12/20/2018

कसा असतो सॅटेलाईट फोन?

१) हा फोन कसा असतो? कार्य कसे चालते? हा फोन वापरण्यासाठी भारत सरकारची परवानगी घ्यावी लागते का ?
सॅटेलाईट टेलिफोन म्हणजे एक प्रकारचा मोबाईल फोनच आहे. महत्वाचा फरक एवढाच आहे की हा फोन टेलिफोन ऑपरेटर्सचे नेटवर्क न वापरता थेट संबंधित देशाने अवकाशात सोडलेल्या उपग्रहांचे नेटवर्क वापरतो. अशा फोनद्वारे एखादा कॉल केला तर तो कॉल सर्वप्रथम सॅटेलाईटकडे जातो. तेथून ज्या व्यक्तीला कॉल केला आहे त्या व्यक्तीचा पृथ्वीवरील नेटवर्कच्या कक्षेत येऊन शोध घेतो आणि त्याच्याशी जोडून देतो. ज्याला कॉल केला आहे त्याच्याकडूनही अशाच प्रकारचे माहितीचा (आवाजाचे) प्रवास होतो. त्यामुळे या फोनद्वारे केलेल्या कॉलचा वेग वेगवेगळा असू शकतो. SATPHONE असे या फोनचे लोकप्रिय नाव आहे.  या फोनचा वापर कॉल फोन करणे-स्वीकारणे, एसएमएस पाठवणे-स्वीकारणे आणि अत्यंत कमी वेगाचे इंटरनेट वापरण्यापुरताच मर्यादित आहे. मात्र, प्रत्येक फोनला इंटरनेट सुविधा उपलब्ध असेलच असे नाही. कार्यकक्षेच्या परिमाणांचा विचार करता हा फोन दोन प्रकारे कार्य करतो. पहिल्या प्रकारातील फोन हा संपूर्ण पृथ्वीवर कोठेही सुयोग्य पद्धतीने कार्यन्वित होतो तर दुसर्या प्रकारात हा फोन केवळ विशिष्ट क्षेत्रातच कार्यन्वित होतो. काही तांत्रिक मर्यादेमुळे सॅटेलाईट फोन नेमक्या कोणत्या ठिकाणावरून वापरण्यात येत आहे हे समजत नाही.  त्यामुळेच भारतामध्ये सॅटलाईट फोनचा वापर केल्याने इंडियन टेलिग्राफ ऍक्ट १८८५, इंडियन वायरलेस टेलिग्राफ ऍक्ट १९३३ आणि इंडियन पिनल कोड आणि फॉरिनर्स ऑर्डर ऑफ १९४८ या कायद्याचे उल्लंघन होते. मात्र, भारतीय दूरसंचार विभागाकडून परवानगी घेऊन हा फोन भारतामध्ये वापरता येतो. या परवानगीसंदर्भातील  सविस्तर माहिती आपणांस पुढील लिंकवर उपलब्ध होऊ शकेल. http://www.dot.gov.in/inmarsat  (माहिती संदर्भ: १) https://en.wikipedia.org/wiki/Satellite_phone    २) https://www.quora.com/Why-are-satellite-phones-banned-in-India)



२) या फोनवरुन रेग्युलर लँडलाईन वा मोबाईलवर काॕल करता येतात का ? काॕलचा दर काय आसतो ? 
सॅटेलाईट फोनद्वारे संपूर्ण पृथ्वीवरील कोणत्याही क्रमांकावर (लॅण्डलाईन, मोबाईल) कॉल करता तसेच स्वीकारता येऊ शकतात आणि एसएमएसही पाठविता येऊ शकतात. मात्र, इंटरनेट वापरताना अत्यंत कमी वेग मिळू शकतो  किंवा वेग मिळेलच याची काही खात्री देता येत नाही.  या फोनची विशेष बाब म्हणजे या फोनचा वापर सर्वसाधारणपणे खुल्या मैदानातून करण्यात येत असल्याने बंद दरवाज्याच्या आत (घरात, कार्यालयात किंवा तत्सम ठिकाणी) हा फोन प्रभावीपणे काम करू शकत नाही. कारण या फोनचे नेटवर्क फक्त आऊटडोअर सेवा अधिक प्रभावीपणे देते.  त्यामुळे खुल्या मैदानात, खिडकीजवळ किंवा दाराशी अधिक चांगली रेंज मिळू शकते. सर्वसामान्यपणे मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्या सेवा पुरविताना इनडोअर आणि आऊटडोअर अशा दोन प्रकारात सेवा पुरवितात. सॅटेलाईट फोनच्या सेवा देणार्या तीन प्रमुख कंपन्या आहेत. त्या  म्हणजे  Iridium, Thuraya  आणि  Globstar यापैकी पहिल्या दोन कंपन्यांवर भारतामध्ये बंदी आहे.
(माहिती संदर्भ: http://www.rediff.com/news/2008/dec/05mumterror-why-terrorists-used-satellite-phones.htm)

कॉलचा दर वेगवेगळे आणि अत्यंत महाग आहेत. सर्वसाधारणपणे प्रति मिनिट रु. ७ (सात रुपये) ते रुपये ९९ (नव्व्यान्नव रुपये) असे आहेत. याशिवाय जर इतरांना (आप्तेष्ट, मित्रमंडळी वगैरे) तुमच्या सॅटफोनवर कॉल करायचा असेल तर प्रतिमिनिट रुपये १४९ (एकेश एकोणपन्नास) ते  रुपये ६९९ (सहाशे नव्याण्णव) एवढा आकार लागतो. एका सॅट फोनवरून दुस-या सॅटफोनवर कॉल करायचा असेल तर किमान रुपये ७४९ मोजावे लागतात. तर केवळ एका एसएमएससाठी किमान रुपये २५ एवढा आकार पडतो.  (माहिती संदर्भ: http://www.rediff.com/news/2008/dec/05mumterror-why-terrorists-used-satellite-phones.htm)  दरम्यान टाईम्स ऑफ इंडियाच्या २८ मे २०१७ च्या वृत्तानुसार भारतामध्ये पुढील दोन वर्षात सॅटफोन सुविधा सर्वांसाठी उपलब्ध होणार असून या फोनसाठी पहिल्या टप्प्यात प्रति मिनिट रुपये ३०-३५ आकार पडणार आहे. (सविस्तर वृत्त वाचा: https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/bsnl-plans-satellite-phone-service-for-all-in-2-years/articleshow/58878959.cms )

३) हा फोन शक्यतो अतिरेकी वापरतात हे खरे आहे का?
अतिरेकी सॅटेलाईट फोन वापरतात हे अगदीच खरे आहे. सर्वसामान्य फोन निर्मनुष्य ठिकाणी वाळवंटात तसेच समुद्रामध्ये प्रभावीपणे काम करत नाहीत. कारण या सर्व ठिकाणी टेलिफोन नेटवर्क उपलब्ध नसते.  सर्वसामान्यपणे दहशतवादी अशाच एखाद्या ठिकाणांवरून घातपाती कारवाया करत असतात. शिवाय या फोनच्या नेमक्या ठिकाणाचा शोध घेणे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत क्लिष्ट आणि आव्हानात्मक काम असते. अगदी अलिकडचे उदाहरण म्हणजे २६ नोव्हेंबर २००८ ते २९  नोव्हेंबर २००८ दरम्यान मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान दहा दहशतवाद्यांनी सॅटेलाईट फोनचा त्यांच्या स्तरावर परस्परांमध्ये समन्वय साधण्यासाठी तसेच समुद्रातून भारताचा रस्ता शोधण्यासाठी अत्यंत शिताफीने वापर केला होता. (माहिती संदर्भ: http://www.rediff.com/news/2008/dec/05mumterror-why-terrorists-used-satellite-phones.htm)

४) हँडसेट वा हँडसेटस कसे असतात?
सध्या अस्तित्वात असलेल्या सर्वसामान्य हॅंडसेटस् प्रमाणेच सॅटेलाईट फोन्स असतात. केवळ त्यांची रुंदी आणि जाडी तुलेनेने अधिक असते. तसेच त्यांना वरच्या बाजूला एक एँटिना (२-४ इंच) असतो. जो कायम (ज्या ज्या वेळी फोन वापरायचा आहे त्या त्या वेळी) उघडून ठेवावा लागतो. हा एँटिना पांढर्या स्वच्छ आकाशाच्या दिशेने ठेवावा लागतो. (माहिती संदर्भ: google.com)

५) सगळी मोबाईल टॉवर यंत्रणा ठप्प असताना हा फोन कार्य करतो का?

ज्या ठिकाणची मोबाईल यंत्रणा ठप्प आहे त्या ठिकाणाहून  इतर ठिकाणी संपर्क साधता येणे शक्य आहे. कारण या फोनचा मोबाईल टॉवर यंत्रणेशी थेट संबंध नसतो.  त्यामुळे मोबाईल टॉवर यंत्रणा सुरू असोत अथवा बंद सॅटेलाईट फोन कायम कार्यन्वितच असतो.  मात्र ज्यांच्याशी संपर्क साधावयाचा आहे त्यांच्याकडे मोबाईल टॉवर यंत्रणा सक्षमपणे कार्यान्वित असणे अनिवार्य आहे.

(माहिती संकलन, संपादन आणि सुलभीकरण: व्यंकटेश कल्याणकर)

1 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...