Showing posts with label new technology. Show all posts
Showing posts with label new technology. Show all posts

Thursday, July 08, 2021

आभासी वास्तवाची (Virtual Reality) एक जादुई दुनिया


आपण तंत्रज्ञानानं समृद्ध झालेल्या एका अद्‌भूत जगात जगत आहोत. आज आपण जगातील कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या व्यक्तीला बोलू शकत आहोत, त्या व्यक्तीला आपल्या मोबाईल स्क्रीनवर पाहू शकत आहोत. बेडवर झोपून कोणतीही वस्तू खरेदी करू शकत आहोत. जिना उतरून जाईपर्यंत पुढील प्रवासासाठी दारात कार बोलवू शकत आहोत. भूक लागल्यानंतर हवं ते दारात येऊ लागलं आहे. अनोळखी ठिकाणी जाण्यासाठी मोबाईलला आपल्याला कसं जायचं, कुठं वळायचं हे सांगत मार्ग दाखवत आहे. लॉकडाऊननंतर तर शाळा, कॉलेज, बैठका आणि ऑफिस हे घराच्या हॉलमध्येच भरू लागले आहेत. तंत्रज्ञानाच्या उन्नत आविष्काराने साकारलेल्या एका अद्‌भूत जगात आपण जगत आहोत.

क्षणाक्षणाला नवा आविष्कार समोर येणारं जग अधिकाधिक जादुई होत चाललं आहे. जगणं सोप्पं करणाऱ्या या सर्व सुविधांच्या पलिकडे आता पुढे काय, हा प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे. आणि त्याचं उत्तरही तयार आहे. नजीकच्या काळात अनेक अकल्पिक, असंभवनीय आणि अद्‌भूत आविष्कार उदयाला येणार आहेत. त्यापैकीच सर्वांत महत्वाचं म्हणजे येणारं जग हे Virtual Reality अर्थात आभासी वास्तवाचं जग असणार आहे.


काय आहे Virtual Reality?

चौदाव्या शतकाच्या मध्यात Virtual हा शब्द अस्तित्वात आला. व्हर्च्युअल म्हणजे एक असा अनुभव किंवा असा परिणाम जो अस्तित्वात नाही. अधिक सोप्या भाषेत सांगायचं तर भौतिक अस्तित्व नसलेला मात्र संगणकीय प्रणालीद्वारे (सॉफ्टवेअर) तयार करण्यात आलेला अनुभव म्हणजे Virtual असं म्हणता येईल. या अर्थाने हा शब्द १९५९ साली सर्वप्रथम वापरण्यात आला. तर Reality चा सरळ सरळ अर्थ आहे वास्तव. थोडक्यात Virtual Reality म्हणजे संगणक निर्मित प्रतिमा ज्यामध्ये युजर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेसच्या माध्यमातून त्रिमितीय (Three Dimentional) स्वरुपातील कृत्रिम दृश्य, वातावरण किंवा परिणाम असलेल्या जगाचा अनुभव घेऊ शकतो.

Virtual Realtiy च्या जगात तुम्हाला फक्त तुमचे डोळे आणि कान या दोनच अवयवांचा वापर करावा लागतो. डोळ्यांना जे दिसतं ते आणि कानांना जे ऐकू येतं ते तुम्हाला खरं वाटू लागतं आणि त्यातूनच तुम्हाला एका वेगळ्या जगात प्रवेश केल्याचा अनुभव येतो. विशिष्ट प्रकारचे गेम्समध्ये तुम्हाला तुमचे हात, पाय मर्यादित स्वरुपात वापरावे लागतात.

जाणून घ्या EMV कार्डबद्दल…


कसं अनुभवयाचं Virtual Reality चं जग?

Virtual Reality च्या जगात प्रवेश करण्यासाठी तुमच्याकडं विशिष्ट इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस असणं गरजेचं आहे. त्याला VR Device म्हटलं जातं. अनेक ऑनलाईन शॉपिंग साईटवर तुम्हाला हा डिव्हाईस खरेदी करता येईल. यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. मात्र फेसबुकचा Oculus हा डिव्हाईस ऑल-इन-वन प्रकारातील सर्वांत लोकप्रिय डिव्हाईस मानला जातो. चष्म्यासारखा दिसणारा हा डिव्हाईस फक्त डोळ्यांवर परिधान केली की तुम्हाला त्रिमितीय दृश्ये, प्रतिमा, वातावरण दिसू लागतं. ज्यामुळं तुम्ही प्रत्यक्षात कुठे आहात हे विसरून समोर दिसणाऱ्या दृष्टीला काही काळापुरतं खरंखुरं जग (वास्तव) मानता.

VR डिव्हाईस डोळ्यांवर परिधान करून तुम्ही स्वत:भोवती ३६० अंशात फिरून त्या आभासी जगातील वेगवेगळ्या दृश्यांचा अनुभव घेऊ शकाल. डावीकडे, उजवीकडे, मागे, पुढे, वर आणि खाली प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्या आभासी जगातील वेगवेगळे दृश्ये दिसू शकतात. अर्थातच तुम्ही जे काही पाहत आहात, त्या प्रोग्रामच्या व्यापकतेवर हे अवलंबून आहे.

Virtual Reality चा वापर कुठे केला जातो?

सध्या तरी Virtual Reality चा सर्वांत लोकप्रिय वापर म्हणजे व्हिडिओ गेम्स किंवा चित्रपट पाहण्यासाठी होतो. मात्र, त्याही पलिकडे जाऊन वेगवेगळ्या शैक्षणिक आणि प्रशिक्षणाच्या ठिकाणीही Virtual Reality चा प्रभावी वापर करण्यात येत आहे. याशिवाय आपल्याला सहजपणे Virtual Reality चा अनुभव घ्यायचा असेल तर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील बहुतेक मॉल्समध्ये असा अनुभव घेता येतो. त्यामध्ये एखादा गेम खेळता येतो किंवा ज्युरासिक पार्कसारख्या ठिकाणाला भेट देता येते.

अतिशय उपयुक्त आणि प्रभावी-परिणामकारक ठिकाणी Virtual Reality वापर करण्यात येत. त्यापैकी काही प्रमुख वापर खालीलप्रमाणे -

लष्करी प्रशिक्षण : अमेरिकेतील नौदल, हवाई दल, सागरी आणि तटरक्षक दलांच्या प्रशिक्षणासाठी Virtual Reality चा प्रभावी वापर करण्यात येत आहे. याद्वारे प्रशिक्षणार्थींच्या डोळ्यांवर VR Device लावून त्यांना वेगवेगळ्या युद्धजनिक किंवा तत्सम परिस्थिती अनुभवण्याची संधी देण्यात येते. यातून कोणत्या परिस्थिती कसे वागायचे याबाबतचे प्रशिक्षण दिले जाते.

क्रीडा प्रशिक्षण : वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी Virtual Reality चा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. यामध्ये लष्करी प्रशिक्षणाप्रमाणेच वेगवेगळ्या परिस्थितीत खेळाडूने कशा प्रकारे प्रतिसाद द्यावा किंवा कोणता निर्णय घ्यावा यासाठी उपयुक्त ठरत आहे. या शिवाय अनेक ठिकाणी क्रीडा प्रेक्षकांनाही प्रत्यक्ष मैदानात राहून सामन्याचा आनंद घेण्यासाठी Virtual Reality चा वापर होत आहे.


मानसिक उपचार : मनोरुग्णांवर उपचार करण्यासाठी Virtual Reality तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त ठरत आहे. रुग्णाला ज्या गोष्टीची किंवा परिस्थितीची भीती वाटते, अशा गोष्टी किंवा परिस्थिती Virtual Reality मध्ये निर्माण करून रुग्णाला अतिशय सुरक्षित, नियंत्रित वातावरणात तसा अनुभव देण्यात येतो. यातून रुग्णाच्या मनातील भीती हळूहळू नष्ट करण्यात येते. मानवी समाजासाठी Virtual Reality चा हा सर्वांत सकारात्मक वापर असल्याचे मानला जाते.

वैद्यकीय प्रशिक्षण : लष्करी आणि क्रीडा प्रशिक्षणाप्रमाणेच वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी Virtual Reality चा वापर करण्यात येतो. यातून प्रशिक्षणाचा भाग म्हणून प्रत्यक्ष रुग्णाच्या शरीरावर उपचार करताना होणाऱ्या चुका किंवा त्रुटी टाळता येणे शक्य होते.

शैक्षणिक अभ्यासक्रम : विद्यार्थ्यांना शालेय-महाविद्यालयीन अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या संकल्पना समजून सांगण्यासाठी Virtual Reality चा वापर होत आहे. अवकाश-सौरमालेची सफर, समुद्राच्या-पृथ्वीच्या आतील जग, मानवी शरीरातील अंतर्गत रचना वगैरे क्लिष्ट बाबी विद्यार्थ्यांना सहजपणे कायमस्वरुपी लक्षात राहतील अशा पद्धतीने समजून सांगणे शक्य होते.

Virtual Reality चा असाही वापर शक्य!

नजीकच्या भविष्यात स्थानिक स्तरावर आणि सध्या आपण वापरत असलेल्या सोयीसुविधांसाठी Virtual Reality चा वापर वाढणार आहे. त्यापैकी काही उदाहरणे अशी असू शकतात –

ऑनलाईन खरेदी : सध्या आपण ऑनलाईन खरेदीमध्ये एखाद्या ऑनलाईन संकेतस्थळाला भेट देऊन आपल्याला हव्या त्या गोष्टी शोधून त्या खरेदी करतो. मात्र, Virtual Reality द्वारे हीच खरेदी प्रत्यक्ष ऑफलाईन खरेदीचा अनुभव देऊ शकते. Virtual Reality द्वारे ऑनलाईन खरेदीसाठी युजरला एक कॅरेक्टर तयार करावे लागेल. ते कॅरेक्टर Virtual Reality च्या जगात आपले प्रतिनिधीत्व करेल. त्यानंतर खरेदीसाठी आपण (आपले कॅरेक्टर) एका मोठ्या मॉलमध्ये प्रवेश करेल. तेथे सगळीकडे फिरून आपण आपल्याला हव्या त्या वस्तू आपल्या बास्केटमध्ये घेऊ शकतो. शेवटी चेक आऊट करून बिल पे करून आपण खरेदी पूर्ण करू शकतो. खरेदी केलेला माल ठरलेल्या दिवशी आपल्याला घरपोच मिळू शकतो.

ऐतिहासिक स्थळांना भेट : अनेक ऐतिहासिक स्थळांना प्रत्येकाला भेट देण्यासाठी Virtual Reality चा वापर करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे

प्राचीन काळाला-प्रसंगांचा अनुभव
: छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना अर्पण केलेला प्रसंग, काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर, रामायण-महाभारतातील काही प्रसंग इत्यादी प्राचीन ऐतिहासिक प्रसंगांचा अनुभव Virtual Reality द्वारे पुन्हा एकदा अनुभवता येऊ शकतो.

याशिवाय पर्यटन किंवा धार्मिक स्थळांना भेटी, बांधकाम व्यावसायिकांच्या नव्या प्रकल्पांचा (उदा. बंगला, फ्लॅट वगैरे) प्रकल्पपूर्तीपूर्वीच अनुभव इत्यादी ठिकाणीही आपण Virtual Reality चा वापर करू शकतो. केला जातो.

सॅटेलाईट फोनबद्दल सारं काही…


Virtual Reality निर्मिती प्रक्रिया

Virtual Reality मधील कंटेंटच्या निर्मितीची प्रक्रिया थोडीशी क्लिष्ट आणि दीर्घकाळ चालणारी असते. जेवढा Virtual Reality चा अनुभव समृद्ध, संपन्न आणि वास्तववादी वाटणारा हवा आहे, तेवढी त्याची निर्मिती प्रक्रिया गुंतागुंतीची, वेळखाऊ आणि खर्चिक असते. Virtual Reality Content तयार करण्यासाठी काय दाखवायचं आहे याचा प्लॅन तयार केला जातो. त्यासाठीचा आवश्यक तो सर्व्हे केला जातो. माहिती संकलित केली जाते. त्याप्रमाणे द्वीमितीय, त्रिमितीय प्रतिमा तयार केल्या जातात. त्यासाठी उच्च क्षमतेचे कॅमेरे, ड्रोन कॅमेरे आणि कॉम्प्युटर प्रोग्राम्सचा वापर केला जातो. यामध्ये 360 डिग्रीच्या फोटोजचा प्रामुख्याने वापर केला जातो. हे सगळं तयार करताना त्यांचा आकार वास्तववादी वाटावा यासाठी प्रत्यक्ष मानवी जगातील आकारांच्या प्रमाणात सर्व काही तयार केलं जातं. ॲनिमेशनद्वारे प्रतिमांची हालचाल दाखविली जाते. हे काम मानवी शरीररचनेचा (Anatomy) सुक्ष्म अभ्यास असलेले तज्ज्ञ करतात. हे सर्व करताना Virtual Reality ची अनुभूती घेणाऱ्या युजरच्या हालचालींचाही विचार केला जातो. विशेषत: युजरचे डोळे, डोक्याच्या हालचालींप्रमाणे दृश्यांची रचना केली जाते.

खरोखरचे मानवी चेहरे असलेले प्रत्यक्ष छायाचित्रण जर Virtual Reality content मध्ये वापरायचे असल्यास ते अधिक गुंतागुंतीचे आणि खर्चिक काम होते. कारण जो अँगल दाखवायचा आहे, त्या प्रत्येक ॲँगलमध्ये एकाचवेळी अनेक कॅमेऱ्यांचा सेटअप छायाचित्रण करतानाच करावा लागतो. एकदा का थीम तयार झाली की ती Virtual Reality Device मध्ये Install करण्यापूर्वी त्याची संगणकीय प्रोग्रामिंगद्वारे पुनर्रचना करावी लागते. या प्रक्रियेमुळे युजरच्या हालचालींप्रमाणे त्याला दृश्यांचा अनुभव घेता येतो. हे सगळं झालं की Virutal Reality Device वर हा Virtual Reality Content install केला जातो. समजा जर Device ला स्वतंत्र स्टोरेज क्षमता नसेल तर त्याला जोडलेल्या संगणक किंवा लॅपटॉपवर तो Content Install केला जातो. युजरला Virtual Reality चा अनुभव देता येतो.


Virtual Reality चा धोका

तंत्रज्ञानाची प्रगती होत असतानाच माणूस स्वमग्न होत चालला आहे. अर्थातच Virtual Reality च्या जगातही युजर अधिकाधिक स्वमग्न होतो. परिणामी वास्तवाचा विसर पडणाऱ्या या जगाचा आकर्षण निर्माण होऊन व्यसन लागण्याची शक्यता असते. याशिवाय Virtual Reality चा अनुभव घेताना मानवी नैसर्गिक पद्धतीशिवाय कृत्रिम आणि संगणकाने निर्माण केलेल्या प्रोग्राम्सद्वारे दिसणाऱ्या इमेजेसचे आकलन करून त्याप्रमाणे अनुभव घेण्यासाठी मेंदूकडून डोळ्यांवर दबाव निर्माण होतो. परिणामी डोळ्यांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. याशिवाय वास्त

Virtual Reality ची काही यशस्वी उदाहरणे


  • मानसिकदृष्ट्या वाईट परिस्थितीतून जात असलेल्या व्यक्तीला प्रेरित करून त्याला यशस्वी करण्यासाठी व्हर्च्युअल रिॲलिटी तंत्रज्ञानाचे बहुमोल मदत होत असल्याचे म्हटले आहे.

  • अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील डक विद्यापीठाने केलेल्या एका संशोधनानुसार रक्तातील हिमोग्लोबिनला परिणाम करणाऱ्या सिकलसेल आजारावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय उपचारासोबतच व्हर्च्युअल रिॲलिटीचा प्रयोग यशस्वी झालेला आहे.

  • युकेतील व्हर्जिन हॉलिडेज या पर्यटन क्षेत्रातील कंपनीने व्हर्च्युअल रिॲलिटीची प्रभावी वापर केला आहे. पूर्वनियोजित सर्व टूर्स हाऊस फुल्ल झाल्यानंतर आपल्या ग्राहकांना टूरची अनुभूती देण्यासाठी व्हर्जिनने व्हर्च्युअल रिॲलिटीद्वारे वेटिंगमुळे नाराज झालेल्या ग्राहकांना त्यांना अपेक्षित स्थळांची व्हर्च्युअल टूर घडविली, ज्यामुळे हेच अपेक्षित ग्राहकांनी त्यांचे टूर पॅकेज खरेदी केले आणि कंपनीची सेल ७० टक्क्यांनी वाढला.

  • पत्रकारिता क्षेत्रातही व्हर्च्युअल रिॲलिटीचा यशस्वी वापर करण्यात येत आहे. आतापर्यंत आपण बातमी फक्त पाहत किंवा वाचत होतो, मात्र ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने nytvr ॲपद्वारे बातमी घडत असताना प्रत्यक्ष तेथे उपस्थित असल्याचा अनुभव आपल्या प्रेक्षकांना देण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे.

  • मे २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियात ‘ईबे’ कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी तब्बल १२,५०० उत्पादने खरेदी करण्यासाठी व्हर्च्युअल रिॲलिटी स्टोअर खुले केले होते.

भारतासारख्या विकसनशील देशाने तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग ओळखून Virtual Reality च्या क्षेत्रात प्रगती करणं आवश्यक आहे. पुरेसे मनुष्यबळाच्या भांडवलावर सरकारसह, खाजगी संस्था आणि कंपन्यांनीही या सर्व Virtual Reality च्या जगात स्वत:ची क्षमता, सामर्थ्य आणि व्याप्ती ओळखून वेळीच गुंतवणूक आणि वेगाने निर्णय घेण्याची गरज आहे.

(यशदा यशमंथनमध्ये प्रसिद्ध झालेला लेख)

Friday, April 11, 2014

माहिती तंत्रज्ञान आणि ग्रामीण विकास

मित्रहो, आज आपण माहिती तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक युगात वावरत आहोत. संगणकाच्या समोर बसून आपण जगातील घडामोडी प्रत्यक्ष  डोळ्यांनी पाहू शकतो. क्षणार्धात जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात विविध माध्यमातून संपर्क साधू शकतो. अगदी कल्पनेपलिकडच्या विकासाच्या युगात आपण जगत आहोत. मात्र, हे सारे होत असताना आपल्या गावाच्या विकासात माहिती तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होत आहे याविषयी आज आपण जाणून घेऊयात.

ग्रामगीतेमध्ये तेराव्या अध्यायातील 103 आणि 104 व्या ओव्यांत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे.

सुंदर असावे वाचनालय। नाना ग्रंथ ज्ञानमय। 
करावया सुबुद्धीचा उदय। गांव लोकी॥
काय चालले जगामाजी। कळावे गावी सहजासहजी। 
म्हणोनि वृत्तपत्रे असावी ताजी। आकाशवाणी त्याठायीं॥

गावाला जगामध्ये काय चालले आहे याची माहिती व्हावी आणि त्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करावा असे तुकडोजी महाराजांनी विसाव्या शतकात म्हटले आहे. म्हणजेच तंत्रज्ञानाचा गावाच्या विकासासाठी उपयोग करण्याचे महत्त्व तुकडोजी महाराजांनी विषद केले आहे.

संशोधकांच्यामते तंत्रज्ञान म्हणजे समाजाने किंवा समूहाने त्यात समाविष्ट असणार्‍या सदस्यांच्या उदरनिर्वाहासाठी उत्पादन, वितरण आणि सेवांचा वापर यासंबंधी स्वीकारलेली एखाद्या विशिष्ट मशिनरी, तंत्रे आणि प्रणालींचा संच होय. सामाजिक-आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी समाजाने किंवा समूहाने नवीन किंवा काही तरी कल्पक, व्यवहार्य स्वरूपाचे तंत्रज्ञान स्वीकारणे आवश्यक असते. अलिकडच्या काळात असे तंत्रज्ञान विकसित झाले आहे.  दररोज तंत्रज्ञानात मोठी प्रगती आढळून येत आहे. सर्व क्षेत्र तंत्रज्ञानाने व्यापून टाकले आहे.

एकविसाव्या शतकात माहिती, तंत्रज्ञान आणि संवादाच्या क्षेत्रात अमुलाग्र क्रांती झाल्याचे आढळून येत आहे.  याचाच उपयोग ग्रामीण विकासासाठी करून घेण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विविध उपयोगांकरिता तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातून गावांचा विकास घडून येत आहे. तंत्रज्ञानाच्या  सहाय्याने कृषीक्षेत्रात तर दखलपात्र बदल घडून येत आहे. जमिनीच्या नोंदणीसंदर्भातील प्रक्रिया संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पूर्वीपेक्षा अधिक गतीने उपलब्ध होऊ लागली आहे. संगणकीय प्रणालीद्वारे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फत शेतकर्‍यांना उत्पादनाच्या किंमती मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून प्राप्त होऊ लागल्या आहेत. त्यावरून शेतकर्‍यांना बाजारभावाचा अंदाज येत आहे. जेणेकरून शेतकर्‍यांना त्याचा उपयोग अपेक्षित भाव देणारे उत्पादन घेण्यासाठी होत आहे. आपली शेती पूर्णत: निसर्गावर अवलंबून असल्याने शेतकर्‍याला हवामानाच्या अंदाजाची आवश्यकता असते. यासाठी दररोजच्या हवामानाच्या अंदाजासाठी विकसित करण्यात आलेल्या विविध संगणकीय प्रणाली शेतकर्‍यांना मार्गदर्शन करीत आहेत. ज्यामुळे अनपेक्षित नुकसान टाळता येणे काही अंशी शक्य झाले आहे. खुल्या झालेल्या माहितीच्या महाजालामुळे विविध उत्पादनांविषयी त्यांच्या लागवडीविषयी, त्या उत्पादनासाठी आवश्यक असणार्‍या भौगोलिक परिस्थितीविषयी, त्यावर पडणार्‍या संभाव्य रोगांविषयी, त्यासाठी आवश्यक असणार्‍या उपाययोजनेविषयी, सविस्तर माहिती घेणे शक्य झाले आहे. जेणेकरून शेतकरी ‘प्रगती’च्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. याबरोबरच शेतीमालावर कुठे कुठे काय संशोधन सुरू आहे, त्याचे काय निष्कर्ष आहेत, पिकाच्या नवीन जातींचे आगमन, प्रतिकारशक्ती, उत्पादकता याबरोबरच प्रक्रियेसाठी लागणार्‍या मालाचा दर्जा, उपलब्धता, बाजारभाव, क्षेत्राची निश्‍चिती, पुरवठ्याचा हंगाम इत्यादी अनेक गोष्टींची माहिती तंत्रज्ञानाच्या आविष्कारातून शेतकर्‍यांपर्यंत पोचत आहे. तसेच शेतीसंदर्भातील जोडधंद्यांविषयीही सविस्तर माहिती प्राप्त करणे शक्य झाले आहे.

गावातील ‘आठवडी बाजारा’लाही आता तंत्रज्ञानाची जोड देता येणे शक्य होऊ लागले आहे. आपल्या उत्पादनाची माहिती संगणकाच्या सहाय्याने इंटरनेटद्वारे जगासमोर मांडता येते. यामुळे व्यापार्‍यांना आपल्या शेतातील उत्पादनाची माहिती संगणकाच्या पडद्यावर पाहणे शक्य झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना त्यांचा माल अधिक लोकांपर्यंत पोचविता येणे शक्य झाले आहे. तसेच यातून उत्पादित केलेला माल लवकर विकला जाण्याची शक्यता अधिक वाढली आहे. महाराष्ट्र शासनाने महिला बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनांची माहिती देणारी देणारे संकेतस्थळाचे अर्थात वेबसाईटचे नुकतेच उद्घाटन केले आहे. www.mahalaxmisaras.org या संकेतस्थळावर राज्यातील 700 हून अधिक बचतगटांची माहिती, संपर्क क्रमांक आणि त्यांच्या उत्पादनाची माहिती देण्यात आली आहे. यातून या बचतगटांच्या उत्पादनांच्या प्रचार-प्रसाराकरिता नवे माध्यम उपलब्ध झाले आहे.

संगणक, मोबाईल्स आणि टॅब्लेटस् इत्यादी साधने म्हणजे तर नव्या तंत्रज्ञानाचा आविष्कारच म्हणावा लागेल. संगणकाने माणसाचं जगणच समृद्ध झालं आहे. ई-मेल, एसएमएसच्या माध्यमातून परस्पर संपर्कात राहता येणे तर शक्य झाले आहेच शिवाय संगणकाच्या सहाय्याने विविध कामे करून गावातील बेरोजगारांना नवा उद्योग मिळू लागला आहे. यातून गावामध्येच व्यवसायाच्या नवीन संधीही निर्माण झाल्या आहेत. तसेच गावात राहत असतानाच शेती किंवा एखादा जोडधंदा करीत असतानाच शैक्षणिक पात्रता वाढविणे शक्य झाले आहे. संगणक आणि इंटरनेटच्या सहाय्याने मुक्त विद्यापीठाच्या दूरशिक्षण अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. असे अभ्यासक्रम आपल्या गावात बसूनच पूर्ण करून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घरबसल्या शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे. ज्यायोगे गावातील युवकांना उच्च शैक्षणिक पात्रता धारण करणे शक्य झाले आहे. अल्प भांडवलात आपल्याच गावामध्ये संगणक प्रशिक्षण केंद्र उभे करता येणे शक्य झाले आहे. याशिवाय तिकिट बुकिंग, नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज, माहितीसाठी इंटरनेट सुविधा आदी सुविधा उपलब्ध असलेले केंद्र उभे करून स्वतंत्र व्यवसायाची संधी प्राप्त झाली आहे. ज्यातून नवा व्यवसाय निर्माण होऊ शकतोच आणि गावाला संगणकाचे ज्ञान दिल्याचे समाधानही मिळू शकते. याशिवाय गावाच्या ठिकाणी राहूनच इंटरनेटच्या माध्यमातून बहिस्थ पद्धतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगणक प्रशिक्षण घेता येणे शक्य झाले आहे. त्यामधून माहिती तंत्रज्ञान तसेच विविध क्षेत्रात उच्च पदांकरिता ग्रामीण युवक पात्र ठरत आहे.

मित्रांनो, पण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात तुम्हाला संगणक साक्षर असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठीही आता गावाच्या बाहेर जाण्याची गरज नाही. आता गावोगावी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा केंद्रांमार्फत माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेणे सोयीचे झाले आहे. एमएस-सीआयटी अर्थात महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञानातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त आणि प्रमाणित अभ्यासक्रमातून संगणक साक्षर होण्याची संधी प्राप्त झाली आहे. या अभ्यासक्रमामध्ये संगणकाच्या प्राथमिक माहितीपासून ते सॉफ्टवेअर, हार्डवेअर तसेच संगणकाशी संबंधित विविध उपकरणांची हाताळणी जसे की स्कॅनर, प्रिंटर इत्यादींविषयीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याकरिता तुमच्याकडे केवळ संगणक शिकण्याची इच्छाशक्ती आणि एसएससी अर्थात दहावी पास असणे आवश्यक आहे. मात्र दहावी पास असणे ही अट अनिवार्य नाही. याचाच अर्थ संगणक शिकण्याची इच्छाशक्ती असली तरी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. हा अभ्यासक्रम इंग्रजी आणि मराठी भाषेच्या माध्यमांसह हिंदी, गुजराती, तेलगु, कन्नाडा, माध्यमातूनही उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम तीन महिन्यांचा असून या अभ्यासक्रमाच्या शेवटी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येते. हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला कंपनीत डेटा एन्ट्री ऑपरेटर, कॉम्प्युटर ऑपरेटर अशा प्रकारची नोकरी मिळू शकते.

मनोरंजन क्षेत्राच्या प्रसारामध्ये माहिती तंत्रज्ञानामुळे अमुलाग्र बदल झाले आहेत. माहिती तंत्रज्ञानामुळे ग्रामस्थांना सेट टॉप बॉक्सच्या माध्यमातून दर्जेदार आणि विनाअडथळा मनोरंजन तसेच वृत्त वाहिन्यांचा आनंद घेता येऊ लागला आहे. त्याचप्रमाणे माध्यम क्षेत्रातही उल्लेखनीय बदल झाले आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून जगातील वृत्तपत्रे वाचता येणे शक्य झाले आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रतिक्रिया देण्यासाठी सर्वांना खुल्या असलेल्या विविध ठिकाणी अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्यही प्राप्त झाले आहे. एखाद्या सामाजिक प्रश्नावर संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधण्यासही तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. ज्यामुळे विकासाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. थोडक्यात, ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे ‘अवघे विश्वचि माझे घर’ ही उक्ती प्रत्यक्ष अनुभवली जात आहे. ग्रामीण भागात विविध कला आणि गुण असणारे अनेक कलाकार असतात. परंतु संधी न मिळाल्यामुळे त्यांच्या कलेची माहिती जगासमोर येत नाही. सोशल नेटवर्किंग माध्यमातून त्यांच्या जगासमोर प्रस्तुत करता येते. त्यामुळे त्यांना व्यासपीठ उपलब्ध होणे आणि त्यातून त्यांची कलाकार म्हणून जडणघडण होणे शक्य झाले आहे.

शासनाच्या विविध विभागांची संकेतस्थळे उपलब्ध असल्याने ग्रामस्थांना संबंधित कार्यालयांना थेटपणाने संपर्क साधण्याची सोय निर्माण झाली आहे. जेणेकरून शासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होत जाऊन सुप्रशासनाकडे वाटचाल होत आहे. शासनाचे महत्त्वाचे परिपत्रक, शासनाचे अध्यादेश, नवी नोकरभरती प्रक्रिया आदी माहिती शासनाच्या ुुु.ारहरीरीहीर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध होत आहे.
गावात काम करणार्‍या शासन नियुक्त प्रतिनिधींना, ग्रामपंचायतच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठीसुद्धा नव्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिखर प्रशिक्षण संस्था असलेल्या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या वतीने घेण्यात येणार्‍या अशा प्रशिक्षणांमध्येही नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. अगदी गावामध्ये प्रशिक्षण सुरु असताना, पुण्यामधून थेट प्रशिक्षण वर्ग प्रक्षेपणाद्वारे पाहता येणे शक्य झाले आहे. ज्याची प्रशिक्षण अधिक दर्जेदार होण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे प्रशिक्षणाच्या विविध टप्प्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.  प्रशिक्षण कार्यक्रमांची रचना, व्याख्यात्यांना निमंत्रित करणे, प्रशिक्षण सुयोग्य पद्धतीने पार पाडणे, प्रशिक्षणाचे मूल्यमापन करणे आदी प्रशिक्षण प्रक्रियेमध्ये संगणकाच्या विविध प्रणालींचा उपयोग करण्यात येत आहे. ज्यामुळे प्रशिक्षण अधिक रंजक, प्रभावी आणि सुयोग्य परिणाम साधणारे ठरू शकते. प्रशिक्षणादरम्यानही मल्टिमिडियाचा, चित्रफितींचा, स्लाईड शोज्चा, पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनचा वापर करण्यात येत असल्याने प्रशिक्षणातील विषय अधिक विस्ताराने समजावून सांगणे सोपे झाले आहे. अशा प्रकारे ग्रामीण विकासासंबंधी प्रशिक्षणामध्येही आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे.

संगणकाच्या मदतीने गावामध्येच बसून आता आपण आपल्या रेल्वे प्रवासाचे, बस प्रवासाचे आरक्षणही करू शकतो. याशिवाय वीज देयके भरणे, दूरध्वनी देयके भरणे इत्यादी कामांसाठीही आपण माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. मदत घेऊ शकतो. माहिती तंत्रज्ञानाच्या आविष्कारामुळे शासनातील रिक्त पदांकरिता अर्ज करण्याकरिता इच्छुक उमेदवारांना आता तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही. तर संकेतस्थळाच्या माध्यमातून इंटरनेट सेवा उपलब्ध असलेल्या ठिकाणाहून उमेदवारांना अर्ज करता येणे शक्य झाले आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या मदतीने शासनाच्या विविध विभागांच्या रिक्त पदाच्या भरतीसाठी संकेतस्थळांची निर्मिती करण्यात आली आहे. ज्यामुळे गावकर्‍यांचा वेळ आणि श्रम वाचतात.
याहीपलिकडे जाऊन काही कारणामुळे गावाबाहेर गेेलेल्या गावकर्‍यांना सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आपल्या गावाची माहिती, भौगोलिक परिस्थिती तसेच ताज्या घडामोडी आणि गावातील विविध कार्यक्रमांची माहिती उपलब्ध करून देता येणे शक्य झाले आहे. ज्यायोगे गावाबाहेर असलेल्या व्यक्तींना गावाशी जोडल्याचे समाधान तर मिळेलच. याशिवाय गावासाठी काही मदत, सहकार्य करावयाचे असल्यास त्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल. याशिवाय गावातील संगणक प्रशिक्षित वर्ग मिळून गावाची संपूर्ण अद्ययावत माहिती देणारा ब्लॉग तयार करू शकतो. ज्यातून गावाची सर्व माहिती एकाच ठिकाणी संगणकाच्या पडद्यावर कोणालाही पाहता येऊ शकेल. ज्यातून आपल्या संपर्कात नसलेल्या गावकर्‍यांपर्यंतही आपली माहिती पोचू शकते. आणि त्यांनाही निरनिराळ्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी हातभार लावता येऊ शकेल.
मंडळी, आता एवढी सारी साधनं आपल्याकडे असतांना केवळ त्यांचा सुयोग्य वापर करणं महत्त्वाचं आहे. चला तर मग, आपल्या आणि पर्यायाने गावाच्या विकासासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करूयात आणि आपल्या गावाचा विकास साधूयात. धन्यवाद!

(आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर झालेले भाषण)

Monday, December 02, 2013

ग्रामीण विकासात आधुनिक तंत्रज्ञानाची उपयोगिता

काळ्यारात्रीला पार करून शुभ्र सकाळ होते. सकाळी शेतकरी रानाकडे जातो. व्यापारी धनाकडे जातो. विद्यार्थी ज्ञानाकडे जातो. थोडक्यात काय तर माणूस आपल्या जगण्याकडे जातो. माणूस जगत असतांना सतत नाविन्याचा ध्यास घेत असतो. त्यासाठी विविध तंत्रांचा शोध घेत असतो. अगदी अनादी काळापासून तो नाविन्याच्या शोधात आहे. अशा नाविन्यातून नवं तंत्र विकसित होत असतं. अशा तंत्रातून तो आपलं जगणं अधिकाधिक सुकर करत असतो. म्हणजेच तो आपला विकास साधत असतो. आपल्या गावाच्या विकासासाठी नवतंत्रज्ञानाच्या उपयोगाविषयी आपण माहिती घेऊयात.

ग्रामगीतेमध्ये तेराव्या अध्यायातील 103 आणि 104 व्या ओव्यांत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे.

सुंदर असावे वाचनालय। नाना ग्रंथ ज्ञानमय। 
करावया सुबुद्धीचा उदय। गांव लोकी॥
काय चालले जगामाजी। कळावे गावी सहजासहजी। 
म्हणोनि वृत्तपत्रे असावी ताजी। आकाशवाणी त्याठायीं॥

गावाला जगामध्ये काय चालले आहे याची माहिती व्हावी आणि त्यासाठी आकाशवाणीचा उपयोग करावा असे तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे. म्हणजेच तंत्रज्ञानाचा गावाच्या विकासासाठी उपयोग करण्याचे महत्त्व तुकडोजी महाराजांनी विषद केले आहे.

संशोधकांच्यामते तंत्रज्ञान म्हणजे समाजाने किंवा समूहाने त्यात समाविष्ट असणार्‍या सदस्यांच्या उदरनिर्वाहासाठी उत्पादन, वितरण आणि सेवांचा वापर यासंबंधी स्वीकारलेली एखाद्या विशिष्ट मशिनरी, तंत्रे आणि प्रणालींचा संच होय. सामाजिक-आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी समाजाने किंवा समूहाने नवीन किंवा काही तरी कल्पक, व्यवहार्य स्वरूपाचे तंत्रज्ञान स्वीकारणे आवश्यक असते. अलिकडच्या काळात तंत्रज्ञानात मोठी प्रगती आढळून येत आहे. सर्व क्षेत्र तंत्रज्ञानाने व्यापून टाकले आहे.

अलिकडच्या काळात माहिती, तंत्रज्ञान आणि संवादाच्या क्षेत्रात अमुलाग्र क्रांती झाल्याचे आढळून येत आहे. याचाच उपयोग ग्रामीण विकासासाठी करून घेण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विविध उपयोगांकरिता तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातून गावांचा विकास घडून येत आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कृषीक्षेत्रात तर दखलपात्र बदल घडून येत आहे. प्रथम कृषीक्षेत्रातील काही नव्या तंत्रांची माहिती घेऊयात.

अलिकडच्या दशकात शेतीमध्ये नॅनो तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. नॅनो म्हणजे छोटा. 80 च्या दशकात जन्म घेतलेल्या नॅनो तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वनस्पतींमधील सुप्त गुणांवर प्रयोग करून नवीन जाती विकसित करण्यामध्ये शास्त्रज्ञांना यश प्राप्त झाले आहे. नॅनो चिप्सच्या सहाय्याने वनस्पतीमध्ये असणारी विविध जनुके यांची चाचणी केली जाते. त्यातून कोणते जनुक वनस्पतीच्या चांगल्या स्थितीत व आजारपणाच्या काळात स्थिरावते किंवा क्रियाशील राहते याची कल्पना येते. या नॅनो तंत्राचा वापर करून पिकांवर पडणार्‍या किडी आणि रोगाचे नियंत्रण करता येते. नॅनो यंत्र अथवा नॅनो उपकरणे यांच्या माध्यमातून वनस्पतीची सुदृढता करून घेता येते. याच तंत्राच्या सहाय्याने रासायनिक खतांचा मर्यादित वापर करून या खतांचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम व जमिनीचे प्रदूषण कमी करण्यास मदत होते. तसेच पिकांच्या उत्पादन क्षमतेच्या वाढीसाठीही या तंत्राची मोठी मदत होते. भाजीपाला साठवण व त्यावरील प्रक्रियेसाठी या तंत्राचा उपयोग करण्यात येतो. ज्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत तर होतेच मात्र त्यातून गावातील शेतकर्‍यांचा आणि पर्यायाने गावाचा विकास साधण्यास मदत होते. याशिवाय लेसरचा वापर करून शेताचे सपाटीकरण, शेतात रेन वॉटर हार्वेस्टिंग, जमिनीचे परीक्षण करण्याची पोर्टेबल किट वापरणे इत्यादी देखील नव्या तंत्रज्ञानाचे कृषि क्षेत्रातील उपयोगाची उदाहरणे देता येतील.

शेतीमध्ये नैसर्गिक संसाधनांच्या वापराला देखिल नव्या तंत्रज्ञानाची जोड देता येणे शक्य झाले आहे. सौर ऊर्जेचा उपयोग पाणी गरम करणे, पदार्थ शिजविणे याबरोबरच रात्रीच्या वेळी प्रकाश निर्माण करण्यासाठी होतो. अलिकडच्याच संशोधनाने आता आपली पिके, फलोद्यान, खुली कोठारे, कृषिभवने इत्यादींचे संरक्षणासाठीसुद्धा सौरऊर्जेचा वापर करणे शक्य झाले आहे. ‘सौर फोटोव्होटाईक विद्युत कुंपण’ या तंत्राद्वारे हे संरक्षण करता येऊ शकते. यामध्ये रक्षित करावयाच्या क्षेत्राला दिलेल्या कुंपणामध्ये सौरऊर्जेद्वारे सौम्य प्रमाणात वीज प्रवाहित केली   जाते. ज्याद्वारे रानटी जनावरे, गुरेढोरे इत्यादींनी विद्युत कुंपणाला स्पर्श केल्याबरोबर त्यांना 0.0003 सेकंद एवढा विद्युत धक्का जाणवतो, शिवाय ज्यातून त्या जनावरांना कोणत्याही प्रकारची दुखापत होत नाही. मात्र ती जनावरे पुन्हा त्या कुंपणाला स्पर्श करीत नाहीत आणि आपले क्षेत्र त्यांच्यापासून सुरक्षित राहते. या तंत्राला ‘सौर कुंपण’ म्हणूनही संबोधले जाते.

एखाद्या रोगाची लागण कोणत्याही प्रदेशात झाली तरी त्यावर त्या ठिकाणी वेळोवेळी केलेल्या योग्य आणि यशस्वी उपाययोजनेबाबतची माहिती आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून मिळते. ज्यामुळे आपल्याकडे तशी परिस्थिती निर्माण झाली तर त्यावर त्या उपाययोजनांची माहिती घेता येऊ शकते. तसेच अधिक उत्पादन देणार्‍या  नव्या प्रयोगांची माहितीही आपल्याला इंटरनेटद्वारे प्राप्त होऊ शकते. ज्यामुळे प्रयोगशील शेतकर्‍यांना नवे प्रयोग राबविण्यासाठी मोठी मदत होते. याशिवाय दररोजचे हवामान, वेधशाळेचा पावसाचा अंदाज इत्यादी माहितीदेखिल आपण इंटरनेटच्या सहाय्याने प्राप्त करून घेऊ शकते.

संगणक, मोबाईल्स आणि टॅब्लेटस् इत्यादी साधने म्हणजे तर नव्या तंत्रज्ञानाचा आविष्कारच म्हणावा लागेल. संगणकाने माणसाचं जगणच समृद्ध झालं आहे. संगणकाच्या सहाय्याने विविध कामे करून गावातील बेरोजगारांना नवा उद्योग मिळू लागला आहे. यातून गावामध्येच व्यवसायाच्या नवीन संधीही निर्माण झाल्या आहेत. तसेच गावात राहत असतानाच शेती किंवा एखादा जोडधंदा करीत असतानाच शैक्षणिक पात्रता वाढविणे शक्य झाले आहे. संगणक आणि इंटरनेटच्या सहाय्याने मुक्त विद्यापीठाच्या दूरशिक्षण अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. असे अभ्यासक्रम पूर्ण करून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घरबसल्या शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे. ज्यायोगे गावातील युवकांना उच्च शैक्षणिक पात्रता धारण करणे शक्य झाले आहे. अल्प भांडवलात आपल्याच गावामध्ये संगणक प्रशिक्षण केंद्र उभे करता येऊ शकते. ज्यातून नवा व्यवसाय निर्माण होऊ शकतोच आणि गावाला संगणकाचे ज्ञान दिल्याचे समाधानही मिळू शकते.
गावातील ‘आठवडी बाजारा’लाही आता तंत्रज्ञानाची जोड देता येणे शक्य होऊ लागले आहे. आपल्या उत्पादनाची माहिती संगणकाच्या सहाय्याने इंटरनेटद्वारे जगासमोर मांडता येते. यामुळे व्यापार्‍यांना आपल्या शेतातील उत्पादनाची माहिती संगणकाच्या पडद्यावर पाहणे शक्य झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना त्यांचा माल अधिक लोकांपर्यंत पोचविता येणे शक्य झाले आहे. तसेच यातून उत्पादित केलेला माल लवकर विकला जाण्याची शक्यता अधिक वाढली आहे.  

गावात काम करणार्‍या शासन नियुक्त प्रतिनिधींना, ग्रामपंचायतच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठीसुद्धा नव्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिखर प्रशिक्षण संस्था असलेल्या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या वतीने घेण्यात येणार्‍या अशा प्रशिक्षणांमध्येही नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. अगदी गावामध्ये प्रशिक्षण सुरु असताना, पुण्यामधून प्रशिक्षण थेट प्रक्षेपणाद्वारे पाहता येणे शक्य झाले आहे. ज्याची प्रशिक्षण अधिक दर्जेदार होण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे प्रशिक्षणाच्या विविध टप्प्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.  प्रशिक्षण कार्यक्रमांची रचना, व्याख्यात्यांना निमंत्रित करणे, प्रशिक्षण सुयोग्य पद्धतीने पार पाडणे, प्रशिक्षणाचे मूल्यमापन करणे आदी प्रशिक्षण प्रक्रियेमध्ये संगणकाच्या विविध प्रणालींचा उपयोग करण्यात येत आहे. ज्यामुळे प्रशिक्षण अधिक रंजक, प्रभावी आणि सुयोग्य परिणाम साधणारे ठरू शकते. प्रशिक्षणादरम्यानही मल्टिमिडियाचा, चित्रफितींचा, स्लाईड शोज्चा, पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनचा वापर करण्यात येत असल्याने प्रशिक्षणातील विषय अधिक विस्ताराने समजावून सांगणे सोपे झाले आहे. अशा प्रकारे ग्रामीण विकासासंबंधी प्रशिक्षणामध्येही आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे.

संगणकाच्या मदतीने गावामध्येच बसून आता आपण आपल्या रेल्वे प्रवासाचे, बस प्रवासाचे आरक्षणही करू शकतो. ज्यामुळे आपला वेळ आणि श्रम वाचतात. याशिवाय वीज देयके भरणे, दूरध्वनी देयके भरणे इत्यादी कामांसाठीही आपण संगणकाची मदत घेऊ शकतो.  याहीपलिकडे जाऊन गावाबाहेर असणार्‍या गावकर्‍यांना गावाच्या विकासात समाविष्ट करून घेण्यासाठी त्यांना गावातील परिस्थिती, हवामान, पीक-पाऊस, गावातील एखादी महत्त्वाची घटना इत्यादीं माहितीच्या देवाणघेवाणीकरिता ई-मेलचा, एसएमएसचा, मोबाईलचा वापर करता येणे शक्य झाले आहे. ज्यायोगे गावाबाहेर असलेल्या व्यक्तींना गावाशी जोडल्याचे समाधान तर मिळेलच. याशिवाय गावासाठी काही मदत, सहकार्य करावयाचे असल्यास त्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल. याशिवाय गावातील संगणक प्रशिक्षित वर्ग मिळून गावाची संपूर्ण अद्ययावत माहिती देणारा ब्लॉग तयार करू शकतो. ज्यातून गावाची सर्व माहिती एकाच ठिकाणी संगणकाच्या पडद्यावर कोणालाही पाहता येऊ शकेल. ज्यातून आपल्या संपर्कात नसलेल्या गावकर्‍यांपर्यंतही आपली माहिती पोचू शकते. आणि त्यांनाही निरनिराळ्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी हातभार लावता येऊ शकेल.

मंडळी, आता एवढी सारी साधनं आपल्याकडे असतांना केवळ त्यांचा सुयोग्य वापर करणं महत्त्वाचं आहे. चला तर मग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूयात आणि आपल्या गावाचा विकास साधूयात.

धन्यवाद!

Wednesday, November 06, 2013

ग्रामविकासात संतांची भूमिका

ग्रामविकासात संतांची भूमिका



आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर लोकजागर या कार्यक्रमात ‘ग्रामविकासात संतांची भूमिका’ या विषयावर पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या माध्यम व प्रकाशन केंद्रातील व्यंकटेश कल्याणकर यांचे प्रसारित झालेले भाषणातील संपादित भाग.

राम राम गावकरी मंडळींनो,

चांगलीच थंडी सुटली आहे ना! तुम्ही दिवसभर शेतातून थकून भागून आला आहात. शेतातील काळ्या आईकडे तुम्ही नेहमीच चांगलं धान उगवण्याची विनंती करीत असता. ते धान म्हणजेच तुमचं वैभव असतं. त्यातून तुम्ही स्वत:चा विकास साधता. तुमच्या गावातील प्रत्येक घरातील प्रत्येकाचा असा विकास म्हणजेच तुमच्या गावाचा विकास. एका एका गावाने मिळून देश बनतो. म्हणजेच तुमच्या गावाचा विकास पर्यायाने आपल्या देशाचा विकासच असतो.

आता, तुमचा विकास साधण्याचा मार्ग कितीतरी शतकांपासून संतपदाला पोचलेले व्यक्ति सांगत आली आहेत. चला, तर मग संत मंडळींनी तुमच्या म्हणजेच तुमच्या गावाच्या विकासाच्या बाबतीत काय काय सांगितले आहे याची माहिती आज आपण घेऊ.



Sunday, August 25, 2013

संगणक प्रशिक्षण

(आकाशावानिवारा दि. २३ जुलै २०१२ रोजी प्रसारित झालेले भाषण)

मित्रांनो,

या संपूर्ण सृष्टीत जेव्हा माणसाची निर्मिती झाली तेव्हापासून आजपर्यंत माणूस सतत संपन्नतेच्या, समृद्धीच्या आणि परमवैभवाच्या सिद्धतेकडं धाव घेत आहे. प्रचंड कष्टानं त्यानं निरनिराळं संशोधन करून आपला विकास साधला. अनादी काळापासून त्याला संशोधनाची आवड आणि गरज वाटत आली आहे. यातूनच सर्व सोयींनी संपन्न असं सुकर जगणं आपल्या वाट्याला आलं आहे. ‘अवघे विश्वचि माझे घर’ ही श्री.ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेली संकल्पना आज आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत. लाखो किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या व्यक्तीशी आपण अगदी सहज संवाद साधू शकतो. इतकंच नाही तर त्याला आपल्या संगणकाच्या पडद्यावर प्रत्यक्ष पाहू सुद्धा शकतो. काही शतकांपूर्वी ज्ञानदेवांनी मांडलेल्या सिद्धांताची अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जोड आणि त्याची प्रचिती म्हणजे मानवाने गाठलेल्या प्रगतीचा मोठा आविष्कारच म्हणावा लागेल.


Related Posts Plugin for WordPress, Blogger...