11/30/2013

नाव नसलेले पदार्थ

खाणं अन् जगणं एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणता येतील एवढं आता माणसाचं जगणं अन् खाणं समृद्ध होत चाललं आहे. दररोजच्या आयुष्यात आपण अनेक पदार्थ खातो, अनेक चवी चाखतो. पदार्थ तेच असतात, कमी अधिक फरकाने चवही तिच असते. पण त्यातून प्रतीत होणार्‍या भावना प्रत्येकवेळी वेगळ्या असतात. त्यांना गंभीर अर्थ असतो पण नाव नसते. प्रत्येकानं आपापल्या जगात त्या-त्या प्रसंगी त्याच-त्याच पदार्थांना, त्याच त्या पेयाला विशिष्ट नाव दिलेले असते. पण प्रत्येकाचे अर्थ वेगळे असतात. म्हणूनच आजही असे शब्द लौकिकार्थाने सार्वत्रिक ठरलेले दिसून येत नाहीत.

थकून भागून घरी आल्यावर पत्नीनं घरात प्रवेश करताच अत्यंत लडिवाळपणे, प्रेमाने आपल्या पुढ्यात ठेवलेला चहाचा झुरका घेताना मिळणारी चव आणि त्या चहाचे नाव शब्दात मांडता येण्यासारखे नाही. मुलीच्या विवाहासंदर्भातील बैठकीच्या वेळी बापाच्या ओठांतून आत जाणार्‍या चहाचे नाव कदाचित त्या चहाला सामावून घेणार्‍या कपालादेखिल आजतागायत माहित पडले नसेल. तोच चहा जेव्हा कॉलेजच्या कॅटींनमध्ये आपल्या प्रिय  मित्रांसमवेत कॉलेजातील सौंदर्याच्या चर्चा तोंडी लावत उदरात जातो तेव्हा त्या चहाला काही नाव असेल काय? त्यातल्या त्याष चहाचे ‘देयक बिल’ जेव्हा आपला परममित्र ‘पे’ करतो; तेव्हा तो आनंद गगनात मावत नाही अन् तो चहा उदरात मावत नाही. तेव्हा त्या विशाल चहाला काही नाव देता येईल का? इथंसुद्धा चहा तोच असतो, चव तिच असते. भावना किती बदलतात ना.

कल्पना करा. सूर्यास्ताच्या वेळी तुम्ही घरी आलात. पत्नी बाहेर गेली आहे. घरी तुम्ही एकटेच आहात. तुम्हाला प्रचंड भूक लागलेली आहे. घरात काहीही पदार्थ तयार नाहीत. अशावेळी डबे चाचपत असताना तुम्हाला शुभ्र रंग धारण केलेला ‘मुरमुरे’ नावाचा पदार्थ दिसतो अन् तुमची भूक आणखीन चाळावेत. तुमच्याकडून त्या मुरमुर्‍यात तेल, मिरची अन् मीठ कधी एकरुप होतं ते तुमचे तुम्हालाच कळत नाही. पण हेच ‘एकरुप’ खुशखुशीत चवीसह तुमची भूक शमविण्याची ताकद धारण करतं. याला बहुतेक रसिक खवय्ये ‘तिखट-मीठ-मुरमुरे’ असे म्हणतात. पण या सर्वांचं मिळून एकत्रित बारसं अद्याप व्हावयाचे आहे. विकेंडच्या रात्री तुमचा कुटुंबासमवेत अचानक बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरतो. पत्नीने घरी रात्रीचा स्वयंपाक केलेला असतो. दुसर्‍या दिवशी  सकाळकरिता त्या पोळ्या तुमची वाट पाहत असतात. मग त्या पोळ्यांचे छोटे-छोटे तुकडे करून त्याला फोडणी टाकून खाताना तुम्ही ‘पोहे’ खाल्ल्याचा आनंद लुटता. पोह्यांचा आनंद देणार्‍या पोळीच्या त्या तुकड्यांना काही निराळं नावच नाही. आता खरेखुरे पोहेसुद्धा बघा किती भाव बदलतात, ते! रेल्वेच्या डब्यातून तुम्ही प्रवास करीत आहात अन् भल्या पहाटे ‘गरम गरम पोहे, गरम गरम पोहे’ म्हणून ओरडत फिरणार्‍या त्या विक्रेत्याला अडवण्याचा मोह तुम्हाला आवरत नाही. त्या प्रवासात तो आनंद देणार्‍या त्या गरम पोह्यांना काही नावच नाही. तेच पोहे जेव्हा ‘कांदा-पोहे’ कार्यक्रमात मुलीच्या थरथरणार्‍या हातातून सर्वांना वितरित केले जातात, मुलीच्या थरथरणार्‍या त्या हातातील पोह्यांना काही निराळे नाव असेल काय!  जगातील सर्व मित्र-मैत्रिणींना एक वेगळाच संदेश देणारे अन् इतिहासाच्या गर्भात घेऊन जाणारे सुदाम्याच्या पोह्यांनासुद्धा वेगळे असे नाव नाही. मैत्रिचे संबंध जाणणार्‍या त्या भावना मात्र किती बोलक्या आहेत ना!
तुम्ही बसने प्रवास करीत आहात. कोणत्यातरी गावात तुमची बस थांबली आहे. तुम्हाला फार तहान लागली आहे. अन् त्याचवेळी कंडक्टरने खाली न उतरण्याची सक्त ताकीद दिलेली आहे. अशावेळी बसच्या खिडकीतून ‘लेमनऽऽ गोळ्या, लेमनऽऽ गोळ्या’ म्हणून ओरडणार्‍या पोराकडे तुम्ही आशेने बघता. अन् त्याच्याकडून त्या गोळ्या घेऊन तोंडात टाकता. त्यावेळी तुमची तहान भागविणार्‍या त्या गोळ्यांना तुम्हाला ‘पाणी’ म्हणण्याचा मोह आवरत नाही.

केशवाय नम:, माधवाय नम:, गोविंदाय नम: म्हणत पळीभर पाण्याचं प्राषण केल्यावर ते पाणी आपल्या ठायी पाणी उरत नाही, पण त्याला नेमकं नावसुद्धा देता येत नाही. कारण त्या पाण्याला श्रद्धेचा काठ असतो.
चंद्राचं आणि माणसाच्या आयुष्याचं नातं अगदी जवळचं आहे. बालपणी चंद्र मामा भासतो, तर तोच चंद्र प्रेयसीसमवेत असताना वेगळाच संदर्भ घेऊन आपल्यासमोर उगवतो. कोजागिरीच्या रात्री तर त्याला काय मिजास चढतो ना. तो थेट आकाशातून आपल्या दुधाच्या भांड्यात अवतरतो. त्यानं आपल्या केवळ सावलीच्या अस्तित्वानं पावन केलेलं दुध आपण प्रसाद म्हणून पाशन करतो. दूध तेच असतं. चवही तिच असते. पण संदर्भ बदलतो मात्र कोजागिरीच्या दुधाला नेमकं नाव काही सापडत नाही. तोच चंद्र जेव्हा रमजानच्या रात्री उगवतो तेव्हा ‘रोजा’धरलेल्या कित्येक श्रद्धाळूंना तो जणू निरनिराळे पदार्थ खाण्याचे निमंत्रणच देतो. मग शिरखुरम्यावर ताव मारला जातो. दुधात निरनिराळे पदार्थ एकत्र करून तयार करण्यात आलेला शिरखुरमा म्हणजे दुधच.  इथंसुद्धा दूध तेच असते. पण दोन्हीही ठिकाणी श्रद्धेचे माध्यम बदलते. अंतिम भावना मात्र श्रद्धेचीच असते.

एखाद्याच्या लग्नाचे लाडू खाताना आपल्याला अतिशय आनंद होतो. त्या व्यक्तीच्या आनंदात समरस होऊन आपण लाडवांचा आनंद लुटतो. आणि हाच लाडू नावाचा पदार्थ आपण जेव्हा एखाद्या मृत व्यक्तीच्या गोडजेवणाच्या वेळी खातो, तेव्हा काय भावना असतात लिहिण्यापलिकडचंच आहे. या दोन्ही प्रसंगांच्या वेळी पदार्थ तोच असतो नावही तेच असतं पण प्रत्येकवेळी त्यांचा अर्थ बदलत जातो.

(चिंतन आदेश दिवाळी अंक २०१२)

1 comments:

  1. Thanks for sharing, nice post! Post really provice useful information!

    Giaonhan247 chuyên dịch vụ mua hàng mỹ từ dịch vụ order hàng mỹ hay nhận mua nước hoa pháp từ website nổi tiếng hàng đầu nước Mỹ mua hàng ebay ship về VN uy tín, giá rẻ.

    ReplyDelete

Related Posts Plugin for WordPress, Blogger...