7/09/2019

हत्तीची गोष्ट! (बोधकथा)

आटपाट नगर होतं. तिथल्या राजाला काही हत्ती खरेदी करायचे होते. सैनिकासह राजा त्याच्या काही मंत्र्यांसोबत शेजारच्या राज्यात हत्ती खरेदी करण्यासाठी निघाला. तेथे अनेक विक्रेते लहान-मोठे हत्ती विकत होते. हत्तींचा बाजार भरला होता. राजा आणि मंत्री संपूर्ण बाजारात खूप वेळ फिरले. शेवटी मोठे हत्ती विकणाऱ्या एका विक्रेत्याजवळ थांबले. त्या विक्रेत्याकडील काही हत्ती राजाला आवडले. त्याप्रमाणे राजाने खरेदी करण्याची तयारी दर्शविली. हत्तींचा दरही ठरला. मंत्र्यांनी विक्रेत्याला पैसेही दिले.

हत्ती ताब्यात देताना विक्रेता प्रत्येक हत्तीच्या फक्त उजव्या पायाला थोडीशी बांधलेली दोरी राजाच्या सैनिकांकडे देऊ लागला. हे पाहून राजा म्हणाला, "अरे, ही दोरी एवढी साधी आहे की आम्ही दूरचा प्रवास करताना हा हत्ती कधीही ती तोडून आमच्यावर हल्ला करू शकतो.' विक्रेता शांतपणे म्हणाला, "तसं होणार नाही!' राजाला आश्‍चर्य वाटले, "अरे पण तसे होणार नाही याची खात्री काय?'

त्यावर विक्रेत्याने नम्रपणे उत्तर दिले, "राजेसाहेब, हे हत्ती छोटे असल्यापासून माझ्याकडे आहेत. सुरूवातीला त्यांच्या चारही पायांना खूप जाड दोरी बांधत होतो. तेव्हा ते दोरीचे बंधन तोडण्याचा खूप प्रयत्न करत होते. कितीतरी दिवस ते दोरी तोडून पळण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या पायातून रक्त निघायचे. त्यांना त्रास व्हायचा. त्यावेळी ते काही खातही नव्हते. त्यामुळे अशक्तपणा यायचा. शेवटी एकेदिवशी त्यांनी परिस्थितीसमोर शरणागती पत्करली आणि धडपडण्याचा प्रयत्न सोडून दिला. येथून पळून जाणे हे क्षमतेबाहेरचे आहे असा त्यांचा समज झाला. आज त्यांच्या पायात मोठे बंधन नाही. मात्र त्यांची पळून जाण्यासाठी ते प्रयत्न करत नाहीत. पळून जाणे अगदी सहज शक्‍य असतानाही त्यांच्याकडे तेवढे सामर्थ्य असतानाही त्यांना असेच वाटते की प्रयत्न करून काहीही उपयोग होणार नाही. प्रयत्न निरर्थक जातील. त्यामुळे त्यांनी प्रयत्नच सोडून दिले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या पायातील ही दोरी जरी मी बाजूला काढून ठेवली तरी देखील ते पळून जाऊ शकणार नाहीत.' विक्रेत्याने दीर्घ खुलासा केला.

राजासह मंत्री आणि अन्य सर्वांना विक्रेत्याचे म्हणणे पटले.

(शब्दांकन: व्यंकटेश कल्याणकर)

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...