7/24/2020

लॉकडाऊनच्या काळात सोशल मिडिया ठरली जीवनसंजिवनी!

करोनाच्या रुपाने डोळ्यांना न दिसणार्या अदृष्य स्वरुपातील राक्षसामुळे मानवी अस्तित्वावर महाभयानक संकट ओढवले आहे. `माणूस जिवंत रहावा', या एकाच हेतूने जगातील बहुतेक देशांनी कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला. मात्र, सतत कृतीशील-कार्यमग्न (एंगेज) राहण्याचा नैसर्गिक स्वभाव असलेल्या माणसाला लॉकडाऊनच्या काळात आधार ठरला तो इंटरनेटचा. सोशल मिडियानं माणसांना एंगेज ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि ही एंगेजमेंट नजीकच्या काळात आपली व्याप्ती अधिक वाढविण्याचे संकेत दाखवित आहे. 

लॉकडाऊनच्या काळात रस्ते रिकामे असताना फेसबुक, व्हॉटसऍप, इंस्टाग्राम, ट्टिवर, लिंक्डइन इत्यादी सोशल मिडिया साईटस् झूम, लार्क, वेबेक्स इत्यादी वेबिनारची सुविधा देणारी माध्यमे तर युट्युब, नेटफ्लिक्स, मॅक्सप्लेअर, हॉटस्टार इत्यादी मनोरंजनाचा खजिना पुरविणारी माध्यमे माणसांच्या प्रचंड गर्दीने फुलून गेली. ही गर्दी एवढी प्रचंड होती की बॅंडविड्थवर (एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी माहिती (डेटा) पोहोचविणारी यंत्रणा) ताण आला आणि नेटफ्लिक्ससारख्या माध्यमांना त्यांच्याद्वारे प्रसारित केले जाणारे व्हिडिओ एचडीवरून (हाय क्वालिटी) केवळ एसडी (स्टॅंडर्स क्वालिटी) दर्जाचेच दाखविण्याची वेळ आली.

कार्यमग्नता, रंजन आणि काही अंशी प्रबोधनासाठी या सर्व माध्यमांचा वापर करण्यात आला. लॉकडाऊन वाढत जाण्याची  चिन्हे दिसल्यानंतर काही आस्थापनांनी, कंपन्यांनी हा कालावधी प्रशिक्षण, गुणवत्ता सुधारणा आणि चिंतनासाठी सार्थकी लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे झूमचा (व्हिडिओ मिटिंग सुविधा असलेले संकेतस्थळ/ऍप) वापर वाढला. दरम्यान झूमशिवाय अन्य पर्यायही समोर आले. त्यामध्ये `गुगल डिओ'लाही मागणी वाढली. आणि कर्मचार्यांच्या घरांची कार्यालये झाली. प्रशासनानेही घरातूनच कामकाज सुरु केले. त्यासाठी नॅशनल इन्फॉरमेटिक्स सेंटरने (एनआयसी) तयार केलेल्या सुरक्षित अशा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग टूलचा वापर करण्यात आला. केंद्र सरकारने मंत्री आणि अन्य प्रशासकीय यंत्रणांना एनआयसीचेच टूल वापरावे असा अधिकृत सल्ला दिला. महानगरपालिका, नगरपालिकासारख्या स्थानिक प्रशासनानेही स्वनिर्मित किंवा अधिकृत टूल्सद्वारे जनसेवेचे व्रत अखंडपणे सुरु ठेवले.  तर राजकीय व्यक्तींनीही फेसबुक लाईव्हसारख्या माध्यमातून जनतेशी संवाद सुरुच ठेवला.

खाजगी क्लासेस, खाजगी शाळा यांनीही विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात एंगेज ठेवण्यासाठी ऑनलाईन क्लासेसचा पर्याय निवडला. त्यालाही उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सात-आठ वर्षांच्या बाळगोपाळांच्या कोमल ओठांतून `झूम' नाव बाहेर पडू लागले. कलावंतांना तर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नवं व्यासपीठच मिळालं. कलावंतांचे समूह तयार झाले. काही विद्यापीठांनी `गुगल डिओ'द्वारे ऑनलाईन लेक्चर्सद्वारे अभ्यासक्रम सुरु ठेवले. याशिवाय हेलो, शेअरचॅट, टीकटॉक, ट्रूकॉलर, व्हीमेट या ऍप्सलाही मागणी वाढली. वाचनाची आवड जोपासण्यासाठी चोखंदळ मराठी वाचकांनी प्रतिलिपी, इनमराठी, स्टोरीटेल यासह अन्य माध्यमांना पसंती दिली. या सर्वांद्वारे लॉकडाऊनमुळे घरात अडकलेल्यांचं चांगलच रंजन झालं. काही आंतरराष्ट्रीय संकेतस्थळांनी केलेल्या अभ्यासानुसार फेसबुक आणि तत्सम ऍपच्या डाऊनलोडच्या प्रमाणात काहीही वाढ झालेली नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, ज्यांनी आधीच अशी ऍप्स केवळ डाऊनलोड करून ठेवली होती. त्यांचं वापराचं प्रमाण वाढलं यात मात्र काहीही शंका नाही.

लॉकडाऊनपूर्वी खरेदीचं नियोजन केलेल्या मंडळींची लॉकडाऊनमुळे निराशा झाली. ऍमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या ऍप्सद्वारे खरेदी जरी शक्य झाली नसली तरीही खरेदी इच्छुक मंडळींनी वेगवेगळ्या वस्तूंची निवांतपणे सविस्तर माहिती घेतली. त्यामुळे या ई-कॉमर्स ऍपवरही पुष्कळ गर्दी झाली.

अपग्रेडेशनला प्राधान्य
लॉकडाऊनच्या काळात सोशल मिडियाचा वापर वाढला. त्यामुळे फेसबुक, व्हॉटसऍपने युजरची गरज ओळखून अपग्रेडेशला प्राधान्य दिले. त्यासाठी रिसर्च डिपार्टमेंट कामाला लागले. मात्र, यासाठी कार्यरत बहुतेक कर्मचारी `वर्क फ्रॉम होम' करत होते. अखेरीस व्हॉटसऍपने काही दिवसांपूर्वीच एकाच वेळी आठ जणांना व्हिडिओ कॉलची सुविधा आणण्याचे जाहीर केले. तर फेसबुकने `फेसबुक मेसेंजर'द्वारे मल्टिव्हिडिओची सुविधा देण्याचा  निर्णय घेतला. याशिवाय फेसबुक लाईव्हद्वारे निधी संकलनाची सुविधा लवकरच उपलब्ध होणार असल्याचेही कळविले. याशिवाय गुगल, ट्विटर आणि अन्य कंपन्यांनीही आपला रिसर्च डिपार्टमेंट कामाला लावला आहे. 

लॉकडाऊनचे जग आणि सोशल मिडिया
लॉकडाऊननंतरचे जग कसे असेल याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. एक मात्र खरे की लॉकडाऊननंतर माणसं माणसांमध्ये सामाजिक अंतर ठेवतील. कमीत कमी स्पर्श होईल याची काळजी घेतील आणि पर्यायाने ऑनलाईन व्यवहारांना प्राधान्य देतील. याशिवाय सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्ता वापरून कमीत कमी मानवी हस्तक्षेपाशिवाय व्यवहार पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येईल. ऑनलाईन बैठका, प्रशिक्षण, मैफिली (निशुल्क-सशुल्क), चर्चासत्रे, कार्यशाळा आदींसाठी वेगवेगळी व्यासपीठे विकसित होतील. स्वयंशिक्षणाकडे कल वाढेल. यातून कौशल्याधारित मनुष्यबळाला मागणी वाढेल. तर जास्तीत जास्त मानवी हस्तक्षेप असलेल्या कारकूनी किंवा कामाच्या पारंपरिक पद्धतीला मागणी कमी होईल. त्यामुळे प्रत्येकालाच नव्या युगातील संसाधनांच्या किमान वापराची कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज ठरेल. कल्पकता, नाविन्यता आणि सर्जनशीलतेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होईल. विशेषत: उपलब्ध तांत्रिक संसाधने-डिव्हाईसेस, माणसांच्या गरजा आदींची सांगड घालून नवे आविष्कार आणि सोयी-सुविधा निर्मितीकडे कल वाढेल. विशेष म्हणजे हे सगळं एखादी मोठी कंपनी किंवा समूह वगैरेच करेल हा भ्रम ठरेल. अशा तंत्रज्ञानाधारित निर्मितीला केवळ मानवी बुद्धिमत्ता हीच एकमेव भांडवल ठरेल. त्यामुळे एखादा शाळकरी विद्यार्थी किंवा एखादा वयोवृद्ध व्यक्तीही अशी लोकोपयोगी नवनिर्मिती करू शकेल. जो या सर्वांमध्ये पारंगत होईल, तो अल्पावधीत आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या समृद्ध होईल. 

फेसबुकच ठरेल वरचढ!
`गुगल'ने सोशल मिडियामध्ये उतरण्यासाठी २००४ साली आणलेले `ऑरकुट' २०१४ साली ऑरकुट बंद केले. तर २०१४ साली आणलेले `गुगल प्लस'ही बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, २००४ पासून सुरु असलेले फेसबुक तब्बल १६ वर्षांपर्यंत अखंडपणे वाचकांच्या `लाईक्स' मिळवित आहे. फेसबुकने संपूर्ण सोशल मिडिया स्वत:च्याच ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. `इन्स्टाग्राम' , `व्हॉटसऍप' ही काही उदाहरणे. याशिवाय स्पर्धा करणार्या छोट्या-मोठ्या कंपन्या विकत घेण्याचं फेसबुकचं धोरण कायम आहे. आतापर्यंत फेसबुकने तब्बल ८२ कंपन्या ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे बाजारातील स्पर्धाच ताब्यात घेण्याचा फेसबुकचा प्रयत्न दिसतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र तुम्ही ज्यावेळी एक श्वास तुमच्या शरीरात घेता त्यावेळी फेसबुकच्या खात्यात प्रत्येक वेळी पाच लाख रुपये जमा झालेले असतात. यावरुन फेसबुकची व्याप्ती लक्षात येईल. फेसबुकने युजरसोबतच जाहिरातदारांनाही प्रचंड मोठं व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे. फेसबुकद्वारे जाहिरात करण्यासाठी तुम्हाला अपेक्षित ग्राहक शोधण्यासाठी १३०० पेक्षा अधिक स्थान, लिंग, वय, अभिरुची असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. आणि यामुळेच फेसबुक सर्वांत वरचढ ठरणार आहे. 

आपला युजर फेसबुक सोडून दुसरीकडे जाऊ नये हा फेसबुकचा नित्यप्रयत्न असतो. त्यासाठी सातत्याने संशोधने आणि विकसन सुरु असतात. त्यामुळेच नजीकच्या काळात तुम्हाला काहीही करायचे असेल तर ते फेसबुकवर करता येणे शक्य होणार आहे. त्यामध्ये कोणत्यही प्रकारची खरेदी, कार्यशाळांचे आयोजन, सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे यासह जे काही इंटरनेटविश्वावर करता येईल ते सर्व काही फेसबुकवर करता येणार  आहे. त्यामुळे नजीकच्या काळात किमान भारतीयांसाठी तरी फेसबुक म्हणजे इंटरनेट ठरेल असे म्हणणेही वावगे ठरणार नाही.

प्रतिक्रिया 
लॉकडाऊनच्या काळात आम्ही सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार परवाने घेऊन आंबा विक्री सुरु केली. महाराष्ट्रभर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसाठी आम्ही आमच्या ठरलेल्या मार्गांवर येणार्या शहरांमध्येच फेसबुकद्वारे जाहिरात प्रसिद्ध केली. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आम्ही दररोज किमान १००० डझन आंबा राज्यभर विक्री करत आहोत. 
- महेश पळसुलेदेसाई, रत्नागिरी (आंबा बागायतदार-व्यापारी)

मागील काही महिन्यांनापासून अनेक कंपन्यांनी आपल्या डिजीटल जाहिरातींसाठीची आर्थिक तरतूद वाढवली आहे. लॉकडाऊननंतर विपणन आणि जाहिरातींसाठी डिजीटल माध्यमांना पूर्वीपेक्षा अधिक महत्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी लवकरात लवकर या माध्यमांचा प्रभावी वापर करायला हवा.
- राघवेंद्र जोशी, विपणन तज्ज्ञ, पुणे

आम्ही कलावंत मंडळींच्या १४८ जणांच्या समूहाने लॉकडाऊनच्या काळात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दररोज सात तास याप्रमाणे सलग ४० दिवसांमध्ये मिळून तब्बल २८० तासांच्या संगीत कार्यक्रमांचे प्रसारण केले. या कार्यक्रमांचा जवळपास काही लाख प्रेक्षकांनी लाभ घेतला. नजीकच्या भविष्यातही आम्ही ऑनलाईन कार्यक्रमांवर भर देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
- कीर्ती निलेश देसाई, पुणे (पार्श्वगायिका-गीतकार-संगीतकार)

नाविन्यपूर्ण उपक्रम, प्रकल्प सुरु करण्यापूवी त्याची संकल्पना, योजना, नियोजन याबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी तसेच जनजागृती-जनप्रबोधनासाठी आम्ही सोशल मिडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहोत. या माध्यमातून प्रशासनाशी नागरिकांना कनेक्ट करून त्यांना सहभागी करून घेता येणे शक्य झाले आहे. लॉकडाऊनदरम्यान आणि नंतरही या माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे.
- संग्राम जगताप, जनसंपर्क अधिकारी (पुणे स्मार्ट सिटी, पुणे)
'ई-पेपर'चा गोंधळ
लॉकडाऊनच्या काळात छापील वर्तमानपत्रांच्या घरोघरी जाऊन वितरणावर संसर्गाच्या धोक्यामुळे निर्बंध लादण्यात आले. त्यामुळे बहुतेक माध्यम समूह आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माध्यम क्षेत्रातील कर्मचार्यांचे रोजगारावरही अनिश्चिततेची ग्रहण आले आहे. मात्र, सतत वाचकांसमोर रहावे यासाठी बहुतेक वृत्तपत्रांनी आपली ई-आवृत्ती अखंडपणे वाचकांसमोर ठेवली. त्यापैकी काही अगदी किरकोळ अपवाद वगळता सर्वच वृत्तपत्रांनी आपली ई-आवृत्ती पीडीएफ फाईलच्या स्वरुपात व्हॉटसऍपद्वारे शेअर केली. तिला चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र त्यातून केवळ वाचकांसमोर वृत्तपत्र दिसण्याखेरीज महसूलाच्या दृष्टीने कोणताही लाभ होत नाही. याउलट जर वृत्तपत्रे ही त्या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर जाऊन ई-पेपरच्या स्वरुपात वाचली गेली असती तर त्यातून डिजीटल जाहिरातींद्वारे (गुगल ऍडस, ऍड जेब्रा किंवा तत्सम माध्यमातून) काही महसूल प्राप्त होऊ शकला असता. भलेही तो महसूल अगदी किरकोळ ठरला असता. मात्र, त्यातून भविष्यात मोठा लाभ होऊ शकला असता. लॉकडाऊनच्या काळात बहुतेक माध्यम समूहांना आपल्या वाचकवर्गाला ई-पेपरकडे (पीडीएफकडे नव्हे!) वळविण्याची आणि हळूहळू डिजीटल आवृत्तीकडे वळविण्याची सुवर्णसंधी लाभली होती. दुर्दैवाने, माध्यम समूहांनी तिचा फारसा लाभ घेतल्याचे दिसत नाही.

जिओमध्ये फेसबुकची गुंतवणूक
भारतामध्ये सर्वप्रथम सर्वांत स्वस्त आणि वेगवान इंटरनेट सेवा देणार्या जिओमध्ये फेसबुकने ४३ हजार ५७४ रुपयांची गुंतवणूक केली आहे. लॉकडाऊनच्या काळातील प्रमुख व्यवहारांपैकी हा एक व्यवहार ठरला आहे. यामुळे फेसबुक हे जिओचे सर्वांत मोठे शेअर होल्डर ठरणार आहे. नजीकच्या फेसबुकद्वारे स्थानिक व्यावसायिक आणि ग्राहकांना जिओमार्टच्या (ई-कॉमर्स पोर्टल) माध्यमातून कनेक्ट करण्याच्या हेतूने हा व्यवहार झाला आहे. यामुळे डिजीटल मार्केटिंगला अधिक प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे.

हे आवश्यकच!
जग बदलत आहे. लॉकडाऊननंतरही ते सतत बदलत राहणार आहे. त्यामुळे या बदल्या जगात सर्वसामान्यांना आपली सर्वार्थानं समृद्धी करून घ्यायची असल्यास नेहमीचे कौटुंबिक कलह, घरगुती समस्या बाजूला ठेवून लोकांची गरज आणि तंत्रज्ञानाची सांगड कशी घालता येईल याबाबत सातत्याने विचार-चिंतन-मनन करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी छोटे-मोठे नवीन कौशल्य  विकसनावरही भर द्यायला हवा. थोडक्यात फलप्राप्तीपेक्षा प्रत्यक्ष कृतीशीलतेला सर्वोच्च प्राधान्य दिले तर समृद्धीसोबतच नजीकच्या काळात तुमच्या हातून अनेक भव्य-दिव्य आविष्कार घडू शकतात.

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...