12/08/2016

'पगारापेक्षा जास्त काम करा!'

खूप दिवसांनी विद्यापीठाच्या कॅंटिनला सगळे एकत्र आले होते. "जाम वैतागलो राव. काम करून करून. कामातच जिंदगी जाते की काय असं वाटतं राव कधी कधी?‘, एकाने मनावरचा ताण हलका केला. "वर्क इज लाईफ है डिअर‘, दुसऱ्याने त्याला समजावलं. "काय घंटा वर्क? आयला जे करतात तेच करत राहतात. जे करत नाहीत ते निवांत..‘, एका त्रस्त मित्राने त्रागा केला. पुन्हा पहिला मित्र बोलू लागला, "खरयं खरयं. अगदी खरयं. बघा नेत्यांना दुप्पट पगारवाढ, गव्हर्नमेंटवाल्यांना पे कमिशन आणि आपल्याला काय? वर्षाकाठी किरकोळ वाढ फक्त...‘ त्याच्या मतावर सगळ्यांनीच सहमती दर्शविली. त्यानंतर थोडा वेळ शांतता पसरली.

"पण काही म्हणा राव जो पगारापेक्षा जास्त काम करतो ना त्योच जातो पुढे...‘, मघापासून शांत असलेल्या एका मित्राने सुरुवात केली. "अरे भवड्या, तुला पगार किती? तू बोलतो किती? त्याच्यामुळेच तुझ्यासारखी माणसं मागे असतात. नुसतं काम अन नुसत्या गप्पा‘, एकाने त्याला खडे बोल सुनावले. "हा हा असला तुमचा ऍटिट्युड आहे ना. त्यामुळे तुम्हाला काम करायला त्रास होतो!‘, शांत मित्र चांगलाच पेटला. "बरं! मग तुझ्या म्हणण्यानुसार आठ तासाऐवजी 16 तास काम करू का? 8 तासाच्या पगारात?‘, पुन्हा वाद पेटला. "मी तसं थोडचं म्हटलोय. पण हा काम करत नाही. तो काम करत नाही. म्हणून आपण त्रास का करून घ्यायचा. आपण आपलं आठ तास काम प्रामाणिकपणे करावं‘, शांत मित्राने स्पष्ट केलं. "प्रामाणिकपणा म्हणजे पगारापेक्षा जास्त काम असा होत नाही ना पण?‘, त्याला पुन्हा उचकवण्यात आलं. "हे बघा मित्रांनो, मी तुम्ही कामचुकार आहात असं म्हणत नाहीए. पण नोकरीत एक असतं. तुम्ही जिथं काम करता ना तिथं तुमच्या कामावर कोणाचं तरी लक्ष असतं. कधी कधी तुम्हाला त्याचं ऍप्रिसिएशनही मिळू शकतं. बऱ्याचदा ही गोष्ट तुम्हाला माहित नसते‘, त्याने पुन्हा फिलॉसॉफी मांडली. "बरं! आहे लक्ष आमच्यावर. काय उपयोग? आणि जे काम करत नाहीत त्यांच्यावर कोण लक्ष देणार?‘, मित्राने प्रश्‍न उपस्थित केला. "त्यांच्याकडेही लक्ष असतं. पण त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्यायची गरज काय? त्यांची लाईफ, त्यांचं काम ते बघून घेतील. काम करत नसल्याचा त्यांना कधी तरी त्रास होणारच आहे‘, शांत मित्राने शांतपणे सांगितले. "बरं. पण मग पगारापेक्षा जास्त काम करून काय उपयोग? पगार तर तेवढीच मिळणार ना! आणि हॅट्रिक म्हणजे हे काम न करणारे लोकच सगळे काम करत असल्याचा आव आणत असतात‘, त्याच्याशी संवाद वाढविण्यात आला.

"मित्रांनो, कसं आहे. की आपण आपल्याला जितका पगार मिळतो तेवढं काम करू असं म्हणतो. पण वास्तविक आपण आजूबाजूच्या काम न करणाऱ्यांकडे बघून तेवढं काम पण करत नाहीत. मात्र तुम्ही कुठंही बघा. ज्याने पगाराच्या आकड्याकडे न बघता पगारापेक्षा जास्त काम निष्ठेने आणि अत्यंत प्रामाणिकपणे काम केले त्याच्याच कष्टाचे कुठेतरी चीज झाले आहे. फार कमी काळात तो माणूस पुढे गेलेला आहे. जरा डोळे उघडे ठेवून तुमच्या आजूबाजूला बघा‘, शांत मित्राने पुन्हा शांतपणे सांगितले. "बरं, पण कधी कधी होतं की लक्ष ठेवणाऱ्यालाच पटवण्याचा प्रयत्न केला जातो‘, पुन्हा प्रतिप्रश्‍न आला. "हे बघा. लाईफ म्हटलं की या साऱ्या बारा भानगडी आल्याच. त्यातच नोकरीत सगळीकडे हीच परिस्थिती आहे. आणि समजा, तुम्ही खूप खूप कष्ट केलेत आणि त्याचे काहीच फळ मिळाले नाही, तर तुम्हाला तुमच्या कामाच्या अनुभवाचा फायदा तर होईलच ना दुसरीकडे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापैकी कशाचाच फायदा झाला नाही तर तुम्हाला काम केल्याचा जो आनंद मिळेल, त्यातून जे समाधान मिळेल. ते कदाचित आयुष्यभर मेडिटेशन केल्यानंतर मिळणाऱ्या शांती आणि समाधानापेक्षा कमी नसेल. मात्र हे आयुष्याच्या शेवटी समजून येईल‘, शांत मित्राने दीर्घ भाषण केलं.

"अबे, पण समाधानाला घेऊन काय करायचं आहे? जिंदगीत पैसा महत्त्वाचाए!‘, एकाने त्याला पुन्हा उचकावले. "हे बघा तुम्हाला ऐकायचे की नाय ते तुमचे तुम्ही ठरवा. तुम्ही कामचुकारपणाही करू शकता. तुम्ही लक्ष ठेवणाऱ्याला पकडून पटवूही शकता. त्यातून तुम्ही नोकरी टिकवत आयुष्य कसेबसे निभावून न्यालही. पण जेव्हा हातात काठी येईल आणि डोक्‍यावरचे केस मार्गस्थ होतील तेव्हा कळेल आयुष्यभर काहीच केलं नाही ते!‘ त्याच्या या वाक्‍यानंतर सगळीकडे शांतता पसरली.

Related Posts:

  • शनिवारची गोष्ट: 'श्रद्धा' म्हणजे काय? आटपाट नगर होतं. नगरावर एक राजा राज्य करत होता. नगरातील लोक श्रद्धाळू होते. नगरात एक मोठे मंदिर होते. मंदिराचा गाभारा खूप मोठा होता. तो पाण्याच्या हौदासारखाच होता. राजाने एकदा आदेश दिले. मंदिराचा गाभारा फक्त दुधाने भरून काढाय… Read More
  • 'माणूस महत्त्वाचा की गुरे?' डोंगरकपारीत जंगलाच्या जवळ एक वाडी होती. त्या वाडीमध्ये त्यांचा मोठा वाडा होता. त्यांचं घराणं प्रतिष्ठित होतं. जंगलाच्या अलिकडे त्यांची 100 एकरपेक्षा जास्त जमीन होती. वाड्यात नोकरचाकर होते. दूध, तूप, लोण्यांसाठी आणि शेतकाम… Read More
  • ...जसं वाटतं तसं जगायला हवं! कंपनीच्या आवारात रोज रात्री एक आलिशान चारचाकी गाडी यायची. रात्री उशिरा गाडी यायची. गेल्या अनेक दिवसांपासून ती गाडी पार्किंगमध्येच दिसत होती. ही गोष्ट कंपनीच्या कॅम्पस मॅनेजरच्या लक्षात आली. त्याने वॉचमनला विचारले. "रोज रा… Read More
  • 'या हयातीत तुमचे घर होणार नाही!' ते दोघे कॉलेजपासून चांगले मित्र होते. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची म्हणावी अशीच होती. तरीही ते कुटुंबियांसोबत खाऊन-पिऊन सुखी होते. दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत होते. आपापल्या क्षेत्रात ते निष्णात आणि प्रामाणिक होत… Read More
  • '...म्हणून जग टिकून आहे आज' ‘आई मला शाळेचं नवीन दप्तर आणायचं हाय‘, ती काही दिवसांपासून हट्ट करत होती. "घीऊ लवकर‘ असं म्हणत तिने रोजच्याप्रमाणे मुलीचे समाधान केले. तिचा नवरा भाड्याची रिक्षा चालवत होता. तर ती आजूबाजूच्या काही घरात धुणं-भांडे करत हातभा… Read More

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...