7/19/2016

नवरा शोधताना....

शहराच्या मध्यवर्ती भागात फक्त मुलींसाठीचे एक हॉस्टेल. कोणी शिकणाऱ्या, कोणी नोकरी करणाऱ्या होत्या. बहुतेकजणी अविवाहितच होत्या. हॉस्टेलच्या मालकीण अत्यंत प्रेमळ होत्या. अर्थात हिशोबात काटेकोर होत्या. पण मुलींच्या अडचणी समजून घेत होत्या. कधीतरी त्या मुलींसोबत दिलखुलासपणे बोलतही असत. शिवाय मुलींच्या पालकांशीही त्या सतत संपर्कात असत. त्यामुळे हॉस्टेलची लोकप्रियता चांगली होती. 
 
 

रविवार असल्याने हॉस्टेलमधल्या एका खोलीत अनेकजणी एकत्र आल्या होत्या. नेहमीप्रमाणे गप्पा मारता मारता लग्नाचा विषय निघाला. "लग्न म्हणजे ना लाईफ ड्रामा टाईप चेंज झाल्यासारखी वाटते. बापरे. स्टॉप झाल्यासारखी वाटते जरा कटकट वाटते‘, एका कॉलेजातील मुलीने थेट भावना व्यक्त केल्या. "हो, यार घर बदलणार. अनोळखी घर. अनोळखी माणसे. नवरा, सासू-सासरे, दीर, नातेवाईक वगैरे वगैरे... त्यापेक्षा सिंगल लाईफ मस्त..‘, दुसऱ्या एकीने तिला दुजोरा देत पाठिंबा दिला. त्यावर हॉस्टेलमध्ये ताई म्हणून परिचित असलेली एक प्रौढ अविवाहित महिला बोलू लागली, "कसं आहे की जसा तुमचा दृष्टिकोन असतो तसं तुम्हाला सगळं जग दिसतं. पण लग्न ही काही किंचितही वाईट किंवा कटकटीची गोष्ट नाही. अर्थात जर तुम्ही लग्न मनापासून स्वीकारले असेल तरच...‘ चर्चेत चांगलाच रंग चढत चालला होता. "ताई, तुम्ही एवढं सांगताय पण मग तुमचं एवढं वय झालं तर का नाही केलं लग्न?‘ एका जराशा फटकळ बोलणाऱ्या आणि हॉस्टेलमध्ये "बोल्ड‘ म्हणून परिचित असलेल्या मुलीने नेमक्‍या वर्मावर बोट ठेवला. त्यानंतर काही क्षण शांतता पसरली. 

थोडा वेळाने ती प्रौढ महिला बोलू लागली, "मला भाऊ नाही. तीन बहिणी. वडिलांचे तुटपुंजे उत्पन्न. त्यात भागत नव्हते. म्हणून मग मी लग्न न करता आधी सर्व बहिणींचे लग्न करायचा निर्णय घेतला. मीच घरात मोठ्या मुलाची भूमिका बजावली. मला माझ्या बहिणींचे लग्न करताना खूप अडचणीी आल्या. आर्थिक परिस्थितीपेक्षा मोठ्या बहिणीचे लग्न नाही आणि छोटीचे आधी असे का? या प्रश्‍नाने मला प्रचंड त्रास झाला. शेवटी मोठीने आधी करावे असे कोठे लिहून ठेवले आहे का? असे म्हणत मी सर्व बहिणींचे लग्न केले. आता माझे लग्नाचे वय उलटून गेले आहे. शिवाय आई-बाबाही थकले आहेत. त्यामुळे त्यांची काळजी करायला कोणीतरी हवेच ना. नोकरीच्या निमित्ताने मी इथे आहे. काही दिवसांनीच त्यांनाही इकडे आणणार आहे. त्यांच्या सेवेतच पुढील आयुष्य घालवणार आहे‘, ताईने आपली कथा पूर्ण केली. त्यावर खोलीतील सर्व मुलींनी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले.


तेवढ्यात मालकीण खोलीत आल्या, "काय गप्पा चालल्यात? ताईची गोष्ट ऐकताय का? फार कष्ट केलेत बरं तिने!‘ पुन्हा बोल्ड मुलगी बोलू लागली, "पण ताई लग्न करूनही नवरा कसा मिळेल वगैरे वगैरे चिंता असतातच त्यापेक्षा...‘ मालकीणीने तिला मध्येच थांबवत म्हटले, "मुलींनो लक्षात ठेवा मुलगा असो की मुलगी आयुष्यात लग्न ही महत्त्वाची बाब आहे किंवा तो एक संस्कार आहे. आता ताईसारखी लाखात एखादी अपवादात्मक गोष्ट असू शकते. पण आयुष्याच्या शेवटी जोडीदार सोबत हवाच. कारण तोच महत्वाचा असतो आणि हो लग्नाच्या बाबतीत तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह ऍटिट्युड ठेवा.‘ तेवढ्यात पुन्हा बोल्ड मुलगी बोलू लागली, "बट, अवर सिस्टीम इज मॅन ओरिएंटेड. सो मला ती बदलाण्याची गरज वाटते.‘ "तू कोणत्या जगात वावरतेस? सिस्टीम वेगाने बदलली आहे. बदलत आहे. आता छोट्या-मोठ्या खेड्यातील मुलीही पोस्ट ग्रॅज्युएट होत आहेत. नोकरी करत आहेत. घरातील बहुतेक निर्णय सर्वांनी मिळून घेतले जातात. लग्नाच्या बाबतीत तर मुलीच्या मर्जीला आणि होकाराला टॉप प्रायोरिटी दिली जाते. शिवाय घरातल्या इतर निर्णयांमध्येही महिलांचा सहभाग महत्त्वाचा मानला जातोय‘, ताईने बोल्ड मुलीला सुनावले.

मघापासून ही सारी चर्चा अगदी मनातून ऐकणारी एक मुलगी एकाएकी रडू लागली. साऱ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. मालकीणीने आणि ताईने तिला शांत करून बोलते केले. ती बोलू लागली, "ताई, मी अगदी साध्या घरातील. माझे लग्न ठरले होते. मी आणि तो बाहेर फिरायलाही जात होतो. एकेदिवशी त्याने माझ्याकडे नको त्या गोष्टीची मागणी केली. मी वेळ टाळून नेली. थेट घरी आले आणि नकार कळवला. आता...‘, असे म्हणून ती मुलगी पुन्हा रडू लागली. "अगं त्यात रडण्यासारखं काय आहे? तू योग्य निर्णय घेतलास. मुलींनो लक्षात ठेवा. लग्नाच्या पूर्वी तुम्ही कोणत्याही पुरुषाकडे तुमचं सगळं काही सोपवू नका. भलेही तो तुमचा होणारा नवरा असला तरीही!‘ मालकिणीने सर्वांना मोलाचा संदेश दिला.

आता ताई बोलू लागली, "हल्ली मुलींना त्यांचे पालक लग्नासाठी स्थळे आणतात. पण लग्न करताना मुली मुलाच्या संपत्तीकडे पाहतात. त्याच्या पॅकेजकडे, त्याच्याकडील गाड्या-बंगल्यांकडे बघतात. त्यात तो ‘फॉरेन रिटर्न‘ किंवा NRI असेल तर मुलगी भाळलीच म्हणून समजा. मग त्याचे इतर सर्व ‘गुण‘ दुय्यम ठरतात. वास्तविक मुलाचे वैयक्तिक कर्तृत्त्व काय आहे, ते बघायला हवे. बापाच्या जिवावर उड्या मारणाऱ्या पोरांना आयुष्याची खरी किंमत समजलेली नसते. स्वत: कष्ट करून सन्मानाने कमावलेले चार पैसे आयत्या संपत्तीपेक्षा हजारो पटींनी श्रेष्ठ असतात... 
पण माझी आजी नेहमी एक म्हणायची ते आठवतेय... की, ‘मुलाकडे फुटकी कवडी नसली तरी चालेल मात्र त्याच्याकडे अनमोल संस्कार, स्वच्छ चारित्र्य, मोठ्यांचा आदर करण्याची वृत्ती, निर्व्यसनी आणि कष्ट करायची तयारी असायला हवी.‘ 
हे आजीचं म्हणजे पण फारच आदर्शवादी वाटतं हो. अशी मुले लढतात, संघर्ष करतात, जिंकतात, प्रसंगी पडतातही पडले तर पुन्हा उठतात आणि पळू लागतात. पुन्हा जिंकत असतीलही... आयुष्यावरील निष्ठेमुळे ते आपल्या प्रेमाच्या, आपुलकीच्या माणसांच्या सुखासाठी कायम सन्मार्गाने धडपडत राहत असतीलही... अगदी शेवटच्या श्‍वासापर्यंत...‘‘ 

ती पुढे म्हणाली, "माझ्या दोन बहिणींना मी अशीच मुले पाहिलीत. त्यांच्याकडे लग्नाआधी फार काही नव्हते. पण लढण्याची जिद्द होती. त्यांनी स्वकर्तृत्त्वावर आज वैभव उभे केले आहे," एवढे बोलून ताई थांबली. सर्वांनी कडकडून टाळ्या वाजवल्या.

अन् ती अस्वस्थपणे पुढे म्हणाली, "पण अशी मुलं किती प्रमाणात आहेत.. अन् असली तरी तशा मुलांची वाट पाहण्याएवढा पेशन्स आहे कुणाकडे?"
(हा प्रश्न तिने सर्व मुलींसह नकळत स्वतःलाही विचारला होता.)
 
(Courtesy: esakal.com)

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...