Saturday, December 10, 2016

शनिवारची बोधकथा: यशापर्यंत पोचण्यासाठी....

एकदा एक शिष्य आपल्या गुरुंना भेटायला गेला. गुरुंना तो म्हणाला, "गुरुजी मला यशस्वी व्हायचे आहे. माझे प्रयत्न सुरु आहेत. मी आणखी काय करायला हवे?' त्यावर गुरूजींनी शिष्याला समुद्राजवळ नेले आणि त्याला समुद्रात पाण्यात जाण्यास सांगितले. शिष्य पाण्यात गेला. त्यावर गुरु म्हणाले, "आणखी पुढे जा' शिष्य पुढे जात राहिला. आता शिष्याच्या गळ्यापर्यंत पाणी आले. गुरूजी त्याच्या मागून पाण्यात गेले. त्याचे डोके पकडून त्याला पाण्यात बुडवू लागले. त्यावर शिष्य शांत.

एक वेळ गुरुजींनी शिष्याचे डोके बराच वेळ पाण्यात दाबून ठेवले. शिष्याला धाप लागली. तो डोके वर काढण्याचा प्रयत्न करू लागला. शेवटी शिष्याच्या नाका तोंडात पाणी जाऊ लागले. त्यानंतर काही वेळाने गुरूजींनी त्याला पाण्याबाहेर काढले. त्याच्या छातीला दाबत नाका-तोंडातील पाणी बाहेर काढले. शांत झाल्यावर गुरूजी म्हणाले, "तुझे नाक, तोंड, डोके ज्यावेळी पाण्यात होते. त्यावेळी तुला काय वाटत होते?' त्यावर शिष्य म्हणाला, "मला मी मरेल असे वाटत होते' त्यावर गुरूजी म्हणाले, "त्या क्षणी जगण्यासाठी काय करावे असे तुला वाटत होते?' त्यावर शिष्य म्हणाला, "मला पाण्याच्या बाहेर डोके काढून श्‍वास घ्यावासा वाटत होता.' त्यावर गुरूजी म्हणाले, "अगदी बरोबर! जगण्यासाठी जेवढी गरज तुला त्या क्षणी श्‍वासांची वाटत होती. यश मिळविण्यासाठी तेवढीच प्रयत्नांची गरज आहे. श्‍वासांइतकीच प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रयत्न हवेत. तरच तू यशस्वी होऊ शकशील.!'

(शब्दांकन: व्यंकटेश कल्याणकर)
(Courtesy: eSakal.com)

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...