Showing posts with label sparsh. Show all posts
Showing posts with label sparsh. Show all posts

Saturday, November 16, 2019

मार्ग (लघुकथा)

`हॅलो, आज लवकर येशील? मला खूप बोअर होतयं रे!''
``हो... आज काही एवढं काम नाहीए येतो लवकर..''
ती, तो आणि त्यांचं फक्त सहा महिन्यांचं बाळ. गोंडस कुटुंब. ती नोकरी करायची. पण गरोदरपणाच्या आठव्या महिन्यात नोकरी सोडली. छानसं बाळ झालं. मुलगी झाली. 
दारावरची बेल वाजली. तो आला. तिनं त्याला मिठीच मारली आणि ठसाठसा रडू लागली.
``राणी , अगं काय झालं'' तो तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला.
``मला जगावसं वाटत नाही रे. खूप कसं तरी होतय रे.''
``तुझं काही दुखतय का? चल, मी डॉक्टरांना फोन लावतो. जाऊयात.''
``नाही रे. दुखत काही नाही. पण काय होतय तेच कळत नाही. म्हणजे बघ, पूर्वी कशी मी छानपैकी माझ्या प्रत्येक मिनिटा मिनिटाचं नियोजन करायचे. घर, ऑफिस, मित्र-मैत्रिणी, आपलं फिरणं, गप्पा किती छान जगत होते मी.''
``हो, काय भारी वाटायचं. आताही आपण हे सगळं करू शकतोच ना?''
``नाही रे. आता ही आलीय ना आपल्याकडं.''
``म्हणून काय झालं?''
``तिला घेऊन कुठं फिरणार अरे.''
``होईल ती लवकरच दोन-तीन महिन्यात सगळं ठीक होईल, राणी''
``बघ, दोन तासापासून त्रास देत होती. आता कुठं झोपलीय.''
``अगं बाळ आहे ते. त्याला काय माहिती आहे आपण जे करतोय त्यामुळं आपल्या आईला त्रास होतोय ते.''
``हो, अरे. पण ही झाल्यापासून या चार भिंतीतच मला जगावं लागतयं. ती तुझ्या आणि माझ्याशिवाय कोणाकडे जात पण नाही रे.''
``तिला पाळणारघरात ठेवून तू नोकरी करतेस का?''
``मला तर आता वाटतय की मी या घरातून पुन्हा बाहेर जाईल की नाही. माझं सगळं संपलयं राजा.'' असं म्हणत ती ढसाढसा रडू लागली.
त्यानं तिला गच्च मिठीत घेतलं. ``हे बघ, अगं ही आयुष्यातील एक फेज आहे. काळ निघून गेला की ही फेजही संपेल. तू पुन्हा तुझी नोकरी, तुझा पूर्वीसारखा कार्यक्रम सुरु ठेवशील.''
``मला तर आता असं काही वाटत नाही. ही फेज जाईपर्यंत मी राहते की...''
 तिच्या तोंडावर हात ठेवत तो बोलला, ``काहीही काय बोलते अगं, तू...''
``अरे, दिवसभर ती माझं आणि मी तिचं तोंड बघत बसते.  मलाही बोअर आणि तिलाही बोअर होत असेल.''
`हमममम'''
`कधी कधी वाटतं, आपण उगाच हिला जन्म...''
पुन्हा तिच्या तोंडावर हात ठेवत तो  म्हणाला, ``राणी, अगं.. असं ना बोलू..'
``मग मी काय करायचं दिवसभर सांग बरं तू?''
आता तो बोलू लागला, ``अगं सगळ्यात पहिल्यांदा तू हे असले विचार करणे सोडून दे. बी पॉझिटिव्ह. खूप काही करता येण्यासारखं आहे.''
``गप्पा मारणं सोप्पयं रे. दिवसभर तिच्याजवळ रहावं लागतं. तिला बघावं लागतं.''
``हो न. पण ती ज्यावेळी झोपते न त्या वेळेत खूप काही करता येतं.''
``काय? तेच तर सांग ना?''
``हे बघ,  ती झोपली की तू पुस्तक वाचू शकतेस, पेपर वाचू शकतेस.  टीव्ही पाहू शकतेस.''
``हे सगळं नाही आवडत मला.''
``मग तू फेसबुकवर मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारू शकतेस. चॅट करू शकतेस.''
``हे पुरुष लोक हरामखोर असतात अरे. थोड्या गप्पा मारायल्या की लागतात सलगी करायला...''
``असं नाहीए. पण असो. तू न तिला झोपवतेस कसं?''
``बाबा रे, तिला मांडीवर. मांडी हलवत गाणी म्हणत झोपवावं लागतं.''
``ओह. बघ तू जी गाणी म्हणतेस न ते रेकॉर्ड कर फोनवर...'
``आणि त्याचं काय करायचं?''
``फेसबुक, युट्युबवर आणि साऊंडच्या कितीतरी ऍप आणि वेबसाईटस् आहेत त्यावर अपलोड करायची गाणी.''
``बरं हे झालं. आणखी काय करायचं?''
`` रेडिओ ऐकायचा. त्यावर स्पर्धा असतात. त्यात भाग घ्यायचा.''
``आणखी''
``उद्या तुला एक डायरी आणून देतो. त्या डायरीत तुझ्या आयुष्यात चांगले वाईट प्रसंग लिहायचे आणि आयुष्यात पुढे काय काय करायचं आहे हे लिहायचं. दररोज किमान एक पान तरी लिहायचं.''
``हमम...''
``तू फक्त एवढं कर मनापासून. पुढचं पुढे सांगतो.'', असं म्हणत त्यानं तिच्या गालावर हळूवार किस्सू केला.

***

काही दिवसांनी...

`हॅलो, अरे राजा आज लवकर येशील का? मला न बक्षीस मिळालयं रेडिओच्या स्पर्धेत. ते आणायला जायचयं..''
``वॉव, ग्रेट. निघतो मी लवकर''

**

आणखी काही दिवसांनी... 
``राजा, अरे आज मी खूप खुष आहे.''
``काय झालं?''
``तू दिलेल्या त्या डायरीत मी आठवण म्हणून जी कविता लिहिली होती न. ज्याला पहिलं बक्षीस मिळालं होतं कॉलेजात असताना. ती आज पेपरात छापून आली आहे.''
``अरे व्वा. भारीच की''
``खूप जणांचे फोन आले. सोसायटीतील बायकांनीही फोन केलेला. खूप भारी वाटतयं. आता मी आठवड्यात एक तरी कविता लिहिणार.''
आज मी लवकर येतो.

सायंकाळी...
आल्या आल्या त्यानं तिला मिठीत घेतलं आणि हळूवारपणे केसावर हात फिरवत म्हणाला, ``हे बघ. महिन्याभरातच तू कशी फ्रेश झालीस. बी पॉझिटिव्ह राणी. आपल्याकडं करता येण्यासारखं खूप काही असतं. पण आपण वेगळा विचार कधी करत नाही. आपल्या अडचणींवर मात आपणच करायला हवी. छोट्या-छोट्या गोष्टीतून मोठा आनंद लुटायला हवा. लक्षात ठेव दूधात लिंबाच्या रसाचा एक थेंब जरी पडला तरी ते सगळं दूध नासून जातं अगदी एक थेंब किती तरी लिटर दूधाला संपवतं. तसचं आपल्या मनाचं असतं. मनाला एक वाईट विचारानं स्पर्श केला की आपली विद्वत्ता, हुशारी, प्रगल्भता नासून जाते. त्यामुळं मनाला कधी मळ चढू द्यायचा नाही. बस्स... बघ एवढं गोड बाळाला सांभाळत असतानाच तूच तुझ्या अडचणीवर मार्ग काढलास की नाही...''
``हो, रे माझ्या राजा आता मला आणखी काही कविता सुचताहेत. त्यांचं मी एक पुस्तक छापणार आहे.''
``ग्रेट... ग्रेट'', असं म्हणत असताना लाडानं तिनचं त्याच्या ओठावर ओठ टेकवला.

© व्यंकटेश कल्याणकर

#Anandyatri #VyankateshKalyankar

Tuesday, June 19, 2018

भुंग्याची गोष्ट

एकदा भुंगा आणि फुलपाखरू एका फुलाजवळ येतात. फुलपाखरू फुलावर बसलेले असते. फूल अतिशय सुंदर असते. मात्र सूर्यास्त झाला की फुलाच्या पाकळ्या आपोपाप मिटण्याचा गुणधर्म फुलात असतो. तसेच सूर्योदय झाला की फुलाच्या पाकळ्या आपोआप उघडतही असतात. भुंग्याचे फुलावर प्रचंड प्रेम असते. त्यामुळे "फुलावर सर्वाधिक प्रेम कोण करतो आणि फुल कोणाचे?' यावरून फुलपाखरू आणि भुंगा यांच्यामध्ये वाद होतात. वाद वाढत जातो. मात्र थांबत नाही. शेजारी असलेला एक जुना वृक्ष हा सारा प्रकार पाहत असतो. तो दोघांनाही शांत करतो आणि एक सल्ला देतो. "उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी जो या फुलाजवळ पहिल्यांदा पोचेल त्याचेच या फुलावर प्रेम असेल आणि हे फूलही त्याचेच होईल', असा सल्ला वृक्ष देतो. हा भुंगा आणि फुलपाखरू दोघांनाही मान्य होतो. त्यानंतर दोघेही निघून जातात.

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे एक फुलपाखरू फुलाजवळ येते. फुलाच्या पाकळ्या बंद असतात. त्या उघडण्याची फुलपाखरू प्रतिक्षा करत असतो. दरम्यान भुंगा अजूनही आला नाही याचा त्याला आनंद होतो. कारण आता विजय आपलाच असा त्याचा ग्रह होतो. काही वेळाने सूर्योदय होऊ लागतो. भुंगा अजूनही आलेला नसतो. फुलपाखराला त्याचा आनंद होतो. फुलाच्या पाकळ्या उघडू लागतात. फुलपाखरू आता फुलाच्या दिशेने जाऊ लागते. तोच त्याला धक्का बसतो. कारण त्याला फुलाच्या आत भुंगा मृतावस्थेत दिसतो. त्यावर त्याला काहीच कळत नाही. इतक्‍यात शेजारचे वृक्ष बोलू लागतो. "फुलपाखरा, सकाळी उशीर होऊ नये म्हणून भुंगा काल पाकळ्या मिटण्यापूर्वीच फुलात जाऊन बसला होता. त्याचे फुलावर खूप खूप प्रेम होते. रोजच्याप्रमाणे सूर्यास्त झाला आणि फुलाच्या पाकळ्या मिटल्या गेल्या. एरवी कोणतीही वस्तू पोखरून काढणारा भुंगा फुलांच्या पाकळ्यांना मात्र पोखरू शकला नाही. मी त्याला आवाज देऊन बाहेर येण्याचा सल्ला दिला. पण त्याने माझे ऐकले नाही. फूल संपूर्ण मिटले आणि सूर्योदय होईपर्यंत भुंग्याचा आत गुदमरून मृत्यु झाला.'

त्यावर फुलपाखराला प्रचंड वेदना झाल्या. "फुलपाखरा आपण ज्या गोष्टीवर प्रेम करतो त्या गोष्टीपासून आपल्याला कितीही धोका असला आणि आपल्यात कितीही सामर्थ्य असलं तरी आपण त्या गोष्टीला इजा नाही पोचवू शकत', वृक्षाने मोलाचा संदेश दिला.

(शब्दांकन: व्यंकटेश कल्याणकर)

Sunday, April 29, 2018

भ्रमात राहु नका (बुद्धकथा)

गौतम बुद्ध काही शिष्यांना उपदेश करत होते. "आपण जे समजतो तेच सत्य आहे, असे कधीही समजू नका. कदाचित सत्य काही तरी वेगळेच असू शकते. सतत डोळे उघडे ठेवा. जाणीवा जागृत ठेवा.' असा उपदेश बुद्धांनी केला. त्यावर काही शिष्यांना अधिक विस्ताराने सांगण्याचा आग्रह केला. त्यानंतर बुद्ध एक गोष्ट सांगू लागले. एका गावात एक गरीब व्यक्ती राहत होता. गावाबाहेरील एका वसाहतीत त्याची छोटीशी झोपडी होती. त्याला एक मुलगा होता. गंभीर आजारामुळे काही वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीचा मृत्यु झाला होता. त्यामुळे पत्नीनंतर त्यानेच आपल्या मुलाचे योग्य संगोपन केले होते. गावातील एका घरात तो व्यक्ती रात्रभर पहाऱ्याचे काम करत असे. मुलावर त्याचे प्रचंड प्रेम होते.

मुलगा आता शाळेत जाऊ लागला होता. मुलगा सुरक्षित राहावा यासाठी तो दररोज मुलाला लवकर झोपवून बाहेरून कुलूप लावून कामावर जात असे. दुर्दैवाने एका रात्री तो राहात असलेल्या वसाहतीवर दरोडा पडला. दरोडेखोरांना त्याच्या मुलाला बाहेर काढले. झोपडीतील सर्व सामान लुटले. ज्या घरात माणसे नव्हते अशा शेजारच्या काही घरातील सामान लुटले. हा सारा प्रकार अगदी गुपचूप झाल्याने आजूबाजूच्यांना काहीच समजले नाही. मात्र दरोडेखोरांनी जाताना सर्व झोपडपट्यांना आग लावली आणि त्या व्यक्तीच्या मुलाला घेऊन ते फरार झाले. दुसऱ्या दिवशी काम संपवून तो व्यक्ती घराकडे आला. त्यावेळी समोरचे दृश्‍य पाहून त्याला प्रचंड दु:ख झाले. झोपडी जळाली. आपला मुलगाही त्यात जळून गेला, असे त्याला वाटले. त्याने प्रचंड शोक केला. काही दिवसांनी दु:खातून सावरत त्याने पुन्हा पूर्ववत आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांत त्याने पुन्हा झोपडी उभी केली. त्या आधी एका डब्यामध्ये झोपडीतील थोडी राख एकत्र केली. आपला मुलगा नव्हे तर किमान त्याची राख तरी आपल्यासोबत कायम राहील, असे समजून तो राखेचा डबा कायम स्वत:जवळ बाळगू लागला. अशातच काही वर्षे गेली.

एके दिवशी काम संपवून सकाळी-सकाळी तो राखेचा डबा घेऊन झोपडीत आला. झोपडीचे दार त्याने आतून बंद केले होते. त्याचवेळी दरोडेखोरांच्या तावडीतून सुटून त्याचा मुलगा त्याच्या दाराशी आला. बाहेरून जोरजोरात दार वाजवू लागला. "मी तुमचा मुलगा', असा आवाज देऊ लागला. मात्र आपला मुलगा तर केव्हाच मृत झाला आहे, असा समज करून बसलेल्या त्या व्यक्तीने स्वत:च्या मुलाकडेच दुर्लक्ष केले. शेजारच्या झोपडीतील मुले आपली गंमत करत असतील, असे समजून त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. खूप वेळ दार वाजवूनही दार न उघडल्याने मुलगा हताश होऊन पुन्हा दूर निघून गेला. बुद्धांची गोष्ट संपली होती. मात्र शिष्यांची विचारप्रक्रिया सुरू झाली होती. बुद्ध सांगू लागले, "पाहा, "आपला मुलगा मेला' हा समज त्या व्यक्तीच्या मनावर एवढा खोल रूजला होता, की कदाचित सत्य काहीतरी वेगळेच असेल आणि आपला मुलगा जिवंत असेल एवढा विचार करण्याचेही त्याला भान नव्हते. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही जे समजता तेच सत्य असते अशा भ्रमात राहु नका.'

Sunday, June 11, 2017

'आयटी'त जगण्याची मजा

मिटिंग संपली. पण तरीही तो ऑफिसच्या बाराव्या मजल्यावरील मिटिंग हॉलच्या खिडकीजवळ उभा होता. खिडकीतून दिसणाऱ्या निळाशार समुद्राकडे पाहत. काहीच विचार न करता शांतपणे. "साहब कोई मिलने को आया है आपको', सिक्‍युरिटी गार्डने हॉलमध्ये येऊन सांगितले. याला पुढचा कार्यक्रम आठवला. "यही भेज दो', याने ऑर्डर दिली. "मे आय कम इन सर', एका कोवळ्या तरुणाने अत्यंत नम्रपणे विचारणा केली. "येस. कम.' याने त्याला परवानगी दिली. नजरानजर झाली. याने तरुणाला बसण्याचा इशारा केला. दोघेही समोरासमोर बसले. "सो धिस इज युअर फर्स्ट डे इन धीस कंपनी', याने सुरुवात केली. "येस सर. ऍक्‍च्युली धीस इज माय व्हेरी फर्स्ट जॉब', त्याने खुलासा केला. पुढे काही क्षण शांततेत गेले. काही टेक्‍निकल प्रश्‍न विचारल्यावर नाव, गाव, घर आदींची विचारणा झाली. दोघेही एकाच जिल्ह्यातील निघाले. मग मराठीतच गप्पा सुरू झाल्या.

हा बोलू लागला. "काही वर्षांपूर्वी मी ही असाच तुझ्यासारखा एका कंपनीत इंटर्नशिपला गेलो होतो. तुझ्या मनात आता जे प्रश्‍न असतील तेच त्यावेळी माझ्या मनात होते', खिडकीतील समुद्राकडे पाहत तो सांगू लागला. "बट सर. माझ्या मनात काय प्रश्‍न आहेत हे तुम्हाला कसे समजले?', तरुणाने प्रश्‍न केला. "गुड क्वच्शन. अरे भावा, "आयटी'त पाच वर्षांपासून आहे. पण फक्त मशिनमध्ये नाही तर माणसांच्या मनामध्येही शिरायला शिकलो आहे', हा आता चांगलाच खुलला होता. "ओह! रिअली. सर, मला ना असं वाटायचं की "आयटी' काम करणारे इतर काही विचारच करू शकत नसतील', याने मनातील शंका बोलून दाखवली. त्यानंतर काही काळ शांतता पसरली. "आजपासून काम सुरू करण्याआधी एक लक्षात ठेव तू आयुष्यात कोणत्याही एरियात काम करत असशील तरीही तुझी विचार करण्याची नॅचरल पद्धत कधीही थांबवू नकोस. अर्थात ती थांबत नसतेच. अगदी कोणाचीही ती थांबत नसते. एखादा गुलामही त्याला हवा तसा विचार करू शकतो. पण बहुतेक जण स्वत:च्या विचारांना, भावनांना मनातल्या मनात दाबून ठेवत असतात आणि त्रास करून घेतात. कोठं तरी व्यक्त व्हायला हवं. कधी कधी आपण स्वत:जवळही व्यक्त झालं पाहिजे.', याने उत्तर दिले.

तरुण बोलू लागला, "सर ऍक्‍चुअली न कॉलेजमध्ये आणि घरी असताना मी आतापर्यंत खूप ठिकाणी ऐकलं आहे की "आयटी'त काम करणारे स्वत:ला ओव्हर स्मार्ट समजतात. ते सेल्फ ओरिएंटेड असतात. कोणाशी फार बोलत नाहीत. पण तुम्ही तर एवढे...', तरुणाला थांबवत तो म्हणाला, "कसं आहे की काहीही केलं तरीही हे जग नाव ठेवणारच. मी जगाला काय वाटतयं, त्यापेक्षा स्वत:ला काय वाटतयं; याचा जास्त विचार करतो.' "सॉरी सर, थोडं पर्सनल सांगतो तुमच्याबद्दल. तुमच्याकडे पाहून मला खूप प्राऊड फिल होत आहे. "आयटी'त खूप कटकटी असताना तुम्ही एवढे फ्रेश कसे?', याने पुन्हा प्रश्‍न केला. त्यानंतर काही काळ कोणीच काही बोललं नाही. "कटकटी म्हणजे काय?', त्याने प्रश्‍न विचारला. तरुण बावरला. "सॉरी सर', म्हणत त्याने चर्चा थांबवायचा प्रयत्न केला. "अरे, बोल रे बिनधास्त बोल. उद्यापासून आपली कधी भेट होईल काही सांगता येत नाही. तुला टीम असाईन केली की माझं काम संपलं...', तो आता चांगलाच खुलला होता. "ओके. म्हणजे सर, फॅमिलीला वेळ देणे, ऑफिसमधले पॉलिटिक्‍स, अपडेटस ठेवणे शिवाय बॅंकेचे प्रिमिअम्स, जॉब सिक्‍युरिटी वगैरे वगैरे', तरुणाने "कटकटी' सांगितल्या.

"सगळ्यात पहिल्यांदा या सगळ्या कटकटी आहेत हे म्हणणं सोडून दे. दुसरी गोष्ट हे सगळे प्रकार फक्त "आयटी'तील लोकांनाच फेस करावे लागतात हा भ्रमही काढून टाक. तुला एक सांगतो. मी इंटर्नशिपला एका कंपनीत गेलो, तिथं पहिल्याच दिवशी तिथल्या एकाने मला छान मेसेज दिला होता. आयटीत नक्की नोकरी कर. पण काही वर्षांसाठी. कर्जाच्या चक्रात अडकून राहून एसीमध्ये पिझ्झा खाण्यापेक्षा गावाकडे आईच्या हातची चुलीवरची भाकरी आयुष्यभर खाऊ शकशील एवढेच पैसे कमव. आयुष्य जगायला शिक, असं त्यानं मला सांगितलं होतं. बाकी टाईम मॅनेजमेंट केलं की फॅमिलीला वेळ देता येतो आणि कोणत्याही ऑफिसमध्ये पॉलिटिक्‍स वगैरे असतच रे. जगात कोठेही गेलास तरीही. अपडेटस ठेवणं ही आपल्या प्रोफेशनची गरज आहे. बॅंकेचे प्रिमिअम्स काय फक्त "आयटी'तल्यांनाच आहेत का? आणि जॉब सिक्‍युरिटी म्हणशील तर या क्षणाला भूकंप झाला आणि ही इमारत कोसळली तर... काय गॅरंटी माणसाच्या जगण्याची. मग जॉबची गॅरंटी कशाला हवी?', याने एका दमात खुलासा केला.

"सर, यु आर ग्रेट. सॅल्युट सर. बट सर, "आयटी'तल्यांना फॉरेनला जाण्याची संधी असते. पण...', तरुणाला पुन्हा थांबवत तो बोलू लागला, "पॉलिटिक्‍स वगैरे सोडून दे रे. इफ यू हॅव क्वालिटी, डेडिकेशन देन यू कॅन डू एनिथिंग. मी फक्त गेल्या सहा वर्षांपासून आयटीत नोकरी करतोय. ठरवलचं आहे की फक्त बारा वर्षे यात घालवायची. मग या काळात जे करता येईल, ते करायचं. क्वालिटी मेंटेन केली आणि पॉलिटिक्‍स वगैरे म्हणतात नं ते सुद्धा थोडं फार केलं. म्हणजे कोणाचं वाईट नाही केलं पण स्वत:ला संधी निर्माण व्हाव्यात असं वातावरण निर्माण केलं.' "म्हणजे', तरुणाला काही उमगलं नाही.

"म्हणजे, समजा तुझ्या टीम लीडरचं किंवा बॉसचं किंवा बॉसच्या बॉसचं दररोज कौतुक केल्यानं त्याला बरं वाटत असेल तर त्यात बिघडलं कुठं? कधी कधी समजा बॉसनं एखादं एक्‍स्ट्रा काम सांगितलं तर बिघडलं कुठं? मी तेच केलं. झालं माझी प्रगती होत गेली. गेल्या पाच वर्षातील माझी ही तिसरी कंपनी आहे. अर्धा डझन देशात जाऊन आलो आतापर्यंत. स्वत:चं घर, गाडी स्वप्न साकार झाली. मलाही फार फार तर सहा महिने झाले असतील या कंपनीत येऊन. पण एक केलं. कधी कोणाचं वाईट केलं नाही आणि कधी कोणाशी मतभेद निर्माण होऊ दिले नाहीत. थोडं फार ऍडजस्ट केलं. गॉसिपींग कधी केलं नाहीच पण गॉसिपींग करणाऱ्यांपासून दूर राहिलो', याने खुलासा केलं.

"मला आजही आठवतयं. माझ्या पहिल्या पगारात मी एका मंदिरात बोललेला नवस फेडायला गेलो होतो. पण तिथं याचना करणारे हात दिसले. दगडाच्या हातांपेक्षा माणसांच्या हातात नवसाचे पैसे दिले. काय आनंद झाला. त्याच दिवशी मी पहिल्यांदा माझ्या गावी बाबांच्या नावाने पाच आकड्यातील मनीऑर्डर पाठवली होती. मनीऑर्डर लिहिताना माझा हात थरथरत होता. तिकडं मनीऑर्डर घेताना आई-बापाचा हात थरथरत होता. मी दुसऱ्या एखाद्या फिल्डमध्ये गेलो असतो तर मी पहिल्याच पगारात कधीच पाच आकडी मनीऑर्डर नसतो पाठवू शकलो. शेवटी पैसा महत्त्वाचा आहे', याच्या डोळ्याच्या कडा एव्हाना पाणावल्या होत्या.

"मंदिरातील याचना करणारे हात आठवले किंवा कधी दिसले की स्वत:चा खूप अभिमान वाटतो. कधी कधी मित्र-मैत्रिणींना फायनान्शिअल अडचणी आल्या की ते माझ्याकडे येतात. जर मी "आयटी'त नसतो; तर मी त्या मित्र-मैत्रिणींच्या जागी असतो असा विचार करून मी त्यांना अगदी शक्‍य तेवढी मदत करतो. जगायला पैसा लागतोच. फक्त तो मिळवताना स्वत:तला "माणूस' जपायला हवा. माझे खूप मित्र वेगवेगळ्या फिल्डमध्ये काम करतात. पण सतत फिल्डला शिव्या घालतात. फिल्ड कोणतंही असो. "आयटी' किंवा अन्य कोणतंही ते आपल्या पोटापाण्याचं साधन असतं. एखाद्या ठिकाणी आपण किती वर्षे काम केलं; त्याही पेक्षा तिथं काम केल्याने आपण किती वर्षे स्वत:चा निर्वाह करू शकलो हे महत्त्वाचं असतं. आपल्या फिल्डवर आपली निष्ठा असावी. मी माझ्या फिल्डचा फुल रिस्पेक्‍ट करतो. म्हणून तर मला "आयटी'त जगायला मजा वाटते. प्रत्येकाने स्वत:च्या फिल्डमध्ये जगत असल्याची मजा घ्यायला हवी', त्याने डोळे पुसले.

"ग्रेट, ग्रेट, ग्रेट सर..', तरुण निशब्द झाला होता. "चल, तुझ्या पहिल्या टीमशी तुझी ओळख करून देतो', दोघेही मिटिंग हॉलच्या बाहेर पडले.
(Courtesy: eSakal.com)

Wednesday, March 29, 2017

तुम्हाला आवडतील असे पटकन वाचून होणारे विचार

तुम्हाला आवडतील असे पटकन वाचून होणारे विचार







Monday, December 12, 2016

'आयटी'ची नोकरी सोडून तो करतोय समाजसेवा!

एखाद्या तरुणाला आयुष्याबद्दल जेवढ्या अपेक्षा असाव्यात सर्वसाधारण तेवढ्या अपेक्षांसह तो दुष्काळग्रस्त मराठवाड्यातून पुण्यात आला. पुरेशा प्रयत्नानंतर त्याला चांगली नोकरीही मिळाली. नोकरीत जमही बसला. त्याला कविता करायची आवड होती. छोट्या-मोठ्या ठिकाणी कविता प्रसिद्धही होत होत्या. मात्र मनात कुठेतरी ‘आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो‘ हा विचार करून त्याला ‘आपण काहीच का करत नाही?‘ असा विचार स्वस्थ बसू देत नव्हता. तशातच एक-दोन महिन्यांनी तो आई-वडिलांना भेटण्यासाठी गावाकडे जात होता. भीषण दुष्काळामुळे मराठवाड्यातील बहुतेक भागात बारा महिने अठरा काळ बाया-पोरांना डोक्‍यावर हंडा घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागते. असंच एक भयाण दृश्‍य त्याच्या संवेदनशील मनावर खोल परिणाम करून गेलं. त्याच काळात भीषण दुष्काळामुळे गावातील काही शेतकरी आत्महत्या करत होते. काही कुटुंबे घर-दार, जनावरे सारं काही सोडून काम शोधण्यासाठी गाव सोडतानाही त्याला दिसली. ती कुटुंबे जिथे जाणार होती तिथे कदाचित त्यांना पोटाची खळगी भरेल एवढे उत्पन्न मिळणारही होतं. पण दारिद्य्राचा हा नकोसा वाटणारा वारसा शिक्षणाअभावी पुढील पिढीकडे जाणार होता. त्याने ठरवलं या लोकांच्या मुलांना शिकवायचं. मोठं करायचं. स्वत:च्या पायावर उभं करायचं आणि ते त्यानं केलंही...

मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्‍यातील अशोक बाबाराव देशमाने. वय वर्षे 27. शिक्षण एम.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स. पुण्यात लठ्ठ पगाराची आयटीतील नोकरी. मात्र मनातील खदखद स्वस्थ बसू देत नव्हती. बाबा आमटेंचे साहित्य बालपणापासून वाचल्याने त्याच्या मनावर खोल परिणाम झाला होता. सुदैवाने पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रकाश आमटेंची भेट झाली. अखेर त्याने ठरवले आपण काहीतरी करायचे. काहीतरी ठरवलं की संपूर्ण विश्व तुमच्या पाठीशी उभं राहतं, सारी सृष्टी मदतीला धावून येते.. त्याप्रमाणे त्याच्याही मदतीला त्याचा ‘भवताल‘ धावून आला. अखेर त्याने कामाची दिशाही ठरवली. आत्महत्याग्रस्त, स्थलांतरित, आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल घटकातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारण्याचा, त्यांना ‘मोठं‘ करण्याचा खडतर मार्ग त्याने पत्करला. त्यासाठी ‘
स्नेहवन‘ नावाच्या संस्थेची नोंदणी केली. हे सारं करत असताना नोकरी सुरूच होती. मग शोध घेतला मराठवाड्यातील गरजवंत विद्यार्थ्यांचा. विद्यार्थीही मिळाले. आता जागेचा प्रश्‍न होता. भोसरीतील अनिल कोठे या सद्‌गृहस्थानं कोणतीही भाडे अगर अनामत रक्कम न घेता 1000 स्क्वेअर फुटाची बांधलेली प्रशस्त जागा वापरण्यास उपलब्ध करून दिली. शिवाय मित्रांची मदत सुरूच होती.

आता त्याचा मार्ग तयार झाला होता. मग त्याने याच कामात आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय घेतला. घरीही तो निर्णय बोलून दाखवला. त्याच्या घरात धार्मिक वातावरण असल्याने, वडिल संतसाहित्याने प्रेरित असल्याने हा खडतर कठीण मार्ग त्यांनाही आवडला. अर्थात एवढा मोठा पसारा वाढवताना त्यांना थोडीशी चिंता होतीच मात्र सुपुत्रावर विश्‍वास दाखवत त्यांनीही तोच मार्ग पत्करला. भोसरीतील ‘स्नेहवन‘मध्ये त्याच्याकडे आता 9 ते 14 वयोगटातील 17 मुलांचे पालकत्व आहे. त्यामध्ये बीड, जालना, हिंगोली, औरंगाबाद, परभणीसह हिंगोली जिल्ह्यातील मुलांचाही समावेश आहे. काही मुलांच्या कुटुंबाची तर एवढी बिकट अवस्था होती की त्यांच्या आई-वडिलांना ‘स्नेहवन‘मध्ये मुलाला सोडवायला येण्यासही प्रवास खर्चासाठीही पैसे नव्हते. अशावेळी अशोकने पोस्टाने पैसे पाठवून मुलांना ‘जवळ‘ केले. या मुलांना भोसरीतीलच शाळेत प्रवेशही मिळवून दिला आहे. आपला मुलगा चांगल्या माणसाच्या हाती लागला याचा आनंद त्या मुलांच्या पालकांना आहे.

अखेर काही महिन्यांपूर्वीच त्याने ‘आयटी‘तील लठ्ठ पगाराची नोकरी सोडली. जेवढा पगार त्याला महिन्याला मिळत होता त्यापेक्षा अधिक खर्च त्याला सध्या महिन्याला येत आहे. तरीही आपण समाजासाठी काहीतरी करत आहोत, त्यामुळे समाजही या मुलांसाठी काहीतरी करेल याच आशेवर त्याने एवढा सारा पसारा वाढवला आहे. त्याची आई सत्यभामा या दररोज एवढ्या साऱ्या मुलांचा चहा-दूध, नाष्टा, जेवण करतात. वडील मुलांना सांभाळतात. त्यांचा अभ्यास घेतात. अशोककडे असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे काहीतरी कौशल्य आहे. कोणी गाणे छान गातो. कोणी उलटी कोलांटउडी मारतो. कोणी स्वयंपाक छान करतो. तर कोणी छान-छान चित्रे काढतो. प्रत्येकातील प्रतिभेला आणि कलेला जागृत ठेवण्याचा तो प्रयत्न करतो. माहिती तंत्रज्ञानाच्या जगात या मुलांनी टिकाव धरावा म्हणून तो सर्वांना संगणक प्रशिक्षण देतो. त्यासाठी समाजातीलच एका बांधवाने त्याला संगणक भेट दिले आहेत. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत त्यासाठी आहे त्या जागेतच त्याने जमेल तेवढी पुस्तके जमवून ग्रंथालय तयार केले आहे. विद्यार्थ्यांची दिनचर्याही ठरलेली आहे. मुलेही अगदी आनंदाने राहतात. शिकतात. ‘आयुष्यात काहीही झाले तरी खोटे बोलायचे नाही‘ हा संदेश तो सर्वांच्या मनावर रुजविण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे सोबत राहत असल्याने कधी एखाद्याचे भांडण झाले तर संध्याकाळी ते प्रामाणिकपणे अशोककडे त्याची कबुली देऊन त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतात. सर्व मुले ज्या शाळेत जातात तेथील शिक्षकांनाही या मुलांच्या हुशारीचे कौतुक वाटते. अशोक वडील बाबाराव यांनी मुलांना 30 पर्यंत पाढे शिकविले. त्याही पुढे जाऊन एका मुलाने तर 32 पर्यंतचे पाढे तयार केले आणि ते पाठही केले आहेत. ज्यावेळी ‘हरवले आभाळ ज्यांचे, हो तयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना, हो तयांचा सारथी‘, अशी प्रार्थना ज्यावेळी ‘स्नेहवन‘मधील विष्णू नावाचा बारा वर्षांचा मुलगा म्हणतो त्यावेळी संवेदनशील व्यक्तीच्या हृदयात कालवाकलव झाल्याशिवाय राहत नाही.

या सर्व विद्यार्थ्यांचा महिन्याचा खर्च 50-60 हजार रुपये असल्याने अशोकला मदतीसाठी सतत धावाधाव करावी लागते. सोबत आई-वडील मुलांकडे लक्ष देतात. अशा परिस्थितीत ज्यावेळी तो 50 हजार रुपये मिळवितो त्यावेळी फक्त पुढील एका महिन्याची सोय झालेली असते. त्यामुळे अशोकला सतत आर्थिक चिंता सतावत असते. एकप्रकारे समोर अंधार दिसत असताना अशोक मनातील आशेचा प्रदीप घेऊन पुढे जात आहे. त्याला गरज आहे समाजाच्या मदतीची. 

‘मी ज्यावेळी गावाकडे गेलो त्यावेळी भीषण दुष्काळामुळे 100 रुपयांसाठी लोक 3-4 एकर जमीन सोडून जात होते. सोबत त्यांची मुलेही होती. ती मुले तशीच शिक्षणाअभावी जगणार होती आणि दारिद्य्रात आयुष्य काढणार होती. त्यामुळे मी अस्वस्थ झालो. त्याचवेळी मी त्यांना शिक्षण देऊन सक्षम करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच ‘स्नेहवन‘चा जन्म झाला. नोकरीतील सारी बचत मी ‘स्नेहवन‘साठी खर्च केली आहे. आता मित्रांच्या, समाजातील दानशूरांच्या मदतीने मी हे सारे काम पुढे घेऊन जात आहे.‘
- अशोक बाबाराव देशमाने

‘यापैकी काही मुले आर्थिकदृष्ट्या एवढी दुर्बल होती की, त्यांच्या पालकांना येथे आणून सोडणेही शक्‍य नव्हते. त्यावेळी आम्ही त्यांना पोस्टाने पैसे पाठवून बोलावून घेतले. आता ही मुले येथे आनंदाने राहतात. खेळतात. शिकतात. ती मोठी होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.‘
- बाबाराव देशमाने, अशोकचे वडील

‘सतरा मुलांचे पालकत्व स्वीकारल्याने यावर्षी गणेशोत्सादरम्यान येणाऱ्या महालक्ष्मीचीही (गौरी) स्थापना करता आली नाही. मात्र, लहान-लहान, निराधार, निरागस मुलांना सांभाळल्याने आम्हाला त्याची खंत महालक्ष्मी न केल्याची खंत वाटत नाही. शेवटी ‘मनुष्यसेवा हीच ईश्‍वरसेवा‘ यावर आम्हा सर्वांचा विश्‍वास आहे.‘
- सत्यभामा देशमाने, अशोकची आई

स्नेहवन संस्थेच्या बॅंक खात्याचा तपशील
Current Account Name : Snehwan
Branch Name : Pimpri Town
MICR : 411002019
Swift Code : SBININBB200
Bank Name : State Bank of India
Account Number : 35517151681
Branch Code : 05923
PAN : AAQTS5600L
IFSC Code : SBIN0005923

(Courtesy: eSakal.com)

Friday, December 09, 2016

'लग्नानंतर 'डस्टबीन' कोठे ठेवणार?'

"या मुलींना राव काही कळतच नाही. काय बोलावं, कसं बोलावं. कुठं बोलत आहोत. याचं त्यांना भान नसतं‘, तो प्रचंड त्रागा करत हॉस्टेलच्या खोलीत पोचला. हॉस्टेलच्या खोलीत चार जण होते. "आयला, आधी काय झालं ते तरी सांग की राव...‘ एकाने विचारले. "अरे, नेहमीप्रमाणे एक पोरगी आलती बघायला. डायरेक्‍ट विचारती राव लग्नानंतर "डस्टबिन‘ कोठे ठेवणार?‘ त्याने स्पष्ट केले. "साधी गोष्ट हाय राव. एवढं ओरडायला काय झालं मग.. "डस्टबिन‘ कोठे ठेवतात एवढी अक्कल नाही अन्‌ चाललाय लग्नाच्या बोहल्यावर चढायला‘, एकाने त्यालाच झापलं. "अरे, भावा पण ती "डस्टबिन‘ कोणाला म्हटली माहितेय का?‘, त्याचा आवाज चढला. "आमाला काय माहित. सांग की तूच!‘, एकाने त्याला प्रत्युत्तर दिले. "माझ्या आई-बाबांना म्हटली ती "डस्टबिन‘..‘, त्यानंतर काही क्षण खोलीत शांतता पसरली. "अरे, सगळ्यात हाईट म्हणजे ती आमच्या घरी आली होती. आम्ही एका खोलीत बसलो होतो. त्याच खोलीत जरा शेजारी आम्हाला दोघांना बोलायला सांगितले. तिने मुद्दाम सगळ्यांना ऐकू जाईल एवढ्या आवाजात विचारलं लग्नानंतर "डस्टबिन‘ कोठे ठेवणार?‘, त्याने अधिक विस्ताराने सांगितले. पुन्हा काही वेळ शांतता पसरली. 

"अरे, छोड दे ना यार... नको करू लग्न त्या पोरीशी नायतर करूच नको लग्न...‘, एकाने त्याला पुन्हा छेडले. "गप रे. एवढा सिरीयस विषय आहे. अन तू..‘, एका समजूतदार रूममेट म्हणाला. "काय आहे की अलिकडच्या मुलींवर जसे संस्कार झालेत किंवा त्या ज्या कल्चरमध्ये वाढल्या आहेत ना त्यामुळं त्यांनी काही शब्द तयार केले आहेत. आता हे खरंय की त्यांनी असे शब्द चार-चौघात बोलायला नको होते. आपल्या आई-बापाला असं कोणी बोललं तर वाईट वाटत नॅचरल आहे. पण त्या गोष्टीचा आपल्यालाच त्रास होणार. त्यामुळे अशा गोष्टी सोडून द्यायच्या. ती, तिचे शब्द अन्‌ तिचं आयुष्य. ती तिचे बघून घेईल. आपण आपले बघायचे‘, समजूतदार पार्टनरने समजावणीच्या स्वरात सांगितले. आता पुन्हा काही काळ शांतता पसरली. 

"खरं आहे राव. पण मुली असं कसं बोलू शकतात‘, व्यथित झालेला मित्र पुन्हा बोलू लागला. "अरे. पुन्हा तेच. त्यांची तसे कल्चर असेल. त्यांची तशीच थिंकिंग असेल. त्यांना लग्नानंतर आई-वडिलांना वेगळे करायचे असेल. त्यांना नवऱ्यासोबत स्वतंत्र राहायचे असेल. तो त्यांचा प्रश्‍न आहे आणि त्यांनी तसा विचारच करू नये का? अर्थात तो चांगला आहे की वाईट ती गोष्ट वेगळी.‘, समजूदार ‘पार्टनर‘ अधिक खुलून बोलू लागला. 
 
"तुला आणखी एक गोष्ट सांगतो. माझ्या भावासाठी मी मुलगी पाहात आहे. सहज काल एका मॅट्रिमोनियल साईटवर एका मुलीची माहिती दिसली. फार इंटरेस्टिंग वाटली मला. ती मुलगी घटस्फोटित होती. तिने स्पष्ट लिहिले होते की, लग्नानंतर मंगळसूत्र, साडी, बांगड्या वगैरे वगैरे घालण्याचा आग्रह करायचा नाही. ती सोशल ड्रिंकर होती. विशेष म्हणजे तिने लग्नानंतर एक मुलगी दत्तक घेणार असल्याचे लिहिले होते. शिवाय तिला वर्कहोलिक नवरा नको होता. मजा आली मला प्रोफाईल वाचून.‘ आता दुसरा एक रूममेट बोलू लागला, "डेंजर परिस्थिती आहे.‘ 

"बाबांनो, डेंजर वगैरे काही नाहीए रे. फक्त काय आहे की आपण जे पाहतो आणि अनुभवतो त्यावरून आपण तर्क लावतो आणि निष्कर्ष काढून शिव्या घालू लागतो. आजही बघा जरा शोधा काही अशाही मुली आहेत की त्यांना घरात बसून सासू-सासऱ्यांची सेवा करायची आहे. काही मुलींची जॉईंट फॅमिली ही अट आहे. काहींना गावाकडे मस्त वाडा असणारा मुलगा हवा आहे. आणि तुम्ही मुलींच्या अँगलनी विचार करा. ती तिचं सगळं तुम्हाला देणार असते. मग जर तिची काही अपेक्षा असणारच. अर्थात ती तुम्हाला पटेल की नाही हा वेगळा विषय आहे आणि हजारात एखादी मुलगी असा "डस्टबिन‘ शब्द बोलते. त्यामुळे काय आहे की असे वेगळे अनुभव आले की व्यथित न होता, त्रास करून न घेता. शांतपणे त्या अनुभवांना सामोरं जायला हवं ना...‘, समजूतदार पार्टनरने आपले म्हणणे पूर्ण केले. 

(Courtesy: eSakal.com)

Thursday, December 08, 2016

'पगारापेक्षा जास्त काम करा!'

खूप दिवसांनी विद्यापीठाच्या कॅंटिनला सगळे एकत्र आले होते. "जाम वैतागलो राव. काम करून करून. कामातच जिंदगी जाते की काय असं वाटतं राव कधी कधी?‘, एकाने मनावरचा ताण हलका केला. "वर्क इज लाईफ है डिअर‘, दुसऱ्याने त्याला समजावलं. "काय घंटा वर्क? आयला जे करतात तेच करत राहतात. जे करत नाहीत ते निवांत..‘, एका त्रस्त मित्राने त्रागा केला. पुन्हा पहिला मित्र बोलू लागला, "खरयं खरयं. अगदी खरयं. बघा नेत्यांना दुप्पट पगारवाढ, गव्हर्नमेंटवाल्यांना पे कमिशन आणि आपल्याला काय? वर्षाकाठी किरकोळ वाढ फक्त...‘ त्याच्या मतावर सगळ्यांनीच सहमती दर्शविली. त्यानंतर थोडा वेळ शांतता पसरली.

"पण काही म्हणा राव जो पगारापेक्षा जास्त काम करतो ना त्योच जातो पुढे...‘, मघापासून शांत असलेल्या एका मित्राने सुरुवात केली. "अरे भवड्या, तुला पगार किती? तू बोलतो किती? त्याच्यामुळेच तुझ्यासारखी माणसं मागे असतात. नुसतं काम अन नुसत्या गप्पा‘, एकाने त्याला खडे बोल सुनावले. "हा हा असला तुमचा ऍटिट्युड आहे ना. त्यामुळे तुम्हाला काम करायला त्रास होतो!‘, शांत मित्र चांगलाच पेटला. "बरं! मग तुझ्या म्हणण्यानुसार आठ तासाऐवजी 16 तास काम करू का? 8 तासाच्या पगारात?‘, पुन्हा वाद पेटला. "मी तसं थोडचं म्हटलोय. पण हा काम करत नाही. तो काम करत नाही. म्हणून आपण त्रास का करून घ्यायचा. आपण आपलं आठ तास काम प्रामाणिकपणे करावं‘, शांत मित्राने स्पष्ट केलं. "प्रामाणिकपणा म्हणजे पगारापेक्षा जास्त काम असा होत नाही ना पण?‘, त्याला पुन्हा उचकवण्यात आलं. "हे बघा मित्रांनो, मी तुम्ही कामचुकार आहात असं म्हणत नाहीए. पण नोकरीत एक असतं. तुम्ही जिथं काम करता ना तिथं तुमच्या कामावर कोणाचं तरी लक्ष असतं. कधी कधी तुम्हाला त्याचं ऍप्रिसिएशनही मिळू शकतं. बऱ्याचदा ही गोष्ट तुम्हाला माहित नसते‘, त्याने पुन्हा फिलॉसॉफी मांडली. "बरं! आहे लक्ष आमच्यावर. काय उपयोग? आणि जे काम करत नाहीत त्यांच्यावर कोण लक्ष देणार?‘, मित्राने प्रश्‍न उपस्थित केला. "त्यांच्याकडेही लक्ष असतं. पण त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्यायची गरज काय? त्यांची लाईफ, त्यांचं काम ते बघून घेतील. काम करत नसल्याचा त्यांना कधी तरी त्रास होणारच आहे‘, शांत मित्राने शांतपणे सांगितले. "बरं. पण मग पगारापेक्षा जास्त काम करून काय उपयोग? पगार तर तेवढीच मिळणार ना! आणि हॅट्रिक म्हणजे हे काम न करणारे लोकच सगळे काम करत असल्याचा आव आणत असतात‘, त्याच्याशी संवाद वाढविण्यात आला.

"मित्रांनो, कसं आहे. की आपण आपल्याला जितका पगार मिळतो तेवढं काम करू असं म्हणतो. पण वास्तविक आपण आजूबाजूच्या काम न करणाऱ्यांकडे बघून तेवढं काम पण करत नाहीत. मात्र तुम्ही कुठंही बघा. ज्याने पगाराच्या आकड्याकडे न बघता पगारापेक्षा जास्त काम निष्ठेने आणि अत्यंत प्रामाणिकपणे काम केले त्याच्याच कष्टाचे कुठेतरी चीज झाले आहे. फार कमी काळात तो माणूस पुढे गेलेला आहे. जरा डोळे उघडे ठेवून तुमच्या आजूबाजूला बघा‘, शांत मित्राने पुन्हा शांतपणे सांगितले. "बरं, पण कधी कधी होतं की लक्ष ठेवणाऱ्यालाच पटवण्याचा प्रयत्न केला जातो‘, पुन्हा प्रतिप्रश्‍न आला. "हे बघा. लाईफ म्हटलं की या साऱ्या बारा भानगडी आल्याच. त्यातच नोकरीत सगळीकडे हीच परिस्थिती आहे. आणि समजा, तुम्ही खूप खूप कष्ट केलेत आणि त्याचे काहीच फळ मिळाले नाही, तर तुम्हाला तुमच्या कामाच्या अनुभवाचा फायदा तर होईलच ना दुसरीकडे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापैकी कशाचाच फायदा झाला नाही तर तुम्हाला काम केल्याचा जो आनंद मिळेल, त्यातून जे समाधान मिळेल. ते कदाचित आयुष्यभर मेडिटेशन केल्यानंतर मिळणाऱ्या शांती आणि समाधानापेक्षा कमी नसेल. मात्र हे आयुष्याच्या शेवटी समजून येईल‘, शांत मित्राने दीर्घ भाषण केलं.

"अबे, पण समाधानाला घेऊन काय करायचं आहे? जिंदगीत पैसा महत्त्वाचाए!‘, एकाने त्याला पुन्हा उचकावले. "हे बघा तुम्हाला ऐकायचे की नाय ते तुमचे तुम्ही ठरवा. तुम्ही कामचुकारपणाही करू शकता. तुम्ही लक्ष ठेवणाऱ्याला पकडून पटवूही शकता. त्यातून तुम्ही नोकरी टिकवत आयुष्य कसेबसे निभावून न्यालही. पण जेव्हा हातात काठी येईल आणि डोक्‍यावरचे केस मार्गस्थ होतील तेव्हा कळेल आयुष्यभर काहीच केलं नाही ते!‘ त्याच्या या वाक्‍यानंतर सगळीकडे शांतता पसरली.

Tuesday, December 06, 2016

'...म्हणून जग टिकून आहे आज'

‘आई मला शाळेचं नवीन दप्तर आणायचं हाय‘, ती काही दिवसांपासून हट्ट करत होती. "घीऊ लवकर‘ असं म्हणत तिने रोजच्याप्रमाणे मुलीचे समाधान केले. तिचा नवरा भाड्याची रिक्षा चालवत होता. तर ती आजूबाजूच्या काही घरात धुणं-भांडे करत हातभार लावत होती. दोघांचे उत्पन्न मिळून कसाबसा संसार पुढे जात होता.

एका इमारतीतील सहाव्या मजल्यावरील घरातील कामवाली गेल्या काही दिवसांपासून येत नव्हती. कामवालीशी संपर्कही होत नव्हता. त्यामुळे तिच्याकडे विचारणा झाली. काम देणारे कुटुंब सधन होते. त्यामुळे मोबदलाही चांगला मिळणार होता. नवे काम मिळाल्याने चिमुकलीला भारीचे दप्तर घेता येणार होते. शिवाय काही बचतही शक्‍य होणार होती. त्यामुळे तिने अगदी आनंदाने काम करण्यास होकार दिला. दुसऱ्याच दिवसापासून व्यवहाराच्या गोष्टी झाल्यावर ती कामावर रूजू झाली. दोन दिवस छान काम चालले. दरम्यान तिने चिमुकलीला आश्‍वासन दिले "येणाऱ्या पगारात तुला नवं कोरं दप्तर घ्यायचं‘! नेमकेपणाने उत्तर मिळाल्याने चिमुकलीही महिना संपण्याच्या प्रतिक्षेत होती.

नेहमीप्रमाणे तिसऱ्या दिवशी ती कामाला निघाली. सहाव्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टमध्ये बसली. सोबत आणखी दोन महिला लिफ्टमध्ये आल्या. त्या दोन महिलांचा संवाद सुरू झाला. "अगं धीर सोडू नगं. मी सांगत्ये मॅडमला. त्या लई चांगल्या हायेत‘, एक महिला बोलली. त्यावर दुसरी महिला म्हणाली, "अगं खरंय! पर आता ह्या सहाव्या मजल्यावरील मॅडमनीबी नवी बाई ठेवली असल तर कामाला. कसं काय होईल काय माहित? इन-मीन चार घरात कामं करत होती. कसंबसं चाललं होतं. मध्येच ह्यो दवाखाना माझ्यामागं लागला अन समदी कामं गेली. अन कळवलंबी नाय गं म्या‘, असं म्हणत त्या महिलेला डोळ्यातील अश्रू अनावर झाले. तोपर्यंत सहावा मजला आला. तिघीजणी एकाच घरात आल्या.

घरातील मॅडमनी दार उघडले. समोर तिघी उभ्या. आधीच्या आणि नव्या कामवालीला एकत्र पाहून मॅडमला आश्‍चर्य वाटले. त्यांना काय करावे काहीच समजेना. त्यांनी सगळ्यांना आत घेतलं. पहिल्या कामवालीला मॅडम म्हणाल्या, ‘काय गं तुझा पत्ताच नाही. काही कळवायचं तरी किमान. तुझी वाट बघून शेवटी मी हिला ठेवलं कामावर‘, मॅडमनी खुलासा केला. त्यावर पहिल्या कामवालीला फारच वाईट वाटलं. तिला काय बोलावे तेच समजेना. तिच्या डोळ्यांच्या कडा पुन्हा ओल्या झाल्या. ही सारी अवस्था पाहून नव्याने कामाला रूजू झालेली ती बोलू लागली, "मॅडम ह्या पहिल्या बाईलाच ठेवा कामावर. तिला लय गरज हाय कामाची. मला काय माझ्याकडं हायेत कामं पोटापुरती...‘, असं म्हणत मॅडमचं काहीही न ऐकता किंवा मागच्या दोन दिवसांचा पगारही न मागता ती घराबाहेर पडली.

चिमुकलीच्या नव्या दप्तराचं स्वप्न सोबत घेऊन जात असलेल्या तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत पहिल्या कामवालीचे आपोआपच हात जुळले. हे सारं पाहून काम मॅडम म्हणाल्या, "काय बाई आहे बघ! एकीकडे कामं मिळवण्यासाठी सगळं जग धडपडतयं. एकमेकांचे पाय खेचतयं. आणि ही बाई चक्क काम सोडून गेली. ते पण तुझ्यासारख्या अनोळखी बाईसाठी. धन्य आहे ती! बघ ही अशी माणसं आहेत ना म्हणून जग टिकून आहे आज..‘

Monday, December 05, 2016

...जसं वाटतं तसं जगायला हवं!

कंपनीच्या आवारात रोज रात्री एक आलिशान चारचाकी गाडी यायची. रात्री उशिरा गाडी यायची. गेल्या अनेक दिवसांपासून ती गाडी पार्किंगमध्येच दिसत होती. ही गोष्ट कंपनीच्या कॅम्पस मॅनेजरच्या लक्षात आली. त्याने वॉचमनला विचारले. "रोज रात्री येते ती गाडी. त्यात कोणीतरी असतं बहुतेक.‘, वॉचमनने माहिती दिली. मॅनेजरने संबंधित गाडीबाबत सविस्तर माहिती काढली. ती गाडी एका महिला एम्प्लॉयीची असल्याचे आढळून आले. संबंधित महिलेच्या विभागाला याबाबत विचारणा करण्यात आली. विभागाने टीमलिडरने काही दिवसांत रिप्लाय देतो, असे कळविले. ती महिला कामात अगदी तत्पर होती. गेल्या दोन वर्षांपासून ती कंपनीत काम करत होती. तशी ती कामात हुशार होती. बऱ्याचदा ती ड्रिंकही करत होती. त्याने महिलेशी अनफॉर्मल चर्चा करण्याचे ठरविले.

त्यानंतर एक-दोन दिवसांनी लिडरने खास सबंधित महिलेला कॅंटिनमध्ये कॉफी प्यायला नेले. दोघेही कॅंटिनमध्ये आले. ऑफिसच्या कामाच्या गप्पा झाल्यानंतर लिडरने मुद्याला हात घातला, "तू राहतेस कुठे?‘ यावर तिने दीर्घ श्‍वास घेतला आणि म्हणाली, "होता एक फ्लॅट माझा. पण आता नाहीए. नुकताच विकला तो.‘ "मग काय भाड्याने राहतेस?‘, लिडरने प्रतिप्रश्‍न केला. ती एकदम गप्प झाली. त्यावर लिडरच पुन्हा बोलू लागला, "हे बघ. तू कुठेही राहिलीस तरी काहीही फरक पडत नाही. फक्त जिथे राहशील तेथे तुला चांगला आराम मिळायला हवा. कारण आराम केलास तरच तुला कामावर लक्ष देता येईल?‘ त्याने आपले बोलणे संपविले. पुन्हा काही काळ शांतता पसरली. ती किंचित जोरात बोलू लागली, "म्हणजे आता मी कामावर लक्ष देत नाही असे वाटते का तुला?‘ ‘तसे नाही गं! पण तुला आराम मिळायला हवा व्यवस्थित ना! पुढे आपल्या टीमकडे एकाच वेळी दोन-तीन प्रोजेक्‍टवर नजर ठेवण्याची जबाबदारी येणार आहे. म्हणून...‘ लिडरने स्पष्ट केले. "मी नुकतीच एक माझी आवडती कार घेतली आहे. त्यातच राहते!‘, तिने खुलासा केला.

"म्हणजे?‘, लिडरने काही समजले नाही. "म्हणजे बघ. दिवसभर ऑफिसला कामात असते. त्यानंतर रात्री थोडीफार शॉपिंग वगैरेसाठी बाहेर जाते आणि बाहेरच डीनर वगैरे करून पुन्हा कार ऑफिसला आणून त्यातच झोपते‘, तिने सगळचं स्पष्ट सांगितलं. "पण...!‘, लिडरने प्रश्‍न विचारायचा प्रयत्न केला. "मला माहिती आहे तुम्हाला खूप प्रश्‍न पडले असतील. मी मुलगी. एकटी. कारमध्ये राहते. घर नाही. कपडे वगैरे? अरे, ऍडजस्ट केलं की सगळं ऍडजस्ट होतं!‘, तिने आणखी गूढ निर्माण केलं. "म्हणजे जरा समजून सांग की!‘, लिडरने तिला आणखी बोलते केले. ती बोलू लागली, "म्हणजे मी ऑफिसला फ्रेश होते आणि कारमध्ये झोपते. बाहेर जेवते. फ्लॅट घेतला होता. पण माझी कार मला फार आवडते. घराचे कर्ज होते. घर विकून ते संपवले आणि आता नवे कर्ज घेऊन आवडती कार घेतली. आता तिच माझं आयुष्य आहे.‘

लिडर गोंधळात पडला, "ए, काहीतरी गंमत करू नकोस बरं!‘ "अरे गंमत कसली? हेच खरं आहे. काय लागतं जगायला माणसाला? मी तुम्हा साऱ्यांना आय मिन जगाला जसं वाटतं तसं जगत नाही, तर मला जसं वाटतं तसं जगते. जगात सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना ते असं आपल्या मनासारखं जगता येत नाही त्यामुळे निर्माण होतात. हा फक्त एवढंच आहे की आपल्या एखाद्या ऍक्‍शनमुळे कोणाला काही प्रॉब्लेम होऊ नये एवढं बघायला हवं. ही महागडी पण आवडती कार घेणं माझं स्वप्न होतं ते मी माझ्या हिमतीने पूर्ण केलं आहे. बस्सं...! माय लाईफ, माय रूल्स!! आता माझ्या घराचं म्हणशील तर माझं घर इथून खूप दूर आहे. त्यांना मी इथे नोकरी करते एवढच माहिती आहे. बाकी काही त्यांना मी सांगत नाही. जरा वेगळं आहे हे सगळं. पण जगण्याची ही माझी पद्धत आहे. ऑफिसमध्ये जर रोज पार्किंग करण्याबद्दल कोणी काही म्हटलं तर तसं मला स्पष्ट सांग. मला तुला प्रॉब्लेममध्ये टाकायचं नाहीए. मी करेल दुसरीकडे पार्किंग...‘, तिने एका दमात सगळाच खुलासा केला.

हे सगळं ऐकून आयुष्याकडे बघण्याच्या तिच्या दृष्टिकोनाबद्दल काय बोलावे, हेच त्याला कळेनासे झाले

Friday, December 02, 2016

'या हयातीत तुमचे घर होणार नाही!'

ते दोघे कॉलेजपासून चांगले मित्र होते. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची म्हणावी अशीच होती. तरीही ते कुटुंबियांसोबत खाऊन-पिऊन सुखी होते. दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत होते. आपापल्या क्षेत्रात ते निष्णात आणि प्रामाणिक होते. आता ते दोघेही नोकरीच्या निमित्ताने एका मोठ्या महानगरात स्थिर होत होते. स्थिरतेच्या व्याख्येतील "घर‘ नावाची महत्त्वाची गोष्ट त्यांच्याकडे अद्याप नव्हती. त्यांना ती फारच आवश्‍यक वाटत होती. त्यासाठी त्यांनी आवश्‍यक ते प्रयत्न सुरू केले. मात्र त्यांचा पगार बॅंकेच्या कर्जासाठीच्या किमान अपेक्षेपेक्षा कमी होता. त्यांना हे माहिती होतेच. मात्र तरीही त्यांचे प्रयत्न सुरूच होते.



चौकशी करता करता एकेदिवशी एका लोकप्रिय आणि मोठ्या बॅंकेत त्यांनी गृहकर्जासंबंधी माहिती घेण्यासाठी भेट देण्याचे धाडस केले. दोघेही बॅंकेच्या अधिकाऱ्याच्या दालनात आले. अधिकाऱ्याने चांगले स्वागत केले. सर्व माहिती देण्यात आली. "तुमची पे-स्लिप सोबत आहे का?‘, अधिकाऱ्याने प्रश्‍न केला. "हो‘ म्हणत दोघांनीही आपापल्या पे-स्लिप अधिकाऱ्याला दाखवल्या. अधिकाऱ्याचा चेहरा एकदम उतरला. तो म्हणाला, ‘तुम्हाला एक सल्ला देतो. तुम्ही आपलं भाड्याच्या घरात आयुष्य काढा. एवढ्या पगारात या शहरात तुमच्या हयातीत तुमचं घर होणं शक्‍य नाही. कशाला या भानगडीत पडता.‘ दोघेही एकदम अस्वस्थ झाले. धीर करत एक मित्र म्हणाला, ‘पण...‘ त्याला मध्येच थांबवत अधिकारी म्हणाला, "अहो, भाड्याच्या घरातच राहायचे आणि करार वाढवत राहायचे. दोन-तीन वर्षांनी घर बदलायचे. त्याला पर्याय नाही. शेवटी जगणं महत्त्वाचं आहे. स्वत:चं घर काय आणि भाड्याचं काय?‘ आणखी अस्वस्थ होत दोघेही मित्र काहीही न बोलता बाहेर पडले.



या घटनेनंतर दोन वर्षांनी पुन्हा ते दोघे अतिशय आनंदात त्याच बॅंकेच्या त्याच अधिकाऱ्याकडे पेढे घेऊन आले. पुन्हा त्याच दालनात दोन वर्षांपूर्वीचे दृश्‍य. "पेढे घ्या पेढे!‘, अधिकाऱ्याला दोघेही जण पेढे देऊ लागले. "अभिनंदन! पण कसले पेढे? आपण ओळखतो का?‘, अधिकाऱ्याने प्रश्‍न केला. "साहेब, दोन वर्षांपूर्वी तुमच्याकडे गृहकर्जाची चौकशी करायला आलो होतो. त्यावेळी आम्ही आमच्या हयातभर स्वत:चे घर घेऊच शकत नाहीत असं तुम्ही म्हणाला होतात. याच हयातीत आम्ही आमचे घर केले आहे. हे पेढे आमच्या घराचेच‘, दोघांपैकी एकाने खुलासा केला. त्यावर अधिकाऱ्याने "अभिनंदन! अभिनंदन!!!‘ म्हणत त्यांचे स्वागत केले. "पण एक सांगा. तुम्ही त्यावेळी आम्हाला एवढ्या निगेटिव्ह भाषेत का सांगितले होते? तुम्ही तर बॅंकेचे अधिकारी! तुम्हाला तर गृहकर्ज देण्यात अधिक रस असतो ना?‘, एका मित्राने प्रश्‍न केला. "छान प्रश्‍न विचारलात. त्यावेळी जर मी तुम्हाला तसं म्हणालो नसतो तर आज तुमचे स्वत:चे घर झालेच नसते. माणसाच्या मनातील पॉझिटिव्ह विचारांना कधी कधी निगेटिव्ह विचार पुढे ढकलत असतात. खरोखरच तुम्ही ज्यावेळी लोनच्या चौकशीला आला होता त्यावेळी तुमच्या पगारात तुम्हाला कोणत्याच बॅंकेने कर्ज दिले नसते. पण मग तुम्ही पगार कसा वाढवलात? काय केलेत?‘, अधिकाऱ्याने प्रश्‍न केला. "तुम्ही आमच्या पगारावर इतके निगेटिव्ह बोललात की त्यानंतर काही दिवस आम्ही दोघेही बेचैन होतो. खूप विचार केला आम्ही. काय करता येईल. मी नवी नोकरी शोधली आणि याने "नोकरी सोडणार‘ म्हटल्यावर त्याला आहे तिथेच पगार वाढवून मिळाला आणि आमचा पगार "कर्जपात्र‘ ठरला. आज आम्ही तुम्हाला दाखवून दिले की आम्ही घर घेऊ शकतो‘, एकाने खुलासा केला. ‘छान. कदाचित मी जर तुम्हाला तेवढ्या स्पष्ट शब्दांत सुनावले नसते तर तुम्ही प्रयत्न वाढवले नसते. दुसऱ्या एखाद्या बॅंकेने किंवा तेथील अधिकाऱ्याने हीच गोष्ट तुम्हाला गोड शब्दांत सांगितली असती. मात्र परिणामी तुम्ही आजही तुमचे घर घेऊ शकला नसता. बऱ्याचदा काय असतं की प्रयत्न आणि इच्छाशक्ती प्रबळ असते. पण प्रयत्नांना "पुश‘ करण्यात आपण कमी पडतो. मी तुम्हाला फक्त "पुश‘ करण्याचे प्रयत्न केले. मल माहिती आहे की तुम्ही बाहेर जाऊन मला शिव्या घातल्या असतील. पण त्याचे मला काही नाही. कारण दोन कुटुंबांना त्यामुळे स्वत:च्या घरात जाता आले. महिन्या-दोन महिन्याला असेच ज्यांना मी निगेटिव्ह बोलतो ते मला पेढे द्यायला येतात. भरून येते. त्यावेळी निगेटिव्ह थॉट दिल्याचे दु:ख नव्हे तर "पुश‘ करून एनर्जी दिल्याचा आनंद होतो. लक्षात ठेवा कधी कधी तुमच्या आजूबाजूचा निगेटिव्ह थॉट तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देत असतो. मी तेवढेच करतो‘, अधिकाऱ्याने दीर्घ भाषण ठोकले.



"पण मग आम्ही तर तुमच्या बॅंकेतून कर्ज घेतले नाही. तरीही तुम्हाला आनंद...‘, एक मित्राने प्रश्‍न केला. "कोणत्या बॅंकेतून कर्ज घेता हा प्रश्‍न नाही. तुमचे स्वत:चे घर होणे महत्त्वाचे आहे. पुन्हा आमच्यावर काही लोक आरोप करतात की तुम्ही बिल्डर्सच्या फेव्हरमध्ये असता किंवा बिल्डर्सचा धंदा होण्यासाठी तुम्ही असे निगेटिव्ह थॉट देता. पण माझ्या मते माझ्यावर आरोप झाले तर एखादा स्वगृहात जात असेल तर मला त्याचे दु:ख नाही. शेवटी माणूस म्हणून आपले काही कर्तव्य आहे की नाही?‘ अधिकाऱ्याने पूर्णविराम दिला आणि दोघेही मित्र त्यांचे आभार मानत बाहेर पडले.

(Courtesy: eSakal.com)

Thursday, December 01, 2016

'माणूस महत्त्वाचा की गुरे?'

डोंगरकपारीत जंगलाच्या जवळ एक वाडी होती. त्या वाडीमध्ये त्यांचा मोठा वाडा होता. त्यांचं घराणं प्रतिष्ठित होतं. जंगलाच्या अलिकडे त्यांची 100 एकरपेक्षा जास्त जमीन होती. वाड्यात नोकरचाकर होते. दूध, तूप, लोण्यांसाठी आणि शेतकामासाठी गायी, बैल, म्हशी, गुरे होती. प्रत्येक कामासाठी स्वतंत्र नोकरमाणूस नेमलेला होता. घरात एक ज्येष्ठ गृहस्थ होते. या साऱ्या संपत्तीचे ते जणू काही सम्राट होते. त्यामुळे सारे त्यांना मालक म्हणून हाक मारत. त्याशिवाय मालकांचे तीन मुले आणि त्यांचे नातवंडे वगैरेंनी वाडा नटलेला होता. पहाटे साडेचारपासून वाडा जागा व्हायचा. रात्री अकरापर्यंत वाड्यात हालचाल सुरूच राहायची. मालक तसा व्यवहारी पण अत्यंत मृदु, नम्र आणि प्रेमळ होता. त्यामुळेच वाड्यातील अनेक नोकरमाणसे अनेक वर्षांपासून इमानइतबारे काम करत होती. मालकाकडे संपत्ती आणि समृद्धी तर होतीच. पण त्याशिवाय त्याच्याकडे माणुसकीही होती.

एकदा नेहमीप्रमाणे नेहमीचा माणूस गायी-गुरांना डोंगरकड्यावर चरायला घेऊन गेला. इकडे वाड्यात इतर नेहमीची कामे सुरूच होती. साधारण अर्ध्याच तासात तो धावत धावत आला. त्याला खूप घाम आला होता. तो प्रचंड भेदरलेला दिसत होता. अशाच अवस्थेत तो वाड्याच्या दाराशी येऊन धडकला. तो फक्त जोरजोरात ओरडत होता. "माऽऽऽऽलक माऽऽऽलक ..... वाऽऽऽऽऽऽऽ वाऽऽऽऽऽ‘, अशा हाका मारत तो मालकांच्या खोलीकडे जाऊ लागला. वाड्यातील सगळे नोकरचाकर "काय झालं? काय झालं?‘ म्हणत त्याच्या मागे धावू लागले. पण तो प्रचंड भेदरलेला होता. त्यामुळे तो कोणालाच दाद देत नव्हता. त्यामुळे वाड्याच्या मुख्य दारापासून मालकाच्या खोलीपर्यंत येताना गोंधळ निर्माण झाला. नेहमीप्रमाणे काम करणारा वाडा अचानक गोंधळून गेला. हे सारे वातावरण पाहून आत हिशोब मांडून बसलेला मालक त्याच्या खोलीच्या दाराशी आले. तेवढ्यात तो तिथे पोचला. आणि पुन्हा "माऽऽऽऽलक माऽऽऽलक ..... वाऽऽऽऽऽऽऽ वाऽऽऽऽऽ‘, अशा हाका मारू लागल्या. "अरे, शांत हो! काय झालं काय नीट सांग?‘, मालकांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण तो फक्त "माऽऽऽऽलक माऽऽऽलक ..... वाऽऽऽऽऽऽऽ वाऽऽऽऽऽ‘ एवढेच म्हणू लागला. मग काही वेळाने कोणीतरी मागून ओरडले, "मालक गुराजवळ वाघ आला वाटतं!‘ तेवढ्यात त्यानेही "होऽऽ होऽऽ वाघ वाघऽऽऽ‘ असे म्हणत समर्थन केले. त्यावर वाड्यात काम करणारा एक ज्येष्ठ माणूस जोरात धावत पुढे आला आणि "साल्या, जनावरांना, गुरा-ढोरांना तिथं टाकून इकड आलास होय र?‘, असे म्हणत त्याने ओरडणाऱ्या माणसाच्या कानाखाली जोरदार चपराक दिली. तेवढ्यात मालकांनी त्या कानाखाली मारणाऱ्या माणसाला खडसावले, "अरे, येडा आहेस की काय? त्यो एकटा. त्यो वाघ रानटी जनावर. कसा काय लढणार ह्यो त्या जनावरासोबत. आणि समजा एखाद्या गुरावर वाघाने हल्ला केलाच तर काय होईल? पर ह्यो माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा नाही का? तूच सांग मला शेवटी माणूस महत्त्वाचा की गुरे?‘

मालकांचे शब्द ऐकून काही वेळापूर्वी गोंधळून गेलेला वाडा पुन्हा निशब्द झाला.

(Courtesy: eSakal.com)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...