5/05/2016

देशप्रेम आणि गप्पा

त्यांचा आठ जणांचा ग्रुप होता. त्यामध्ये तीन मुलीही होत्या. प्रत्येकाची आवड-निवड, विचार वेगवेगळे होते. तरीही कॉलेजपासून त्यांची चांगली मैत्री होती. जमेल तेव्हा सगळेजण एकत्र भेटत असत. रोज त्यांच्या वेगवेगळ्या विषयांवर मोबाईलच्या माध्यमातून गप्पा चालत होत्या. त्यांच्या चर्चेत राष्ट्रीय विषयांना सर्वोच्च प्राधान्य होते. राष्ट्रीय घटनांचे त्यांच्या ग्रुपमध्ये रोज विश्‍लेषण केले जायचे. प्रत्येक जण आपापल्या बुद्धीप्रमाणे मते मांडत. आपल्या म्हणण्याला शक्‍य तेवढे पुरावेही देण्याचा प्रयत्न करत. अशा गप्पा दिवसभर कधी कधी रात्री उशिरापर्यंतही चालत. त्यांच्यापैकी एकजण मात्र नेहमी शांत असायचा. या साऱ्या गप्पा वेळ मिळेल तसे वाचायचा. फार फार तर कधी कधी एखादी चांगली गोष्ट शेअर करायचा.

एका सुटीच्या दिवशी सगळ्यांनी भेटायचे ठरले. ठरलेल्या वेळी सगळेजण आले. मंगळ, चंद्र, पृथ्वी, विज्ञान, अध्यात्म, सहिष्णुता, देशप्रेम, चित्रपट, श्रद्धा-अंधश्रद्धा, दहशतवाद, शांती, धर्म वगैरे वगैरे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा सुरु झाली. नेहमी शांत असणारा मित्र आजही शांतच होता. काही निवडक विषयांवरच बोलत होते. त्याला पाहून एकाने विचारले, "का, रे तू सदा न कदा नुसतं बघत काय बसतो? बोल रे, कळू दे ना तुला काय वाटतं ते! बोलत जा. सगळ्याच विषयांवर‘ त्यावर इतर काही जणांनीही त्याला मत मांडण्याचा आग्रह धरला. त्यावर तो म्हणाला, "हे बघा, मी मतं मांडतोच ना. फक्त राजकारण वगैरे विषयांवर चर्चा मला फारशी पटत नाही‘ त्यावर एका मैत्रिणीने सांगितले, "हे हे तुझ्यासारखे शांत बसून या सगळ्या गंभीर विषयांना वाऱ्यावर सोडणाऱ्यांमुळेच काही चांगलं होत नाही.‘

आता शांत बसणारा मित्रही किंचित मोठ्या आवाजात बोलला, "तुम्ही या सगळ्या सगळ्या विषयांवर बोलता. काय मिळतं तुम्हाला?‘ त्याला मध्येच थांबवत अन्य एकाने तावातावाने सांगितले, "अरे, परस्परांचे विचार कळतात. नवे संदर्भ समजतात. एखाद्या विषयाकडे नव्या दृष्टीकोनातून बघता येते‘, त्यावर पुन्हा शांत मित्र म्हणाला, "बरं कळले विचार. कळले संदर्भ. कळली दृष्टी. पुढे?‘ पुन्हा मैत्रिण म्हणाली, "शांत बसल्याने तरी काय मिळतं रे तुला?‘ शांत मित्र म्हणाला, "हे बघा. तुम्ही खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारता. अगदी दुसऱ्या दिवशी एखादा देशातील एखादा मोठा माणूसही तुम्ही सांगितल्यापैकी एखादा संदर्भही वापरतो. पण आपल्या ग्रुपमध्ये कोणीही लोकप्रतिनिधी नाही. या चर्चेचा चर्चेतून एखादा सर्वानुमते निष्कर्ष काढून तो अनेकांपर्यंत पोचविण्याचीही आपल्याकडे यंत्रणा नाही. त्यामुळे या चर्चेला काहीही अर्थ उरत नाही. उरला प्रश्‍न दृष्टीकोनाचा तर गुगलवर शोधा हवी ती दृष्टी निर्माण करता येईल. हवी ती गोष्ट खरीच आहे म्हणून तुम्हाला पटवून सांगता येईल, एवढे पुरावेही मिळतील.‘

त्याला मध्येच थांबवत एक मित्र म्हणाला, "मग आम्ही काय नुसतं गुगल करत बसावं, असं तुला वाटतं का? गप्पा मारूच नयेत. फक्त गप्प बसावं तुझ्यासारखं?‘ शांत मित्र म्हणाला, "गप्पा जरूर माराव्यात. पण शक्‍य तेवढ्या सकारात्मक. अरे तुम्ही दहा विषयांवर दहा वेगळी मतं निष्फळपणे ऐकून घेण्यापेक्षा एक चांगला विचार दिवसभरात जमेल तेवढ्या वेळा वाचा. तसं वागण्याचा प्रयत्न करा. तो विचार इतरांना सांगा. शेवटी पॉझिटिव्ह विचारांनीच जग कितीही वाईट असलं तरीही बदलू शकतं. तुम्ही दिवसभर देशभरातील चांगल्या वाईट गोष्टींची चर्चा केलीत तर त्यातून काही मिळणार नाही. पण तुम्ही एक चांगला विचार जमेल तेवढ्या लोकांना सांगितलात तर कदाचित देश बदलूही शकेल. कोणत्याही व्यक्तीला, समूहाला किंवा विचारसरणीला जमेल तेवढी टीका करून, उणेदुणे काढण्यापेक्षा एक चांगला अनेकांना सांगणे हेच माझ्यामते देशप्रेमाचे उत्तम उदाहरण ठरेल ना?‘

पुढे बराच काळ ग्रुपमध्ये शांतता पसरली होती.

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...