एकापेक्षा अधिक वेळा वाचन) कराल...

खरे तर गेल्या 60-70 तासांत काय झालं, काय होत होतं, काय होणार होतं हे मला कळतच नव्हतं. कदाचित आपणही अशा परिस्थितीला अनभिज्ञ असाल. मी तर अगदीच अनभिज्ञ होतो. कालपर्यंत तर जगणंच थरथरत होतं. आज माझा हात थरथरत आहे. आता ते काही प्रमाणात स्थिर झालं आहे. पूर ओसल्यावर नदीची झालेली अवस्था मी आज अनुभवत आहे. समुद्राला आलेल्या ओहोटीची अवस्था आज मी अनुभवत आहे. काळ्याकुट्ट ढगानं आपल्या आत दडलेलं पाणी उधळून टाकल्यानंतरची अवस्था मी अनुभवत आहे. माझी अवस्था शब्दातीत आहे. माझी अवस्था जगण्यापलिकडची आहे. माझी अवस्था जाणिवांपलिकडची आहे. संवेदना आणि अनुभूती यांच्या पलिकडच्या जाणिवांनी जन्म घेतला आहे. या जाणिवांना शब्द नाहीत, या जाणिवांना नाव नाही, या जाणिवांना कोठलीही बंधनं नाहीत. या जाणिवांना मूर्त स्वरुप नाही, देहसुद्धा नाही. त्यामुळेच या पत्रात नावांना स्थान दिले नाही. अर्थात् असे शब्द, त्यातील अर्थ, त्यातील मतितार्थ जाणण्याइतपत आपण सूज्ञ आहात असे मी गृहित धरतो.

मात्र, जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हटलं जातं. त्याची प्रचिती मला प्रत्यक्ष आली. कदाचित माझ्या भोळ्या-भाबड्या भावना या जाणिवाच नसणार्‍या मशिनलाही कळत आहेत. त्यामुळे त्यांचेही अवयव काम करत नाहीयत. कारण इथंपर्यंत लिहितानाच माझा संगणक 2 वेळा बंद पडला आहे. एवढा सगळा पसारा लिहिण्याच्या मुख्य उद्देशाकडे वळूयात. सोमवारी मला देवानंच दिलेल्या बुद्धिमुळं मी आपणांस भेटलो आणि मला जे वाटतं ते बोललो. अर्थात् हे सर्व देवाच्या मनात असेल, आणि त्यामुळेच त्यानं मला तशी बुद्धि दिली असेल यावर माझा दुर्दम्य विश्वास आहे. ‘माझ्या पदरचे काहीच नसे’। आपणांस बोलताना मी स्वत:वर लादलेली सर्वसाधारण आचारसंहिता कधी मोडली नाही. आचारसंहिता म्हणजे नियम आणि बंधनं. माझा धर्म, माझे संस्कार, माझी संस्कृती आणि आई-बाबांची शिकवण यामुळे हे शक्य झालं. मला जेवढे बोलायचे होते, जे बोलायचे होते, तेवढेच आणि तेच अगदी नेमकेपणाने मांडले, असे मला वाटते. हे सगळं घडलं कसं असा प्रश्न आपणांस पडणे स्वाभाविक आहे. बघा ना, स्थिर, शांत पाण्यावर जर न दिसणार्‍या हवेचा थोडासा दाब जरी पडला तरी त्यावर असंख्य अगदी न मोजता येणारे वलय निर्माण होतात. मग एखादा जिवंत माणूस कोणाचा विचार करीत असेल तर त्याच्या मनात किती वलयं निर्माण होतील.

या जगात कोणी कोणाला आवडू शकत नाही का? इथं चंद्राला चांदणी आवडू शकते, समुद्राला किनारा आवडू शकतो, वृक्षाला छाया आवडू शकते. स्वप्नांना सत्य आवडू शकतं. काळ्याकुट्ट रात्रीला रम्य सकाळ आवडू शकते. जगण्याला मृत्यु आवडू शकतो. असा खुळा विचार मी केला. आणि तसे थेटपणाने व्यक्तही झालो. चंद्र अन् चांदणी, समुद्र अन् किनारा, वृक्ष आणि छाया, स्वप्न आणि सत्य, रात्र अन् सकाळ, जन्म अन् मृत्यु कधी भेटू शकते का? एवढा साधा विचारही करण्याचं तारतम्य त्यावेळी मला राहिलं नाही हेच माझं दुर्दैव.
तुम्ही तर माझ्या भावनांची, जाणिवांची, संवेदनांची तुलना थेट उभ्या आयुष्याशी केलीत. अवघं आयुष्य जोडण्यातील असमर्थतता व्यक्त केलीत. भावना, जाणिवा आणि संवेदना यांना थेटपणानं अवघ्या आयुष्याच्या पटावर मांडण्याचा प्रयत्न केलात. आपल्या दोघांत निरनिराळ्या अन् जगात कोणालाही न मोडता येणार्‍या अशा ‘अंबुजा सिमेंट’च्या भिंती निर्माण केल्यात. त्या भिंती तोडण्याची क्षमता सध्यातरी माझ्यात नाही. इथल्या व्यवस्थेतसुद्धा ती क्षमता नाही. माझ्या भावनेच्या आधारापेक्षा तुम्ही भेदा भेदाच्या भिंतीचाच आधार घेऊन मला निराधार केलेत. या भिंतींपलिकडे मी निखळ, निरागस, निर्विकार मैत्रीच्या पटापर्यंतचाच विचार केला होता. जिथं आपण आपल्या भावभावना, आठवणी, सुख-दु:ख, संवेदना, अन् आपला जिवंतपणा वाटून घेऊ शकलो असतो. त्यातून जगण्यातील आर्तता आपणांस समजू शकली असती. दु:ख याचंच आहे की आपण मला समजून घेऊ शकला नाहीत. असो.

माणसाचं आयुष्य म्हणजे सायकल चालवण्यासारखं असतं. तोल सावरण्याकरिता पुढे पुढे जात रहावं लागतं. आपल्यालाही पुढे पुढे जात रहावं लागणार. ज्या घटना घडून गेल्या त्या रात्रीच्या अंधारानं गिळून टाकल्या. येणार्‍या उष:कालावर आपलाच अधिकार असणार आहे. त्यामुळं ती रात्र कधी उगवणार नाही तो उष:काल आपल्यासाठीच उगवत राहवा, अशी मी देवापुढं प्रार्थना करतो. या पत्रातून माझ्या साहित्याचा प्रवास अखंड चालू राहणार हे निसंदेश. माझ्या स्वप्नवत प्रवासाला सुरुवात करून दिल्याबद्दल धन्यवाद!

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...