7/02/2016

'...मला माणूस बघायचा आहे!'

शाळेतील कार्यक्रम काही वेळातच सुरू होणार होता. कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली होती. विद्यार्थी रांगेत बसले होते. काही विद्यार्थ्यांचे पालक, शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारीवृंदही उपस्थित होते. काही वेळाने वक्ते आणि प्रमुख पाहुणे व्यासपीठावर आले. सर्व पाहुण्यांची ओळख करून देण्यात आली. स्वागत-सत्काराचा औपचारिक कार्यक्रम संपन्न झाला. पाहुण्यांचा परिचय, प्रस्तावना वगैरे सगळे झाले. आता प्रमुख वक्ते बोलण्यासाठी उभे राहिले. टाळ्यांचा कडकडाट झाला. विद्यार्थ्यांसह, शिक्षक आणि उपस्थित सर्वांना वक्तव्याला ऐकण्याची प्रचंड उत्सुकता होती. वक्ते साधारण पन्नाशी ओलांडलेले होते. त्यांची लोकप्रियता प्रचंड होती. ते बोलू लागले - 



"मित्रहो, आज मी तुमच्या समोर उभा आहे. एक संशोधक आणि अवकाशयात्री म्हणून. माझेही बालपण याच शाळेत गेले. मी ही तुमच्यासारखा याच मैदानावर खेळत होतो. आज मला माझ्या बालपणीची आठवण येत आहे. परंतु मला लहानपणी फार मित्र नव्हते. पण तुम्ही मात्र चांगले मित्र बनवा. खूप खूप मित्र बनवा. माणसे जोडा. खरे तर एवढेच सांगण्यासाठी मी येथे आलो आहे. लहानपणी मी फारच एकलकोंडा होतो. तसा काहीसा जणू माझा स्वभावच बनला होता. लहानपणी ज्यावेळी आई मला चांदोमामाच्या गोष्टी सांगायची त्यावेळी मी आईला प्रश्‍न विचारायचो. म्हणायचो "आई, चांदोबा तर आपला मामा आहे. मी माझ्या मामाकडे दरवर्षी जातो. मग या चांदोमामाकडे मला जाता येईल का?‘ त्यावर आई हसली आणि "हो, खूप अभ्यास केलास तर जाशील की‘ असे म्हणाली. 

मित्रांनो, मग मी चंद्रावर जाण्याचा ध्यासच घेतला. काय काय करता येईल असे आईला रोज विचारत होतो. आई-बाबा मला फक्त "तू अभ्यास कर‘ असे म्हणत होते. मी एवढा ध्यास घेतला की फक्त अभ्यास. त्यामुळे मी फारसे मित्रही केले नाहीत. मी खूप खेळतही नव्हतो. आठवीच्या नंतर तर माझे खेळणेही बंद झाले. दहावीत मी चांगल्या मार्कांनी पास झालो. त्यानंतर चंद्रावर जाण्यासाठी काय काय करता येईल त्यादृष्टीने मी पुढची वाटचाल केली. आवश्‍यक ते सर्व अभ्यासक्रम पार पाडले. ते पूर्ण करण्यासाठी मला माझे गाव सोडून जावे लागले. ज्यावेळी मी गावापासून दूर होतो, त्यावेळी मला आईची, घरची खूप आठवण यायची. मग गावाकडचा किंवा अगदी माझ्या जिल्ह्यातला माणूस भेटला की बरे वाटायचे. तरीही माझा एकलकोंडा स्वभाव बदलला नव्हता. काही वर्षांनी मला पुढील शिक्षणासाठी राज्याबाहेर जावे लागले. आता बाहेर राहण्याची सवय झाली होती. आईपासून दूर. मग ते गावाबाहेर असो की राज्याबाहेर. पण राज्याच्या बाहेर असताना मला हॉटेलमध्ये आणि इतर ठिकाणी माझ्या राज्यातील माणूस भेटायचा. मग त्याच्याशी मी आवर्जुन माझ्या भाषेत बोलायचो. अगदी ओळखीच्या लोकांना न बोलणारा मी अनोळखी लोकांशीही बोलू लागलो. त्यानंतर काही वर्षांतच पुढील शिक्षणासाठी परदेशात जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यासाठी मला आता आईपासून खूपच दूर जावे लागणार होते. मात्र मला माझे स्वप्न पूर्ण करायचेच होते. 

मित्रांनो, परदेशात जाण्यापूर्वी मी आईला भेटायला गेलो. मला चांगलं आठवतयं आई म्हणाली होती, "आता मी चंद्राची रोज पूजा करत जाईल. तुझ्या भाच्याला सुखरूप परत पाठव म्हणून सांगेन‘ मित्रहो, त्यादिवशी नकळतपणे माझ्याही डोळ्यात पाणी आले. आईचे आशीर्वाद घेऊन मी नियोजनाप्रमाणे परदेशात गेलो. तिथे माझे आवश्‍यक ते अत्यंत खडतर प्रशिक्षणही सुरू झाले. मॉर्निंग वॉकला किंवा रात्रीच्या शतपावलीच्या वेळी मला एखादा माणूस माझ्या देशातला असल्यासारखा भासायचा. मग मी आपुलकीने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचो. बहुतेकवेळा तो माझ्याच देशातला निघायचा. एक-दोन वेळा अंदाज चुकला होता. मात्र माझ्या देशातला माणूस भेटला की मला बरे वाटायचे. मग तो कोणत्याही राज्यातला असला तरीही! 

मित्रहो, ज्या दिवसासाठी मी आतापर्यंत तपश्‍चर्या केली होती तो दिवस अखेर उगवला. जगातील वेगवेगळ्या टोकावरील चार माणसांना चंद्रावर पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये माझीही निवड झाली. माझे सहकारी ज्या देशातील होते त्या देशाबद्दल मला फारसे काहीच माहिती नव्हते. मात्र प्रत्यक्ष चंद्रावर जाण्यापूर्वी काही महिने आम्हाला एकत्र ठेवण्यात आले. तेव्हा छान ओळख झाली. थोडी फार भाषेची अडचण यायची. पण पुढे पुढे त्याचीही सवय झाली. हा कालावधीही यशस्वीरित्या पूर्ण झाला. मित्रहो, 

तुम्ही जर जिद्द ठेवलीत तर आयुष्यात तुम्हाला खूप काही मिळू शकते. ज्यादिवशी मी चंद्रावर जाणाऱ्या यानात बसलो त्यादिवशी माझ्या मनात मी माझ्या मामाला भेटायला जात असल्याची भावना होती. आणि "मी चंद्राची रोज पूजा करत जाईल. तुझ्या भाच्याला सुखरूप परत पाठव म्हणून सांगेन‘ हे आईचे शब्द कानात घुमत होते. त्यानंतर ठरलेल्या वेळी आमचे यान निघाले. माझ्याकडे यानातून बाहेर जाऊन चंद्रावर पाय ठेवून दिसतील तेवढ्या आणि जमतील तेवढ्या वस्तू आणण्याची जबाबदारी होती. त्यामध्ये चंद्रावरील दगड, माती आणि आणखी जे काही दिसेल त्या साऱ्या वस्तूंचा समावेश होता. आमचे यान पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर आले. आता माझ्या सोबत पृथ्वीवरील तीन कोपऱ्यातील देशांमधील नुकतीच ओळख झालेली तीन माणसे होती. पण सोबत माणूस होता, हे विशेष. यान चंद्रावर उतरले. ठरल्याप्रमाणे सर्वांचे काम सुरू झाले. यानाबाहेर उतरण्याची माझी वेळ आली. माझी दोरी यानाला जोडलेली होती. तसे प्रशिक्षणात या साऱ्या बाबींचे प्रात्यक्षिक केले होते. मात्र आता हे प्रत्यक्ष घडणार होते. मी यानाबाहेर पोचलो. गुरुत्वाकर्षण नसल्याने तिथे क्षणाक्षणाला तोल जात होता. मी फक्त काही क्षणांसाठी त्या अवकाशात राहणार होतो. आजूबाजूला काळाकुट्ट अंधार होता. नाही म्हणायला दूरवर एक निळसर रंगाचा मोठा गोळा किंचितसा चमकत असल्यासारखा दिसत होता. दिसायला तो साधा गोळा होता पण त्याला "ती पृथ्वी आहे‘ असा निष्कर्ष आम्ही काढला होता. खरं तर एवढे मोठे देश, एवढी माणसे एवढ्याशा गोळ्यात सामावलीत यावर माझा सुरुवातीला विश्‍वास बसला नाही. पण माझ्याकडे त्यासाठीचे आवश्‍यक पुरावे होते. त्या गोलाकार गोळ्यावर देशादेशामधल्या सीमा दिसत नव्हत्या. फक्त एक गोळा. त्यावर माझी आई होती. माझे घर होते. पण या साऱ्यापासून मी खूप दूर आलो होतो. अशाच विचारांच्या तंद्रीत मी पुढे पुढे जाऊ लागलो. काही वस्तू गोळा केल्या. मात्र या साऱ्या विचारात नियोजित वेळेपेक्षा अगदी काही क्षण मी अधिक वेळ बाहेर होतो. त्यामुळे माझ्या दोरीला यानातील सहकाऱ्यांना धक्का देऊन मला परत येण्याची अप्रत्यक्ष सूचना केली. माझी विचारांची तंद्री भंगली. मी प्रचंड भयभीत झालो. "एलियन्स‘ आलेत की काय असे क्षणभर वाटले. "एलियन्स‘ आपल्याला त्यांच्या जगात घेऊन जातील, आपले काय करतील? असे एक ना अनेक हजारो विचार त्या अर्धा-पाऊण क्षणात माझ्या डोक्‍यात तरळून गेले. 

मित्रहो, त्याक्षणी मला फक्त माणूस बघावासा वाटला. माझ्या गावाकडचा, माझ्या जिल्ह्याचा, माझ्या राज्याचा, माझ्या देशाचा हे सारे भेद त्या दोन-तीन क्षणांसाठी गळून पडले होते. केवळ हाडामासाचा आणि पृथ्वीवरचा माणूस मला त्याक्षणी आश्‍वस्त करणारा होता. कोणतेच भेदभाव आता माझ्या समोर नव्हते. माणसाचं मन कसं असतं पहा मित्रांनो! एक क्षण असा होता की मला माणसाला बोलायला आवडत, भेटायला नव्हते. मी एकलकोंडा होता. पण आता फक्त माणसाच्या भेटीसाठी माझा जीव तळमळत होता. त्यानंतर काही क्षणांतच मी यानाच्या दिशेने आलो आणि सुखरूपपणे यानात पोचलो. तेथे मला यानातील माझा सहकारी ‘माणूस‘ दिसला. आणि बरे वाटले! 

मित्रहो, हा सारा चंद्रावरचा प्रवास झाल्यानंतर मी पुन्हा माझ्या देशात परतलो आहे. मी पुन्हा माझ्या शाळेत परतलो आहे. प्रत्यक्ष चंद्रावरील संशोधनापेक्षा मला माझ्या आतला एक शोध लागला आहे. तो म्हणजे कोणत्याही भेदाशिवाय कोणत्याही माणसाला कोणताही माणूस भेटला की बरे वाटायला हवे. तेच तर जीवनाचे सार्थक आहे. आता मला फक्त माणूस भेटला की खूप बरे वाटते.. मित्रहो, जाता जाता एवढेच सांगतो की तुम्ही माणूस जोडा. प्रत्येक माणूस जोडण्याचे व्रत केले तर एक दिवस सारे भेद गळून पडतील. कोणीही कोणाचाच शत्रू राहणार नाही... धन्यवाद!‘

एवढे बोलून वक्ता थांबला. विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. त्यानंतर जवळजवळ दोन-तीन मिनिटे फक्त टाळ्याच वाजत होत्या.

(सौजन्य : www.esakal.com)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...