Showing posts with label anandyatri. Show all posts
Showing posts with label anandyatri. Show all posts

Sunday, July 11, 2021

आम्हाला एक मुलगी मिळेना, अन्‌...




दिवाळीच्या सुट्या संपल्या. ऑफिस सुरु झालं. दिवाळी सेलिब्रेशनच्या गप्पा रंगल्या. "काय मग यंदा कर्तव्य आहे ना?‘. लग्नासाठी मुली पाहणाऱ्या सहकाऱ्याची चौकशी सुरु झाली. "नाही राव, काय मुलींच्या अपेक्षा फार आहेत!‘, अस्वस्थ होत त्यानं उत्तर दिलं. "खरं तर तू लग्नच करु नकोस! लय कटकट असते राव. सारी जिंदगीच बदलून जाते‘, दोनच वर्षांपूर्वी लग्न झालेल्यानं अनुभव सांगितला. "पण लग्नाशिवाय जगण्याला काही अर्थ नाही. दोनाचे चार हात चाराचे मग...‘ एका सुखी विवाहितानं उत्तर दिलं. "अरे, तुमचे अनुभव लादू नका. त्याला त्याचा अनुभव घेऊ द्या. अन्‌ ठरवू द्या ना!‘, ऑफिसमधील एका स्कॉलरने विचार मांडला. काही काळ शांतता पसरली. पुन्हा स्कॉलर बोलू लागला, "काय आहे, की 1981-1990 या दहा वर्षांमध्ये मुलींचा जन्मदर कमी होता त्यामुळे या नव्या पोरांना मुली मिळत नाहीएत?‘, स्कॉलरने पुन्हा "स्कॉलर‘ विचार मांडला. "आणि ज्या आहेत त्यांच्या अपेक्षा फारच... हे नको, ते हवं. ते नको हे हवं‘, मुली पाहणाऱ्या अविवाहितानं त्याच्यासमोरील आव्हानं सांगितली. काही वेळातच सगळेजण आपल्या कामाला लागले. हळूहळू चर्चा थांबली.


दुपारच्या चहाची वेळ झाली होती. सर्वजण कॅंटीनमध्ये चहाला जमले. तिथं काम करणारा पोऱ्या चुणचुणीत होता. तो आनंदाने आणि उत्साहाने चहा देत होता. यांच्यामध्ये पुन्हा सकाळची चर्चा रंगली. "हा पोरा बघा. काय फिकर-बिकर काय नाय. दिवसाला पगार. दिवसाचा खर्च भागला. संपलं...‘ एकाने पोराची जिंदगी उलगडून सांगितली. तेवढ्यात चहा घेऊन पोरा आला. "का रे? कशी झाली दिवाळी? सुटी घेतली का नाय?‘, एकाने पोराला सवाल केला. "होय, सायब चांगली 15 दिवस सुटी होती‘, पोराने उत्तर दिलं. "अरे 15 दिवस काय केलस मग?‘, पोराशी संवाद वाढविण्यात आला. "काय, नाय लग्न केलं सायब!‘, पोराने लाजत उत्तर दिलं. "अरे, पण मागे एकदा तू लग्न केलसं म्हणाला होतास ना?‘, एका वरिष्ठ सहकार्याने सवाल केला. "हो! आता हे दुसरं लग्न होतं...‘, पोराने निरागसपणे उत्तर दिलं. त्यावर सर्वांना धक्काच बसला. "आयला, आमाला एक मुलगी मिळना अन्‌ तू दोन दोन लग्न...‘, अविवाहितानं नेमका मर्मावर बोट ठेवला. आता पोरा बोलू लागला, "काय आहे सायब की पटवून घेतलं, समजून घेतलं की भागून जातं. नाय पटलं, नाय आवडलं तर फारकत घेतलेली बरी. मी तसचं केलं. पहिल्या बायकोशी नाय पटलं. तिला, तिच्या घरच्याला बोलावलं. आपलं पटत नाय सांगितलं. कोर्ट, फिर्ट चक्कर नकोय. आमीच तिचं दुसरं लग्न लावून देऊ असं सांगितलं. झालं..‘ पोरा तेवढ्यातच थांबला. आता त्याच्या स्टोरीत सगळ्यांनाच इंटरेस्ट निर्माण झाला होता. "मग, पुढं काय झालं?‘ स्कॉलरने उत्सुकता दाखवली. पोरा पुन्हा बोलू लागला, "सायब, तिनं बी सांगितलं नाय पटत. शेवटी माझ्या गावाकडच्या नात्यातल्यानं त्याना मदत केली दुसरं लग्नबी लावलं. आता माजंबी लग्न झालं. ती खूष मी बी खूष!‘ पोराने स्टोरी पूर्ण केली अन्‌ तो निघूनही गेला.


"बघा, साधा चहा विकणारा पोरगा दोन-दोन लग्न करतो. आपल्याला शहाणपणा शिकवतो. बघा...‘, स्कॉलरनं उपदेश सुरु केला. "त्याचं काय रे त्याची जिंदगी साधी आहे. दिवस भागला. संपलं. आपल्याकडच्या पोरी भविष्याचा विचार करतात. प्रॉपर्टी बघतात...‘, अविवाहितानं त्रागा केला. त्यावर दुसरा एक सहकारी म्हणाला, "अरे पण कसलं भविष्य अन्‌ कसलं काय. चहा विकणारा पोरा काय बी करू शकतो भौ..‘ आता चर्चेत चांगलाच रंग चढत चालला होता. चहाचा कप रिकामा होत होता. चहावाल्या पोराला अनेकांना प्रश्‍न विचारायचे होते. त्यांनी त्याला पुन्हा आवाज दिला. पोरा आला. "काय रे? तुझी कमाई किती? बायको त्रास देत नाही का?‘ एकाने त्याला थेट सवाल विचारला. "सायब, पहिलीला पण मी लग्नाआधीच सांगितलं होतं. आपली कमाई एवढी. पुडं-मागं वाढलं. पर गॅरंटी नाय. वन रूम किचनचं छोटं घर बाप देऊन गेला. तीच प्रॉपर्टी. पर तिला नाय आवडलं. आपण बी जास्त इचार नाय केला. शेवटी इचार करून काय होतं सायब... जिंदगी महत्वाची ना..‘, पोराने तत्वज्ञानचं मांडलं. "लईच बोलतो रे तू....?‘, एकाने पोराची खेचली. त्यावर पोरा सुटलाच, "सायब, तुमच्या जिंदगीशी कंपेर करू नका आमाला. आमच्याकडं मोटं घर नाय. साधी दोन चाकाची गाडी बी नाय. रोजच्या रोज पगार. जे मिळलं त्यात सुख. आता घराजवळ एक चहाची टपरी सुरु केलीया. इथनं गेलं की तिथं धंदा सुरु. कमाई वाडतीया. रोज सुखानं झोप येतीया. बॅंकेच्या हप्त्याची कटकट नाय की हाय-फाय राहणीची... बापाने जिंदगी जगली. अन्‌ सोडली बी. बायको अन्‌ माय सोबत हाय... त्या बी टपरीसाठी मदत करत्यात... हप्त्यातून एकदा कोंबडं कापतो. महिन्यातनं एकदा गोड-धोड करतो. वर्षातनं एकदा फिरायलाबी जातो. एकाद्या दिवशी उपाशी झोपण्याचीबी तयारी हाय. काय जिंदगी असतीया अजून... दररोज पोटभर कष्टाची भाकर अन्‌ रोज रातच्याला शांत झोप...‘, पोरानं त्याचं आयुष्यच वाचून दाखवलं. आता सगळेच शांत झाले. तो तुलना करू नका म्हणत होता. पण सगळेजण स्वत:च्या जगण्याचीच त्याच्याशी तुलना करत होते.


सगळीकडे स्मशान शांतता पसरली. काही वेळाने स्कॉलर बोलू लागला, "काय असतं. मुलींच्या अपेक्षा जास्त आहेत असं नाही. मुलांच्या पण अपेक्षा असतातच. गोरी हवी, काळी नको. स्वयंपाक यायला हवा. गाडी यायला हवी. साडी घालता यावी. बाप श्रीमंत असावा. जावयाचा लाड करावा. बहिण-भाऊ शक्‍यतो नसावेत. आदी आदी...‘ आता अविवाहित बोलू लागला, "समजा, यापैकी एकही अपेक्षा नसेल तरीही मुलींच्या अपेक्षा असतातच ना?‘ "बीऽऽऽऽ कूल... अरे जी मुलगी आपली अख्खी लाईफ सोडून तुमच्याकडे येणार असते तिनं अपेक्षा ठेवल्या तर बिघडलं काय रे? तिने नक्कीच अपेक्षा ठेवाव्यात!‘ स्कॉलर पेटला.


आता वरिष्ठ सहकारी बोलू लागला, "शेवटी काय आहे की मुलगा असो की मुलगी प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडे काय आहे, आपल्या अपेक्षा काय आहेत, याचा एकूणात विचार हवा. शेवटी लग्न म्हणजे जीवनाचा प्रश्‍न असतो. प्रसंगी काही तडजोडी कराव्या लागतात. तडजोडींचं प्रमाणही ठरवायला हवं. अन्‌ त्या स्वीकारून आयुष्यभर परस्परांची साथ देण्याची हिम्मतही असावी. तसं झालं नाही तर प्रसंगी फारकत घेऊन दूर जाण्याचीही तयारी असावी. या पोरासारखी. जे आहे त्यात सुख मानायला हवं. जे नाही ते मिळविण्याचा प्रयत्नही अवश्‍य करावा. पण वास्तवाचं भान हवं. परस्परांना साथ द्यावी. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत... लक्षात ठेवा नवरा आणि बायको अखेरच्या क्षणापर्यंत सोबत असताता, इतरांची खात्री नसते...‘सर्व वातावरण गंभीर झाले. ‘सिरीयसली विचार करा मित्रांनो आणि मात्र आता चला काम पडलीत...‘ असं म्हणत स्कॉलरने पूर्णविराम दिला.


© व्यंकटेश कल्याणकर

Wednesday, July 07, 2021

‘‘तुम्ही हजारवेळा आमचं घरटं चोरा! आम्ही पुन्हा उभं राहू’’, घरटं चोरणाऱ्या माणसाला सुगरण पक्षाचं पत्र!

नमस्कार माणसांनो,

मी सुगरण बोलतोय. हो, बरोबर वाचताय. सुगरण पक्षी. तुम्ही म्हणाल पक्षी, प्राणी, कीडे-मुंग्या कधी बोलतात का? पण एखाद्याचं ‘घरटं’च कोणी चोरून नेलं तर तो शांत कसा बसेल? तुमच्यातीलच एका माणसाने नव्हे एका दैत्याने नव्हे एका चोराने पुण्यातून आमची १९ घरटी चोरून नेली. 


दुर्दैव बघा ज्या घरट्यात राहायचं नाही, जे घरटं स्वत:ला तयार करता येत नाही, एवढचं नव्हे तर जे घरटं चोरण्यासाठी ज्याला कापूनही घेता आलं नाही अशा नराधमानं आमचं घरटं चोरलं. एक-एक घरटं काढून घेता आलं नाही, म्हणून ‘त्या’ राक्षसानं झाडाच्या ज्या फांदीवर आम्ही १९ घरटी उभारली होती, ती संपूर्ण फांदीच तोडून नेली. काय म्हणावं त्या हैवानाला? 


आमच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल सांगण्याआधी आमच्याबद्दल तुम्हाला थोडं सांगावं लागेल. कारण अलिकडं तुम्ही माणसं पक्षी, प्राणी, आजबाजूचा भोवताल सोडा; तुम्हा माणसांना शेजारी असलेला माणूस जिवंत आहे की मेलाही याचीही जाणीव नसते. कारण तुम्ही स्मार्ट फोन हातात घेऊन खूप ‘स्मार्ट’ झाला आहात. त्या फोनमुळेच तर आमच्या कुळातील चिमण्यांना आपल्या डोळ्यादेखत आपल्या पिढ्या संपताना पहाव्या लागल्या. 


आमची संस्कृती थोडी वेगळी असते. आम्हाला कोणी सुगरण म्हणतं, कोणी बाया कोणी विणकर, तर कोणी गवळण म्हणून ओळखतं. आम्ही छानशा विहिरीवर घरटी बांधतो आणि तिथं बसून आमच्या प्रेयसीला (सुगरण मादी) आकर्षित करतो. त्या सुगरणीला जर घरटं आवडलं तर आमचा संसार सुरू होतो. 


आमच्या घरट्यात खालच्या बाजूने प्रवेश असतो. खालून निमुळते आणि लांब बोगदा असलेले घरटे वर गोलाकार होत जाते. वरच्या भागात दोन किंवा जास्त कप्पे असतात. गवत, कापूस, केस आणि इतर वस्तूंपासून आम्ही हे घरटं व्यवस्थित विणून तयार करतो. घरट्याच्या फुगीर भागात ओल्या मातीचा गिलावा असतो. आम्ही एकाचवेळी एकाच परिसरात एका पेक्षा जास्त घरटी तयार करतो. घरटं तयार करण्याचं काम आम्ही करतो. आमच्या सुगरणी घरट्यामध्ये एकावेळी २ ते ४ अंडी देतात. ही अंडी शुभ्र पांढऱ्या रंगाची असतात. अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे कामे मादी एकटीच करते. 


पहाटे लवकर उठायचं. घरट्याबाहेर पडायचं. विहिरीतल्या पाण्यात स्नान करायचं. उंच आकाशात उडायचं. दाणे शोधायचे. सुगरणीकडं द्यायचे. पिल्लांना चोचीतून भरवताना बघायचं. पुन्हा दाणे आणायचे. दिवस मावळला की घरट्याकडे परतायचं. असा आमचा दिनक्रम. दरम्यान आम्ही आमच्या पिल्लांना उंच आकाशात झेप घ्यायला शिकवतो. कोकिळाबाई, चिऊताई आणि मैनाबाई यांच्याकडून गाणं शिकायला सांगतो. सोबतच आपल्याला धोका असल्याशिवाय कोणालाही त्रास द्यायचा नाही, हे आम्ही आवर्जुन सांगतो. 


आमच्या घरट्याला तुम्ही माणसं खोपा सुद्धा म्हणता. कवयित्री बहिणाबाईंनी, ‘‘अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला, देखा पिल्लासाठी तिनं, झोका झाडाले टांगला’’ असं म्हणत आमचं कौतुक केलं आहे.


मागील काही दिवसांपासून मी माझ्या काही मित्र-नातेवाईकांसोबत पुण्यातील वारजे येथील एका छानशा टेकडीवर आम्ही राहत होतो. विहिरीच्या जवळ बाभळीच्या झाडावर प्रचंड मेहनतीनं घरटी तयार केली होती. दूरदूरवर जाऊन काडी, केस, माती शोधून, चोचीत धरून तयार केलेल्या आमच्या छानशा घरट्यात राहत होतो. त्यादिवशी मी प्रचंड थकलो होतो. पहाटेच्या हवेची मंद झुळूक, घरट्यातील उब अशा रम्य आणि स्वत:च्या घरट्यात शांतपणे आराम करत होतो. माझं घर सर्वार्थानं माझं होतं. कारण, आमच्यामागे ईएमआयची कटकट नव्हती. 


त्या रम्य वातावरणात आम्हाला अचानक भूकंपासारखा एकाएकी झटका जाणवला. खूप मोठा धोका असल्याचं आम्हाला समजलं. घरट्यातील आमच्या सुगरणी, पिल्ले हे सगळेजण जिवाच्या आकांतानं ओरडू लागले. एरवी इतर कीटक किंवा आमचे शत्रू हल्ले करतात, त्याची चाहुल आम्हाला आधीच लागते. आणि ते माणसांएवढे निर्घृण नसतात. ते हल्ला करतानासुद्धा हल्ल्याची काही नैतिकता पाळतात. 


मात्र, त्यादिवशी घडत असलेले हे सगळं अचंबित करणारं होतं. अचानकच झोपेत असताना हे सगळं घडत असल्याने काय होत आहे आणि काय करायचं आहे, हे कोणालाच समजत नव्हतं. उडत उडत बाहेर आल्यावर समजलं की पहाटेच्या अंधारात एक माणूस आम्ही ज्या फांदीवर घरटी बांधली होती, ती फांदी तोडत आहे. आम्ही पटकन आमच्या भाषेत सर्वांना जागृत केलं. आमच्या सुगरणींना, पिल्लांना आणि घातलेल्या अंड्यांना घरट्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तरीही आमच्यापैकी काही पिल्लांना, काही मित्रांना आणि काही सुगरणींना आम्ही वाचवू शकलो नाही, याचं आम्हाला खूप वाईट वाटलं. हे सगळं अगदी एक-दोन मिनिटांत घडलं. आमची १९ घरटी घेऊन एका माणसाची काळी आकृती पहाटेच्या अंधारात गायब झाली. स्वत:ला सावरता सावरता त्या नराधमाच्या मागे जाऊन त्याला जाब विचारायचं राहून गेलं. म्हणूनच हा पत्रप्रपंच.


आज आम्ही रस्त्यावर आलो आहोत. पण आम्ही सारे एकत्र आहोत. सोबत आहोत. कारण आमच्यामध्ये द्वेषाला स्थान नाही. आमच्यामध्ये भेदाभेदाची कोणतीही भिंत नाही. एकमेकांचे अश्रू पुसून पुन्हा नव्याने उभं राहण्याची ताकद आमच्या पंखांमध्ये आहे. आम्ही पुन्हा उभं राहू. पुन्हा काडी काडी गोळा करू आणि पुन्हा घरटी बांधू. आम्ही दुसऱ्यांची घरं चोरणारी ‘माणसं’ नाहीत, तर स्वत:च्या सामर्थ्यावर, माणसांना तयार करता येणार नाहीत अशी घरटी उभारण्याचं सामर्थ्य असलेले  ‘सुगरण’ आहोत. तुम्ही १९ काय १९ लाख घरटी जरी घेऊन गेलात, तरी आम्ही खचणार नाही. पुन्हा उभं राहू. 


पण त्या दिवशीचा अनुभव विचित्र आणि तुम्हाला ‘माणूस’ म्हणावं का यावर आम्हा पक्षांना पुन्हा विचार करायला लावणारा होता. पण आम्हाला आजही विश्वास आहे. तुमच्यातलं ‘माणूसपण’ आजही शिल्लक आहे. कारण आमच्यात द्वेषाला स्थान नाही. तर आदर, सन्मान आणि संरक्षणासाठी सामर्थ्य हे आमचं जीवन आहे. त्यामुळेच तर आम्ही आमच्या पिल्लांना स्वत:च्या जीवाला धोका असल्याशिवाय हल्ला करायचा नाही, हे शिकवतो. त्यांना फक्त प्रेमच करायचं शिकवतो. फक्त प्रेम.


तो माणूस कुठे आहे? त्यानं आमची १९ घरटी का नेली? त्याचं पुढे काय केलं? त्यानं असं का केलं? हे सगळं तुम्ही शोधालच. कदाचित त्या माणसाला तुमच्या कायद्यानुसार शिक्षाही होईल. कदाचित असे प्रकार याआधी अनेकदा घडलेही असतील. पण पुण्यातील या घटनेमुळे आमच्या मनावर माणूस म्हणून तुमची जी प्रतिमा होती, त्याला जो धक्का पोहोचला आहे, तो पुन्हा कधीही भरून येणार नाही. कधीच भरून येणार नाही.


चला, निघतो. पिल्लं, सुगरण रस्त्यावर आहेत. घरटं बांधायचं आहे.

© व्यंकटेश कल्याणकर

Saturday, March 21, 2020

प्रेरणादायी विचार... (04)

अवघ्या पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात  हे सारे विचार वाचून होतील.  मात्र प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास अवघं आयुष्य कमी पडेल फेसबुकवर लिहिलेले काही प्रेरणादायी विचार....







Saturday, November 16, 2019

मार्ग (लघुकथा)

`हॅलो, आज लवकर येशील? मला खूप बोअर होतयं रे!''
``हो... आज काही एवढं काम नाहीए येतो लवकर..''
ती, तो आणि त्यांचं फक्त सहा महिन्यांचं बाळ. गोंडस कुटुंब. ती नोकरी करायची. पण गरोदरपणाच्या आठव्या महिन्यात नोकरी सोडली. छानसं बाळ झालं. मुलगी झाली. 
दारावरची बेल वाजली. तो आला. तिनं त्याला मिठीच मारली आणि ठसाठसा रडू लागली.
``राणी , अगं काय झालं'' तो तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला.
``मला जगावसं वाटत नाही रे. खूप कसं तरी होतय रे.''
``तुझं काही दुखतय का? चल, मी डॉक्टरांना फोन लावतो. जाऊयात.''
``नाही रे. दुखत काही नाही. पण काय होतय तेच कळत नाही. म्हणजे बघ, पूर्वी कशी मी छानपैकी माझ्या प्रत्येक मिनिटा मिनिटाचं नियोजन करायचे. घर, ऑफिस, मित्र-मैत्रिणी, आपलं फिरणं, गप्पा किती छान जगत होते मी.''
``हो, काय भारी वाटायचं. आताही आपण हे सगळं करू शकतोच ना?''
``नाही रे. आता ही आलीय ना आपल्याकडं.''
``म्हणून काय झालं?''
``तिला घेऊन कुठं फिरणार अरे.''
``होईल ती लवकरच दोन-तीन महिन्यात सगळं ठीक होईल, राणी''
``बघ, दोन तासापासून त्रास देत होती. आता कुठं झोपलीय.''
``अगं बाळ आहे ते. त्याला काय माहिती आहे आपण जे करतोय त्यामुळं आपल्या आईला त्रास होतोय ते.''
``हो, अरे. पण ही झाल्यापासून या चार भिंतीतच मला जगावं लागतयं. ती तुझ्या आणि माझ्याशिवाय कोणाकडे जात पण नाही रे.''
``तिला पाळणारघरात ठेवून तू नोकरी करतेस का?''
``मला तर आता वाटतय की मी या घरातून पुन्हा बाहेर जाईल की नाही. माझं सगळं संपलयं राजा.'' असं म्हणत ती ढसाढसा रडू लागली.
त्यानं तिला गच्च मिठीत घेतलं. ``हे बघ, अगं ही आयुष्यातील एक फेज आहे. काळ निघून गेला की ही फेजही संपेल. तू पुन्हा तुझी नोकरी, तुझा पूर्वीसारखा कार्यक्रम सुरु ठेवशील.''
``मला तर आता असं काही वाटत नाही. ही फेज जाईपर्यंत मी राहते की...''
 तिच्या तोंडावर हात ठेवत तो बोलला, ``काहीही काय बोलते अगं, तू...''
``अरे, दिवसभर ती माझं आणि मी तिचं तोंड बघत बसते.  मलाही बोअर आणि तिलाही बोअर होत असेल.''
`हमममम'''
`कधी कधी वाटतं, आपण उगाच हिला जन्म...''
पुन्हा तिच्या तोंडावर हात ठेवत तो  म्हणाला, ``राणी, अगं.. असं ना बोलू..'
``मग मी काय करायचं दिवसभर सांग बरं तू?''
आता तो बोलू लागला, ``अगं सगळ्यात पहिल्यांदा तू हे असले विचार करणे सोडून दे. बी पॉझिटिव्ह. खूप काही करता येण्यासारखं आहे.''
``गप्पा मारणं सोप्पयं रे. दिवसभर तिच्याजवळ रहावं लागतं. तिला बघावं लागतं.''
``हो न. पण ती ज्यावेळी झोपते न त्या वेळेत खूप काही करता येतं.''
``काय? तेच तर सांग ना?''
``हे बघ,  ती झोपली की तू पुस्तक वाचू शकतेस, पेपर वाचू शकतेस.  टीव्ही पाहू शकतेस.''
``हे सगळं नाही आवडत मला.''
``मग तू फेसबुकवर मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारू शकतेस. चॅट करू शकतेस.''
``हे पुरुष लोक हरामखोर असतात अरे. थोड्या गप्पा मारायल्या की लागतात सलगी करायला...''
``असं नाहीए. पण असो. तू न तिला झोपवतेस कसं?''
``बाबा रे, तिला मांडीवर. मांडी हलवत गाणी म्हणत झोपवावं लागतं.''
``ओह. बघ तू जी गाणी म्हणतेस न ते रेकॉर्ड कर फोनवर...'
``आणि त्याचं काय करायचं?''
``फेसबुक, युट्युबवर आणि साऊंडच्या कितीतरी ऍप आणि वेबसाईटस् आहेत त्यावर अपलोड करायची गाणी.''
``बरं हे झालं. आणखी काय करायचं?''
`` रेडिओ ऐकायचा. त्यावर स्पर्धा असतात. त्यात भाग घ्यायचा.''
``आणखी''
``उद्या तुला एक डायरी आणून देतो. त्या डायरीत तुझ्या आयुष्यात चांगले वाईट प्रसंग लिहायचे आणि आयुष्यात पुढे काय काय करायचं आहे हे लिहायचं. दररोज किमान एक पान तरी लिहायचं.''
``हमम...''
``तू फक्त एवढं कर मनापासून. पुढचं पुढे सांगतो.'', असं म्हणत त्यानं तिच्या गालावर हळूवार किस्सू केला.

***

काही दिवसांनी...

`हॅलो, अरे राजा आज लवकर येशील का? मला न बक्षीस मिळालयं रेडिओच्या स्पर्धेत. ते आणायला जायचयं..''
``वॉव, ग्रेट. निघतो मी लवकर''

**

आणखी काही दिवसांनी... 
``राजा, अरे आज मी खूप खुष आहे.''
``काय झालं?''
``तू दिलेल्या त्या डायरीत मी आठवण म्हणून जी कविता लिहिली होती न. ज्याला पहिलं बक्षीस मिळालं होतं कॉलेजात असताना. ती आज पेपरात छापून आली आहे.''
``अरे व्वा. भारीच की''
``खूप जणांचे फोन आले. सोसायटीतील बायकांनीही फोन केलेला. खूप भारी वाटतयं. आता मी आठवड्यात एक तरी कविता लिहिणार.''
आज मी लवकर येतो.

सायंकाळी...
आल्या आल्या त्यानं तिला मिठीत घेतलं आणि हळूवारपणे केसावर हात फिरवत म्हणाला, ``हे बघ. महिन्याभरातच तू कशी फ्रेश झालीस. बी पॉझिटिव्ह राणी. आपल्याकडं करता येण्यासारखं खूप काही असतं. पण आपण वेगळा विचार कधी करत नाही. आपल्या अडचणींवर मात आपणच करायला हवी. छोट्या-छोट्या गोष्टीतून मोठा आनंद लुटायला हवा. लक्षात ठेव दूधात लिंबाच्या रसाचा एक थेंब जरी पडला तरी ते सगळं दूध नासून जातं अगदी एक थेंब किती तरी लिटर दूधाला संपवतं. तसचं आपल्या मनाचं असतं. मनाला एक वाईट विचारानं स्पर्श केला की आपली विद्वत्ता, हुशारी, प्रगल्भता नासून जाते. त्यामुळं मनाला कधी मळ चढू द्यायचा नाही. बस्स... बघ एवढं गोड बाळाला सांभाळत असतानाच तूच तुझ्या अडचणीवर मार्ग काढलास की नाही...''
``हो, रे माझ्या राजा आता मला आणखी काही कविता सुचताहेत. त्यांचं मी एक पुस्तक छापणार आहे.''
``ग्रेट... ग्रेट'', असं म्हणत असताना लाडानं तिनचं त्याच्या ओठावर ओठ टेकवला.

© व्यंकटेश कल्याणकर

#Anandyatri #VyankateshKalyankar

Wednesday, November 13, 2019

अलौकिक अमृतानुभावाचा अभूतपूर्व सोहळा


माणूस माणसांना जन्म देतो. माणसांची साखळी तयार होते. या साखळीचा प्रारंभ आणि अंत याचा विचार केला तर हाती केवळ तर्कच येतात. फार फार तर त्यांना थोडे फार किरकोळ संदर्भ असू शकतात.
आज या साखळीचा एक भाग होऊन वर्ष झालं. अर्थातच कन्या वल्लरी एक वर्षाची झाली. आजपासून बरोबर वर्षभरापूर्वी सकाळी 9 वाजून 32 मिनिटांनी अॉपरेशन थिएटरात वल्लरीनं जन्म घेतला. तर प्रसव वेदनेच्या महापूरात Pradnya तील आईनं जन्म घेतला. अन अॉपरेशन थिएटराबाहेर व्यंकटेश कल्याणकर नावाचा बाप जन्मला.
काही वेळानं मी वल्लरीला भेटलो. आपल्याच पेशींपासून तयार झालेला इवलासा देह आपल्याच डोळ्यांनी पाहणं, स्पर्शानं अनुभवणं आणि हा अदभूत सोहळा हृदयात साठवणं म्हणजे जणू एका अलौकिक अमृतानुभावाचा अभूतपूर्व सोहळाच.
पुढं वर्षभर त्या इवल्याशा जीवात हळूहळू जाणिवा, चेतना जागृत झालेल्या पाहणं रोमांचकारी होतं. प्रत्येक घटना, प्रसंग म्हणजे एक चैतन्यउत्सवच होता. तिला वेदना झाली की माझ्या काळजात कळ येते.. ती गोड हसली की काळीज रक्त निर्माण करायचं सोडून आनंदलहरी निर्माण करतं. हे सारं विलक्षण आहे. ही अनुभूती वाट्याला येणं जणू पूर्वसंचितच!
दोन महिन्यापूर्वी ती स्वतःच्या दोन्ही पायांवर उभी राहिली अन काळजात धस्स झालं. कारण आयुष्यात आणखी एकदा ती स्वतःच्या पायांवर उभं राहिली की आज मुठीत मावणारा तो जीव तेव्हा मिठितही मावणार नाही. विरहावेग असह्य होईल.
तिच्या लीला पाहून वाटतं आभाळातल्या सगळ्या चांदण्या तिच्या मांडीवर ठेवाव्यात. विश्वातल्या सगळ्या सूर्यांचा प्रकाश तिच्या पायाशी ठेवावा.
इवल्याशा लेकीच्या डोळ्यातील भाव वाचणं, तिच्या गरजा ओळखणं, त्या पूर्ण केल्यावर तिच्या इवल्याइवल्या डोळ्यातलं कृतार्थपणं अनुभवणं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून केवळ स्वर्गसुखच आहे. नव्हे नव्हे बाप नावाचा हा स्वर्गच जणू.
मी या लौकिक जगात असो अथवा नसो माझ्या काळजात ती अन तिच्या काळजात मी निरंतरपणे निवास करु हे निसंदेह!

Tuesday, November 12, 2019

प्रेरणादायी विचार... (03)

अवघ्या पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात  हे सारे विचार वाचून होतील.  मात्र प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास अवघं आयुष्य कमी पडेल फेसबुकवर लिहिलेले काही प्रेरणादायी विचार....









Tuesday, September 10, 2019

"आपला संपर्क तुटलाय, पण मी सुखरूप पोहोचलोय, काळजी नसावी" : चांद्रयानचं भारतीयांना पत्र.!

नमस्कार भारतीय बंधू-भगिनींनो

ओळखलत का मला? मी `विक्रम’. होय चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलेला `विक्रम’. तुमच्या कॅलेंडरप्रमाणे २२ जुलै २०१९ रोजी रोव्हर नावाच्या यानात बसून निघालेलो मी तब्बल ४७ दिवसांचा प्रवास करून अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचलो.

सोबत मी एकटा नव्हतो तर होती माझ्या कोट्यवधी भारतीय बांधवांची स्वप्ने. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा आणि तुम्ही तुमच्या श्रद्धा स्थानांसमोर हजारो प्रार्थना.



रोव्हर आज पहाटे बरोबर १ वाजून ३७ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागाशी समांतर येण्यासाठी विषुववृत्ताशी ९० अंशाचा कोन करत होता. तेव्हा तो चंद्राच्या पृष्ठभागापासून फक्त ३० किलोमीटर अंतरावर होता. पृष्ठभागाशी समांतर येण्यासाठी तो धडपड करत होतो.

६ हजार किलोमीटर प्रतितास एवढ्या गतीने चाललेला रोव्हर शून्य किमी प्रतितास एवढ्या गतीवर येऊन म्हणजे स्थिर होऊन पृष्ठभागावर थांबणार होता. तो पृष्ठभागावर उतरल्यानंतर मी चंद्रावर उतरणार होतो.

इथं गुरुत्वाकर्षण शक्ती नसल्याने रोव्हरला ३ ते ४ सेकंदात जवळपास ५० पेक्षा अधिक वेळा कोन बदलण्यासाठी प्रचंड हालचाल करावी लागली. यामुळे अवघ्या ८-१० मिनिटात माझ्या आत खूप उलथापालथ झाली.

त्यानंतर मी चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या २१०० मीटर अंतरावर पोहोचलो.

माझ्या आत उलथापालथ सुरुच होती. भूकंप झाल्यावर तुमच्या घरातली भांडी पडतात तसेच माझ्या आतील मजबूत बसवलेली यंत्रे इकडे तिकडे फिरू लागली.

आणि दुर्दैवाने पृथ्वीशी संपर्क करणा-या यंत्रणेवरही त्याचा परिणाम झाला आणि तुमच्याशी माझा संपर्क तुटला. पण माझे काम व्यवस्थितपणे सुरुच होते.

अखेर तुमच्या, माझ्या प्रयत्नांना, शुभेच्छांना यश मिळाले आणि आज पहाटे एक वाजून ५५ मिनिटांनी मी भारत माता की जय म्हणत इथं चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर सुखरुप पोहोचलो आहे. हे सांगताना मी यंत्र असूनही मला भरून येत आहे.

मी इथं एकटा नाही पोहोचलो. तुमची स्वप्नं, तुमची महत्वाकांक्षा इथं माझ्या अवतीभोवती उत्सव साजरा करत आहेत. मला सांगितल्याप्रमाणे मी बरोबर दोन विवरांच्या मधोमध उतरलो आहे.

माझ्या एका बाजूला `मॅंझिनस सी’ आणि दुसर्या बाजूला `सिंपेलियस एन’ ही दोन विवरं आहेत. ती आपल्या डोंगरांसारखीच आहेत. पण स्थिर नाहीत. ती हलत असल्यासारखं मला भासत आहे.

इथं सध्यातरी मला प्रकाश दिसत नाही. इथं हवा नाही. गुरुत्वाकर्षण शक्ती नाही. पाणी आहे की नाही माहिती नाही, त्याचा मी शोध घेत आहे.

पण कोट्यवधी भारतीय बंधूभगिनींच्या शुभेच्छांचा, आशीर्वादाचा, शास्त्रज्ञांच्या पराकोटीच्या प्रयत्नांचा ओलावा मला इथंही स्पष्टपणे जाणवतोय.

त्या बळावरच मी हळूहळू पुढे सरकतोय.

तुम्ही व्हॉटसऍपवर एखादा फोटो किंवा व्हिडिओ डाऊनलोड करताना जशी मध्येच रेंज जाते ना तेवढंच झालयं माझं. बाकी काही नाही.

माझा तुमच्याशी पुन्हा संपर्क होईल की नाही मला माहिती नाही. पण मी अखेरपर्यंत माझे काम चोखपणे पार पाडणार आहे. मी इथं चंद्राच्या पृष्ठभागाचे, विवरांचे, मातीचे छान छान फोटोज घेत आहे. मातीचे नमुनेही मी माझ्या पोटात साठवून ठेवत आहे.

हे सगळं घेऊन मला परत तुमच्यापर्यंत येऊन उत्सव साजरा करायचा होता. पण…

मी माझे काम चोखपणे बजावल्यावर माझे काय होईल याचा मलाही पत्ता नाही. कदाचित जोपर्यंत ब्रह्मांड आहे तोपर्यंत पृथ्वीच्या सौरमालेत निरंतरपणे दिशाहीन भ्रमण करत राहील किंवा क्षणार्धात माझी राखही होईल आणि ती राखच अनंत काळापर्यंत ब्रह्मांडात फिरत राहील.

पण जोपर्यंत मी ज्या चंद्रावर उतरलोय तो चंद्र आणि मी ज्या सूर्यमालेत फिरतोय तो सूर्य अस्तित्वात असेल तोपर्यंत कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांचे, त्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेचे प्रतिक म्हणून मी जिवंत असेल.

इथं ब्रह्मांडात आणि तुमच्या प्रत्येकाच्या हृदयात.

सलाम!!!

भारत माता की जय!

व्यंकटेश कल्याणकर

Saturday, June 10, 2017

भ्रमात राहु नका (बोधकथा)

गौतम बुद्ध काही शिष्यांना उपदेश करत होते. "आपण जे समजतो तेच सत्य आहे, असे कधीही समजू नका. कदाचित सत्य काही तरी वेगळेच असू शकते. सतत डोळे उघडे ठेवा. जाणीवा जागृत ठेवा.' असा उपदेश बुद्धांनी केला. त्यावर काही शिष्यांना अधिक विस्ताराने सांगण्याचा आग्रह केला. त्यानंतर बुद्ध एक गोष्ट सांगू लागले.

एका गावात एक गरीब व्यक्ती राहत होता. गावाबाहेरील एका वसाहतीत त्याची छोटीशी झोपडी होती. त्याला एक मुलगा होता. गंभीर आजारामुळे काही वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीचा मृत्यु झाला होता. त्यामुळे पत्नीनंतर त्यानेच आपल्या मुलाचे योग्य संगोपन केले होते. गावातील एका घरात तो व्यक्ती रात्रभर पहाऱ्याचे काम करत असे. मुलावर त्याचे प्रचंड प्रेम होते. मुलगा आता शाळेत जाऊ लागला होता. मुलगा सुरक्षित राहावा यासाठी तो दररोज मुलाला लवकर झोपवून बाहेरून कुलूप लावून कामावर जात असे. दुर्दैवाने एका रात्री तो राहात असलेल्या वसाहतीवर दरोडा पडला. दरोडेखोरांना त्याच्या मुलाला बाहेर काढले. झोपडीतील सर्व सामान लुटले. ज्या घरात माणसे नव्हते अशा शेजारच्या काही घरातील सामान लुटले. हा सारा प्रकार अगदी गुपचूप झाल्याने आजूबाजूच्यांना काहीच समजले नाही. मात्र दरोडेखोरांनी जाताना सर्व झोपडपट्यांना आग लावली आणि त्या व्यक्तीच्या मुलाला घेऊन ते फरार झाले.

दुसऱ्या दिवशी काम संपवून तो व्यक्ती घराकडे आला. त्यावेळी समोरचे दृश्‍य पाहून त्याला प्रचंड दु:ख झाले. झोपडी जळाली. आपला मुलगाही त्यात जळून गेला, असे त्याला वाटले. त्याने प्रचंड शोक केला. काही दिवसांनी दु:खातून सावरत त्याने पुन्हा पूर्ववत आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांत त्याने पुन्हा झोपडी उभी केली. त्या आधी एका डब्यामध्ये झोपडीतील थोडी राख एकत्र केली. आपला मुलगा नव्हे तर किमान त्याची राख तरी आपल्यासोबत कायम राहील, असे समजून तो राखेचा डबा कायम स्वत:जवळ बाळगू लागला. अशातच काही वर्षे गेली. एके दिवशी काम संपवून सकाळी-सकाळी तो राखेचा डबा घेऊन झोपडीत आला. झोपडीचे दार त्याने आतून बंद केले होते. त्याचवेळी दरोडेखोरांच्या तावडीतून सुटून त्याचा मुलगा त्याच्या दाराशी आला. बाहेरून जोरजोरात दार वाजवू लागला. "मी तुमचा मुलगा', असा आवाज देऊ लागला. मात्र आपला मुलगा तर केव्हाच मृत झाला आहे, असा समज करून बसलेल्या त्या व्यक्तीने स्वत:च्या मुलाकडेच दुर्लक्ष केले. शेजारच्या झोपडीतील मुले आपली गंमत करत असतील, असे समजून त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. खूप वेळ दार वाजवूनही दार न उघडल्याने मुलगा हताश होऊन पुन्हा दूर निघून गेला.

बुद्धांची गोष्ट संपली होती. मात्र शिष्यांची विचारप्रक्रिया सुरू झाली होती. बुद्ध सांगू लागले, "पाहा, "आपला मुलगा मेला' हा समज त्या व्यक्तीच्या मनावर एवढा खोल रूजला होता, की कदाचित सत्य काहीतरी वेगळेच असेल आणि आपला मुलगा जिवंत असेल एवढा विचार करण्याचेही त्याला भान नव्हते. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही जे समजता तेच सत्य असते अशा भ्रमात राहु नका.'
 
(Courtesy: eSakal.com)

Friday, June 09, 2017

क्षमायाचना (बुद्धकथा)

एका गावात एक मोठा व्यापारी होता. त्याला चार मुले होती. त्याची चारही मुले दररोज बुद्धांसमोर तीन-चार तास बसत होती. व्यापाऱ्याला प्रश्‍न पडला. मुले बुद्धांसमोर बसण्यापेक्षा दुकानात बसली तर जास्त नफा होईल, व्यापाऱ्याने विचार केला. एकेदिवशी व्यापारी मुलांच्या मागे गेला. मुले बुद्ध बसलेल्या ठिकाणी आली. बुद्ध डोळे मिटून शांतपणे बसून होते. त्यांच्यासमोर काही लोकही बसले होते. मुलेही त्यांच्यासमोर डोळे मिटून शांतपणे बसले. "त्यांनी डोळे मिटलेले आहेत आणि माझी मुलेही त्यांच्यासमोर डोळे मिटून बसलेली आहेत', हे पाहून व्यापारी संतापला. व्यापाऱ्याने बुद्धांना दूषणे देण्यास प्रारंभ केला. जोराजोरात वाईट बोलू लागला. तरीही सारे जण शांत होते. बुद्ध किंवा समोर बसलेले मुले काहीच प्रतिसाद देत नसल्याचे पाहत व्यापारी बुद्ध बसलेल्या ठिकाणाजवळ रागाने थुंकला आणि निघून गेला. बुद्ध, व्यापाऱ्याची मुले किंवा समोर बसलेल्यांपैकी कोणीही काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे व्यापारी निघून गेला.

त्या रात्री व्यापाऱ्याला झोप लागली नाही. आपण एवढी दूषणे दिली. एवढे वाईट बोललो. त्यांच्याजवळ थुंकलो. तरीही त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. इतर वेळी आपण कोणालाही एक शब्दही वाईट बोललो, तर लोक चिडतात. पण बुद्ध, त्यांचे अनुयायी मात्र शांत होते. कदाचित आपणच चुकीचे काम केले असेल. आपणच चुकलो आहोत, असा विचार व्यापारी करू लागला. त्याला रात्रभर झोप लागली नाही.

दुसऱ्या दिवशी उठून तो बुद्धांकडे गेला. बुद्धांना नमस्कार करून तो क्षमा मागू लागला. "मी जे केले आहे. त्याचा मला पश्‍चाताप होत आहे. कृपया मला माफ करा', व्यापारी विनंती करू लागला. मात्र बुद्धांनी अनपेक्षित उत्तर दिले, "मी तुला माफ करू शकत नाही!' त्यामुळे व्यापारी आणखी त्रस्त झाला. तो म्हणाला, "पण आपण मला का माफ करू शकत नाहीत?' त्यावर बुद्धांनी उत्तर दिले, "ज्याने काल दूषणे देण्याचे, थुंकण्याचे कृत्य केले तो तू नाहीस. माझा द्वेष करणारा काल रात्रीच निघून गेला आहे. आता माझ्यासमोर जो माणूस क्षमायाचना करत आहे त्याने काहीही चूक केलेली नाही. जर तू काहीही चूक केली नसेल तर मी कशासाठी क्षमा करावी?'
हे ऐकून व्यापाऱ्याने बुद्धांचे पाय धरले.

(Source: esakal.com)

Sunday, February 22, 2015

प्रेरणादायी विचार... (01)

अवघ्या पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात  हे सारे विचार वाचून होतील.  मात्र प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास अवघं आयुष्य कमी पडेल फेसबुकवर लिहिलेले काही प्रेरणादायी विचार....














Saturday, November 08, 2014

प्रेरणादायी विचार... (02)

अवघ्या पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात 
हे सारे विचार वाचून होतील. 
मात्र प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास अवघं 
आयुष्य कमी पडेल 
असे काही प्रेरणादायी विचार....









Related Posts Plugin for WordPress, Blogger...